Saturday 4 August 2018

किशोर कुमार - सुसंकृत अवलिया

"दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभूंच्या या ओली वाचताना मला नेहमी किशोर कुमार यांच्या "चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये" या गाण्याच्या ओळी आठवतात आणि त्यामागोमाग अविस्मरणीय झालेला चित्रपटातील प्रसंग!! किशोर कुमार यांच्या गायनाचे विश्लेषण करण्याअगोदर या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यावरील "यॉडलिंग" करणारा गायक असा लागलेला शिक्का किती चुकीचा आहे, हेच दर्शवायचे आहे. आपण किती सहजपणे कुठल्याही कलाकाराला झापडबंद अशा लेबलात अडकवतो यायचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार. मध्यप्रदेश राज्यातील खांडवा इथे जन्म. पहिल्यापासून काहीसा हुडपणा अंगात भरलेला ( उडत्या चालीची गाणी सहजपणे म्हणणे हा योगायोग नसावा!!) आणि पहिल्यापासून मनावर सैगल यांच्या गायनाचा प्रभाव पदाला आणि त्याबाबतची कृतज्ञता या गायकाने आयुष्यभर व्यक्त केली. सैगल यांचा प्रभाव किती होता, याबाबत बोलायचे झाल्यास, आपला खास आवाज समजून लावणे ते कळेपर्यंत किशोर कुमार हे सैगल यांच्या गायनाची आणि आवाजाची नक्कल करीत होते. एक उदाहरण याबाबतचे बघायचे झाल्यास, १९४८/४९ मध्ये आलेल्या "झिद्दी" चित्रपटातील "यह कौन आय रे करके सिंगार" तसेच " मरने की दुआये क्यों मांगू" ही गाणी ऐकावीत. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी त्यांना सैगलप्रमाणेच गायचे असे स्पष्टपणे बजावले होते, असे वाचल्याचे आठवत आहे आणि ही गाणी ऐकताना त्यातील तथ्य जाणवते. परंतु लगोलग आलेल्या "रिमझिम" चित्रपटातील "जगमग जगमग करता चाँद निकाला" या गाण्यात मात्र किशोर कुमार खऱ्या आवाजात गायले. मजेचा भाग म्हणजे हे गाणे देखील संगीतकार खेमचंद प्रकाश यांचीच निर्मिती!! या गाण्यानंतर त्यांची जगाला "गायक" म्हणून ओळख व्हायला लागली. पुढे हसवणारा/हसविणारा गायक-नायक म्हणून "छम छमा छम" या चित्रपटाने त्यांचे नाव अधिक प्रसिद्ध झाले. रसिकांनी त्यांच्या आवाजाची सांगड प्रथम देवआनंद, पुढे राजेश खन्ना आणि नंतर अमिताभ बच्चन या लोकोत्तर नायकांशी निगडित केले आणि यामागे अर्थात संगीतकार एस.डी.बर्मन यांचा महत्वाचा सहभाग होता. गायक म्हणून किशोर कुमार यांची ओळख प्रेमगीते, युगुलगीते आणि कॉमिकगीते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीतांतून यथार्थपणे कळून येते. निरनिराळे कंठगायनाचे परिणाम साधत असतानाही संगीताचा अनुभव देत राहण्याची त्यांची क्षमता आणि कुवत ही अनन्यसाधारण अशीच म्हणायला हवी. गायनाचा आरंभ करण्यापूर्वी हुंकार गायन देखील अतिशय सुरेल होते तसेच तसे करताना, संभाषणात्मक वातावरण निर्माण करण्याची हातोटी अप्रतिम अशीच होती. वास्तविक हा सगळा नाट्यात्म परिणाम तरीही त्यातील सांगीतिक गुणवत्ता सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्याकडे भरपूर होते. यांच्यातच त्यांनी निर्माण केलेल्या यॉडलिंगला तुलनाच नव्हती. उदाहरणच द्यायची झाल्यास, "पडोसन" आणि "प्यार का मौसम"या चित्रपटातील गाणी ऐकतांना, त्यासारख्या कंठकौशल्याचा पुरेपूर पडताळा घेता येतो. नौशाद, शंकर-जयकिशन, मदन मोहन, हेमंतकुमार, चित्रगुप्त, एस,डी. बर्मन, आर.डी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी इत्यादी संगीतकारांकडे गायलेल्या रचना ऐकताना वरील सांगीत बहुलत्वाचे प्रत्यंतर येते. रफीसारख्यांची स्पर्धा असून देखील ते सुमारे १७ वर्षे उच्च स्थानी विराजमान होते. "आराधना" नंतर तर काही काळ लकप्रियतेत इतरांपेक्षा फारच पुढे होते. इतर गायकांना डाचणारी generation gap त्यांच्याबाबतीत संपूर्णपणे निष्प्रभ होती, असे म्हणायला कसलाच प्रत्यवाय नसावा. शास्त्रोक्त संगीताची टाळी नसताना ते सर्व प्रकारची गाणी अधिकाराने गात असत. उदाहरणार्थ "मेरे नैना सावन भादो" (चित्रपट महेबुबा) सारखे लयीला अतिशय अवघड गाणे अतिशय ठोसपणे सादर केले आणि तसे करताना त्यातील शिवरंजनी रागाची बरीच मेहनत केली असावी असे वाटते. त्यांचा आवाज पातळ नव्हता पण अगदी रुंद वा जाड देखील नव्हता. जास्तीतजास्त दीड सप्तकाचा पल्ला धुंडाळाणे त्यांना जमत असे, पण तेंव्हा तसे गाताना कुठेही चाचपडणे नव्हते. त्यांचे अष्टपैलुत्व असे की, रुंजी घालणारे "हुस्न भी है उदास" (चित्रपट फरेब) या गीतापासून ते अगदी आनंदाने धिंगाणा घालण्याचे गाणेही ते अतिशय रंगून गात असत. मी खालील प्रमाणे काही उदाहरणे देतो जेणेकरून माझा मुद्दा अधिक ठाशीवपणे सिद्ध होईल. आके सीधी लगे धमाल,विनोदी हाफ टिकिट वो शाम कुछ अजिब शांत आणि अंतर्मुख खामोशी बडी सुनी सुनी है दु:खी आणि व्याकुळ मिली गुजर जाये दिन दिन अवघड रचना अन्नदाता आता ही सगळी गाणी स्वतंत्रपणे ऐकल्यावर किशोर कुमार यांचे अष्टपैलुत्व जाणून घ्यायला फारसा प्रयास पडणार नाही. वरील गाणी पडताळताना, एक मुद्दा लगेच ध्यानात येतो आणि तो म्हणजे या गाण्याचे संगीतकार सगळे "बंगाली" आहेत. एकूणच किशोर कुमार यांच्या कारकिर्दीत बंगाली संगीतकारांचा वाटा लक्षणीय आहे, विशेषतः कारकिर्दीच्या चाचपडण्याच्या काळात, विशेष करून सचिन देव बर्मन यांनी दिलेला "आधार" अतिशय महत्वाचा ठरतो. सचिन देव बर्मन यांच्याकडील, किशोर कुमार यांनी गायलेली गाणी पडताळताना, त्यातील बहुविध ढंगाच्या स्वररचना गाताना, किशोर कुमार यांच्या गळ्याची परीक्षा तर होतेच परंतु मी वर जे अष्टपैलूत्वाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले होते, तेच ठळकपणे समोर समोर येते. त्यावरून किशोर कुमार फक्त "यॉडलिंग" करणारे गायक होते, हा प्रवाद किती चुकीचा आहे आणि त्यांच्या गायकीवर अन्याय करणारा आहे, हे निखालसपणे सिद्ध होते. राजकपूर, देवानंद आणि दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीस तीन अभिनयशैली असे म्हटले जाते आणि त्यात बरेच तथ्य आहे. याच चालीवर पुढील टप्पा घ्यायचा झाल्यास, किशोरकुमार यांनी चौथी शैली प्रदान केली असे मान्यच करायला हवे. प्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांनी "किशोर कुमार हे सर्वोत्तम गायक होते" हे मत व्यक्त केले आणि ते मनापासून केले असणार. कारण, त्यांच्याच काळात सगळेजण रफींना घेत असताना, आणि बिस्वास यांनी अतिशय तुरळक किंवा अपवादात्मक प्रसंगीच रफींच्या आवाजात गाणी तयार केली. किशोर कुमार यांनी सर्वात प्रथम "झुमरू" या चित्रपटाची निर्मिती केली - साल १९६१. त्या चित्रपटात त्यांनी "कोई हमदम ना रहा" या अविस्मरणीय गीताची रचना रचना केली. याच चित्रपटात त्यांनी "मैं हूं झूम झूम झुमरू" सारखे गीत लिहिले. या रचनेत त्यांनी आपल्याकडील सगळ्या कंठगत कौशल्यांना भरपूर वाव दिला, असे म्हणता येते. थोडेसे मूल्यमापन थोडक्यात आपण किशोर कुमार गुणवत्तेचे मूल्यमापन करायला घेऊ. गळ्याची कामगिरी १) त्यांच्या गळ्याच्या-कामगिरीचा फार मोठा आवाका ही त्यांच्या जमेची फार मोठी बाजू आहे. याबाबतीत समकालीनांत त्यांचा हात धरणारा कुणीही आढळत नाही. एका गायकांकडून इतके परिणाम मिळणे ही गोष्ट अजिबात सामान्य नव्हे. किशोर कुमार जे गळ्यातून विविध प्रकारच्या ध्वनीचे उत्पादन सहजपणे उपलब्ध करून देऊ शकत, त्यात पुढील काही गोष्टींचा समावेश करता येईल. १) यॉडलिंग तसेच शिट्टी, अशा विविध, प्रसंगी सहेतुक बेसूर होणे २) एकापाठोपाठ पुरुष व स्त्री आवाजात गायन. ३) अगदी सपाट आवाजात गायन. ४) कुठेही वाकडी वळणे न घेता, गायन करणे ५) ज्याला "नक्कि" स्वर म्हणतात, तशा आवाजात गायन करणे, ६) गाताना अनेकवेळा स्वरांत आन्दोलने घेणे ७) एखादी ओळ गाताना त्यात विविधता आणून गाण्याला वेगळे परिमाण देणे ८) द्रुतगती गाताना देखील त्यात वेगवेगळे ध्वनी उत्पन्न करणे. ९) अंतर्मुख गायन करणे. अर्थात वर लिहिताना यातील काही वैशिष्ट्यांचा उल्लेख केलाच आहे. आता या वैशिष्ट्यांचा थोडक्यात उहापोह कारण बघूया जेणेकरून किशोर कुमार यांच्या गायकीचे अधिक खोलवर विश्लेषण करणे शक्य होईल. ही सगळी वैशिष्ट्ये जाणीवपूर्वक ऐकताना, एकूणच त्यांच्या गायकीचा "आवाका" आपल्याला "अवाक" करून जातो, हे निश्चित. मुळात ही सगळी वैशिष्ट्ये आपल्या गायनातून सादर करताना, किशोर कुमार कधीही, आपले गायन हे सामान्यातील सामान्य माणसाला गुंगवून टाकेल, हा विचार अबाधित ठेवलेला आढळतो. याचा परिणाम असा झाला, रूढार्थाने शास्त्रोक्त संगीताचा पायाभूत अभ्यास न करता, त्यांची गायकी सामान्यांच्या रुचीशी फार जवळीक साधून राहिली. प्रचंड लोकप्रियता हा आपल्याकडे बरेचवेळा "दोष" मानला जातो परंतु फारच थोडे गायक कलाकार याला अपवाद म्हणता येतील आणि त्या यादीत किशोर कुमार यांचे नाव अग्रभागी राहील. खरंतर सातत्याने लोकप्रिय राहून, तसेच गाणी गाण्यात प्रचंड सातत्य ठेऊन, आपली गायन वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात फार थोडे कलाकार यशस्वी झाल्याचे दिसून येते आणि इथे हा गायक फार मोठी उंची गाठतो. अगदी कुण्या गायकाचे अनुकरण करताना देखील त्या गायकाचे वैशिष्ट्य तसेच ठेवताना आढळते.सैगल हे त्याचे दैवत होते, हे आपण वर बघितले आहे आणि किशोर कुमार यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात, त्यांच्यावर सैगल यांच्या शैलीचा प्रभाव होता, हे देखील आपण बघितले आहे परंतु तो कदाचित नकळत झालेला प्रभाव दाखवताना, त्यांच्या गायकीचे किशोर कुमार यांनी "अनुसर्जन" केले आहे, निव्वळ अव्वल आंधळी नक्कल नव्हे. हाच प्रकार, पुढील कारकिर्दीत, सचिन देव बर्मन यांच्या गायकीचे अनुकरण करताना आढळतो. सचिन देव बर्मन यांची गायकी खऱ्या अर्थाने "लोकसंगीत"या प्रकारात मोडणारी आहे. किंचित अनुनासिक, बंगाली जाड ठसा असलेली गायकी गाताना, किशोर कुमार यांनी त्या गायकीचा "मान" तर राखलाच परंतु तसे करताना, आपल्या गायनाच्या विविध वैशिष्ट्यांत, ही नव्याने भर टाकली. दुसरा मुद्दा असा मांडता येईल, "विनोदी गायन" करताना, कुठेही आक्रस्ताळेपणा दिसत नाही. शब्दांचे औचित्य सांभाळत तसेच संगीतकाराने जी स्वररचनेची "चौकट" आखून दिली आहे, त्या परिघातच गाताना, चित्रपटीय प्रसंगाचे महत्व जाणून घेऊनच, आपल्या गायकीचा "बाज" राखलेला दिसतो. गाणे विनोदी आहे म्हणून आपल्याला "बेसूर" व्हायचा परवाना मिळाला आहे, असला "आचरट" प्रकार चुकूनही किशोर कुमार यांच्या गायकीत दिसत नाही. किंबहुना, विनोदी गाणी गाताना देखील, विचारपूर्वक गायची असतात, याचा सुंदर वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. तिसरा महत्वाचा मुद्दा असा, ललित संगीत गाताना, मी अमुक एक प्रकारचेच गाणे गाणारा, असा हट्ट चालत नसतो कारण विशेषतः छोत्रपटातील गाणी गाताना, अनेक विविध प्रकारचे प्रसंग आणि त्यानुरूप रचली जाणारी गाणी, हे एक आव्हान असते आणि त्या आव्हानाची परिपूर्ती गायकांकडून होत असते. अशा वेळी, लोकसंगीत, भक्ती संगीत किंवा प्रसंगी उठवळ (गायनात कधीही ही उठवळ वृत्ती दिसली नाही) प्रसंगातील गाणी गाताना, त्यांना कधीही प्रयास पडल्याचे दृग्गोचर झाले नाही. अतिशय सहजपणे अशा रचनांमधून ते वावरले. तोच प्रकार काही अवघड रचनांच्या बाबतील आढळतो. सलील चौधरी किंवा राहून देव बर्मन, यांच्या अनपेक्षित सुरावटी आपल्या गळ्यावर पेलताना कधीही बावरलेपणा दिसत नाही कि चाचपलेपण सापडत नाही. एक गैरसमज किशोर कुमार यांच्या अपरिमित लोकप्रयतेवर भुलून अनेक गायक कलाकार या क्षेत्रात आले.त्यांच्याप्रकाराची गाणी गाण्याचा प्रयत्न देखील केला बरेचवेळा अपयश आले. त्या अपयशाची सांगती लावताना, किशोर कुमार काही शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतलेले कलाकार नव्हते तेंव्हा आपल्याला देखील त्याची अजिबात जरुरी नाही असा विपर्यास करू लागले आणि स्वतः:चे अपयश लपवण्याचा नवीन मार्ग शोधायला लागले. यात एक मेख नेहमीच विसरली जाते - किशोर कुमार अतिशय डोळस आणि दैवी देणगी लाभलेले गायक होते. अशी श्रीमंती लाभलेले कलाकार नेहमीच विरळा असतात. इथेच किशोर कुमार आणि इतर गायक यातील फरक स्पष्ट होतो.

No comments:

Post a Comment