Monday 5 August 2019

कुब्जा

एका दृष्टीने मला इंदिरा बाईंची "कुब्जा" ही कविता फार विलक्षण वाटते. वास्तविक, "कुब्जा" हे व्यक्तिमत्व पुराणकाळातील, काहीसे दुर्लक्षित झालेले, किंबहुना दोन, चार प्रसंग वगळता फारसे महत्व नसलेली व्यक्तिरेखा. असे असून देखील तिचा प्रभाव महाभारताच्या संपूर्ण कथेत जाणवतो. अर्थात ही किमया महाभारतकारांची!!
"अजून नाही जागी राधा,
अजून नाहीं जागें गोकुळ;
अशा यावेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ;
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन आपुलें तनमन.
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तों मुरलीरव;
डोळ्यांमधून थेंब सुखाचे :
हें माझ्यास्तव... हें माझ्यास्तव..."
ही कविता वाचताना, आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांमधून साधली गेलेली कविता. इंदिराबाईंच्या कवितेतील विचार आपल्याला स्वतंत्रपणे करायला लावणारी ही कविता. तसे बघितले विस्ताराच्या दृष्टीने या कवितेत प्रतिमाविश्व अतिशय मर्यादित आहे. त्या प्रतिमा, त्यांच्या स्थायीभावाच्या जाणिवेने मर्यादित केले आहे. सरत्या रात्रीची वेळ आणि त्यावेळी भणाणणारा वारा!! या वातावरणाच्या भोवती दिसणारा केशरी चंद्र, कवितेतील वातावरण निर्मिती, हा वेगळा शाब्दिक खेळ असतो. प्रतिमा मोजक्या शब्दात मांडावी आणि मांडताना त्यातील आशय अधिक विस्तारित व्हावा!! हेच इथे नेमकेपणा आपल्याला वाचायला मिळते.
संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. त्या दृष्टीने, सपक, सामान्य पातळीवरील संवेदनाविश्व इंदिरा बाईंच्या कवितेत फारसे कधी आढळत नाही. या कवितेत, अर्थातच निसर्गरूपे आहेत पण ती सहजपणे डोळ्यासमोर दिसणारी नाहीत. आपल्या भाववृत्तीच्या स्पंदनांचे प्रतिबिंबच असे निर्माण केले जाते. अतिशय अरुप अशा भाववृत्तीने जाणवणाऱ्या निसर्गाचे रूप या कवितेत आढळते.
कवितेत प्रतिमा आढळणे आणि त्यातून मूळ आशय वृद्धिंगत होत जाणे, हे भावकवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानावेच लागेल. बरेचवेळा प्रश्न पडतो, वापरलेली प्रतिमा, मूळ भावनेचा आशय अधिक अंतर्मुख होऊन व्यक्त होते की मूळ भावनेला गुदमरवून टाकते? नाकापेक्षा मोती जड, हे तत्व इथे देखील लागू पडते. प्रतिमासंयोजन म्हणजे तरी काय? जीवनात अनेक अनुभव आपणांस येतात. त्यातील काही संवेदनाद्वारे स्वतः:ला आलेले, काही कल्पनेने जाणवलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. काहीवेळा मिश्र अनुभव देखील येऊ शकतात. यातीलच कुठल्याही एकाच्या किंवा एकत्रित अनुभवांचा अर्कभूत परिणाम म्हणजे भाववृत्ती!! तिच्याशीच खऱ्याअर्थाने भावकवितेला नाते जोडता येते आणि ते नाते, प्रतिमांच्या द्वारे सखोल होत जाते.
"कुब्जा" कवितेत, हेच नात्यांचे ताणेबाणे बघायला मिळतात. या कवितेत, इंदिरा बाईंच्या प्रतिमांना ताकद मिळते, टी संवेदनाविश्वाच्या भरीव आणि निकट अशा जाणिवेमुळे. कवितेच्या पहिल्या कडव्यात राधेचा उल्लेख आणि त्याबरोबर "गोकुळ" आणि "मंजुळ पावा" या प्रतिमा आपल्या मनात एक "जमीन" तयार करतात. पुराणकथेचा आधार घेतला तर कुब्जेने विषाचा प्याला घेऊन जीवन संपविले होते. या कृतीचे वर्णन करताना,
" विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तों मुरलीरव;"
किती समर्पक शब्दयोजना आहे. कृष्णाचे नाव देखील कुठे घेतलेले नाही पण "मुरलीरव" या प्रतिमेतून कृष्ण तर उभा राहिलाच पण त्याच बरोबर, "विश्वच अवघे ओठा लावून" या कृतीने आपले अव्यक्त प्रेम व्यक्त केले आहे. बरे, तिची कृती "प्याला पिण्या" इतपत नसून, विष पिताना देखील डोळ्यातून सुख सांडत आहे आणि नुसते सांडत नसून ती भावना केवळ माझीच आहे, हे अधिक महत्वाचे आहे.इथे सगळी कविता कुब्जेची होते आणि सुरवातीची राधा पूर्णपणे लुप्त होते. शेवटच्या कडव्यात जो ताण आहे, तिचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची जाणीव.

No comments:

Post a Comment