Saturday 5 July 2014

कुमार गंधर्व - प्रयोगशील गायकी(??) - भाग २

मागील लेखात आपण, कुमार गंधर्वांच्या गायनातील, उपशास्त्रीय गायनातील काही प्रयोगांबद्दल बघितले आणि आता तोच धागा पुढे नेऊ या. 
त्रिवेणी :- कबीर, सूरदास आणि मीराबाई यांच्या रचना इथे ऐकायला मिळतात. सगळी भजने ऐकताना असेच वाटत राहिले, गायक रागाच्या बंदिशी सादर करीत आहेत. अर्थात, ही सवय भावगीत गायनात प्रकर्षाने दिसून आली पण त्याबद्दल थोडे नंतर. अर्थात गायनाची शैली बहुतांशी रागदारी थाटाची आहे परंतु अत्यंत अटकर स्वरूपात आहे. मला, १} उठी उठी सखी सब मंगल गाये, २] उधो अंखिया अति अनुरागी, ३] मै गाऊ पद गाऊ - या रचना ऐकायला मिळाल्या. स्वरविस्तार   तसा मर्यादित स्वरूपात आहे पण तरीही स्वरांवर "झडप" टाकायची वृत्ती इथेही प्रकर्षाने आढळते. पुढे प्रसिद्ध पावलेल्या निर्गुणी भजनाची मुलतत्वे या गायनात दिसून येतात. शब्दप्रधान गायकीत एक गोष्ट प्रकर्षाने पाळावी लागते आणि ती म्हणजे कवीचे जे शब्द आहेत, त्यांना नेमका न्याय देण्याचा. 
इथे असे झाले आहे, एकामागोमाग या रचना ऐकताना, त्यात गायकीचे नाविन्य तसे कमी आढळले. शब्दांना न्याय देणे म्हणजे त्यातील आशय अधिक दृग्गोचर करणे, हा एक भाग येतो तर शब्दोच्चार अधिक स्वच्छ, आणि निकोप होणे जरुरीचे असते. सुरांच्या सहाय्याने शब्दांना अधिक खुलवून मांडणे, इथे नेमके झाले पण बरेचवेळा " मूर्तीपेक्षा मखराला महत्व" असा काहीसा प्रकार झाला!! एकाहून अधिक कलांनी मिळून होणाऱ्या आविष्कारात, विशिष्ट स्वरसमूह = विशिष्ट अर्थ असे समीकरण सरसकट गृहीत धरणे धोक्याचेच आणि तसा धोका इथे जाणवतो. विशिष्ट शब्दारचनेस कोणती चाल, यात मतभिन्नता स्वाभाविक आहे पण सांगीत सुसंगतीच्या तत्वानुसार आधीच्या सुरावटीने नंतर येणारी सुरावट कोणती, हे निश्चित होत असल्याने, तिथे व्यक्तिगत पसंती - नापसंतीचा प्रश्नच उद्भवत नाही आणि इथे नेमके तेच घडले आहे. कबीराचा निर्गुण भक्तिभाव, मीरेची आर्तता आणि सुरदासाचा प्रौढ विरहावेग, या भावनांची प्रचीती येणे जरुरीचे होते पण तसे फारसे घडले नाही. 
मला उमजलेले बालगंधर्व :- इथे एक विचार पहिल्यांदा मांडणे जरुरीचे आहे, जरी बालगंधर्वांची गाणी असली तरी कुमार गंधर्व, हे स्वतंत्र प्रज्ञेचे गायक असल्याने, बालगंधर्वांच्या गाण्याचे साचा किंवा आराखाडा तसाच ठेऊन, त्यात स्वत:चा विचार प्रस्थापित करून, स्वरविस्तार करायचा, हाच गायकाचा प्रधान हेतू होता आणि त्या हेतूंबद्दल शंका घेण्याचे काहीही कारण नाही. दुसरे असे, बालगंधर्वांचा आवाज आणि कुमार गंधर्वांचा आवाज, यात बराच फरक असल्याने, बालगंधर्वांच्या आवाजाची वैशिष्ट्ये - "आ"कार लावणे तसेच सगळ्या सप्तकात सहज हिंडणे, हे कुमार गंधर्वांच्या बाबतीत शक्यच नव्हते. कुमार गंधर्वांच्या गायनाच्या बाबतीत, नेहमी अल्पस्वरी तान आणि स्वराला निमुळतेपण असल्याने, दोन्ही गायन शैलीतील फरक स्पष्ट दिसतो - अर्थात हे न्यूनत्व नव्हे. परंतु फरक पडतो तो, शब्दोच्चारात!! बालगंधर्व नेहमी त्याबाबत सजग असल्याचे दिसून येते तर कुमार गंधर्व हे तिथे थोडे दुर्लक्ष्य करत आहेत, हे जाणवते. कुमार गंधर्वांच्या मते, बालगंधर्वांची गायन शैली आत्मसात केली की झाले, असा स्पष्ट विचार दिसतो!! 
मराठी नाट्यगीते :- वास्तविक कुमार गंधर्वांनी स्वतंत्र अशी तुरळकच नाट्यगीते गायली. १] ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी, २] उठी उठी गोपाळा. ही दोन्हे गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. नाट्यगीतांचा असा स्वत:चे असा वेगळा "चेहरा" असतो, त्या गायनाचे देखील वेगळे निकष असतात. वरती, बालगंधर्वांच्या गायनाचा उल्लेख केला, त्याबाबतीत देखील हेच निकष योग्य आहेत. कितीही झाले तरी नाट्यगीत म्हणजे रागदारी संगीत नव्हे. त्यात रागदारी संगीताचे कुठले अलंकार घ्यावेत, कुठले टाळावेत तसेच गायकी कशी अनुसरावी आणि मुख्य म्हणजे आपण गातो, ते नाटकातील एक व्यक्तिरेखे साठी आहे, याचे भान ठेवणे आवश्यक असते. भावगीत गायनात, अशी कुठलीही व्यक्ती समोर नसल्याने, तशा मर्यादा पडत नाहीत. 
आता पहिल्या गाण्याचा विचार केला तर, गाण्याची चाल, वसंत देसायांनी अप्रतिम बांधली आहे, गाण्याचे शब्द तसे पारंपारिक धाटणीचे आहेत पण तरीही भावना पुरेशा व्यक्त करणारे आहेत. फरक पडतो, तो गायनात. दुसऱ्या कडव्याच्या शेवटी "हसण्यावरती, रुसण्यासाठी जन्म जन्मीच्या गाठी" मधील, "जन्म जन्मीच्या" हे शब्द फार खडबडीत ऐकायला येतात म्हणजे "जल्म जल्मिच्या गाठी" असे काहीतरी ऐकायला येतात तसेच तिसऱ्या कडव्यातील, "कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो" मधील "धुसफुसलो" हा शब्द ऐकावा. शब्दावर नको तितका जोर दिला गेला आहे आणि त्यामुळी त्या शब्दातील भावनाच नष्ट झाली आहे!! अगदी वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, "धुसफुसलो" हा शब्द "फसफसत" अंगावर येतो!! याचे मुख्य कारण, गायकाची शब्दांकडे बघायची दृष्टी. 
मराठी भावगीते:- कुमार गंधर्वांची सर्वात गाजलेली भावगीते ही कवी अनिल, यांच्या कविता आहेत. १] आज अचानक गाठ पडे, २] अजुनी रुसुनी आहे. जर कविता म्हणून विचार करायला गेलो तर नि:संशय शब्दकळा अप्रतिम आहे आणि या दोन्ही भावकविता आहेत, आशयाच्या कितीतरी छटा सापडू शकतात. प्रत्यक्षात, गायनात याचे काहीही प्रतिबिंब पडत नाही. गायनात दिसून येते,ती गायकाची स्वरांवरील पक्कड तसेच कविता, ही बंदिशीच्या अंगाने गायली गेली आहे. भावगीत म्हणजे शास्त्रोक्त बंदिश नव्हे, हाच विचार या गायनात लुप्त झालेला दिसतो. "आज अचानक गाठ पडे" या कवितेत "अचानक" गाठ पडणे, या कृतीला महत्व आहे आणि त्यातून येणाऱ्या प्रणयी भावनेला महत्व आहे. या भावनांचा प्रत्यय, गायनातून अजिबात येत नाही, हे अत्यंत गडद अपयश म्हणावे लागते. 
मुळात, इथे भावगीताच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे, असे वाटते. आपण, वरती जे सांगीतिक आविष्कार बघितले ते सगळे बव्हंशी उपशास्त्रीय संगीताचे आविष्कार होते आणि तिथे सुरांची आळवणी, काही प्रमाणात चालून जाते परंतु भावगीत गायनात असला प्रकार खपत नाही आणि याचे मुख्य कारण, भाषा आणि स्वर, ही दोन्ही वेगवेगळी माध्यमे आहेत अभेत या दोन्ही माध्यमांचा नेमका विचार सुगम संगीतात अभिप्रेत असतो. 
हे असे का घडले तर इथेच गायकाची विचार करण्याची पद्धत बघावी लागते. वरील सगळ्या आविष्कारात, शब्दांचा आढळ, अनिवार्य आहे आणि त्याला बरोबर घेऊनच संगीताची बांधणी करावी लागते. ती करताना, अर्थात, शब्द माध्यमाची योग्य ती काळजी घेणे क्रमप्राप्तच ठरते आणि याच जाणिवांचा इथे नेमका विसर पडलेला दिसतो आणि आपल्याला ऐकायला मिळतो, तो केवळ संगीताचा प्रादुर्भाव. शब्द बिचारे कोपऱ्यात सारले जातात. 
कुमार गंधर्वांनी या सगळ्यांकडे आपल्या सांगीतिक कल्पनाच्या आविष्काराची गरज म्हणून बघितले आणि हा या दृष्टीचा फरक आहे आणि त्यामुळे ही गाणी कितीही श्रवणीय (ऐकायला चांगली) वाटली तरी वस्तुस्थिती कल्पनेपेक्षा फार दूर आहे आणि हेच कुमार गंधर्वांच्या गायनाचे अपयश म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment