Wednesday 13 June 2018

हेमंत कुमार

अनेक संगीत-संबद्ध क्षेत्रात सहज विहार करणारा आणखी एक बंगाली संगीतकार म्हणून अभिमानाने उदाहरण देण्यासारख्या कलांकारात हेमंतकुमार यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. इथे आपण गायक आणि संगीतकार, या दोन्ही पातळ्यांवर वावरताना दाखवलेली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता, यांचे विश्लेषण करणार आहोत. ते आधुनिक बंगाली गीते, बंगाली चित्रपटसंगीत, हिंदी चित्रपटसंगीत स्वतः: गात व त्यांची स्वररचना देखील करीत असत. याशिवाय आपल्या सादरीकरणातून रवींद्रसंगीताचा प्रसार आणि गायन करून, याही क्षेत्रात त्यांनी महत्वाचे कार्य केलेले आहे. याखेरीज विचारणीय बाब अशी, की गायक म्हणून वाटचाल करायला सुरवात केली तेंव्हा बांगला गान आणि रवींद्रसंगीत प्रभावीपणाने सादर करणारे दुसरे अनेक कलाकार होते आणि तरीही हेमंतकुमारांनी आपला स्वतः:चा निश्चित असा ठसा उमटवला.
आपण आधी गायक म्हणून त्यांचे कर्तृत्व विचारात घेऊ. एक  पार्श्वगायक म्हणून अपेक्षेनुसार त्यांनी विविध प्रकारच्या रचना गायल्या आहेत. हेमंतकुमारांचा आवाज रुंद असला तरी ढाला म्हणता येणार नाही. त्यात एक सूक्ष्म ध्वनिकंप देखील आहे. त्यामुळे त्यांना एका खास भावपूर्णतेचा स्पर्श निर्माण करणे चांगले जमले. आवाजातील कंपामुळे काहीवेळा स्वर लगाव थरथरता वाटलं तरी एकंदरीने गायन सुरेल म्हणूनच प्रतीत होते. काही वेळा स्वरकेंद्रापासून ढळणे अर्थातच फायद्याचे ठरते. छोट्या स्वरसमूहांची द्रुत फेक त्यांचा आवाज सक्षमतेने करतो. थोडक्यात आवाजाचे वर्णन म्हणून करायचे झाल्यास, भारदस्तपणे संथ असे करता येईल. काही गीतांच्या गायनात ज्याला "अप्पर रजिस्टर" म्हणतात, तो लगाव वापरून, त्यांनी गती साधली आहे. पण अशा वेळी आवाज कोता आणि कमताकद वाटतो आणि संगीताशय खात्रीपूर्वक पोहोचत नाही. एकंदर असे म्हणता येईल, या गायकास सूक्ष्म स्वरेलपणाची आवड आहे व पुष्कळ सादरीकरणात या आवाजाला भरीव फेक जमते. इतर काही बंगाली गायकांच्या तुलनेत त्यांच्या हिंदी चित्रपटगीतांच्या गायनात बंगाली छापाचा उच्चार कमी जाणवतो पण मन्ना डे त्यांच्याइतका तो खुला देखील नाही. एक वैशिष्ट्य आणखी सांगता येईल - "ओ" या स्वरवर्णाच्या उत्पादनाची छाया एकूणच सगळ्या गायनात अधिक जाणवते.
पण याचाच सकारात्मक परिणाम असा, की गायनात एक सहकंपन आणि गुंजनही सर्वत्र आढळते - आणि सहकंपन हा एक प्रमुख गायनगुण आहे. यामुळे एक वेधक विरोधाभास लक्षात येण्यासारखा आहे. त्यांचे हिंदी शब्दांचे उच्चारण एकेरी तर गायन वा आवाज मात्र भरीव असा प्रत्यय येतो. हेमंतकुमारांच्या गायनाचा आणखी एक विशेषही आवाजाच्या गुणधर्माशी संबंधित आहे. त्यांच्या गायनात हुंकारयुक्त गायन आणि हुंकार भरपूर असतात. "ह" हे प्राणव्यंजन इतर व्यंजनांच्या उच्चारणांत थोड्याफार "नक्की" लगावाचा सहभाग ठेऊन गाणे, हे हुंकाराचे स्वरूप होय. गायकांनी हेवा करावा अशी बरीच अंगे या गायकाच्या आवाजात आहेत पण तरीही शास्त्रोक्त संगीत त्यांना पेलवत नाही, असे म्हणावेसे वाटते. जेंव्हा केंव्हा ते आलाप करतात तेंव्हा ते गायन नसून पठण करतात, असे वाटते. उदाहरणार्थ "दर्शन दो घनश्याम" (नरसी भगत) किंवा "सो गया जाने कहां" (मोहर-मदन मोहन) ही गाणे मुद्दामून ऐकावीत. या दोन्ही गीतांत लावलेला 'आ'कार सायासाने, मर्यादित गुंजनाने आणि बाहेरून आल्यासारखा वाटतो.
संगीतकार म्हणून सुरवातीलाच "आनंदमठ","शर्त","सम्राट" सारखे चित्रपट सांगीतिक दृष्ट्या बऱ्यापैकी गाजले पण त्यांची खरी ओळख ही १९५४ साली आलेल्या "नागीन" चित्रपटाने!! एक मुद्दा - संगीतकार म्हणून त्यांना पाश्चात्य संगीत किंवा त्यातील आगळे वेगळे स्वनरंग यांचे फार आकर्षण होते, असे दिसत नाही. त्याचप्रमाणे अतिद्रुत किंवा हिसकेबाज हालचालींस पूरक असे नृत्यसंगीत त्यांना फारसे आवडत नव्हते.
हेमंतकुमारांच्या संगीताविषयी आखि मूल्यात्मक विधाने करणे शक्य आहे. १] आधी म्हटल्याप्रमाणे "नागीन" चित्रपटाचे संगीत त्यांना अडचण वाटावी इतके लोकप्रिय झाले. क्ले व्हॉयलीनच्या वेगळ्या स्वनरंगातील छोटी आणि प्रत्येक गीतांत पुनरावृत्त केलेली धून स्मरणात रेंगाळणारी खूण झाल्याचे वाटते.
२] एक प्रकारचा हळवेपणा आणि अ-दृश्याची ओढ हे भाव हेमंतकुमारांना जवळचे वाटत असावेत. त्यांनी रचलेल्या आणि गायलेल्या अनेक परिणामकारक गीतांत हे भाव भरपूर आढळतात. "कहीं दीप जले","छुप गया कोई रे","भंवरा बडा नादान", "तुम पुकार लो" ही गाणी खास उल्लेखनीय आहेत.
३] एकाच गीतांत अनेक संदर्भ आणून आपल्या सांगीतिक व्यामिश्रतेची जाणीव करून देणे, अतिशय सुरेखरीत्या जमले आहे - उदाहरणार्थ "जय जगदीश हरे" (आनंदमठ) हे गीता दत्त बरोबरचे गीत ऐकायला घेतल्यास, यात भारतीय धर्मसंगीतातील अनेक प्रकार एकत्र आणले आहेत. पठण, भजन गान, द्वंद्वगीत आणि अलिप्तपणे पण तीव्रतेने गायलेले "बाउल"पद्धतीचे सादरीकरण या सगळ्यांचा समावेश या स्वररचनेत दिसून येतो.
४] नाईट क्लब गीतें हा त्यांचा आवडीचा प्रकार निश्चित नव्हता आणि तशा रचना करताना, त्यांनी "उरकून" टाकले अशा पद्धतीने स्वररचना केल्याचे समजून घेता येते. परंतु चित्रपट उद्दिष्टास साहाय्यक सांगीत कल्पनेचे एक चांगले उदाहरण म्हणून "ना जाओ सैंय्या" (साहब बिबी और गुलाम) ही रचना ऐकल्यास, लयहीन अंतर्लक्षी कुजबुज, मग्न पठण आणि मुख्य हेतू म्हणून हळूहळू गायनापर्यंत पोहोचणारी संगीतस्पंदने अशा प्रतितास कारण होत हे गीत उभे राहते.
त्यांचे आग्रहाचे म्हणणे असायचे - आपल्याला रवींद्रसंगीतापासून स्फूर्ती मिळाली आणि दुर्दैवाने तिकडे आधुनिक रचनाकार दुर्लक्ष करतात. दुसरे म्हणजे चित्रपटसंगीतातील आधुनिक रचनाकारांचा चित्रपट निर्मितीच्या सर्जनशील अंगाशी काहीही परिचय नसतो आणि याची त्यांना खंत वाटायची आणि ती खंत, त्यांनी वारंवार प्रगट केली.
त्यांचे विविध अंगाचे काम बघता, त्यांना तसे म्हणण्याचा नक्कीच अधिकार होता. 

No comments:

Post a Comment