Monday 10 August 2015

गौड सारंग

एकाच कुटुंबातील  असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा "घ्यायचा" म्हणजेच त्या स्वराची "जागा" कशी मांडायची, त्यामुळे तेच स्वर आणि तो राग भिन्न होत जातो आणि रागांमधील व्यामिश्रता अधिक खोलवर डोकावते. "गौड सारंग" रागाच्या बाबतीत हे साम्य बघताना, इतर अनेक रागांच्या आठवणी मनात येतात. 
खरतर हेच साम्य, रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. एखादा राग सादर करणे म्हणजे केवळ सुरांची बेरीज-वजाबाकी असा गणिती कारभार नसून, त्या स्वराचा (जे स्वर सामायिक असतात )  नेमका "स्वभाव" जाणून घेऊन, त्याचे सादरीकरण गरजेचे असते. स्वराला "पैलू" असतात, ही इथे लक्षात येते. 
या रागात दोन्ही मध्यम लागतात (तीव्र आणि शुध्द) आणि बाकीचे स्वर शुध्द आहेत.  अर्थात,हा राग ऐकताना, "बिहाग","छायानट" या रागांच्या आठवणी मनात तरळतात पण तरीही हा राग, आपले "वेगळेपण" सिद्ध करीत असतो. "सा" "रे" "ग" "म" या स्वरांच्या साहचर्याने स्वत:ची ओळख निर्माण  करता येते. 
भारतीय संगीतात, बांसुरी वाद्याचा नेमका उगम कधी झाला, याबाबत संदेह बराच आहे. परंपरागत संकेतानुसार, कृष्णाकडे या वाद्याचा मान जातो. आधुनिक भारतीय संगीतात, या वाद्याची प्रतिष्ठापना खऱ्याअर्थी कुणी केली असेल तर, ती पंडित पन्नालाल घोष यांनी. वाद्याचा स्वभाव ओळखून, त्यात सुरांचा असामान्य मुलायमपणा पंडितजींनी ज्या प्रकारे ओळखला आणि त्याचे सादरीकरण केले, त्याला आजही तोड नाही. राग सादर करताना, त्याचे शुद्धत्व राखून, लयकारी आणि ताना इतक्या सुंदरपणे सादर केली आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध व्हावा. अत्यंत ठाय लयीत सुरवात करायची, हळूहळू स्वरांचा "भरणा" करीत, रागाची बढत करायची, असा त्यांच्या वादनाचा सर्वसाधारण असा ढाचा  ओळखता येतो. याचा दृश्य परिणाम असा होतो, रसिकाला प्रत्येक स्वराचा आनंद घेता येतो. वास्तविक, या वाद्याचा थोडा विचार केला तर हे वाद्य सतारीप्रमाणे "पूर्णत्व" मिळणारे वाद्य नाही पण तरीही पन्नालाल घोष यांनी, या वाद्यावर प्रभुत्व मिळवताना, वाद्याचा नेमका गुणधर्म ओळखून, ठाय आणि मध्य लयीत वादनाची गत राखली.  


या लिंकवरील वादन ऐकताना, आपल्याला याच गुणांचा आढळ येतो. अतिशय ठाय लयीत वादन करताना, प्रत्येक स्वर नेमका लावणे, स्वरांची बढत करीत असताना, कपड्यावर कशिदाकाम करावे त्याप्रमाणे स्वरांची रेखीव आकृती निर्माण करायची आणि लयकारी सादर करायची, याकडे वादनाचा कल दिसतो आणि तो कल, वाद्याचा गुणधर्म ओळखून सौंदर्यनिर्मिती करतो. वाजवताना, शक्यतो दीर्घ ताना न घेता, छोट्या स्वरावलींतून लय प्रगट करायचा आग्रह दिसतो. त्यामुळे, ऐकताना देखील रागाचे सौंदर्य सहजपणे न्याहाळता येतो. रचना द्रुत लयीत वाजवताना देखील, शक्यतो सुरांचा अवकाश हा शक्यतो मंद्र सप्तकात राखायचा, हा विचार स्पष्ट दिसतो. 
लताबाईंनी, त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत असंख्य भजने गायली आहेत तरीही या रचनेची अवीट गोडी काही निराळीच आहे. विशेषत: हिंदी चित्रपट संगीतात तर या रचनेचे स्थान अतुलनीय असे आहे. अत्यंत सशक्त शब्दकळा, त्यालाच जोडून निर्माण केलेली अप्रतिम संगीत रचना आणि त्याचे अतिशय परिणामकारक सादरीकरण, ही या रचनेची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. खरतर, या रचनेत, फक्त "गौड सारंग" राग नसून, काही ठिकाणी "भूप" रागाची संगती लागते तरीही गौड सारंग रागाची दाट छाया, या गाण्यावर निश्चित आहे. आणखी विशेष सांगायचा म्हणजे, गाण्याचे बांधणी "दीपचंदी" या काहीशा अनवट तालात बांधली आहे. या तालावर आधारित फारशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. एकतर हा ताल लयीला फार अवघड आहे. चौदा मात्रांचा ताल असून, "टाळी" च्या मात्रा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने, वाजवताना,फार कौशल्य लागते. 


या गाण्यात, सुरवातीपासून जरा बारकाईने ऐकले तर तालाच्या मात्रांचा हिशेब मिळतो. संगीतकार जयदेव यांची या गाण्यात बांधलेली लय तर केवळ अपूर्व आहे. गाणे फार वर-खाली चालत आहे म्हणजे मध्येच वरच्या सुरांत जाते तर क्षणात खालच्या सुरांत जाते. चाल अतिशय श्रवणीय आहे तसेच कविता म्हणून देखील, हे गाणे असामान्य आहे. साहीरचे शब्द प्रत्ययकारी आहेत आणि त्या शब्दांचा आशय, चालीतून नेमका दृग्गोचर होईल, याची काळजी घेऊन, गाणे बांधले आहे. लताबाईंनी गाताना देखील, याच वैशिष्ट्याचा विकास होईल, या भूमिकेतून गायले आहे.                                                 उर्दू साहित्यात, गझल साहित्याचे स्थान फार वरच्या स्तरावर आहे. बरेचवेळा, "गझल" हे कवितेचे वृत्त आहे, असे न मानता, "गझल" हा गायकीचा एक प्रकार आहे, असे मानले जाते. एका दृष्टीने हा विचार योग्य आहे पण, तरीही, गझल, ही एक कविता आहे, हे मान्यच करावे लागेल. अर्थात, गझल आणि गझल गायकी, हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. ज्या हिशेबात ठुमरी गायनाचे मोजमाप केले जाते त्याच प्रमाणे गझल गायनाचे देखील मापदंड आहेत आणि त्यात जगजीत सिंग यांचे नाव अग्रभागी आहे. अत्यंत मुलायम आवाज, शक्यतो गायन करताना, शब्दांना कुठेही "जखम" करायची नाही, हा विचार ठामपणे दिसतो!! कालांतराने त्यांची गायकी थोडीशी "एकांतिक" झाली तरी देखील, गझल गायनात त्यांनी आपले नाव प्रस्थापित केले, यात शंकाच नाही. "दैर ओ हरम मे  बसने वालो" ही रचना,केरवा तालात गायली आहे.                                                                
https://www.youtube.com/watch?v=OLFYYj8aQRo                                                                                                                                        
रचनेच्या सुरवातीलाच सरगमचा उपयोग केला आहे आणि पुढे देखील बऱ्याच ठिकाणी सरगम ऐकायला मिळते. ऐकताना रचना जरा द्रुत लयीत आहे, असे वाटते पण केवळ तालाच्या आघातामुळे, लय थोडी द्रुत वाटते. गायन ऐकताना, जगजीत सिंग यांच्या सगळ्या गायकीची वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. एखाद्या शब्दावर "खटका" घेताना देखील, त्या शब्दाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष दिलेले सहज समजून घेता येते. गौड सारंग रागाची ओळख करून घेण्यासाठी, ही रचना दर्शविता येईल. 
आता आपण, मराठीतील असेच एक "समृध्द" भावगीत ऐकुया. "काल पाहिले मी स्वप्न गडे" हेच ते गाणे. आशा भोसले यांनी आपल्या असामान्य गायकीने हे गाणे फारच अवीट गोडीचे करून ठेवले आहे. योगेश्वर अभ्यंकर, या काहीशा अप्रसिद्ध कवीने लिहिलेले हे गाणे, आपल्याला गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार श्रीनिवास खळे, यांनी ही चाल बांधली आहे. हा संगीतकार म्हणजे मराठी भावगीतातील अद्भुत रसायन होते. यांच्या बहुतेक चाली अतिशय संथ, तरीही गळ्याची परीक्षा घेणाऱ्या असतात. "गायकी" ढंगाकडे चाल बांधण्याची विशेष प्रवृत्ती दिसते. गमतीचा भाग असा असतो, गाणे ऐकताना, गाणे सुश्राव्य वाटत असते परंतु तेच गाणे गायला घेतले म्हणजे त्यातील "खाचखळगे" दिसायला लागतात आणि गाण्याची चाल भलतीच अवघड वाटायला लागते!! 


सुरवातीच्या आलापीमध्येच आपल्याला गौड सारंग दिसतो. हा आलाप ऐकायला सहज, सोपा वाटतो पण गाताना घेतले तर आपल्याला समजेल की, आलापीत किती "अवघडले" पण आहे. तसेच प्रत्येक ओळ संपविताना, जे "खटके" घेतले आहेत त्याचबरोबर पहिला अंतरा सुरु करताना, एकदम वरच्या सुरांत रचनेला सुरवात करून, चालीतील "काठीण्य" दर्शवून द्यायचे, हा सगळाच भाग अतिशय विलोभनीय आहे.

आता आपण आणखी काही गाण्याच्या लिंक्स ऐकुया म्हणजे या रागाची ओळख अधिक खोलवर होईल. 
१] कुछ और जमाना कहेता है 

२] रितू आये रितू जाये सखी रे 

३] लहेरो मे झुलू, तारो को छुलू 

No comments:

Post a Comment