Sunday 21 August 2022

जाने क्या ढुंढती रेहती है ये आँखे

"यही है आजमाना तो सताना किसको कहतें हैं, अदू के हो लिये जब तुम तो मेरा इम्तहां क्यों हो" (मिर्झा गालिब) मिर्झा गालिब हे उर्दू साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठित नाव, जवळपास १५० वर्षे उलटून गेली तरीही आजही त्यांच्या रचनांचा अन्वयार्थ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लावला जातो. इतके भाग्य फार थोड्या कवींना लाभले आहे. म्हटले तर गालिब यांच्या रचना सरळसुत असतात परंतु मध्येच एखादा *अनवट* उर्दू शब्द येतो आणि मग ती रचना किंवा शेर एकदम अगम्य होऊन बसतो. ही शैली पुढे उर्दू शायरांमध्ये विस्तारत गेली. वरील द्विपदात *अदू* शब्द जरा अनवट आहे आणि त्याचा मराठी अर्थ *आले* अशा क्रियापदाच्या अनुषंगाने घेतला जातो आणि मग ही द्विपदी अगदी सोपी होऊन जाते. गंमत हीच असते, आपण जेंव्हा वाचायला घेतो तेंव्हा आपल्याला सगळे आयते ताटात वाढलेले, हवे असते पण स्वतःहुन वाढून घ्यायचे म्हटल्यावर त्रास होतो. कुठल्याही कविता किंवा उर्दू शायरीबाबत सर्वसाधारणपणे हाच अनुभव असतो. हीच द्विपदी आजच्या आपल्या गाण्यातील शायरीबाबत सन्मुख होते. या शायरीचे कर्ते आहेत, कैफी आझमी, दुसरे उर्दू शायरीमधील वजनदार नाव. कैफी म्हटले की लगेच त्यांची *डावी विचारसरणी* आणि तद्नुषंगाने केलेल्या कविता लक्षात घेतल्या जातात. अर्थात हे एकांगी आहे, जरी कैफी यांच्या रचनांमध्ये डावी विचारसरणी, अगदी प्रणयी थाटाच्या रचनांतून देखील वाचायला मिळते. कैफी प्रामुख्याने गाजले ते चित्रपटीय गाण्यांतून आणि चित्रपट म्हटला की तिथे अनेकविध प्रसंग असतात आणि त्यानुसार गाणी करणे क्रमप्राप्तच असते. चित्रपटात सातत्याने लिहून देखील सातत्याने ठराविक दर्जा कायम राखणारे शायर म्हणून कैफी यांचा सार्थ गौरव होतो. आता या गाण्यातील कवितेबाबत हेच मत आपले कायम राहील. गाणे अर्थात विरही प्रसंगावर आधारित आहे आणि ही भावना, मुखडा आणि पुढील तिन्ही अंतऱ्यात कायम राखली आहे. *राख के ढेर में शोला है ना चिंगारी है* ही ध्रुवपदातील दुसरी ओळ, सगळ्या कवितेचा आशय व्यक्त करते. वास्तविक राख म्हटल्यावर, न विझलेले निखारे डोळ्यासमोर येतात पण इथेच साहिर यांनी *शोला है ना चिंगारी* असे लिहून प्रणयातील व्याकुळता मांडली आहे . पहिल्या कडव्यातील आर्तता वाचण्यासारखी आहे. ध्रुवपदाचेच विस्तारित स्वरूप आहे परंतु जातिवंत शायर हा नेहमीच्या घिसापिट्या शब्दांचा वापर टाळून अर्थवाही शब्दांचा वापर केला आहे. *जिसकी तस्वीर निगाहो में लिये बैठी हो, मैं वो दिलदार नहीं उसकी हूं खामोश चिता*!! ओळी जरा शांतपणे वाचल्यावर ओळींच्या शेवटी आलेला *चिता* शब्द एकदम वेगळेच परिमाण देतो आणि असे अचानक वेगळे परिमाण देणे, ही उर्दू साहित्याची खासियत आहे. पुढे देखिलशाचं प्रकारचे विवेचन वाचायला मिळते. *कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊं, बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता*!! पहिल्या ओळीत *बाजार* शब्द आल्यावर पुढील ओळीत *खरीदार* शब्द लिहून आपल्या आशयाची पूर्तता केली आहे. मघाशी मी वर म्हटल्याप्रमाणे, डाव्या विचारसरणीचा शायर, त्याचे इथे देखील अंधुक का होईना प्रत्यंतर येते. कलाकाराचा मूळ स्वभाव, विचारधारा अशाप्रकारे त्याच्या निर्मितीत उतरत असतो, संगीतकार खय्याम हे उर्दू साहित्याचे जाणकार वाचक म्हणून ख्यात होते. त्यांच्या समग्र कारकीर्द लक्षात घेता, त्यांच्या गाण्यात *सक्षम कविता* ही दृश्यभान दाखवते. हे तर आहेच की स्वररचना करायला *कविता* मिळाली की संगीतकाराला देखील हुरूप येतो. खय्याम यांनी आपल्या कारकिर्दीत फार वेगवेगळ्या शैलीचे शायर निवडले/घेतले. जसे, साहिर, मजरुह, अली सरदार जाफरी,शहरयार सारखे, ज्यांना *नामचीन* शायर म्हणता येईल, असेच कवी घेतल्याचे दिसून येते. एकतर खय्याम यांच्या स्वररचना बुद्धीला *ताण* देणाऱ्या असतात आणि त्यातून मग अर्थवाही उर्दू शायरी असली की मग एकूणच सगळी रचना वेगळ्याच उंचीवर जाते आणि तिथे ती रचना रसिकांकडून बुद्धीचा प्रतिसाद मागते. अर्थात ज्यांना असा विचार करायचाच नसेल तर त्यांनी खय्याम यांच्या वाट्याला जाऊ नये. आता प्रस्तुत गाण्याकडे वळावे. गाण्याची चाल सरळ सरळ *पहाडी* रागावर आधारित आहे. खय्याम यांच्या बऱ्याच चालींत या रागाचे अंश सापडतात. असेही म्हणता येईल, खय्याम यांचा पहाडी राग अतिशय आवडीचा होता. असे असले तरी त्यांनी ज्या प्रकारे आपल्या रचनेंत वैविध्य दाखवले आहे, ते केवळ स्तिमित करण्यासारखे आहे. गाण्याची सुरवात अतिशय व्याकुळ करणाऱ्या सारंगीच्या सुरांने होते, आणि त्याच शांतपणे आपल्याला मोहम्मद रफींचा आवाज ऐकायला मिळतो. आता सुरवातीलाच पहाडी रागाचे जरी सूचन होत असले तरी एकूणच सगळे वळण शायरीच्या आशयाला धरून केलेले आहे. *जाने ! क्या ! ढुंढती ! रेहती ! है* * पप ! प.. ग ! ग गग रे ! रेरे ग (म) ग ! ग* ही सुरावट बारकाईने ऐकल्यावर प्रस्तुत रागाची अंधुकशी चुणूक आपल्याला मिळते. मी वर जे विधान केले होते, खय्याम यांच्या रचना ऐकताना, रसिकाकडे बुद्धीचा प्रतिसाद मागते, याचे इथे रोकडे प्रत्यंतर ऐकायला मिळते. जाणकारांना पहाडी रागाची जातकुळी नक्की माहीत असणार आणि त्या दृष्टीने बघायला गेल्यास, त्या रागात अशी *फ्रेज शोधून* काढणे, हाच खरा व्यासंग म्हणता येईल. धृवपदाच्या दुसऱ्या ओळीत देखील हेच ऐकायला मिळते. *राख के ढेर मे* *रे गग ! रेसा ! रेसा निध ! ध* *शोला है ना चिंगारी है* *रे सासा ! सा ! सा ! रे पगरे सा ! सा !* इथे मी मुखड्याच्या दोन्ही ओळींचे मुद्दामून २ वेगळे खंड केले जेणेकरून प्रत्येक शब्द आणि त्यातील अक्षर, यांचा संगीतकाराने केलेला अभ्यास आपणा सर्वांच्या ध्यानात यावा. आता पुन्हा पहाडी रागाचे चलन गुणगुणून बघितल्यावर संगीतकाराची व्यामिश्र बुद्धिमत्ता लगेच ध्यानात येऊ शकते. गाण्यात ३ अंतरे आहेत पण बहुतांशी सारखेच आहेत. अंतऱ्यांसाठी वेगवेगळ्या स्वररचना करणे हे बुद्धीगामी नक्कीच असते परंतु जर का मुखड्याची चाल तितकीच सक्षम असेल तर आवश्यकता नसते. असेही म्हणता येईल, मुखड्याच्या चालीत थोडे सूक्ष्म बदल करून, कवितेतील आशय अधिक वृद्धिंगत करता येतो. शेवटच्या अंतऱ्यातील ओळी मात्र चढ्या सुरांत घेतल्या आहेत कारण, पुन्हा त्या कवितेच्या अर्थाकडे वळून बघितल्यावर उत्तर सापडते. गंमत अशी आहे, या ओळी संपल्यावर क्षणभर शांतता आहे. प्रेमाचा बाजार आणि त्याचा खरेदीदार म्हटल्यावर, अर्थच सगळा भिन्न होतो आणि त्यामुळेच संगीतकाराने तिथे *शांतता* ठेवलेली आहे आणि मग पुन्हा मुखडा गायला जातो. परिणामी गाणे अधिक अंतर्मुख होऊन, आपल्या मनात जाऊन बसते. मोहम्मद रफींनी गाताना, आपली परिचित गायन शैली बाजूला ठेवली आहे.अर्थात याचे श्रेय जितके गायकाचे तितकेच संगीतकाराचे म्हणायला हवे. आपली स्वररचना कशाप्रकारे रसिकांपर्यंत पोहोचवायची, याचे प्रत्येक संगीतकाराचे आडाखे असतात आणि त्यानुरूप तो गायकांकडून गायनाची मागणी करतो. इथे हाच प्रकार घडला आहे. हे गाणे जेंव्हा बांधले गेले तेंव्हा रफी,एक प्रतिष्ठित नाव झाले होते आणि त्यांची काहीशी *नाट्यात्म* शैली लोकप्रिय झाली होती. संगीतकार खय्याम याबाबत एक दावा नेहमी करायचे, त्यांनी रफीसाहेबांना वेगळ्या आणि मूळ शैलीत गायला लावले आणि त्यांच्या आवाजातील भावविवशता काढून टाकली. हे किती पूर्णांशाने सत्य आहे,हे सिद्ध करणे अवघड आहे कारण जवळपास याच काळात संगीतकार रोशन यांनी देखील रफींना मध्य तसेच ठाय लयीत गायला लावले होते. एक नक्की, खय्याम यांच्या गाण्यांत रफींचा आवाज फार मृदू असतो आणि शक्यतो कवीच्या शब्दांना गोंजारणारा असतो. अगदी विरहाची भावना असली तरी त्यात संयत भाव आणून, अनक्रोशी दु:ख प्रगट करायचे. विरही भावना ही शेवटी अति वैय्यक्तिक असते आणि अत्यंत खाजगी असते. आपले खाजगीपण कुणी टाहो फोडून व्यक्त करेल का? हा विचार, त्यामागे असतो. अगदी मुखडा गाताना देखील, विरहाची संयत भावनाच ऐकायला मिळते तसेच कवितेत बरेच उर्दू शब्द आहेत आणि जसे प्रत्येक भाषेचा एक स्वतंत्र *लहेजा* असतो आणि तो सांभाळूनच भाषेचे प्रगट होणे, अधिक न्यायी असते. रफींनी आपल्या गायनात हे औचित्य पूर्णांशाने संभाळल्याचे प्रतीत होते. मला खरेच विस्मय वाटतो, इतके सर्वांगसुंदर गाणे आपल्या समोर आले तरी हे गाणे विस्मरणात का गेले? मोहम्मद रफींच्या निधनानंतर जी गाणी बाहेर आली , त्यात या गाण्याचा समावेश निदान मला तरी दिसला नाही. प्रत्येक गाणे हे आपले नशीब घेऊन येतो, हेच खरे. जसे खय्याम हळूहळू विस्मरणात गेले (कभी कभी किंवा उमराव जान, काहीप्रमाणात काही लोकांच्या स्मरणात आहेत) त्याच चालीत असे म्हणावेसे वाटते,इतके नितांतसुंदर गाणे विस्मरणात गेले!! जाने क्या ढुंढती रेहती है ये आँखे मुझमें राख के ढेर में शोला है ना चिंगारी है अब ना वो प्यार उस प्यार की यादें बाकी आग वो दिल में लगी कुछ ना रहा, कुछ ना बचा जिसकी तस्वीर निगाहो में लिये बैठी हो मैं वो दिलदार नहीं उसकी हूं खामोश चिता ज़िन्दगी हंस के गुजरती थी बहुत अच्छा था खैर हंस के ना सही रो के गुजर जायेगी राख बरबाद मोहोब्बत की बचा रखी है बार बार इसको जो छेडा तो बिखर जायेगी आरजू जुर्म, वफा जुर्म, तमन्ना है गुनाह ये वो दुनिया है यहाँ प्यार नहीं हो सकता कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊं बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता Jaane Kya Dhoondhti Rahti Hai - Mohammed Rafi - Dharmendra, Sulochana - YouTube

No comments:

Post a Comment