Tuesday 10 September 2019

सी. रामचंद्र

हिंदी चित्रपट संगीतात एकेकाळी स्वतःचे अधिराज्य गाजवणारे म्हणून सी. रामचंद्र यांचे नाव घ्यावेच लागेल. जवळपास १८ वर्षे ( १९४२ ते १९५८ ) त्यांनी हिंदी चित्रपट संगीतावर आपली छाप उमटवली. आता इतकी प्रदीर्घ कारकीर्द म्हटल्यावर मूल्यमापन करणे बरेच सोपे जाते आणि तसे मी करणार आहे. पंडित विनायकबुवा पटवर्धन (पुणे) आणि पंडित शंकरराव सप्रे (नागपूर) यांच्याकडून कलासंगीताचे पायाभूत शिक्षण घेतले. ही सुरवातीलाच सांगणे आवश्यक आहे कारण त्यांच्यावर बरेचवेळा पाश्चात्य संगीतचोर म्हणून आरोप केला गेला (वास्तविक मुळातल्या पाश्चात्य चाली आणि त्यांची पुनर्रचना केलेल्या आवृत्ती हा अभ्यासाचा वेगळा विषय आहे) परंतु त्याचबरोबर त्यांनी भारतीय धाटणीची जी गाणी दिली, तिकडे या टीकाकारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. भारतीय कलासंगीताचा पायाभूत अभ्यास केल्याचा त्यांना आपल्या कारकिर्दीत बराच फायदा झाला. किंबहुना, कलासंगीताच्या अभ्यासाचा एक अटळ परिणाम होतो परंतु या संगीतकाराने स्वररचना करताना, निव्वळ आधारभूत स्वर घेतले आणि आपल्या रचना सजवल्या. त्या कशा सजवल्या, याचेच इथे आपण विवेचन करणार आहोत आणि उचलेगिरीबाबत झालेली टीका किती कोत्या मनाची आहे, हे दर्शवून देणार आहोत. कारकिर्दीची सुरवात एक सुंदर हार्मोनियम वादक म्हणून झाली (साधारणपणे १९३९साली)  पण लवकरच त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आणि आपलया परिपूर्ण कारकिर्दीला आरंभ केला.कारकिर्दीत साधारणपणे २५० चित्रपटांना संगीत दिले (इतर भाषिक चित्रपट यात अंतर्भूत आहेत). 
आनंदी ,जवानीच्या जल्लोषाने भरलेले तसेच पाश्चात्य हलक्याफुलक्या संगीताने प्रभावित झालेले भारतीय संगीत असे ढोबळपणे म्हणता येते परंतु त्यांना संगीतचोर म्हणणे तितकेसे योग्य नाही. आपण हलक्याफुलक्या पाश्चात्य संगीताचे सुजाण श्रोते आहोत, असे ते वारंवार म्हणत असत आणि  त्यात तथ्य आहे. सर्वात महत्वाचा विशेष म्हणजे संगीतरचनेस वर्णनात्मक आशय देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षणीय होता. गायक म्हणून विचार करायचा झाल्यास, त्यांच्या गायनात एक प्रकारचा फसवा सहजपणा होता. गुणगुणल्यासारखे ते गातात असे वाटते. तुम्ही पण माझ्या सोबत गाऊ शकता, नव्हे तसे करा, असे जणू ते सुचवीत असत. 
"आना मेरी जान संडे के संडे" (चित्रपट शहनाई) या गाण्याने त्यांना खऱ्याअर्थी अफाट लोकप्रियता मिळाली. पाश्चात्य संगीताचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी या गाण्याद्वारे नवीन पायंडा पाडला असे म्हणता येईल. गीतरचनेची या संगीतकाराची एक खास सर्वसाधारण पद्धत अशी, की निवडकपणे हलके - विशेषतः नृत्याच्या अंगाचे - पाश्चिमात्य संगीत घ्यायचे आणि त्याला भारतीयता प्रदान करायची. यामुळे हिंदी चित्रपट संगीतात "रंबा संबा (गोरे गोरे)", "रॉक एन रोल (मिस्टर जॉन किंवा इना मीना डिका)" ही वळणे त्यांनी पक्केपणाने रुजवण्याचे काम त्यांनी केले. परिणामतः ओबो, सॅक्सोफोन, चेलो, ट्रम्पेट, ड्रम्स, स्पॅनिश गिटार, हार्मोनिका सारखी वाद्ये त्यांनी मुबलकपणे वापरली, यात काही नवल नव्हते. 
त्यांच्या बहुतांशी रचनांनी आजही लोकमानसावर परिणाम का साधावा, याची कारणे समजण्यासारखी आहेत. सर्वात प्रथम असे, चालीची बांधणी इतकी साधी आहे की ही गीते ऐकून कुणालाही आपण देखील गाऊ शकतो, असा विश्वास वाटतो. दुसरा विशेष असा, वापरलेले ताल आणि लयीपण सहज उचलण्यासारखे आहेत. यात शारीर हालचाली सहजपणे जमणे हा भाग महत्वाचा आहे. त्यासाठी पूर्वशिक्षणाची काहीही गरज भासत नाही. रचनांचे साधेपण हे असे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांतून एक वासनारहित मोकळेपणा खेळत असते. 
याचबरोबर या संगीतकाराने भारतीय संगीत परंपरांत बसू शकतील अशीही गीते यशस्वीपणे सादर केली आहेत. या संदर्भात "लोक","कला" आणि "जन" संगीतकोटींतील त्यांच्या रचनांचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. "ये जिंदगी उसीकी है" या गीतात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचे सतार वादन उल्लेखनीय आहे, याच वाद्याने पुढे, "मुहोब्बत ही ना जो समझे" या गीतात रंग भरला आहे. पहिल्या गीतात असाधारण चमकदारपणे वाजणारी सतार, या रचनाकाराने सहेतुकपणे दुसऱ्या गीताच्या शोकगंभीर परिणामास विरोधासंबंधी म्हणून योजली आहे, असे  वाटून जाते. "तू छुपी है कहाँ" या गीतामधील शहनाईचा वापर याच प्रकारचा आहे. "मालकंस" या "औडव" रागात बांधलेल्या चालीत शहनाईच्या भेदक आणि तीक्ष्ण स्वरवाक्यांतून एक साद वा हाक ऐकू येते. कालिक लय पुरवण्यासाठी बहुदा ताशा व नगारा ही काठीच्या आघाताने वाजणारी तालवाद्ये वापरली असावीत. आणखी एक सुरेख उदाहरण बघायचे झाल्यास, "कितना हंसी है मौसम" या गाण्यात "पिकोला" या उच्चस्वरी वाद्याच्या ध्वनीने या गीतात बासरी मुख्य चालीतून आतबाहेर करते. 
या संगीतकाराने काही अप्रतिम द्वंद्वगीते दिली आहेत. "ओ चांद जहाँ तू जाये" हे गीत लताबाई आणि आशाबाई यांनी गायलेले आहे. "वो हमसे चूप है" (सी. रामचंद्र आणि लताबाई), "गया अंधेरा हुवा उजाला" ( लताबाई + तलत मेहमूद), "भूल जाये सारे गम" ( नौशेरवाने आदिल), "तू छुपी है कहाँ" (आशाबाई + मन्ना डे), "गा रही है जिंदगी" ( आशाबाई + महेंद्र कपूर) ही सगळी गाणी ऐकावीत. यांत निरनिराळ्या आवाजात कुठलीही भावना आगळीवेगळी वाटली पाहिजे!! इथेच रचनाकाराचे कौशल्य पणाला लागलेले असते. फक्त चालच नव्हे तर त्या चालीचा आवाजानुसार बदलता रंगही ध्यानात आला पाहिजे. 
इतर रचनाकारांप्रमाणे हा संगीतकार आपल्या रचनासुत्रांतही भारतीय रागांच्या ठशांचा वापर समाविष्ट होताच. "कैसे जाऊं जमुना के तीर" (राग भैरवी), "ओ निर्दयी प्रीतम" ( राग भीमपलास), "जब दिल को सतावे गम" (राग जौनपुरी), "आधा है चंद्रमा" (राग मालकंस), "दिल लगाकर हम ये समझे" (राग पहाडी) इत्यादी गीते या संदर्भात लक्षात येतील. असे असले तरी या संगीतकाराला "बागेश्री" रागाने अधिक भावले होते. " ]राधा ना बोले", " जाग दर्द ए इष्क जाग" या गीतांत हा राग यथायोग्य वापरलाच आहे परंतु "मोहब्बत ऐसी धडकन है","हम कितना रोये", "मेरे जीवन मे किरन" ही गीते ऐकावीत. बागेश्री रागावर प्रक्रिया करून, त्याचा पुनर्रचित अवतार या गीतांतून घडवला आहे. 
पारंपरिक रचना वापरण्याशिवाय ( ये जिंदगी उसी की है - मूर्तिमंत भीती उभी किंवा कैसे जाऊं जमुना के तीर - याच नावाची भैरवी रागातील ठुमरी) त्यांनी अमलात आणलेले अधिक कुशल तंत्र म्हणजे स्वराकृती निर्माण करण्याची चित्रे अनुसरण्याची होय. 
उदाहरणार्थ "जब दिल को सतावे गम" किंवा "धीरे से आजा री" पहिल्या गाण्यात सरगम गायनाचे शास्त्रोक्त कंठ संगीतातील तंत्र वापरले आहे तर दुसऱ्या गीताचे जन्मस्थान उघडपणे मराठी स्त्रीगीतावर आधारलेले आहे. या संगीतकारावर जेंव्हा पाश्चात्य संगीताची उसनवारी करणारा अशी टीका होते, त्यावेळी प्रस्तुत रचना करताना पारंपारिक संगीताची योजना करणारा संगीतकार म्हणून लक्षात घ्यावे. 
त्यांच्या अनेक गीतांना विनोदी गीते म्हणता येईल. तसे बघता, आवश्यक ते शब्द असल्याशिवाय विनोद कसा आणायचा हा नेहमीच प्रश्न असतो. बरेचवेळा गंभीर संगीतापासून फटकून वागणारे ध्वनिपरिणाम योजणे, बरेचसे संगीतकार पसंत करतात. वास्तविक गीताच्या लयींपासून विनोद निर्मिती करता येते. उदाहरणार्थ - " ओ बेटा जी" (अलबेला) या गीतांत जलतरंग वाद्यानंतर स्वयंपाकघरातील भांड्यांचे आवाज ध्वनी लयीच्या चौकटीत बसवून वापरल्याने गीत अधिक वेधक झाले आहे. याच उलट बोलायचे झाल्यास "मेरे दिल की घडी" (अलबेला) या गीतांतील विनोदी आशय मोजक्या वाद्यांचा वापर आणि ढाल्या आवाजातील गायन, यामुळे अधिक वेधक झाले आहे आणि विनोदी आशय ठाशीवपणे समोर येतो. 
दुसरा वेधक विशेष असा म्हटले येईल, एकंदर नेहमीची संचालन गीते किंवा मिरवणुकीतून शौर्य, निषेध व्यक्त करणारी गीते त्यांच्या पसंतीच्या कक्षेत नव्हती. "यही पैगाम हमारा"(पैगाम) किंवा "देख तेरे संसार की हालत"(नास्तिक) या घेतांना कुशलतेने रचलेली गीते असे म्हणता येईल. याउलट चित्रपटबाह्य "ऐ मेरे  वतन के लोगो" हे गाणे. खरेतर हे गाणे चित्रपटबाह्य संदर्भाने अमर झाले पण गीताच्या चलनात ज्या प्रकारचा रुंजी घालणारा भाव, करुणार्त भाव आहे, तो विशेष जाणवणारा आहे. पण असे विधान नक्की करता येईल, या संगीतकाराला राष्ट्रगीते रचायला आवडले असते, असे वाटत नाही. 
प्रत्येक रचनाकार काही गीते अशी काही करतो जी रूढ अर्थाने धडाक्यात लोकप्रिय झाली नाहीत तरी देखील टी गीते ऐकल्यावर एक सूक्ष्म पण काहीसा अस्वस्थ करणारा परिणाम घडतो. काही वेळा परिणाम एकदम न जाणवता त्या गीतांच्या वारंवार श्रवणाने लक्षात येतो. अशा गीतांचे यथार्थ मूल्यमापन देखील अवघड जाते तरी नोंद घेणे आवश्यक. उदाहरणार्थ "तुम क्या जानो" (शिनशिनाके बुबलबू). हे गीत बागेश्री रागाची छाया घेऊन अवतरते. परंतु विशेष असा आहे, आपण शास्त्रीय राग वापरलाय, असे दाखवण्याचा अट्टाहास कुठेच दिसत नाही. तसेच आपण रागापासून कसे दूर गेलो आहोत, हे देखील दर्शविण्याचा प्रयत्न नसतो. या गाण्याच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, "रोये" शब्दावर कोमल गंधार ठेवून मग आवाहक गंभीरतेच्या शुद्ध धैवतावर अवरोह केला जातो. मग एकेक स्वरवाक्य येते आणि नंतर "षड्ज" या शांत स्वरावर विसावते. 
आता थोडक्यात मूल्यमापन - हा संगीतकार अष्टपैलू होता हे नि:संशय. त्यांचा रचनासंभार विपुलही आहे. सुरावटीचा प्रवाह खेळता ठेवणे जमत असे. काहीही करताना कसलाही प्रयास पडत नसे आणि संगीतरचनेतील त्यांचे हे सहजपण श्रोत्यांपर्यंत सहजपणे पोहोचत असे. त्यामुळे एखाद्या गीताने डोळ्यांत अश्रू आले तरी ऐकणाऱ्यास आरामदायी आनंद वाटे. त्यांचे संगीत सगळ्यांना समजे. अर्थात, ते संगीत साधे म्हणून समजे असे नसून, पुरेशा तांत्रिक प्रभुत्वामुळे आपले कौशल्य लपवून संगीत लोकांसमोर आणण्याची कला त्यांना साध्य झाली होती. हिंदी चित्रपट संगीताच्या रूढ शैलीविरुद्ध जाण्याचे धाडस दाखवले होते. त्यासाठी आपले वेगळेपण सिद्ध करण्याची त्यांना कधीही गरज भासली नाही. आपण कलाकार आहोत आणि ते पुरेसे आहे, हेच त्यांची भावना प्रबळ होती. संगीतकार म्हणून इथेच त्याचन्हे वेगळेपण सिद्ध होते. 

No comments:

Post a Comment