Monday 23 April 2018

कवितानुभूती - भाग ३

भावकाव्य हे स्वभावत:च वैय्यक्तिक अनुभवांची विशिष्टता शोधात जाणारे काव्य असते. अतितरल अशा भावच्छटांच्या झालेल्या जाणिवेच्या पुष्कळच जवळ वाचक जाऊ शकतो. काव्यात बरेचवेळा जाणवणारी दुर्बोधता, भावकवितेच्या बाबतीत बव्हंशी नसतेच असे देखील विधान करता येऊ शकते. त्यादृष्टीने बघता, एखादा वैयक्तिक अनुभव जेंव्हा काव्यरूप घेतो, त्यावेळी तो कवीच्या जाणिवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वतः:चे रूप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. काव्यरूप घेतानाच ती नाळ तोडणे आवश्यक ठरते. या दृष्टिकोनातून पुढे, "कवीची स्वतः:ची भाषा" निर्माण होऊन त्याचा अभिव्यक्तीवर सुद्धा परिणाम होतो. इथे एक बाब ध्यानात ठेवावी लागेल, काव्य हाही एका पातळीवरील संवादच असतो. आणि या संवादाचे वाहन भाषेतून निर्माण झालेले मान्य सामाजिक संकेत हेच असतात. असे असल्यामुळे या सामाजिक संकेतांच्या संदर्भातच कवीला आपला संवाद घडविता येऊ शकतो. कधी तो या संकेतांमधून, कधी या संकेतांना पाठीशी घालत पुढे जाऊन, तर कधी त्यांच्या विरोधात, पण नेहमी त्यांच्याशी संबंध राखूनच हे प्रस्थापित करावे लागते. कवीचा काव्योदगार हा त्याच्या स्वतः:खेरीज इतर कुणाकरताही असला तरी मग कवीची स्वतः:ची भाषा संभवतच नाही. तसे नसले तर मात्र प्रश्नच उद्भवत नाही, पण मग त्या वेळी काव्याला संवाद म्हणून अजिबात अस्तित्व नसते.
भावाकवितेत आशयाची बंदिश किती तऱ्हांनी करता यावी याला भावकविता या रुपाचेच बंधन असते. काळ व अवकाश यांच्या अगदी संकुचित अशा क्षेत्रात, अगदी थोड्याच घटकांच्या द्वारे अभिव्यक्ती घडवावी लागते. म्हणूनच एकदा का भावाकवितेचे एक क्षितिज गाठल्यानंतर त्यापलीकडील प्रगती म्हणजे अधिकाधिक संमिश्र व तरल जाणिवांना नेमके शब्दरूप देणे हीच असू शकते. ज्या भावच्छटा शब्दस्पर्शाने कोमेजतील, अशांना शंदस्पर्शानेच उमलविणे हीच कसोटी इथे असते. अर्थात यात काही धोके उद्भवू शकतात. कवीची काव्यसंपदेवरील आपलीच हुकूमत वाढलेली असते. ती हुलूमात कामी येऊ शकते पण कधीतरी अडचण देखील ठरू शकते. भावजाणिवेतील एखादी विशिष्ट छटा आधी शब्दांकित केलेल्या छटांहून किंचितशी निराळी असते. तिचे निराळेपण गवसले तर ठीक अन्यथा कवितेत आवर्तपणा येऊ शकतो. जीवनातील अनुभवांनी जाणिवेचे दृष्टिकोन बदललेले असतात, अशा वेळी क्वचित आधी जे स्थायीभावासारखे असते, तेच बंधनकारक ठरू शकते.
भावाकवितेबाबत आणखी एक ठाम विधान करता येणे शक्य आहे. आशय, रूप, घाट, रचना या सगळ्या घटकांतून कविता साकार होत असते पण तिला "कविता" हीच अभिव्यक्ती आवश्यक आहे का? कवितेखेरीज दुसरे कुठलेच रूप अशक्य आहे, असा प्रत्यय येणे जरुरीचे आहे का? कविता घडते शब्दांतून, आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे सगळे खरेच आहे पण हे सगळे "गृहीत" धरावे लागते कारण या सगळ्यांची जाणीव व्हावी लागते ती अखेर शब्दांतूनच. आशय गृहीत धरल्यावर रचनाकाराने पुढे काय केले, हेच सर्वार्थाने महत्वाचे ठरते. आणि इथे भाषेचा खरा कस लागतो, जोपर्यंत एखाद्या कवितेत आशय हा संपूर्णपणे भाषेतून वेढला आहे, प्रत्येक शब हा पूर्ण शब्द होऊन आला आहे आणि अभिव्यक्तीचे हेच रूप अपरिहार्य आहे आणि आशयाला वेधून घेताना माध्यमाच्या सर्व अंतर्गत शक्ती पणास लागल्या आहेत, असे जाणवत नाही, तोपर्यंत "कविता" ही पूर्णत्वाने सिद्धच होत नाही. इथेच साहित्याच्या इतर आविष्कारांत आणि कवितेत खरा फरक दिसतो. भाषा हा संस्कृतीचा गाभा आणि कविता हा भाषेचा गाभा! म्हणूनच कवितेला ही जाणीव पुर्णांशानं द्यावीच लागते.
भावाकवितेच्या रसग्रहणाच्या प्रवासात ही जाणीव सतत बाळगणे आवश्यक ठरते अन्यथा हाती असलेल्या कवितेत सगळे घटक आहेत पण प्रत्येक घटकाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. असे स्वतंत्र अस्तित्व राखणे, इथेच भावकविता फसते. आशयाने, घाटात, घाट रचनेत विरून जायलाच हवे तरच सुंदर भावकवितेच्या प्रत्ययाची जाणीव आपल्याला होऊ शकते. सामान्यत: कुठलाही अनुभव अस्पष्ट, अमूर्त, धूसर अशा रीतीने आपल्याला जाणवतो आणि त्याला रूप देण्याच्या प्रक्रियेत, अधिकाधिक स्पष्ट, आरेखित, मूर्त होत जातो. हे अमूर्ताचे मूर्तपण, भावकविता वाचताना भावले पाहिजे.

No comments:

Post a Comment