Thursday 22 August 2019

साऊथ आफ्रिका - दुभंग समाज

ल्ली परदेशी नोकरीनिमित्ताने राहायला जाणे यात फारसे अप्रूप उरलेले नाही आणि ते फार बरेच झाले. अनेक बाष्कळ मुद्दे उपस्थित केले जातात आणि परदेशी जाणे, यातली गंमतच निघून जाते. असो, एखादा देश राहण्यासाठी स्वीकारल्यावर, त्या देशाबद्दल इत्थंभूत माहिती घेण्यासाठी काही वर्षे तरी सलगपणे राहणे आवश्यक असते अन्यथा जे काही अनुभव येतात ते फार वरवरचे असतात. मुळात, त्या देशातील समाजात सामावून जाणे (हे तसे फार अपवाद म्हणून गणले जातात) ही प्रक्रिया फार किचकट आणि वेळखाऊ असते, प्रसंगी तटस्थता स्वीकारून, पडते घेऊन वागावे लागते. तरच काही प्रमाणात तुम्हाला त्या देशाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडण समजून घेता येते. अन्यथा सगळाच उथळपणा ठरतो. 
मला अशी संधी १९९४ मध्ये, साऊथ आफ्रिकेत नोकरी मिळाली. वास्तविक प्राथमिक विचार हा ४,५ वर्षांपुरताच होता. १९९२/९३ मध्ये मी लागोस-नायजेरिया इथे नोकरीसाठी गेलो होतो. पुढे सुट्टीनिमित्त भारतात आलो आणि अचानक साऊथ आफ्रिकेची संधी चालून आली. एक नवा देश, बघूया कसा काय आहे? या विचारानेच संधी स्वीकारली. वास्तविक त्यावेळेस, "नेल्सन मंडेला" सोडले तर कुठलीही व्यक्ती ऐकिवात देखील नव्हती, "जोहान्सबर्ग","डर्बन", "प्रिटोरिया" आणि "केप टाऊन" वगळता कुठल्याच शहराचे नाव माहीत नव्हते. थोडक्यात मनाची पाटी कोरी ठेऊन, या देशाला गेलो. पुढील विचार करता, मनात कसलीच कल्पना नव्हती, ही इष्टापत्तीच ठरली. प्रत्येक प्रदेश, प्रत्येक दिवस, भेटलेला प्रत्येक माणूस हा नवीन अनुभवच ठरला. नोकरी "पीटरमेरित्झबर्ग" शहरात होती. या शहराचे नाव सुद्धा त्यापूर्वी ऐकलेले नव्हते परंतु "डर्बन" शहराजवळील शहर, इतकीच माहिती, घर सोडायच्या आधी समजली होती. १९९४ साली एकूणच साऊथ आफ्रिका देशाबद्दल आपल्याकडे "अज्ञान" अमाप होते आणि तसे अनुभवी कुणीही भेटले नव्हते. परंतु अशी माहिती नव्हती, त्यामुळे पुढे आलेले सगळेच अनुभव आजही मनात ताजे राहिलेले आहेत. मुळात कसलाच पूर्वग्रह नव्हता त्यामुळे नवलाई भरपूर होती. 
देशाबद्दल थोडक्यात सांगायचे तर तिथे "वर्णद्वेषी" राज्यकर्ते होते (१९९४  सालीचा तिथे पहिली लोकशाही निवडणूक झाली आणि नेल्सन मंडेला अध्यक्ष म्हणून निवडून आले) आणि त्यांनी गौरेतर लोकांवर अनन्वित अत्याचार करून सगळ्यांना त्रस्त केले होते. नेमका काय अत्याचार केला होता, त्याचे काय परिणाम झाले वगैरे बाबींबद्दल मी अनभिज्ञ होतो. त्यामुळे जेंव्हा मी तिथल्या कंपनीत पहिल्या दिवशी शिरलो आणि माझी ओळख परेड झाली तेंव्हा तिथल्या लोकांनी जरी "स्वागत" वगैरे उपचार पाळले तरी त्यात स्नेहार्दपणा जराही नव्हता. माझ्या कंपनीतील  ऑफिसमध्ये, माझ्याआधी २ भारतीय नोकरीसाठी आले होते आणि त्यांची ओळख होणे, हेच मला उबदार वाटले. 
पहिल्या काही दिवसांत मला एक जाणीव झाली, माझे मौखिक इंग्लिश आणि इथल्या लोकांचे इंग्लिश, या उच्चारात बराच फरक होता. अर्थात त्याची आडवळणाने मला जाणीव करून दिली जात होती. मला जर का इथे नोकरी करायची असेल तर माझे उच्चार बदलणे आवश्यकच होती आणि ही जाणीव लखलखीतपणे जाणवली. उच्चार शिकण्याशिवाय तरुणोपाय नव्हता. इथल्या  ख्रिश्चन लोकांचे उच्चार पद्धती जिभेवर रुळण्यासाठी मला जवळपास ३ महिने लागले अर्थात मला कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याने सगळे घडले अन्यथा इथे राहणे अवघड गेले असते. जसजसे दिवस जायला लागले तशी इथल्या भारतीय वंशाच्या लोकांशी ओळखी व्हायला लागल्या. इथला भारतीय वंशीय समाज साऊथ आफ्रिकेत १८५० पासून यायला लागला आणि हा देश पुढे जगापासून तुटला तशी इथला भारतीय समाज इथलाच झाला, दुसरा काही इलाजच नव्हता. याचा परिणाम असा झाला, त्यावेळी ज्या भारतीय पद्धती होत्या, त्या आजही आंधळेपणाने चालू राहिल्या. त्यामागे तर्क वगैरे काहीही नाही. एक उदाहरण देतो, वास्तविक Good Friday आणि Ester Monday हे सण ख्रिश्चन लोकांचे पण इथल्या भारतीयांनी आपलेसे केले परंतु आपलेसे  करताना, भारतातील पूर्वीच्या प्रथा आजही स्वीकारल्या. विशेषतः डर्बन, पीटरमेरित्झबर्ग शहरात त्यादिवशी निर्जळी उपास  करतात,संध्याकाळी शहरातून प्रचंड मिरवणूक काढली जाते (शहरातील भारतीय मंदिरात ती मिरवणूक विसर्जित होते), त्या मिरवणुकीत काहीजण भ्रमिष्टाप्रमाणे उघड्या अंगावर अणकुचीदार आकड्याच्या साहाय्याने फळे लटकावतात - काहीजण तर जिभेवर आणि पापण्यांवर फळे खोचतात!! या व्यक्ती तो सगळा काळ भ्रमिष्टच असतात. पुढे मिरवणूक मंदिरात आल्यावर इथे जिवंत निखाऱ्यांवरून अनवाणी पायाने चालतात!! 
मी जेंव्हा पहिल्या वर्षी हा सोहळा बघितला तेंव्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील लोकांना काही प्रश्न विचारले परंतु मला एकदाही तर्कसुसंगत उत्तर मिळाले नाही. "बाबा वाक्यम प्रमाणम" हीच वृत्ती दिसली. वास्तविक भारतात देखील अंतर्भागात असले प्रकार चालतात परंतु शहरी भागात असे काही चालत असल्याचे मला तरी माहीत नाही किंवा माझ्या बघण्यात नाही. मी जेंव्हा असे इथल्या लोकांना सांगितले तर त्यावर कुणीही काहीही बोलले नाही. हाच प्रकार त्यांच्या नेहमीच्या विचारसरणीत कायम दिसून आला. आपण जे  वागतो,जी विचारसरणी स्विकारतो त्यामागे कसले तरी वैचारिक अधिष्ठान असावे, असे इथल्या भारतीय वंशाच्या लोकांना वाटतच नाही. कधीकाळी आपल्या आजोबांनी, वडिलांनी जे काही चालू ठेवले होते तेच अंधपणे चालू ठेवण्यातच त्यांना आनंद वाटतो. एका बाजूने या समाजावर अमेरिकन संस्कृतीचा प्रचंड पगडा आहे, उच्चार तसेच अंगवळणी पाडले, राहणीमान अमेरिकन लोकांवर अवलंबून स्वीकारले. सामाजिक चालीरीती एका बाजूने जुनाट भारतीय घेतल्या पण आधुनिकतेच्या नावाखाली जी संस्कृती स्वीकारली, ती निव्वळ अमेरिकन संस्कृती!! तिथला भारतीय समाज हा प्रामुख्याने "तामिळ", "हिंदू" (तामिळ बगैर) आणि "मुस्लिम" यात विभागला गेला आहे. अर्थात लग्न व्यवहार बघताना हा भेदाभेद आवर्जूनपणे बघितला  जातो,हे विशेष. एकवेळ "हिंदू" आणि "तामिळ" यांच्या अपवादस्वरूपात रोटीबेटी व्यवहार सापडतात परंतु "मुस्लिम" आणि "इतरेतर" यांच्यात विस्तव जात नाही. अर्थात व्यवहार वगैरे बाबतीत असली आडकाठी नसते. तिथे मात्र संपूर्णपणे व्यवहार्य दृष्टिकोन असतो. मी ज्या कंपनीत काम करीत होतो, ती मुस्लिम कुटुंबाच्या मालकीची होती. अगदी कर्मठ म्हणावे अशी विचारसरणी. अर्थात आमच्यासारख्या भारतातून आलेल्या लोकांवर तशी काही बंधने नव्हती. त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या मुलाने एका "हिंदू" मुलीशी, घरातून पळून जाऊन लग्न केले. ज्या दिवशी लग्न केले त्याच दिवशी त्याला धर्मातून बहिष्कृत करण्यात आले!! त्याच्या कुटुंबात नुसता हलकल्लोळ उडाला होता. 
अर्थात असा प्रकार तामिळ आणि हिंदू समाजात होत नाही पण इतरांची नजर थोडी तिखट होते, बोलण्यातून वाग्बाण निघतात. अशी काही लग्ने मी स्वतः बघितली आहेत. यात गमतीचा भाग असा देखील आहे - मुलगी जरी मुस्लिम समाजातील असली तरी तिला आधुनिक राहणीमान खूप भावत असते. घरात डोक्यावर पडदा ओढून घेतील ऑफिसमध्ये तशाच वावरतील पण बाहेर गेल्यावर मात्र ती बंधने बाजूला टाकली जातील. काही मुस्लिम मुली तर नाईट क्लबमध्ये धुंद होऊन नाचलेल्या, मी याची डोळा बघितलेल्या आहेत. अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास,इथला भारतीय खऱ्याअर्थी "दुभंग" आहे. एका बाजूने भारतीय म्हणून (वृथा) अभिमान बाळगतात पण दुसऱ्या बाजूने अमेरिकन संस्कृती आत्मसात करतात. गोऱ्या लोकांच्यात एकूणच सण, समारंभ याचे प्रमाण तसे कमीच असते परंतु इतकी वर्षे इथे गोऱ्या लोकांनी राज्य केल्यामुळे त्यांच्या सवयी, राहणीमान इथल्या भारतीय समाजाने आपल्याशा केल्या आहेत. याबाबत असे ठाम विधान करता  येईल, गोऱ्या राजवटीने इथल्या भारतीय समाजावर पूर्णपणे अधिष्ठान मिळवले आहे आणि दिवसेंदिवस वाढतच आहे. आता गेली काही वर्षे या लोकांचा भारताशी बराच संबंध यायला लागला परंतु १९९४ च्या सुमारास भारतीय वंशीय समाजाची सांस्कृतिक भूक ही भारतीय हिंदी चित्रपटांवर पोसलेली होती!! भारतातून त्यावेळी हिंदी चित्रपटांच्या व्हिडीओ तिथे भरपूर मिळत असत आणि त्यांच्यावरच त्यांची सांस्कृतिक गुजराण होत असे. त्यामुळे भारतीय संगीत म्हणजे हिंदी चित्रपट संगीत (काही अपवाद मला भेटले होते पण त्यांचे प्रमाण अत्यल्प असेच होते) असाच समज दृढ झाला होता आणि आजही यात फारसा फरक नाही. मी तिथे असताना, एकदा पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची मैफल झाल्याचे स्मरते परंतु श्रोते  बघता,बव्हंशी वयस्कर होते, तरुणांचा सहभाग जवळपास नगण्य स्वरूपाचाच होता. 
भारतीय समाज हा अधिककरून डर्बन, पीटरमेरित्झबर्ग या शहराभोवतीच वसलेला आहे. केप टाऊन, पोर्ट एलिझाबेथ सारख्या शहरात तर फारच अल्प संख्येने भारतीय वंशाचे राहतात. अर्थात माझी नोकरीची ठिकाणे देखील बरीचशी शहरी भागातच असल्याने मला हा अनुभव आला. आजही भारतीय समाज वेगळ्या वस्तीत राहतो. एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या वस्तीत शक्यतो घर घेण्याचे टाळतो. अगदीच रहात नाहीत असे नाही पण प्रमाण अल्प!! आजही गोरे, काळे आणि भारतीय समाज यांमधील दरी बुजलेली नाही. माझ्या माहितीत, एकच "हिंदू" मुलगी अशी निघाली जिने एका गोऱ्या माणसाशी सूत जुळवले आणि लग्न करून स्थिरावली!! अर्थात दिसायला अतिशय देखणी अशीच होती पण तिच्याकडे सगळा भारतीय समाज "दिग्विजय गाजवलेली मुलगी" याच नजरेतून बघतो. आजही भारतीय वंशाच्या आणि काळ्या लोकांच्या मनावर अदृश्यपणे का होईना पण गोऱ्या लोकांचे मानसिक वर्चस्व आहे. स्पष्ट बोललो तर मान्य करणार नाहीत., पण मी स्वानुभवावरून लिहीत आहे. 
पुढे काही वर्षांनी मी प्रिटोरिया आणि शेवटी जोहान्सबर्ग इथे नोकरी करायला आलो. इथे मात्र माझा काळा आणि गोरा समाज यांच्याशी फार जवळून संबंध आला. काही जणांशी आजही संपर्क आहे. सतत दुसऱ्या समाजावर वर्चस्व गाजवायचे, अशीच आजही गोऱ्या लोकांची बव्हंशी मानसिक ठेवण आहे. मला सुरवातीला फार त्रास झाला पण हळूहळू त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकलो. माझ्या हाताखाली काही गोरे कामाला होते. सुरवातीला त्यांनी ढिम्मपणे वागायचे धोरण ठेवले, कुठलेच सहकार्य करायचे नाही, कामात सतत आडकाठी करायची असेच धोरण असायचे पण तोपर्यंत मला या देशाचा बराच अनुभव आला होता. जसजसे मी त्यांचे पाणी जोखायला लागलो तशी त्यांचे मला सहकार्य मिळायला लागले. गोऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य खरोखरच आत्मसात करण्यासारखे आहे, मी बघितलेल्या बहुतांशी गोऱ्या लोकांमध्ये "व्यावसायिक" वृत्ती भरपूर असते (अपवाद सगळीकडेच असतात) ऑफिसमध्ये काम करताना, वचावचा बडबड नसते, कामाप्रती निष्ठा असते तसेच ऑफिसमध्ये आवश्यक तितकी जवळीक दाखवली जाते परंतु बाहेर कुठे (विशेषतः मॉलमध्ये) भेट झाली तर ओळख दाखवतील याची खात्री नसते!! मला असे थोडेच गोरे भेटले ज्यांच्या घरापर्यंत मी पोहोचू शकलो. ही त्यांची मानसिक घडण आहे आणि "आपल्या कातडीला जगात मान आहे"  या वृत्तीतूनच जन्माला आली आहे. खासगी नोकरींमध्ये आपली चूक मान्य  करणे,सर्वसाधारणपणे घडत नाही. तुम्ही एखाद्या गोऱ्या व्यक्तीची चूक दाखवा, ती व्यक्ती अनेक प्रकारची कारणे  सांगेल, तुमच्याच अंगावर चूक ढकलून देईल प्रसंगी फडतुस देखील विनोद करून विषयांतर करतील. तुम्ही इतके सगळे होऊन ठाम राहिलात तर मग गळ्यात हात वगैरे टाकतील!! 
गोरा माणूस हा असा आहे, जन्मापासून आपण कुणीतरी वेगळे आहोत, असेच शिकवले जाते. त्याचे प्रत्यंतर पुढे अनेक प्रसंगातून लख्खपणे दिसते. एक मात्र मान्यच करायला हवे, गोरे लोकं उगीचच परंपरेचे ओझे वाहत नाहीत. भारतीय समाज, जोखड म्हणून वागवतो. गोरा माणूस, तुम्ही जर गोऱ्या कातडीचे नसाल तर एका ठराविक अंतरावरच ठेवणार. उगीच जवळीक वगैरे साधणार नाही, गळेपडूपणा तर अभावानेच आढळेल. आज मी साऊथ आफ्रिका सोडून ८ वर्षे झाली पण अपवाद म्हणून दोनच गोऱ्या व्यक्तींशी माझा संपर्क आहे!! असे असले तरी पार्टी रंगवावी तर गोऱ्या माणसांनीच. पार्टी म्हटली की गोरा माणूस मोकळा होतो. सुदैवाने मला काही ख्रिसमस पार्ट्या गोऱ्या लोकांच्या घरात साजऱ्या करता आल्या. परदेशात  राहताना,ख्रिसमस साजरा करणे, यात काही फारसे नवल नसते परंतु अशाप्रकारे एखाद्या गोऱ्या लोकांच्या कुटुंबात साजरे करणे, हा सुंदर अनुभव असतो. प्रसंगी अश्लील विनोद सांगितले जातील (बायकांच्या देखत!) किंवा आयुष्यातील फजितीचे प्रसंग खुलवत सांगतील. भारतीय समाजातील लोकं पार्टीचे तत्व सांभाळतील पण साजरी करताना बरेचवेळा खालची पातळी देखील गाठतील. 
काळ्या लोकांचा समाज तर फारच वेगळ्या स्तरावर वावरत असतो. इथला काळा समाज हा आजही बहुतांशी मानसिक कुचंबणेत अडकलेला आहे. वर्णद्वेषी काळाचा सर्वात जास्त फटका या समाजाला बसला. Inferiority Complex त्यांच्या वागणुकीतून सतत जाणवत असतो. मुळातच हाडपेर दणकट, देहयष्टी भरदार आणि एकूणच हालचाली दुसऱ्याला जरब बसवणाऱ्या, त्यामुळे या लोकांच्या वाटेला सहसा कुणी जात . इतकी वर्षे या समाजाला निव्वळ दाबून ठेवल्याने आणि रगडून घेतल्याने, सर्वसाधारण प्रवृत्ती ही काहीशी जहाल भासते परंतु हे काही प्रातिनिधिक चित्र नव्हे. मला काही काळ्या व्यक्ती अतिशय सहृदय भेटल्या आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामात वाकबगार होत्या. एक सर्वसाधारण निरीक्षण असे, या समाजावर वर्षानुवर्षे अन्याय झालाआणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या वागणुकीतून दिसते. १९९४ सालापासून या देशात लोकशाही आली आणि काळ्या लोकांना आपल्या हक्कांची वाजवी जाणीव झाली. या बाबतीत आणखी एक निरीक्षण असे नोंदवता येईल - १९९४ साली लोकशाही प्रक्रियेच्या निवडणुका झाल्या आणि नेल्सन मंडेला अध्यक्षपदी विराजमान झाले, त्यावेळेस एक धोका साऊथ आफ्रिकेत होता जो इतर आफ्रिकन देशांतून वारंवार दिसतो. स्वातंत्र्य मिळाले पण काळ्या लोकांच्यात आपापसात टोळीयुद्धे सुरु झाली आणि "राजवट" अधिक "रासवट" झाली. साऊथ आफ्रिकेत निदान त्यावेळेस तरी हा धोका टळला. अर्थात पुढे झालेली आणि अजुनही चालू असलेली सामाजिक घसरण मात्र टाळू शकले नाहीत.  
एक गमतीशीर उदाहरण द्यावेसे वाटते. प्रिटोरिया इथल्या इथे  करीत  असताना, एके दिवशी  सहाध्यायी म्हणून एक तरुण कला मुलगा आला. त्याचे टेबल माझ्याच  शेजारी होते. आता शेजारीच आला म्हणून ओळख वाढवली. आता आम्ही या देशाचे राजे आहोत, याचा काहीसा दर्पयुक्त बोलण्याचा सूर असायचा. अर्थात फारसे वावगे नव्हते कारण आता या देशाचे राज्यकर्ते कृष्णवर्णीय (च) असणार, हे उघड सत्य आहे. त्या ऑफिसच्या मुख्य दरवाज्यातून आत शिरताना लांबलचक लांबोळका असा पोर्च होता. एके संध्याकाळी रेमंड ( त्या काळ्या मुलाचे  नाव) काही कामनिमीत्ताने दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये निघाला. वाटेत त्याला आमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा धक्का लागला. तो वरिष्ठ अधिकारी गौर वर्णीय होता. तिथे त्या दोघांचे काय  झाले,मला कल्पना नव्हती पण त्याच संध्याकाळी रेमंड आमच्या C.E.O. कडे तक्रार घेऊन गेला. तक्रारीच्या मसुद्यात, त्या गौरवर्णीय अधिकाऱ्याने मला मुद्दामून धक्का दिला आणि अनिल त्या घटनेचा साक्षी आहे!! लगेच मला बोलावण्यात आले. रेमंडला लेखी माफी हवी होती अन्यथा तो पोलीस तक्रार करणार होता - रेमंडचे म्हणणे असे होते, या गौर वर्णियाच्या मनात अजूनही वर्णद्वेष जागा आहे आणि म्हणून त्याने माझा अपमान करण्यासाठी मुद्दामून धक्का दिला!! हे ऐकताना मला तर मनातल्या मनात हसायलाच येत होते. परंतु जर का हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असते तर नसता अनर्थ झाला असता. मनात विचार आला, मुंबईत अशा घटना नेहमीच होत असतात, धक्का लागल्यावर तिथल्या तिथे "sorry" म्हणायचे आणि पुढे चालायला लागायचे. असाच शिरस्ता असतो पण हा साऊथ आफ्रिका देश आहे. Protocol इत्यादी बाबींना इथे कमालीचे महत्व असते. सकाळी कामावर येताना कधीकधी आपण काही विचारांत गर्क असू शकतो पण तरीही "Good Morning" किंवा संध्याकाळी घरी जाताना "Good Evening" हे सोपस्कार पूर्ण करायचेच असतात अन्यथा  समोरच्याचा अपमान होऊ शकतो! मला देखील एक, दोनदा या अनुभवाला सामोरे जावे लागले होते. 
या बाबतीत इथला सगळा समाज एकवटलेला आहे. तसेच इथला materialistic  द्रुष्टीकोन स्विकारण्यासारखा आहे. इथे श्रमाला आणि शिक्षणाला किंमत आहे. भारताप्रमाणे इथे सरसकट पदवीधर बघायला मिळत नाहीत. शिक्षण अतिशय महागडे आहे. अर्थात शिक्षणाचे प्रमाण गोऱ्या लोकांमध्ये अधिक आहे आणि काळ्या लोकांमध्ये उदासीनता अधिक आहे. थोडा विचार केला तर १९९४ च्या आधी शिक्षणाच्या संधी या फक्त गौर वर्णीयांनाच उपलब्ध होत्या. युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवणे इतरेजनांना अशक्य होते. याचा परिणाम भारतीय समाज आणि काळा समाज यांच्यावर पडणे अपरिहार्य होते. इतरेजन हे आपल्या घरातील शेलकी कामे करण्यासाठी आहेत, हाच समज पक्का झाला होता. आजही यात फारसा फरक आढळत नाही. 
याचा विरुद्धार्थी परिणाम काळ्या लोकांवर झाला. रेमंडची प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर बघता येते. २००० नंतर इथे Law and Security हा प्रश्न भयानक झाला, त्याची पाळेमुळे इतिहासात सापडतात. 
वास्तविक १९९४ मध्ये रीतसर स्वातंत्र्य मिळाले. काळ्या लोकांसमवेत भारतीय वंशीय लोकांनीही सर्वस्वाची होळी केली होती. अनेक वर्षे रॉबिन आयलंडसारख्या (अंदमानप्रमाणेच हा तुरूंग आहे. विक्राळ समुद्रातील एकांतवासी बेट आहे) तुरूंगात आयुष्य व्यतीत केले आहे पण नव्या साउथ आफ्रिकेत भारतीय समाजाला फार काही मिळाले नाही. पुढे Black Empowerment कायदा झाला जो उघडपणे काळ्या समाजाला वर्धीत करणारा झाला. यामध्ये इथले भारतीय कुठेच नव्हते. असे नव्हे, सत्तेत वाटेकरी झाले नाहीत. प्रवीण गोरधन सारख्या व्यक्ती देशाची  Finance Minister झाली  पण संपूर्ण समाज हा "वंचीत" राहिला.आणि हे परखड सत्य आहे. याची जळजळ भारतीय समाजात ठुसठुसत आहे. 
अर्थात काळ्या समाजाला उजवे माप मिळाले म्हणून तो समाज वर्धिष्णू झाला का? तसे चित्र अजिबात दिसत नाही. गुन्हेगारी अतोनात वाढली आहे, भ्रष्टाचार रोजचा झाला आहे आणि सामान्य पातळीवर चालत आहे. यात काळा समाज आघाडीवर आहे. एक मुद्दा आणखी मांडायला लागेल, इथला काळा समाज म्हणजे आता लोकल + नायजेरियन असे समीकरण मांडायला हवे, इतक्या प्रमाणावर इथे नायजेरियन इथल्या गुन्हेगारीत सामावले आहेत. Easy Money हेच यांच्या आयुष्याचे महत्वाचे सूत्र झाले आहे. आजही अशा काळ्या लोकांची वस्ती प्रामुख्याने वेगळी आहे आणि त्याला  Location म्हणतात. अती भयानक अशी ही वस्ती असते. पोलीस देखील धाड टाकताना, पूर्ण तयारीनिशी जातात कारण पोलीसाचा खून होणे, ही नैसर्गिक घटना झाली आहे. 
एका बाबतीत हे तिन्ही समाज एकसंध आहेत. कुटुंबसंस्थेच्या विलीनीकरणाच्या बाबतीत कमालीचे साम्य आढळते. कुटुंबसंस्था अशी काय दोलायमान झाली आहे की काही बोलायची सोय नाही. लग्नाआधी मूल होणे ही आता सर्वमान्य घटना झाली आहे. एक नक्की, हे सगळे उघडपणे चालते. त्यात लपवाछपवी नसते. मला तर अशी भरपूर उदाहरणे माहित आहेत ज्यांची (विशेषत: मुलींची) आयुष्ये भरकटलेल्या पतंगाप्रमाणे भिरभिरत आहेत!! अशी उदाहरणे सगळ्या समाजात आढळतात. 
यात एक मजेदार निरीक्षण असे, आता काळ्या लोकांचे राज्य आले तरी गोऱ्या लोकांची गूर्मी तितकी कमी झालेली नाही. आपला पगार वाजवून घेतात. अर्थात ही विषण्णता भारतीय समाजात जास्त आढळते. वास्तविक काही भारतीय खरोखरच बुद्धीवान आहेत आणि त्यांना देखील वाजवी पगार मिळतो पण ते प्रमाण अजुनही अत्यल्प आहे आणि ही बाब खटकते. हाच मुद्दा आणखी पुढे नेला म्हणजे एक अत्यंत विदारक चित्र उभे राहते. आर्थिक विषमता जगात सगळीकडे आहे परंतु साऊथ आफ्रिकेत याचे अतिशय भीषण स्वरूप आढळते. मी काही वर्षे तिथल्या गावस्वरूप जागेत नोकरीनिमित्ताने काढली. नोकरीचा भाग म्हणून मला पार अंतरंगात जावे लागायचे. तिथल्या  वस्त्या, लोकांचे राहणीमान, त्यांची (तथाकथित) घरे इत्यादी गोष्टी फार जवळून बघायला मिळाले. ते सगळे बघताना, देशातील आर्थिक विषमतेचा पुसटसा अंदाज घेता आला. साउथ आफ्रिकेत "मध्यमवर्ग" आहे पण एकूण लोकसंख्येचा विचार करता "अल्पसंख्य" आहे. श्रीमंत आणि गरीब, यांच्यात प्रचंड मोठी दरी आहे. या देशातील गुन्हेगारी वाढण्यामागे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अर्थातच काळा समाज आजही मोठ्या प्रमाणावर गरीब आहे. एकीकडे अवाढव्य सुबत्ता आणि दुसरीकडे शेणाच्या भिंतींची घरे, हा विदारक विरोधाभास आहे. जुन, जुलै महिन्यातील हाडे गोठविणाऱ्या थंडीत कसे रहात असतील?.हा अस्वस्थ करणारा अक्राळविक्राळ प्रश्न आहे. 
इथला समाज दुभंगलेला आहे, त्या मागचे हे इंगीत आहे. त्यामुळेच "अविश्वास" हवेत भरलेला आहे. प्रत्येकजण आपला एक कंपू करून रहात असतो. ज्याला सुबत्ता मिळवायची आहे त्याला बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. आयुष्य उबदारपणे व्यतीत करणे सहजशक्य आहे. बुद्धीमत्तेला मान्यता आहे पण यामागे मानसिक दुभंगलेपणाचे अभेद्य कवच आहे. 
या बाबतीत इथला सगळा समाज एकवटलेला आहे. तसेच इथला materialistic  द्रुष्टीकोन स्विकारण्यासारखा आहे. इथे श्रमाला आणि शिक्षणाला किंमत आहे. भारताप्रमाणे इथे सरसकट पदवीधर बघायला मिळत नाहीत. शिक्षण अतिशय महागडे आहे. अर्थात शिक्षणाचे प्रमाण गोऱ्या लोकांमध्ये अधिक आहे आणि काळ्या लोकांमध्ये उदासीनता अधिक आहे. थोडा विचार केला तर १९९४ च्या आधी शिक्षणाच्या संधी या फक्त गौर वर्णीयांनाच उपलब्ध होत्या. युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवणे इतरेजनांना अशक्य होते. याचा परिणाम भारतीय समाज आणि काळा समाज यांच्यावर पडणे अपरिहार्य होते. इतरेजन हे आपल्या घरातील शेलकी कामे करण्यासाठी आहेत, हाच समज पक्का झाला होता. आजही यात फारसा फरक आढळत नाही. 
याचा विरुद्धार्थी परिणाम काळ्या लोकांवर झाला. रेमंडची प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर बघता येते. २००० नंतर इथे Law and Security हा प्रश्न भयानक झाला, त्याची पाळेमुळे इतिहासात सापडतात. 

No comments:

Post a Comment