Wednesday 3 July 2019

भारती (शंकर) शेठ

काहीवर्षांपूर्वी विनयचा मला फोन आला होता आणि त्याने शाळेचा गुप WhatsApp वर काढल्याचे सांगितले आणि त्यात माझी वर्णी लावल्याचे देखील सांगितले. त्याआधी मी तसा इतर WhatsApp गृपवर होतोच पण आता शाळेचा गृप म्हटल्यावर मनात थोडी जिज्ञासा निर्माण झाली. त्यावेळी विनय आणि भारती हे दोघे गृपचे Admin होते. भारती त्यावेळी तरी डोळ्यांसमोर येत नव्हती. संजीवला मी फोन केला तेंव्हा त्याने मला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण फारशी काही ओळख पटली  नव्हती. पुढे विनयने गिरगाव चौपाटीवर भेटण्याचा घाट घातला आणि तिथे खऱ्या अर्थाने भारतीची ओळख झाली आणि तद्नुषंगाने "शंकरशेठ" नावाची महती!! नावामुळे सुरवातीला तरी मी भारतीशी थोडे अंतर राखूनच बोलत होतो. मळवलीच्या पहिल्या पिकनिकने मात्र हे बंध खऱ्याअर्थी तुटले. अर्थात पिकनिक निमित्ताने तेंव्हा विनयच्या घरी संध्या, मी आणि भारती यांच्या गाठीभेटी झाल्या पण घरात भेट होणे आणि बाहेर भेटणे, यात नेहमीच फरक असतो आणि तसा तो होता देखील. 
मळवलीच्या बसमध्येच भारतीने आपले "रंग" दाखवायला सुरवात केली. अगदी सहजपणे ती गृपमध्ये सामावुन गेली. कुठेही कसलाही नखरा नाही, आढेवेढे नाहीत. किंबहुना जमल्यास एकमेकांना शाब्दिक चिमटे काढण्यात पुढाकार. 
हे बघितल्यावर अस्मादिक खुश. पुढे उत्तरोत्तर ओळख चांगलीच वाढत गेली दोन, तीन वेळा तिच्या घरी देखील जाणे झाले, एका भेटीत तिच्या नवऱ्याशी गप्पा मारून झाल्या. पुढे पुढे तर, आमच्या गाठीभेटी बाहेर व्हायच्या तेंव्हा, विशेषतः बारक्या, सतीश करंदीकर आणि मी, जवळपास हक्काने तिच्या गाडीत प्रवेश मिळवायला लागलो. आजचा आपला जो गृप आहे, तो जमवण्यात नि:संशयरीत्या भारतीचा सिंहाचा वाटा आहे. आजही तिला तोच मान आहे किंबहुना काही मुली तर "भारती येत आहे ना, मग मी येणार!!" असे बोलून भेटायला (मुलांवर हा अविश्वास म्हणायचं का?😀😀) येतात. यात महत्वाचा मुद्दा असा, भारतीने इतरांचा मिळवलेला विश्वास!! मी तर तिला कितीतरी वेळा उगाचच फोन करीत असतो, काहीही कारण नसते पण फोनवर आमच्या खूप गप्पा होतात. आता गृप म्हटल्यावर रुसवे-फुगवे होणारच, त्यातून आपला मराठी लोकांचा गृप!! आत्तापर्यंत असे बरेच प्रसंग आठवतात, त्यावेळी गृपमाधील काही सभासद, नको तितके ताणत बसतात,  स्वतःचा अहंकार गोंजारत बसतात पण त्यामुळे इतरांची मज्जी खपा होत असते आणि अशा वेळी भारतीने पुढाकार घेऊन, पुन्हा सगळे सोपस्कार ठीकठाक केले आहेत आणि  मी या सगळ्यांचा साक्षीदार आहे. अशावेळी तिची "समजूतदार" वृत्ती लक्षणीय असते. कितीही मानापमानाचे प्रसंग आले तरी गृप तोडायचा नाही, हा तिचा खाक्या असतो (असे असून देखील तिने आणि इतर मुलींनी त्यांचा असा "खास" गृप तयार केला आहे!! पण त्या मागील कारणे वेगळी आहेत). 
चाळीस, पन्नास लोकांचा गृप एकत्र सांभाळणे तसे कठीणच असते आणि आपल्याकडे तर सगळेच "बुद्धीप्रामाण्यवादी"!! प्रत्येकाला असेच वाटते, "मी म्हणतो तो अखेरचा शब्द!!" अशा चंबूगबाळ्यांना तिने एकत्र ठेवले आहे. गृपचा कुठलाही कार्यक्रम ठरवायचा झाल्यास, पहिली "हाकाटी" घातली जाते, ती भारतीच्याच नावाने!! कधीकधी अकारण आढेवेढे घेते पण अखेर निदान मुलींमध्ये तरी तिचा शब्द अखेरचा मानला जातो. त्यातून, तिचे संबंध अनेक ठिकाणी जोडलेले  असल्याने, कार्यक्रम करणे, त्याची जुळणी मांडणे आणि शेवटपर्यंत तडीस नेणे, यात भारती अग्रगण्य. 
तशी भारती फार बोलत नाही, विषय गंभीर व्हायला लागला की लगेच मिस्कील प्रतिक्रिया देऊन वातावरण हलके-फुलके ठेवते. माझ्यावर प्रतिक्रिया देणे, (माझ्या लेखांवर देत नाही, ते सोडून देतो कारण तो या गृपचा "स्वभाव" आहे!!) हा तिच्या नितळ आनंदाचा भाग. "अनिल अति गंभीर वृत्तीचा आहे", हे तिचे आवडते आणि ठाम मत मग मी कितीही मस्करी केली तरी!! अर्थात मला आता त्याची सवय झाली आहे म्हणा. भारती अत्यंत सधन आहे पण त्याचे "सावट" कधीही मैत्री नात्यावर पडत नाही, हा तिचा मोठेपणा. उच्च समाजात वावरून देखील आजही जमिनीवर पाय ठेऊन असते, याचेच बहुदा मला आणि इतरांना आश्चर्य वाटत असते आणि हीच भारतीची खरी ओळख आहे. 

No comments:

Post a Comment