Wednesday 10 April 2019

नवल वर्तले गे माये

आपल्या भारतीय संगीतात, भक्तिमार्गी संगीताचे  महत्व अपरंपार आहे. यात स्पष्टपणे २ पोटविभाग दिसतात. १) भक्तिमार्गी संगीत, २) पूजनमार्गी संगीत. वास्तविक श्रद्धांच्या दृष्टीने बरीच सरमिसळ आढळते तरी सूक्ष्म भेद दिसतो. प्रेमाचे नाते हेच ईश्वर-भक्तांच्या दरम्यान असणारे नाते  मानणाऱ्या भक्तीमार्गात लौकिकतेचा प्रवेश सहजपणे शकतो.  माता, पिता, बंधू, सखा इत्यादी अनेक मार्गांनी ईश्वर साकार होणे निखळ पूजनमार्गी श्रद्धेला कदाचित मानवले नसते. पूजनमार्गातील मूर्तीचे आलंबन अंडी एक विशिष्ट मानसिक अवस्था मिळून भक्तिमार्ग सिद्ध होतो. लौकिकतेला मज्जाव न करण्याच्या भूमिकेमुळे भक्तिसंगीतही लौकिक जीवनाशी अधिक जवळीक साधू शकते आणि हाच विचार आजच्या भक्तिसंगीतात प्राधान्याने आढळतो. "नवल वर्तले गे माये" ही रचना "संत निवृत्ती ज्ञानेश्वर" या १९६३ साली आलेल्या चित्रपटातील अतिशय ख्यातकीर्त रचना होय. 

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु 
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु 

कवी ग.दि.माडगूळकरांची शब्दरचना आहे. आपण जर का कविता म्हणून आस्वादायचे ठरविल्यास, प्रथमदर्शनी "प्रकाशु","विनाशु" किंवा पुढे "गोठी" (गोष्ट) तसेच "दिनेशु" ( सूर्य) अशा संत साहित्याशी जवळीक साधणाऱ्या शब्दांकडे नजर वळते आणि कवितेचा असा खास विशेष म्हणून शब्दरचना म्हणून मनावर गारुड टाकते. ललित संगीतातील प्रमुख घटकांपैकी "शब्द" घटक जर का इतकी प्रमुख भूमिका घेत असेल तर एकूणच गाण्याच्या संवर्धनासाठी हा घटक अतिशय उपकारक ठरतो. वास्तविक घटना नेहमीचीच आहे, पहाट होत आहे आणि अवकाशातील अंधार हळूहळू लयाला जात आहे. या निसर्गक्रमाचा माडगूळकरांनी मानसिक संक्रमण दर्शविण्यासाठी सुरेख उपयोग करून घेतला आहे. कवितेत निसर्गाचा उपयोग करून घेणे हे नेहमीच घडत असते. किंबहुना निसर्ग हा बऱ्याच कवितांचा कच्चा माल असतो. प्रश्न असतो, या निसर्गाचा कवी कशाप्रकारे उपयोग करून आशयाची सिद्धी साधत असतो. 

हास्यची विलसे ओठी, अद्भुतची झाले गोठी 
रातीचिये स्वप्नी आला, कोवळा दिनेशु  

संगीतकार सी. रामचंद्र, हे नाव हिंदी चित्रपट संगीतातील अतिशय प्रतिष्ठित, मानाचे नाव. वास्तविक, रामचंद्र चितळकर असे मराठमोळे नाव असूनही, केवळ चित्रपटासाठी त्यांनी सी. रामचंद्र नाव धारण केले - परिणाम हे नाव दक्षिण भारतीय वाटले आणि या माणसाकडे लायकीपेक्षा फारच कमी मराठी चित्रपट आले. अर्थात तोटा रसिकांचा झाला, हे सर्वश्रुत आहेच. स्वररचना नीटसपणे तपासली तर मराठी धाटणी स्पष्टपणे अधोरेखित होते पण त्यापलीकडे शब्दरचनेतील आशयघनता आणि गेयता, दोन्हीही या स्वरचनेतून अतिशय गोडपणे दृग्गोचर होतात. 
मुखड्याच्या आधीचा वाद्यमेळ बांधताना, संगीतकाराने दोन स्तरांवर बासरीचा उपयोग केले आहे आणि त्यातून रचना मुखड्याशी कशी येते हे खास ऐकण्यासारखे आहे. चाल सुरवातीपासून काहीशा द्रुत गतीत सुरु होते पण तरीही शब्दांतील आशय कुठेही दोलायमान होत नसून कवितेतील भाव निश्चित आणि ठामपणे  रसिकांपर्यंत पोहोचतो आणि संगीतकार म्हणून ही कामगिरी निश्चितच स्पृहणीय आहे. गायिका आशाबाईंनी, गाताना,शब्दांचे औचित्य आणि स्वररचनेतील गोडवा अचूकपणे टिपला आहे. आपल्याकडे रचना ही नेहमीच गायक/गायिकेच्या गळ्यातून पोहोचत असल्याने, हा घटक खऱ्याअर्थी महत्वाचा!!  
मुखड्यानंतरच्या वाद्यमेळ प्रामुख्याने बासरी, मेंडोलिन  आणि व्हायोलिन या तीनच वाद्यांनी सजवलेला आहे. जरा बारकाईने ऐकले तर कळेल, अंतरा संपताना, तालाची लय दुगणित ठेवलेली आहे पण स्वरिक लय मात्र त्याच लयीत ठेवलेली आहे. 

पहाटली आशा नगरी, डुले पताका गोपुरी 
निजेतुनी जागा झाला, राउळी रमेशु 

संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, ते अष्टपैलू रचनाकार निश्चितच होते आणि एकूणच आपल्या कारकिर्दीत अनेक गीतप्रकारांचे त्यांच्या रचनांत चीज झाले. सुरावटींचा खेळता प्रवाह ठेवणे त्यांना जमत असे. प्रस्तुत रचना ऐकताना, रचनेतील गोडव्याबरोबर आंगिक असे खेळतेपण, ज्याला चैतन्य असे म्हणता  येईल,ते सतत ठेवले आहे. त्यामुळेच रसिकांपर्यंत हे "सहजपण"  सहज पोहोचत असे. त्यांचे संगीत सर्वांना सहज समजत असे. संबंधित संगीत फार साधे म्हणून ते समजे असे नसून, पुरेशा तांत्रिक प्रभुत्वामुळे आपले कौशल्य लपवून संगीत पुढे आणण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती म्हणून. आपले भारतीयत्व व आगळेवेगळेपण सिद्ध करून दाखवण्याचा अट्टाहास कधीच रचनांमधून दिसला नाही. 

चैत्रवाऱ्याची वाहली, आली देहाच्या अंगणी
अंग मोहरूनी आले, जसा का पलाशू 

ललित संगीतात गायक/गायिकेची भूमिका नेहमीच अतुलनीय असते. रसिकांना तर गाण्याची प्राथमिक ओळख ही गायन याच घटकांतून प्रथम होते आणि इथे अशा भोसले यांचे कौशल्य खास दिसून येते. माडगूळकरांच्या शब्दांचे औचित्य आणि सी. रामचंद्रांच्या रचनेतील खेळकरपणा तरीही प्रासंगिक गांभीर्य, या गुणांचा तंतोतंत आढळ,आशाबाईंनी या गायनातून दाखवला आहे. खरेतर असे म्हणता येईल, ललित संगीतात जितके म्हणून सर्जनशील होता येईल, त्या सगळ्या शक्यतांचा आढळ त्यांच्या गायनातून अचूकपणे घेता येतो. 


No comments:

Post a Comment