Saturday 14 April 2018

कवितानुभूती - भाग २

आपण प्रथम बघितलेल्या यांत्रिक, आणि नंतरच्या तर्कात्म आणि पुढे यांत्रिक मानसशास्त्रीय अशा टप्प्यातून जाणवणारी कवितेची बंदिश हे जाणिवेचे पुढील पाऊल म्हणता येईल. कारण अशा तऱ्हेच्या बांधणीत भावनाशायाची स्वतः:चीच प्रकृती शोधावी लागते. संमिश्र प्रेरणक्षेत्राचे स्वरूप शोधावे लागते. आणि तसेच करताना, भावकविता तिच्यातील साहचर्याचे एक-एक सूत्र पकडून साऱ्या अनुभवाचे दर्शन घडविते. अर्थात अशा तऱ्हेच्या बांधणीला देखील काही मर्यादा पडतात. या सूत्रात येऊ न शकणारे सखोल पातळीवरील अनुभव तिच्यातून निसटतात!! परिणामी भावनाशयाच्या संमिश्र स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या अंतर्गत ताणांचा, कधी कधी अगदी विरुद्ध दिशांच्या ताणांचा आणि त्यांच्या एकाच क्षणातील सहस्थितीचा प्रत्यय अशी बांधणी देऊ शकत नाही. भाववृत्तीने भारलेल्या क्षणांचे स्पंदन साकार करायचे भावाकवितेचे जे कार्य, त्याच्यावर आपोआप मर्यादा पडतात. खरे म्हणजे मानसशास्त्रीय सूत्रांमधील बंदिशही कार्यकारणभावाचाच संबंध शोधीत असते. खरेतर हा विषय मानसशास्त्रीय प्रबंध अधिक खोलवर हाताळू शकेल.
दुसऱ्या कशानेही होऊ शकणार नाही, एकच आहे, जे कला करू शकते.आणि या विषयापुरतेच लिहायचे झाल्यास, केवळ आणि केवळ भावकविताच करू शकते.ते म्हणजे भाववृत्तीने भारलेल्या  क्षणाची नेमकी प्रचिती देणे. त्या क्षणाच्या स्पंदनात जाणवणारे सगळे ताण शब्दांकित करणे आणि त्या क्षणाच्या जाणिवेतून भाववृत्तीकडे रसिकाला घेऊन जाणे. इथेच कविता ही भावकवितेचे शुद्ध शरीर अशी जी सौंदर्यात्मक बंदिश असते, तिच्याकडे अपरिहार्यपणे जाते.
बरेचवेळा भावकवितेत भाववाचक विशेषणांच्या साहाय्याने केलेले वर्णन आढळत नाही. परिणामाचा आणि त्याच्या कारणाचा तर्कात्म किंवा मानसशास्त्रीय सूत्रांधारे संबंध जोडला जात नाही. अशा कवितेचा परिणाम हा सर्वस्वी भाववृत्तीतील दोन घटकाच्या विशिष्ट संबंधामुळे होणारा परिणाम आहे. अशा कवितेत प्रत्येकाचे वजन, गती, दिशा व लय हे घटक सर्वस्वी वेगळे असतात. असे वेगळ्या गुणवत्तेचे दोन घटक एकत्र आल्यानेत्यातील संघर्षाने त्या दोहोंत काही अंतर्गत ताण निर्माण होऊ शकतात आणि याच ताणाच्या जाणिवेत वाचकाला भाववृत्तीने भरलेल्या क्षणाचे स्पंदन जाणवू शकते. अशा सुसंवाद, विरोध अथवा तोल, या सौंदर्यतत्वानुसार घडविलेल्या बंदिशींमधून केवळ त्या क्षणाच्या स्पंदनाची प्रत्यक्ष अशी जाणीव होऊ शकते. आणि या दृष्टीने, भावनांशयांतील घटकांची बंदिश ही भावाकवितेला अधिक जवळची, असे सहज म्हणता येईल.
स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा प्रवास हा भावनाशाय या त्यांची यांत्रिक, तर्कात्म, मानसशास्त्रीय या तत्त्वांपासून सौंदर्यात्मक तत्वांवरील बंदिश हा प्रवाह काव्यात देखील दिसून येतो. अर्थात आपल्याला भावकाव्याचा सर्वस्पर्शी असा विचार करायचा नाही. कवितेचे रसग्रहण करणे, हा प्रमुख उद्देश आहे. उत्तम भावकवितेत भावनाशयातील सुक्षमतेकडे केलेला सक्षम प्रवास आकळता येतो.
आपण सुरवातीलाच बघितले, वर्तमानाच्या उंबरठ्यावर तोललेला भूत आणि भविष्याचा कालभाग आणि या दोन टोकांतील ताणलेली भाववृत्ती, हाच भावकवितेचा स्थायीभाव आहे. वर्तमानातील क्षणाच्या या दोन टोकांपासून बदलत असलेल्या अंतराने व त्यामुळे बदलणाऱ्या ताणाने, भाववृत्तीच्या सगळ्या छटा एकत्रित दिसतात. आणि अशा असंख्य तरल छटा, स्थायीभावाची असंख्य रूपे आपल्याला भावकवितेतून वाचायला मिळतात. जे सगळे शब्दांत पकडणे निरतिशय अवघड असते जरा वेगळ्या मुद्द्याने काही विचार स्पष्ट करून घेऊ. काव्यातील परिणामाच्या दृष्टीने काव्यातील लहानांतला लहान घटक हा शब्द किंवा शब्दसमूह न रहाता "प्रतिमा" हाच होतो. शब्दाचे शब्द म्हणून आवाहन शेवटी आपल्या मनातील त्या शब्दाभोवतीच्या मान्य अर्थाकृतीच्या संदर्भातच असल्याने त्याद्वारे घडवून आणता येणाऱ्या परिणामांना मर्यादा पडतात. प्रतिमा आपल्या सर्व संवेदनानुभवांना आवाहन करून त्यातील भाववृत्तीकडे घेऊन जातात. याचमुळे अनेक पातळ्यांवरील आणि अनेक छटा असलेल्या भाववृत्तीचा अनूभव देता येणे शक्य होते. 
मराठी भावकवितांत "निसर्ग" वेगवेगळ्या प्रतिमा घेऊन वावरत असतो, एका दृष्टीने भावकवितेचे एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. बरेचवेळा निसर्ग हा कालचक्राच्या गतीच्या जाणिवेतून ध्यानात येतो. ज्यावेळी प्रतिमा एक निसर्गाचे रूप म्हणून वापरले जाते तेंव्हा बव्हंशी परिणाम हा निसर्गरूपरून जाणवणाऱ्या कालचक्राच्या गतीचा एक क्षण पकडणे, असे एक स्वरूप दिसून येते. मग तिथे त्या गतीचा भाववृत्तीच्या लयाचे नाते जाणवले जाते आणि तिथेच संवेदनाविश्व आणि भाववृत्ती एकरूप होतात. तिथे मग प्रतिमेचा एक विशिष्ट ताण जाणवतो आणि या ताणांचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची स्पष्ट जाणीव होय!! अर्थात भावकवितेतील जाणिवेचा भाग जाणविणे म्हणजे एका अर्थाने संवेदनाविश्वाचा भाववृत्तीकडे प्रवास  शेवटी शब्दांचाच आधारे समजून घेणे. 
भाववृत्तीच्या क्षणात अंतर्गत ताणाच्या जाणिवेतून प्रत्यय देण्याचा खरा प्रयत्न. शब्द, शब्दांची विशिष्ट पद्धतीने केलेली गुंफण, त्यांच्यातून असे अनेक लय साकार होतात. थोड्या वेगळ्या शब्दांत  ,एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे आणि ज्या वेळी अस्तित्वाने स्थिर झाला असे वाटावे, त्या क्षणीच धक्का देऊन किंचित हलवायचा!! एखादी मंद लयीतील प्रतिमा निर्माण करायची, आणि तिच्यावर जाणीव हेलकावू लागली की तिच्यात एक द्रुत लय टाकायचा आणि या बदलाच्या धक्क्यातुन परिणाम साधायचा!! प्रतिमांची  उलटापालट करायची, एका प्रतिमेचा परिणाम दुसऱ्या प्रतिमेने पुसून टाकायचा, दोघींच्या मिश्रणातून एक तिसरीच प्रतिमे निर्माण करायची आणि या सगळ्या बदलत्या घटनांतून भाववृत्तीचा क्षण साकार करायचा. भावकवितेत बव्हंशी असाच सगळा खेळ चाललेला असतो. 
यातील पुढील मुद्दा असा येतो, भाववृत्तीतीलअनुभवाचे घटक जेंव्हा एकमेकांशी संबद्ध होतात, तेंव्हा त्यांना अंत:केंद्रित करणारे जे सूत्र असते, ते त्या भाववृत्तीचे स्पंदन. या स्पंदनाचा लय म्हणजे त्या भाववृत्तीचा लय आणि हा लयच भावकवितेला भावकविता बनवतो!! शब्द, शब्दसमूह, ओळी, ओळीओळींतून कविता प्रगट होत असताना येणारे अवकाशाचे व विश्रांतीचे टप्पे, कवितेच्या दृश्य रचनेने संचालित केलेले कवितेचे आपल्या मनातील वाचन - या सर्वांचा मनावर होणाऱ्या परिणामातून हा स्पंदनाचा  ठरते.

No comments:

Post a Comment