Sunday 25 February 2018

मूर्तीमंत दाहक सौंदर्य


प्रसंग एक :-  "सुरमई अंखियों में" - उत्तर रात्रीची
निरव शांततेची वेळ. नायकाच्या डोळ्यावर झोप तरंगत असते पण समोरील मुलगी काही झोपण्याच्या तयारीत नसते. अखेरीस नायक गुणगुणायला लागतो. त्या सुरांच्या गोडव्याकडे मुलीचे लक्षच नसते. डोक्यावर परिणाम झाल्याने ऐन उमेदीच्या वर्षात अल्लड बालपण भोगायची वेळ आलेली असते. त्याच धुंदकीत नायिका वावरत असते. पहिला अंतरा संपताना, तिच्या डोळ्यात झोप अवतरते आणि त्याच अवस्थेत, नायकाच्या मांडीवर लवंडते. सुरांचा अर्थ काय, कवितेचा मतितार्थ काय, हे समजण्याच्या पलिकडे गेली असल्याने, लहान मुलीप्रमाणे आंगठा चोखायला लागते. नायक तो आंगठा बाहेर काढतो पण ती क्रुती तिला आवडत नाही. नजरेतून नावड दर्शवते तरीही नायक पुन्हा तेच करतो.
शेवटी ती त्याच झोपाळू अवस्थेत हात लांबवून नायकाच्या मानेवर ठेवते, लगेच हात खाली घसरत असताना, नायकाच्या उघड्या टी शर्टमध्ये अडकतो. हळुहळु गाणे संपते आणि ते "बाळ" झोपेच्या अधीन होते!! 
वास्तविक सगळा चित्रपट नायकाचा, त्याच्याभोवतीच चित्रपटाची कथा फिरत असते तरीही ही "अल्लड" मुलगी आपले अस्तित्व सबंध चित्रपटभर दाखवून देते. हे अजिबात सोपे नाही. 
प्रसंग दोन :- अशीच मदीर, थंड रात्र पसरलेली. नायक/नायिकेच्या मिलनाची संकेत वेळ. नायिका निळ्या साडीत आलेली तर नायक अद्रुश्यावस्थेत तिच्या भोवती पिंगा घालीत असतो. नायिकेने आपली निळी साडी अशा प्रकारे नेसली आहे की त्यातून ओसंडून वाहणारे दाहक सौंदर्यच प्रतीत व्हावे!! वास्तविक नायिकेला असा प्रकार नवीन नव्हता पण चित्रपटातील गाण्याची हाताळणी आणि तिची देहबोली, यामुळे ते गाणे आजही लोकांच्या मनात ठाण मांडून आहे. आपल्या शारीर सौंदर्याचा अभिमान दर्शवताना तसेच तसेच त्याच्या सहाय्याने उद्दीपीत करीत असताना, उठवळपणाची मर्याद रेषा आखून घेतलेली!! बघणाऱ्याच्या मनात आणि नजरेत चाळवाचाळव करणारे सौंदर्य!! 
वास्तविक तिच्या सुरवातीच्या काळातील तद्दन पोशाखी आणि भडक चित्रपटात, तिने शारीर सौंदर्य, हाच मापदंड ठेवला होता. दाक्षिणात्य चित्रपटातून हिंदी चित्रपटात प्रवेश करताना, बहुतेक सगळ्याच अभिनेत्री थोड्याफार प्रमाणात, आपल्या देहाचे भांडवल करुनच स्थिरावल्या. तेंव्हा हिने तोच मार्ग चोखाळावा, त्यात काहीच गैर नव्हते.आपल्या अस्तित्वाची बहिर्मुख जाणीव प्रेक्षकांना करून देण्याचा एक शिरस्ता आणि राजमार्ग होता. त्या मार्गावरील पहिली पावले निश्चितच आकर्षून घेणारी होती. 
पुढे त्याच राजमार्गावर स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा निर्माण केली. थोडे वेगळ्या बाजूने बोलायचे झाल्यास, तिच्या उच्चारातील दाक्षिणात्य प्रभाव तिला कधीही पुसून टाकता आला नाही. संवादफेक बरेचवेळा, काहीशी चिरचिरी वाटावी अशी होती पण तरीही पडद्यावरील वावर हा आत्मविश्वासाने भरलेला होता आणि आत्मविश्वासाला तिने कधीही तडा जाऊ दिला नाही. पडद्यावर निखळपणे वावरणे, हे सहज जमण्यासारखे निश्चितच नसते. भलेभले गांगरतात. यात गमतीचा भाग असा, पडद्यावर वावरताना तिची देहबोली विलक्षण प्रभावी असायची. 
तिने केलेल्या बहुतांशी भुमिका या glamorous अशाच होत्या आणि तिथे ती आपल्या अभिनयाचा "माज" दाखवायची पण कुठलीही भूमिका करताना, स्वत्व विसरून ती भूमिका म्मणजेच मी, असा परकाया प्रवेश करणे, तिला फार थोड्यावेळाच शक्य झाले. बहुतेक भूमिकांतून, "मी पण" दाखवणे, हाच विशेष राहिला. अर्थात याला लोकाश्रय हेवा वाटावा, इतक्या प्रचंड प्रमाणात मिळाला.अर्थात "लोकप्रियता" हाच निकष असल्यावर मग कशाला उगीच परकाया प्रवेश वगैरे प्रयोग करायचे!!
पुढे "चालबाज" हा दुहेरी भूमिका असलेला चित्रपट मिळाला. वास्तविक दोन टोकाची व्यक्तिमत्वे असलेल्या भूमिका. अभिनयाची वेगळी उंची दाखवण्याची संधी पण काही अपवादस्वरूप प्रसंग वगळता, अभिनयाचे प्रारूप तेच राहिले. चांगली संधी निसटली!! 
नंतर तिचे नाव इतके मोठे झाले की स्त्री अभिनेत्यांमधील अघोषित सर्वोच्च स्थान प्राप्त झाले. एकदा टोकाचे उंचीचे स्थान मिळाले की धडपड उरते ती, ते स्थान टिकवण्याची. अती स्पर्धेचा अटळ परिणाम. वास्तविक या स्थानावर पोहोचल्यावर, भूमिकांमधील वैविध्याला महत्व देणे आवश्यक ठरते पण असणाऱ्या स्पर्धेचे दडपण अशा प्रयोगशीलतेला नेहमीच नाकारते. 
आपले सौंदर्य हेच आपल्या अभिनयाचे महत्वाचे अंग आहे, या समजापायी एकसूरी भूमिका करणे, हेच प्राक्तन ठरले. जेंव्हा तुम्ही तरूण असता तेंव्हा शारीर सौंदर्याला अमाप मागणी असते पण अभिनय म्हणजे शारीर सौंदर्य नव्हे, याची खरी जाणीव, तिला बहुदा उत्तर आयुष्यात झाली असावी. 
सुदैवाने लग्न झाले आणि लाईमलाईटपासून काही काळ ठरवून फारकत घेतली. अर्थात असा निर्णय घेणे कधीच सोपे नसते पण तिने तितकी जिद्द दाखवून काही वर्षे संसारात रममाण झाली. चित्रपटांच्या मागण्या निग्रहाने नाकारल्या. हे बघितल्यावर, मनात एकच प्रश्न आला, असा निग्रह तिने, आपले अभिनय साम्राज्य निर्माण करताना, भूमिकेंबाबत का दाखवला नाही? 
वेगळ्या प्रकारच्या भूमिका पेलण्याची क्षमता प्रत्यक्षात फारच क्षीणपणे दाखवली. सतत वरच्या नंबरवर राहण्याच्या हव्यासापायी मोजलेली किंमत, असेच आता म्हणावे लागते. खरतर चित्रपटक्षेत्रात कुणीही कायमस्वरूपी आपले सर्वोच्च स्थान निर्माण करू शकतच नाही. प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो, तितपतच सद्दी निर्माण होऊ शकते पण बहुदा इतपत सुजाण जाण, फारसे कुणी दाखवत नाही.
काही वर्षे संसार केल्यावर, पुनरागमनाच्या मार्गावर तिला "इंग्लीश विंग्लीश" सारखा अत्यंत सशक्त भूमिका असलेला चित्रपट मिळाला. तिच्या अभिनयाचा सर्वस्वी वेगळा पैलू जगासमोर आला!! आपली काय ताकद आहे आणि वेगळ्या प्रकारची भूमिका मिळाल्यावर, आपण काय करू शकतो, याची चूणूक दाखवून दिली. आता खरे तर स्पर्धेचे कसलेच बंधन, भय उरले नव्हते. त्यामुळे अभिनयात सहजता आली असणार. 
एकूणच अभिनय क्षेत्रात, ज्याला "जिवंत" अभिनय म्हणावा, अशा भूमिका आणि त्यातून निर्मिलेले क्षण, हे नेहमीच अती दुर्लभ असतात. अशा टप्प्यावर करियर आलेली असताना, अचानक् आडाचे पाणी वळचणीला गेले!! माणूस जाण्यासाठीच जन्माला आलेला असतो, हे सर्वकाळ निरपवाद सत्य असले तरी, काळाच्या गडद पडद्यावर चार लखलखते क्षण कोरण्याची संधी नियतीने हिरावून घेतली पण नियतीचा हा सर्वात आवडीचा खेळ!!

No comments:

Post a Comment