Saturday 18 August 2018

अजित वाडेकर

स्पष्टच लिहायचे झाल्यास, वाडेकरांचे जाणे हे तसे अकल्पितच म्हणायला हवे. कुठेही त्यांच्या आजारपणाची वाच्यता झालेली नव्हती, त्यामुळे आजारी आहेत, हेच कळले नव्हते आणि अचानक वाडेकर गेल्याची बातमी!! अर्थात सत्तरी पार केलेली व्यक्ती ही कधी ना कधीतरी जाणारच असते. एक नक्की, गेल्या काही वर्षात वाडेकर विस्मृतीत गेले होते. तसे पहायला गेल्यास, व्यक्तिमत्व अत्यंत मितभाषी, सालस. असे असून देखील १९७१ साली त्यांनी भारतीय संघाची विळ्या-भोपळ्याची सक्षम मोट काही वर्षे तरी नक्कीच बांधली होती. १९७१ साली, वाडेकर प्रकाशात आले होते. रणजी सामने दणक्यात गाजवत होते. मी कितीतरी सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर जाऊन, भान हरपून पहिले होते. भारतीय संघातील कामगिरी अतुलनीय जरी नसली तरी लक्षणीय नक्कीच होती. मुंबईचे सातत्याने यशस्वी नेतृत्व केले होते आणि देशातील प्रतिष्ठित अशी रणजी ट्रॉफी वर्षानुवर्षे मुंबईकडे ठेवली होती. त्यावेळचा मुंबईचा संघ म्हणजे निव्वळ असामान्य खेळाडूंचा संघ होता. 
त्यावेळी मला वाटते, सुनील गावस्कर एकदा म्हणाले होते, एकवेळ भारताच्या संघात प्रवेश मिळेल पण मुंबई संघात स्थान टिकवणे फार अवघड आहे आणि परिस्थिती अशीच होती. विशेषतः: मुंबईची फलंदाजी तर डोळ्यात भरणारी अशीच होती आणि अशा संघाचे वाडेकर कप्तान होते. सुनील, पारकर, सरदेसाई, वाडेकर, अशोक मंकड. एकनाथ सोलकर, मिलिंद रेगे  यांना पुढे मिळालेले दिलीप वेंगसरकर आणि संदीप पाटील. गोलंदाजी साठी एकटा पद्माकर शिवलकर पुरेसा असायचा. तसे बाळू गुप्ते आणि एकनाथ सोलकर गोलंदाजीसाठी असायचेच पण फलंदाज इतकी भव्य संख्या गाठून द्यायचे की समोरचा संघ, ती धावसंख्या बघूनच गारठला जायचा.  यात वाडेकर म्हणजे मुकुटमणी!! अत्यंत शांतपणे खेळपट्टीवर  येणार, त्याच शांतपणे स्टान्स घेणार. कुठेही आपण आलो म्हणून कसली ग्वाही नाही की गोलंदाजांचे खच्चीकरण करण्याची नजर नाही. तो स्वभावच वाडेकरांचा नव्हता. सुरवातीला थोडे चाचपडणे असायचे पण नजर स्थिरावली की मग मात्र गोलंदाजांची खैर नसायची. एका रणजी सामन्यात त्यांनी प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्या विरुद्ध चक्क त्रिशतक काढले होते. ज्यांना कुणाला प्रसन्नाच्या गोलंदाजीचा दर्जा ठाऊक असेल त्यांना या वाक्याचे नेमके महत्व कळून येईल. 
वाडेकरांच्या फलंदाजीत नजाकतभरा डौल होता. कधी त्यांनी हातातील बॅटीचा उपयोग हत्याराप्रमाणे केला नाही. विशेषतः त्यांचा "लेटकट" बघणे, केवळ नयनरम्य असेच असायचे. किंचित मागील पायावर भर द्यायचा, बॅट स्लिपच्या दिशेने न्यायाची आणि चेंडूला अगदी शेवटच्या क्षणी स्लिपमधूनच थर्डमॅनला दिशा द्यायची!! कुठेही ताकदीचा वापर नाही. दिशा द्यायची, ती देखील  इतक्या शेवटच्या क्षणी की जर का अंदाज चुकला तर स्लिपमध्ये झेल नक्की किंवा क्लीन बोल्ड!! परंतु क्रिकेटमधील थोडे नयनरम्य फटके आहेत,त्यातील विलक्षण सौंदर्यवान फटका.  गोलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात टाकणारा आणि चकवून देणारा हा फटका मारणे सहजशक्य नाही आणि जे प्रत्यक्ष क्रिकेट खेळले आहेत, त्यांनाच या फटाक्यातील खरी लज्जत कळेल. 
उंची सहा फुटाहून थोडी जास्त, शरीरावर कुठेही मांसल भाग आहे का, अशी शंका यावी इतपत सडपातळ बांधा, चालीत काहीसा आळशीपणा भरलेला पण एकदा का हातात बॅट घेतली की मैदानावर चैतन्य निर्माण करायची ताकद. सगळी ताकद मनगटात भरलेली. किंबहुना हुक सारखा दणकट फटका सोडला तर भात्यात सगळे मनगटी फटके. भारतात मी कधी त्यांना हूकचा फटका खेळताना पाहिल्याचे आठवत नाही. कसे बघणार म्हणा!! भारतात त्यावेळी प्रलयंकारी वेगवान गोलंदाज होतेच कुठे? अर्थात आजही ज्याला प्रलयंकारी म्हणावे असे गोलंदाज नाहीत पण पूर्वीपेक्षा परिस्थिती बरीच बरी. असो, एक दोष मात्र नक्कीच काढता येईल, विशेषतः: कसोटी सामन्यात, नव्वदीत बाद होण्याचा!! नव्वद धावा काढल्या म्हणजे चेंडूवर नजर स्थिरावली असे नक्कीच म्हणता येईल परंतु पुढील दहा धावा अशावेळेस "अंत" बघतात, भलेभले खेळाडू डगमगताना बघितले आहेत आणि वाडेकर याचे बळी वारंवार झाले. वास्तविक ८ वर्षांचीच कसोटी कारकीर्द आणि त्यातही एकमेव शतक. ही आकडेवारी काही असामान्य नक्कीच म्हणता येणार नाही पण तरीही बरेचवेळा असे घडले, संघ दोलायमान अवस्थेत असायचा आणि वाडेकरांची पन्नाशी किंवा नव्वदीची खेळी संघाला तारून न्यायची. 
१९७१ ची  गाजलेली  कसोटी मालिका  - लॉर्ड्सवर पहिलाच कसोटी सामना, पहिल्या इनिंगमध्ये वाडेकरने ८५ धावा केल्या होत्या आणि परिस्थिती त्यावेळी कठीणच होती. या खेळीचे महत्व निश्चितच शतकापेक्षा महत्वाचे होते. तरीही आज असे म्हणता येईल, कसोटीत वाडेकरांची फलंदाज म्हणून कामगिरी डोळ्यात भरणारी अशी नव्हती. खरतर ८ वर्षांचीच कसोटी कारकीर्द आणि त्याकाळी कसोटी मालिका आजच्यासारख्या वारंवार होत नसत. त्यामुळे वाडेकरांना आपल्या कौशल्य दाखविण्याच्या संधी फार कमी मिळाल्या. त्यातून वाडेकर आपले नावाला तिसऱ्या क्रमांकावर यायचे, परिस्थिती बरेचवेळा अशीच असायची, सलामीचा फलंदाज पहिल्या ५,६ ओव्हर्समध्ये परतलेला असायचा आणि चेंडूची लकाकी घालवण्याचे, संघाचे तारू मार्गी लावण्याचे अशी दुहेरी कामगिरी सतत अंगावर पडलेली असायची. अर्थात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना म्हटले म्हणजे अशा कारणांना काहीही वाव नसतो. परिस्थिती कशीही असू दे, न कुरकुरता आपली खेळी साकारायची, हेच तत्व, जे त्याकाळी सुनील, विशी  यांनी वर्षानुवर्षे अंगिकारले होते. 
वाडेकर खऱ्याअर्थाने  रणजी,दुलीप सामन्यात अक्षरश: "दादा" होते. त्यावेळच्या जगद्विख्यात स्पिनर्सना लीलया फेकून देण्याची विलक्षण क्षमता त्यांनी वारंवार दाखवली होती. फटका मारायचा पण त्यात नजाकत दिसायची. कुठेही आगडोंब उधळला, असे कधीही झालेच नाही. त्यांचा कव्हर ड्राइव्ह देखील असाच देखणा होता. किंचित उजवा पाय पुढे आणायचा आणि शरीर किंचित खालच्या बाजूला झोकून ठेवायचे आणि बॅटीने पुढील काम करायचे!! निव्वळ टायमिंग!! कव्हर, मिड-ऑफचे क्षेत्ररक्षक फक्त बघ्याची भूमिका घ्यायचे. बघण्यासारखा भाग म्हणजे बॅटीची सहज हालचाल. एखादी मंदगती हरकत गळ्यातून  निघावी तसे सौंदर्य त्या फटक्यात असायचे. 
वाडेकर कप्तान झाले आणि भारताचे कसोटी सामने जिंकायचे दुर्भिक्ष काहीअंशी संपले. अर्थात तरीही वाडेकर हे काही आक्रमक कर्णधार नव्हेत. पतौडी आक्रमक कर्णधार होते परंतु तरीही वाडेकरांनी भारताला परदेशाची सामने जिंकायची सवय  लावली,हे मान्यच करायला हवे. सलग २ मालिका परदेशी जिंकायची किमया तुरळकरीत्या बघायला मिळते आणि वाडेकरांनी ती करून दाखवली. याची दुसरी बाजू अशी होती, आपल्या संघात तेंव्हा भरात आलेले  बेदी, चंद्रा,प्रसन्ना आणि वेंकट सारखे स्पिनर्स होते. पुढे जागतिक स्तरावर जलदगती गोलंदाजांच्या जशा चौकड्या प्रसिद्ध झाल्या त्याच धर्तीवर ही मंदगती गोलंदाजांची चौकडी होती. प्रत्येकाची शैली वेगळी होती प्रत्येकजण सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता राखून होता. त्याचबरोबर वाडेकरांनी प्रकाशात आणलेली close in fielding. फॉरवर्ड शॉर्ट लेगला सोलकर, बॅकवर्ड शॉर्ट लेगला वेंकट, स्लिपमध्ये वाडेकर, या त्रिकुटाने अशक्यप्राय असे झेल  घेऊन,या मंदगती गोलंदाजांचा दरारा वाढवला. सोलकर तर केवळ असामान्य होता, नसलेले झेल पकडून फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा क्षेत्ररक्षक होता. 
परंतु जेंव्हा १९७४ साली भारताचे पारडे फिरलेआणि संघाचा अक्षरश: दारुण पराभव झाला तिथे वाडेकरांचा कस कमी पडला. नेतृत्व कमी पडले आणि मुख्य म्हणजे कोसळणाऱ्या संघाची धुरा उचलायला कमी पडले. एक कर्णधार म्हणून त्यांनी आपल्या फलंदाजीने इतरांसमोर आदर्श निर्माण करणे जरुरीचे होते पण तसे घडले नाही. याचा  परिणाम,भारतात झालेली अतोनात मानहानी - पण हे तर आपल्या रसिकांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे. कौतुक करतील तेंव्हा देव्हाऱ्यात बसवतील अन्यथा पायदळी तुडवायला कमी करणार नाहीत. १९७४ सालच्या मालिकेनंतर हेच झाले आणि निवडसमितीने वाडेकरांना Western zone संघातून देखील डच्चू दिला. पराभव मानहानीकारक नक्कीच होता परंतु ज्या कर्णधाराने तुम्हाला सलग ३ वर्षे विजयाची चव दिली, त्याला इतकी शेलकी वागणूक द्यायला नको होती. आपली निवडसमिती देखील क्रिकेट रसिकांसारखीच. 
वाडेकरांना खेळाडू म्हणून अजून एखादी संधी नक्कीच मिळायला हवी होती पण पराभवाला किंमत नसते हेच खरे 

No comments:

Post a Comment