Tuesday 7 July 2020

एक उमदं व्यक्तिमत्व

शाळेत मी कधीही "हुशार" म्हणून गणला गेलो नाही कारण अस्मादिकांचे कर्तृत्वच तसे होते. असो, अर्थातच त्यावेळी शाळेत "बुद्धीमंत" मुलांचा वेगळा वर्ग (C Division) असायचा आणि त्या वर्गातील मुले नेहमी मान उंच ठेऊन वागत असत. अर्थात काही अपवाद होते. त्यात अपवादात "हा" थोडासा बुटका, काळसर वर्णाचा आणि "तुडतुड्या" वृत्तीचा होता. माझ्या वाडीत तेंव्हा जयंत राहात होता. जयंत पहिल्यापासून अव्वल हुशार असल्याने, "अभ्यास" सोडून इतर विषयात आमच्या गप्पा व्हायच्या. त्याच वेळी हा बुटका आमच्यात यायला लागला. आमचा वाडीपासून तिसऱ्या वाडीत राहणारा असल्याने ओळख लगेच झाली. शाळेत बराच बडबड्या होता. आता "होता" हे क्रियापद लावले कारण पुढे हे बडबडेपण बरेच कमी झाले. जयंतच्याच तुकडीत असल्याने, जायंटकडे वारंवार भेटायचा. 
आमची खरी ओळख झाली, आम्ही शाळेच्या क्रिकेट संघात एकत्र आलो तेंव्हा. वास्तविक आपली शाळा कधीही खेळाला उत्तेजन देणारी म्हणून प्रसिद्ध नव्हती तरी देखील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भाग घ्यायला परवानगी द्यायची. क्रिकेट निमित्ताने धोबीतलाव इथल्या आझाद मैदानावर दीड, दोन महिन्याचे नेट लागले होते. जयंत खेळात कधीच पुढे नव्हता त्यामुळे हा बुटका आणि मी एकत्र आझाद मैदानावर जायला लागलो. तो खेळात, माझ्यापेक्षा अधिक "प्रवीण" होता आणि त्याची बॅटिंग, हा खास प्रांत होता. तेंव्हा मी त्याच्या घरी बरेचवेळा जात होतो. राजन तांबे, मी आणि हा बुटका असे एका त्रिकोणात राहात होतो आणि नेहमी भेटत होतो. 
पुढे मी, भाई जीवनजी गल्लीतील "मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या" अभ्यास वाटिकेत जायला लागलो आणि हा देखील तिथे यायला लागला. तिथे अभ्यास कमी आणि इतरांच्या टोप्या उडवणे जास्त असेच चालायचे. शाळेतील दिवस असल्याने अंगात हुडपणा भरपूर भरलेला होता. अर्थात हा बुटका बुद्धीने तल्लख असल्याने नेहमी परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास व्हायचा पण कधीही अव्वल नंबर शर्यतीत नव्हता. तिथे जयंत, विजय असली नामांकित नावे असायची. 
अर्थात पुढे शाळा सुटली आणि आम्ही वेगळे झालो. तो सायन्स तर मी कॉमर्स शाखेकडे वळलो आणि आमचे संबंध विरळ व्हायला लागले. अर्थात भेटीगाठी कमी झाल्या. तास रस्त्यात कधी भेटलो तर थोड्याफार गप्पा व्हायच्या पण त्याला फारसा अर्थ नव्हता. नंतर १९९२ मध्ये मीच परदेशी गेलो आणि माझा भारतातील संबंध संपल्यातच झाला होता आणि ते क्रमप्राप्तच होते. त्यातून मी जवळपास १६ वर्षे परदेशी राहिल्याने तर ओळखी या "स्मरणरंजन" अवस्थेत राहिल्या. पुढे २०११ साली मी पुन्हा भारतात कायमचा आलो आणि थोड्याफार ओळखी पुन्हा व्हायला लागल्या. २०११ साली मी थोडा उशिरा आलो कारण त्याच वर्षीच्या सुरवातीला विरार इथे आपल्या गृपने भव्य स्नेहसंमेलन भरवले होते आणि माझ्या हातून थोडक्यात निसटले. 
या बुटक्याची व्यायसायिक प्रगती कळत होती आणि मनात थोडा आदर वगैरे उत्पन्न झाला होता. परंतु मी नव्याने भारतात स्थिरावयाचा प्रयत्न करीत होतो, त्यामुळे शेजारी रहात असूनही गाठीभेटी या रस्त्यात भेटण्यापुरत्या झाल्या होत्या. संसारात पडले की हे प्राक्तन स्वीकारावेच लागते. तरी याची बायको माझ्या चांगल्या परिचयाची असूनही भेटी होत नव्हत्या हेच खरे. 
पुढे मागील वर्षी पुन्हा असेच स्नेहसंमेलन भरावयाचे ठरले आणि प्रवीण जुवाटकरने याच्या घरी भेटायचे नक्की केले. खूप वर्षांनी निवांत भेटायचे ठरले असल्याने, घरात भरपूर चेष्टामस्करी झाली. कार्यक्रम कसा करायचा याचे रूपरेखा आखली आणि आम्ही सगळे पांगलो आणि पुन्हा भेटलो, ते स्नेहसंमेलनाच्या दिवशी. अर्थात माझी चेष्टा करणे आणि मी ते स्वीकारणे, हा भाग त्या दिवशी अनुस्यूत होताच. बुटका ही संधी थोडीच सोडणार. त्यादिवशी अखेरीस पुन्हा भेटायचे ठरले आणि घराकडे सगळे वळले.  
परवा सकाळी जयंतचा फोन आला तोच मुले याच्या बद्दलच्या अशुभ बातमीने!! बातमी मला नक्की करायला सांगितले पण मी नुकताच बाहेरून आलो असल्याने (कोरोनाचे दिवस तेंव्हा बाहेरून घरात शिरल्यावर आंघोळ करायचीच) मी वाडीतील एकाला बातमीची खातरजमा करायला सांगितली. माझी आंघोळ पूर्ण होते तेव्हड्यात पुन्हा जयंतचा फोन आला "शिरीष गेला!!" आडाचं पाणी असे इतक्या लवकर वळचणीला जायला नको होते पण नियतीने ठरवल्यावर कुणाचीही प्राज्ञा तिथे चालत नाही हेच खरे. मनावर कायमचा एक ओरखडा उमटला!!

No comments:

Post a Comment