Monday 11 March 2019

ईश्वर महाराज

साउथ अफिकेतील वास्तव्यात, सर्वात जवळ, माझ्या कुणी आला असेल हा माणूस. पीटरमेरीत्झबर्ग शहरात रहाणारा (आता नाही पण….) तिथल्या भारतीय समाजात अविभाज्य घटक म्हणावा, इतकी सगळ्यांशी याची मैत्री. याच्याच मुळे, मला तिथल्या भारतीय वंशाच्या समाजात अगदी अंतरंग म्हणावे, इतक्या जवळकीने माणसे अनुभवता आलि. या माणसाच्या घरात मी आणि माझे मित्र, कधीही जाऊ शकत होतो, याच्या बायकोशी हक्काने जेवायला सांगत असे. वीणा ( याची बायको) देखील अतिशय आत्मीयतेने आमचे स्वागत करीत असे. या घराचा दरवाजा, आम्हाला २४ तास उघडा असायचा.
जवळपास साडे पाच फूट उंची, रंग काळसर, गोल गरगरीत पोट, डोळ्यांवर काळसर झाक असलेला चष्मा, सतत हसतमुख चेहरा आणि मुख्य म्हणजे, भारताबद्दल अतीव माया. पुढे, पुढे तर ईश्वर, आमची ओळख, त्याच्या कुटुंबातील घटक, अशीच करून द्यायला लागला होता.हिंदी उच्चार त्यातल्या त्यात नेमके करू शकणाऱ्या फार थोड्या व्यक्तींमध्ये याची जिम्मा करता येउल, अन्यथा तिथल्या लोकांचे हिंदी उच्चार खुद्द प्रेमचंदला देखील घेरी आणणारे आहेत. अर्थात, त्या बाबतीत या समाजाला दोष देण्यात काही अर्थ नाही,. १९८८ पर्यंत, सगळ्या जगाने वाळीत टाकलेला देश!! त्यामुळे, भारताशी, या समाजाचा कसलाच संबंध राहिला नाही. भारतातून, चोरट्या मार्गाने ज्या हिंदी चित्रपटाच्या व्हिडियो मिळायच्या, त्यावरून भाषेचे "शिक्षण" घ्यायचे. तिथले गुजराती मात्र भारतीय संस्कृती(च) नव्हे तर गुजराती भाषा अत्यंत अस्खलित बोलतात आणि याचे कारण, त्यांनी मात्र भारताशी नाळ जोडून ठेवली होती पण तो वेगळा विषय आहे.
सुरवातीला, आमच्यातील बुजरेपणा आणि मुख्य म्हणजे आमचे तर्खडकरी उच्चार बदलून, तिथले इंग्रजी उच्चार, अगदी जिभेवर घोटवून घेतले, असे म्हणता येईल. वास्तविक, याचा व्यवसाय म्हणजे दारूचा पब आणि त्याला जोडून हॉटेल. Raisethorpe या उपनगरात, याचे घर आणि पब होता. मानाने अतिशय मोकळा धाकला असल्याने, तिथल्या भारतीय समाजात, त्याला सगळेजण "अंकल" म्हणूनच ओळखायचे. हॉटेलमधील कस्टमर, मुख्यत्वेकरून, भारतीय किंवा काळे. पण, याचा पब मात्र अतिशय प्रसिद्ध होता. गर्दी नाही, अशी फारशी वेळ यायचीच नाही. मी, बहुतेकवेळा, शुक्रवार संध्याकाळी तिथेच "पडलेला" असायचो. जो पर्यंत, पब चालू आहे, तोपर्यंत मी तिथे Billiards खेळत असे. जशी संध्याकाळ उगवायला लागायची, तशी तिथे मग, आमच्या ग्रुपमधले इतर "खेळाडू" यायचे. त्यापुढे मग, रात्रभर धमाल. आम्ही मित्र (भारतातून आलेले) तिथे एकटेच रहात असल्याने, आमच्यावर जेवण करायला बंदी असायची!! वीणा किंवा इंद्रा, जेवणाचा सोहळा मांडायचे.
ईश्वरच्या घरी सगळ्यात म्हणजे त्याचा मुलाचा २१वा वाढदिवस. साउथ आफ्रिकेत २१वा वाढदिवस, फार मोठा मानला जातो. त्यानिमित्ताने जंगी पार्टी होते, त्यावेळी, वडील मुलाला एकतर नव्या गाडीची चावी देतात किंवा नव्या घराच्या किल्ल्या. तो पर्यंत मुलाने, कुठेतरी स्वत:चे जमवलेले असते आणि मग ते दोघे, या पार्टीचा आरंभ, त्यांच्या डांसने करतात आणि मग, हळूहळू इतर जोडपी त्यांना साथ द्यायला लागतात. ईश्वरने आम्हाला आधीच सांगितले होते, आजची रात्र इथेच काढायची आणि चुकूनही घरी जायचे नाही. शनिवार रात्र आणि हवेत थंडगार गारवा. ईश्वरने घराच्या पुढील हिरवळीवर मोठा तंबू बांधला होता आणि या पार्टीसाठी खास म्युझिक सिस्टीम बसवली होती. इथेच मी, इथले कलाकार, "मूळ" हिंदी गाण्यांची कशी वासलात लावतात, हे ऐकले. It's South African Re-Mix music and known as "चटनी सॉंग्स"!!
मुलाने जसे नृत्याला आरंभ केला तशी ईश्वर फॉर्म मध्ये!! इतका वजनदार माणूस पण, नृत्य इतके सुंदर केले की मी बघतच राहिलो. नंतर वीणासोबत "बॉल डान्स" केला आणि त्यावेळी त्याला इतर बघ्यांनी टाळ्यांची जबरदस्त साथ दिली. मला त्यावेळी पाश्चात्य नृत्याचा गंध देखील नव्हता, तेंव्हा अनिल टिपिकल "मुंबई डान्स" मध्ये मश्गुल!! पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी चालू होती. मग, तिथेच त्याच्याच घरात झोपलो, ते रविवारी दुपारपर्यंत!!
हा माणूस तसा अतिशय भाबडा होता. आमच्यावर मात्र खूप विश्वास. त्यावेळी माझ्याबरोबर सतीश म्हणून एक मित्र रहात असे. माझ्याच कंपनीत काम करायला होता, आपल्या चेंबूर मधला. तो, आमच्या कंपनीत contract basis वर आला होता. कंपनीचे काम संपले तशी त्याची परत जायची वेळ आली. ईश्वरला काय, पार्टीसाठी कारण सापडले. शनिवार रात्री, त्याने आमच्या सगळ्या ग्रुपला बोलावले आणि नेहमीप्रमाणे, पार्टी रंगवली. जशी जायची वेळा आली, तशी त्याने सतीशच्या गळ्यात, आठवण म्हणून सोन्याची चेन अडकवली!! आम्ही सगळेच थक्क. आम्ही कोण? केवळ नोकरीसाठी या गावात आलेले आणि प्रत्येकाचा निवास हा तसा तात्पुरता (तसेच पुढे घडत गेले, मी आणि विनय पुढे तिथून बाहेर पडलो) आणि जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत(च) मी तिथे राहणार,हे विधीलिखीत!!
असे असून देखील, या माणसाने आम्हाला लळा लावला, अगदी पैशाची तमा न बाळगता, सढळ हाताने खर्च करीत असे. दाराशी मर्सिडीज सारखी श्रीमंत गाडी, आम्ही ती आमचीच म्हणत असू. या गावापासून केवळ १०० किलोमीटर वर जगप्रसिध्द डर्बन शहर. तिथे तर त्याने आम्हाला अगणित वेळा नेले आणि तिथल्या जगप्रसिद्ध बीचेस वर हिंडवून आणले. त्याला आमच्याकडून कपर्दिक फायदा होण्याची शक्यता अजिबात नव्हती तरी देखील, तो विचार देखील मनात न आणता, त्याने आमच्यावर अतोनात माया केली.
ईश्वरचे "खाणे" सर्वात मोठा असूयेचा भाग होता. हा माणूस, काहीही, कधीही आणि कितीही खात असे. त्याच्या खाण्याला कसलीच काळवेळ नसायची. अंगात मधुमेह ठाण मांडून बसलेला, रक्तदाबाचा विकार नव्याने जडलेला तरीही बेमुर्वतपणे सगळ्या गोळ्या बाजूला सारून, याचे ड्रिंक्स आणि खाणे चालायचे.
याचा परिणाम झाल्याशिवाय कसे राहील. १९९७ मध्ये, त्याच्या अचानक छातीत दुखायला लागले तशी तिथल्या हॉस्पिटलमध्ये भरती केले.डॉक्टरने, त्याच्या बायकोला, पथ्य पाण्याबाबत बाबत सूचना दिल्या आणि घरी रवानगी केली. तेरड्याचा रंग ३ दिवस, या न्यायाने, ईश्वरने आठवडाभर सगळे निमुटपणे सहन केले आणि परत पहिले पाध्ये पंचावन्न. आम्ही देखील त्याबाबत ईश्वरशी जरा गंभीरपणे बोललो तशी हसून, त्याने विषय उडवून टाकला.
पुढे, विनय १९९७ च्या डिसेंबरमध्ये आणि मी १९९८ च्या जूनमध्ये डर्बन इथे नोकरी पकडली आणि त्याचा निरोप घेतला. असे असून देखील मी बरेचवेळा त्याच्या घरी जात असे - विशेषत: शनिवार रात्र तिथे काढत असे. आता, सोबतीला, त्याचा मोठा मुलगा आणि त्याची सून देखील असायची. १९९८ च्या ऑक्टोबर मध्ये त्याने पीटरमेरीत्झबर्ग इथे मुलाचे लग्न केले. त्यावेळी, त्याने मला आणि विनयला, लग्नघरी आणण्यासाठी चक्क गाडी पाठवली होती. लग्न अत्यंत आलिशान पद्धतीने केले, अगदी वैदिक पद्धतीने. तेंव्हाच,मला, ईश्वर खंगलेला दिसला. तसे मी त्याच्या बायकोशी बोलून दाखवले पण तिने देखील थोडेसे उडवून लावले.
१९९९ च्या फेब्रुवारीत, विनयचा मला फोन आला, "अनिल, ईश्वर गेला"!! मनाला चटका बसला. माणूस थोडा खंगलेला भासला पण, इतक्यात असे काही घडेल, याची सुतराम शक्यता नव्हती. घरी आल्यावर, आमच्या ग्रुपमधून माहिती कळली, आदल्या रात्री छातीत दुखत असताना देखील, नेहमीप्रमाणे ड्रिंक्स घेतले आणि मध्यरात्री छातीतील कळा वाढायला लागल्या. वीणाला त्रास होऊ नये म्हणून, तसाच भेलकांडत बाथरूममध्ये गेला आणि तिथेच कोसळला!! काही मिनिटांचा खेळ.
जाताना, त्याच्या मनात काय विचार आले असतील? ज्या कुणी व्यक्ती डोळ्यासमोर आल्या असतील? त्यात मी असेन का? असले अनेक निरर्थक प्रश्न मनात आले.मैफिलीचा राजा मात्र निघून गेला होता. त्यानंतर मी अनेकवेळा त्या गावात गेलो पण, प्रत्येकवेळी "कृष्णेकाठी आता पहिले कुंडल उरले नाही" असेच वाटत राहिले.

No comments:

Post a Comment