Saturday 30 April 2016

तुम मुझे भूल भी जाओ



चित्रपट गीतांत अनेक प्रसंग असतात आणि त्यानिमित्ताने, कवींना त्या प्रसंगांना शब्दातून, रसिकांच्या समोर मांडायचे असते. अशावेळेस, कवितेत एखादी राजकीय विचारसरणी किंवा सामाजिक भान असावे का? हा एक कालातीत प्रश्न आहे आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. एकतर चित्रपट हे माध्यम सामान्य माणसांपासून ते बुद्धीवादी समाजाला एकत्रित बाधून ठेवणारे माध्यम असल्याने, तिथे होणारा आविष्कार हा नेहमीचा तौलनिक दृष्टीने सादर होणे गरजेचे असते. एकांतिक विचाराने होणारी आविष्कृती काही ठराविक, मर्यादित स्तरावर यशस्वी ठरू शकते. विचाराबरोबर मनोरंजन, हा घटक देखील विचारात घ्यावाच लागतो अन्यथा सादरीकरणाचा डोलारा कधीही कोसळू शकतो. 
त्या दृष्टीने विचार करता, १९५९ साली आलेल्या "दीदी" चित्रपटातील "तुम मुझे भूल भी जाओ" हे गाणे विचारात घ्यावे लागेल. शायर साहिर हा मुळातला सक्षम कवी, त्याने आपले "कवित्व" चित्रपट गाण्यांसाठी वापरले, असा एक आरोप नेहमी केला जातो. एका दृष्टीने विचार करता, यात तथ्य नक्कीच आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गाण्यात "काव्य" आणले तर नेमके काय बिघडते? सरधोपट शब्दकळा असलेली असंख्य गाणी देखील, कवितेच्या अंगाने फारच थोड्या वेळा ऐकली जातात तेंव्हा "काव्य" असलेली गाणी दुर्लक्षित झाली तर त्यात काय नवल!! गीतात "भावकाव्य" असण्यात निदान मला तरी फार गैर वाटत नाही. 
जीवनात अनेक अनुभव आपल्याला येतात.त्यातील काही संवेदानाद्वारे आलेले, काही कल्पनेने जाणवलेले, काही वैचारिक स्वरूपाचे तर काही संमिश्र स्वरूपाचे असतात. परंतु यातील कोणत्याही एकाच्या किंवा सर्वांच्या अनुभवांचा एकात्म व अर्कभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती होते तिच्याशीच केवळ भावकवितेला कर्तव्य असते. ही भाववृत्ती एक मानसिक स्पंदन म्हणून जाणवते. याचअंगाने आपण, आजच्या या गाण्याचा विचार करू शकतो.  
ती माया ममता कृतज्ञता अन प्रीती 
बलिदान समर्पण श्रद्धा निष्ठा भक्ती 
चल विसर शब्द ते भरला बघ हा प्याला 
अर्थशुन्य शब्दांची ही दुनिया असे स्मशानशाळा….!! 

प्रसिद्ध कवी रॉय किणीकरांनी वरील ओळीत, साहीरच्याच विचारांची री ओढली आहे, असे मला वाटते. या गाण्यात साहीरच्या "डाव्या" विचारसरणीचा प्रभाव फार गडद असा जाणवतो. मी सुरवातीला, राजकीय किंवा सामाजिक भान याबद्दल चार शब्द लिहिले आहेत, ते याच संदर्भात आहेत. आता या गाण्यातील काव्याचाच विचार करायचा झाल्यास, 

"जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" 
ही ओळ म्हणजे साहीरच्या मनातील डाव्या विचारसरणीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे. आता प्रश्न असा येतो, चित्रपटातील पात्राच्या दृष्टीने असे विचार कितपत योग्य ठरतात? इथे मात्र वादाचा मुद्दा निश्चित निर्माण होतो. आणखी एक मजेशीर मुद्दा आहे. ही ओळ  - "जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" इथे थोडे गूढ आहे, म्हणजे प्रसिद्ध शायर फैझ-अहमद-फैझ यांच्या अतिशय गाजलेल्या - "मुझसे पहिली सी मुहोब्बत, मेरे महेबूब ना मांग" या रचनेत हीच ओळ "और भी दुख है जमाने में मुहोबत के सिवा" अशी वाचायला मिळते!!  प्रश्न असा, याचे श्रेय नेमके कुणाचे?   अर्थात आणखी एक मजेदार किस्सा, फैझच्या याच रचनेतील, "तेरी आंखो के सिवा दुनिया में रख्खा क्या है' ही ओळ, मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या "चिराग" चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याशी साम्य दाखवते. 
गाण्याची चाल यमन रागावर आधारित आहे. चाल अतिशय सुश्राव्य आहे आणि सहज गुणगुणता येईल अशीच आहे. मुळात यमन राग अति गोड राग, त्यामुळे या चालीला सुंदर असा गोडवा प्राप्त झाला आहे. नायिकेच्या भासमान मनस्थितीतून निर्माण झालेली ही रचना आहे आणि तोच धागा पकडून, संगीतकार सुधा मल्होत्राने अतिशय मोजका वाद्यमेळ ठेऊन गाण्याला सुरवात केली आहे. 
तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 
अतिशय मोहक सुरावटीने ही गाणे सुरु होते. नायिकेची स्वप्नावस्था ध्यानात घेऊन, गाण्याची सुरावट बांधली आहे. खरतर सुधा मल्होत्रा, संगीतकार म्हणून फारशी ख्यातकीर्त नाही पण इथे तिने जी "तर्ज" बांधली आहे, केवळ लाजवाब अशीच म्हणावी लागेल. हे गाणे म्हणून बघताना ही एक सुरेख कविता आहे, याचा विचार केलेला आढळतो. अर्थात, गाण्याची चाल बांधताना, ती "कविता पठण" होणार नाही, याची काळजी  घेतली आहे. गाण्यातील तालाची योजना देखील त्याच ढंगाने केलेली आहे. 
मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है 
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है 
मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया 
इन परेशान सवालात की कीमत क्या है 
तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 

या ओळी म्हणताना, सुधा मल्होत्राने शब्दांचे औचित्य कसे सांभाळले आहे, ते ऐकण्यासारखे आहे. "मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया, इन परेशान सवालात की कीमत क्या है" या ओळी म्हणताना, स्वर किंचित वरच्या पट्टीत घेतला आहे. या ओळीतून प्रकट होणारी मनाची बेचैनी किंवा तडफड, सुरांतून व्यक्त करण्यासाठी. सूर थोडे वरच्या पट्टीत घेतल्याने, शाब्दिक आशय नेमका आपल्या मनाला भिडतो. पुढील ओळीत " तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको" मनाला समजावण्याची धडपड असल्याने, ही आणि पुढील ओळ अतिशय संयत स्वरांत मांडली आहे - परिणाम केवळ सूर(च) नव्हे तर शब्द देखील आपल्या ध्यानात राहतात. 

जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है 
जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुयी इस दुनिया में 
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आंख चुराओ तो ये हक़ है तुमको 
मैंने तुम से ही नहीं सब से मोहब्बत की है 
या ओळी प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या आवाजात आहेत. एक गायक म्हणून मुकेश यांच्या आवाजाला खूप मर्यादा आहेत परंतु त्या मर्यादेत राहून देखील परिणामकारक गायन करण्याचे त्यांचे कौशल्य निश्चित वाखाणण्यासारखे आहे. मी लेखाच्या सुरवातीला, काव्यातील राजकीय विचारसरणी बाबत जे लिहिले होते, ते याच ओळींच्या संदर्भात आहे. इथे साहिर आपली विचारसरणी, चित्रपटातील पात्रावर लादत आहे का? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अर्थात, कविता म्हणून इतके स्वातंत्र्य कवीला निश्चितच मिळायला हवे. 

तुमको दुनिया के गम-ओ-दर्द से फुरसत ना सही 
सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही 
मैं तुम्हारी हुं यही मेरे लिये क्या कम है 
तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत ना सही 
और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

चाल तशी संपूर्ण गाण्यात फारशी कुठे बदलेली नाही किंवा लयीत फार वेडीवाकडी वळणे देखील नाहीत. गाणे ऐकताना मात्र सारखे मनात येत राहते, इथे गाण्यापेक्षा कविता अधिक तुल्यबळ आहे. गाण्याची चाल आणि सादरीकरण अतिशय सुश्राव्य आहे. गाण्याची चाल मनाची पकड सहज घेते आणि हा मुद्दा विशेष मांडायला हवा. गाण्याची चाल ऐकताना, सहज समजू शकली तरच ती लोकांच्या मनात घर करते आणि ते साध्य इथे साधले आहे. 
मुकेश यांच्या आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नव्हता आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरती मर्यादित होती. परंतु आवाजात एक प्रकारचा आश्वासक किंवा सांत्वन करण्याचा धर्म होता. थोडे तांत्रिक बोलायचे झाल्यास, काही स्वरमर्यादांत सुरेल गाणे त्यांना सहज सुलभ जात असे. परिणामत: मुकेश यांचा आवाज छोटे स्वर समूह द्रुत गतीने आणि सफाईने घेऊ शके. वरील गाण्यांतील दुसरा अंतरा, या वाक्यांना पूरक म्हणून दाखवता येईल. आपल्या पट्टीपेक्षा वरच्या सुरांत गायची वेळ आली, तेंव्हा त्यांचा आवाज डळमळीत व्हायचा आणि त्यांच्या आवाजाची प्रमुख मर्यादा. 
सुधा मल्होत्रा यांच्या आवाजाबाबत देखील वरील वर्णन लागू पडेल परंतु यांच्या आवाजात एक प्रकारची फिरत असल्याने, हलक्या  हरकती घेणे सहज जमून जाते आणि त्यामुळे गाण्याला किंचित गायकी अंग प्रदान करणे शक्य होत असे. 
असे असून देखील, ही गाणे आपल्या मनाचा ठाव घेते, कारण चालीमधील असामान्य गोडवा आणि सहज सुंदर गायन. ललित संगीतासाठी खरेतर याच मुलभुत बाबी ध्यानात घेणे जरुरीचे असते. 


https://www.youtube.com/watch?v=xs1h-inHU4U

No comments:

Post a Comment