Thursday 8 February 2018

हत्याकांडे आणि वैषम्य!!


पूर्वी असे म्हटले गेले, दुसरे महायुद्ध झाले आणि हिंसाचाराची परमावधी झाली. यापुढे जगाला इतक्या प्रमाणात हिंसाचार बघायला मिळणे कठीण, अशी देखील मीमांसा करण्यात आली. महायुद्ध संपले परंतु हिंसाचाराच्या प्रमाणात दुर्दैवाने प्रचंड वाढ होत गेली, हे एक वैश्विक सत्य आहे. मला इथे कसलाच न्यायनिवाडा करायचा नाही पण यात सामान्य माणूस भरडला गेला,हे देखील मान्यच करावे लागेल. 
दुसरे महायुद्ध झाले, दोषींना यथास्थित सजा मिळाल्या आणि काही प्रमाणात क्रौर्याला न्याय मिळाला. अर्थात, जो हिंसाचार झाला, त्याची भरपाई कधीही अशक्य!! वास्तविक कुठल्याही प्रकारचा हिंसाचार हा तत्वतः अमान्यच, त्यातही मानवी नृशंस हत्या तर नेहमीच तिरस्करणीय ठरते. महायुद्धात ज्या प्रमाणात हिंसा झाली त्यानंतर माणूस शहाणा होऊन, शांततेकडे वाटचाल करेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती परंतु त्यानंतरच्या एकूणच सगळ्या घटनांचा आढावा घेतला तर हिंसाचार कमी होण्यापेक्षा त्यात अतर्क्य अशी भयानक वाढ झाल्याचेच आढळून येते. हिंसाचाराचे नवनवीन मार्ग शोधून काढण्यात आले, हिंसाचाराच्या समर्थनार्थ अनेक कल्पना लढवल्या गेल्या आणि मानवाच्या मानवीपणाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.
आदर्श समाजाची कल्पना आपल्यापाशी आहे आणि टी निर्माण करण्याचा उपाय आपण सांगू तोच आहे, या भावनेने हिटलरला पछाडले होते. ज्यूंचा नायनाट, हे त्याचे आद्य कर्तव्य होते आणि त्यापायी त्याने ना भूतो, ना भविष्यती,या से हत्याकांड घडवले. 
अर्थात ज्यूंचे हत्याकांड सुरु होण्यापूर्वी रशियातही आदर्श समाजाच्या विक्षिप्त कल्पनेपायी लाखो लोकांचे बळी देऊन, स्टॅलिन आपली कल्पना राबवत होता. त्यासाठी त्याने गुप्तहेर संघटना बांधली आणि जो विरोधक डोईजड होईल, त्यांचा नि:पात चालविला होता. अर्थात याचा पाया लेनिनने घातला होता. लेनिनने जे पेरले, त्याचे अमाप पीक स्टॅलिनने काढले!! स्टॅलिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्ह यांनी, स्टॅलिनच्या पापाचा पाढा वाचला आणि जगातील सगळ्या कम्युनिस्ट विचारवंतांचा पायाच हादरला होता!! स्टॅलिनने आपल्या वेड्या कल्पनेपायी लाखोंची कत्तल बिनदिक्कतपणे केली होती आणि तोपर्यंत जगात या हत्याकांडाची कुठेही वाच्यता देखील झाली  नव्हती,ही आणखी विशेष!! आजही याबद्दल कुठेही फारसे बोलले जात नाही. हिटलर क्रूरकर्मा होता तर स्टॅलिन त्याच पंगतीत सहजपणे बसणारा होता. सामुदायिक शेतीच्या नावाखाली हजारो शेतकरी मेले. प्रत्यक्ष झारने देखील इतका अत्याचार केला नव्हता आणि स्टॅलिनने राजकीय सत्ता हे कमालीचे निर्घृण असे यंत्र बनवले. यात नवल असे वाटते, इतके सगळे घडत असून, डोळ्यावर कातडे पांघरून बसणाऱ्या समाजाच्या मानसिक ठेवणीबद्दल खास अभ्यास होण्याची गरज वाटते. 
अर्थात जे रशियात झाले, तेच थोड्याफार प्रमाणात सगळ्याच कम्युनिस्ट देशांत झाले होते. भांडवलशाहीच्या अनन्वित अत्याचारांबद्दल जेंव्हा टीका केली जाते आणि ती योग्यच आहे, तेंव्हा या कम्युनिस्ट राजवटीतील हत्याकांडाबद्दल देखील तितकेच सखोल लिखाण व्हायला हवे आणि जागृती होणे गरजेचे आहे. आपल्याकडे आणखी एक विशेष बघायला मिळते, हिंसाचार म्हणजे मानवी हत्या, इतपतच मर्यादित अर्थ घेतला जातो परंतु, दीर्घकालीन कारावास, उच्चार अंडी लेखन-स्वातंत्र्यास बंदी, या बाबी देखील हिंसाचाराशी संबंधित आहेत, ही फारसे कुणी ध्यानात घेत नाही. कम्युनिस्ट राजवटीत, याचा कळस गाठला गेला. 
एकेकाळी माओचे गुणगान गाणे, हा अनेक विचारवंतांचा आवडता छंद होता तसेच चीनच्या प्रगतीबद्दल प्रशंसोद्गार काढण्यात, अमेरिकन पंडित आघाडीवर होते, पण त्याचवेळी हजारो चिनी लोकं भुकेने तडफडून मरत होते, ही वस्तुस्थिती डोळ्याआड केली जात होती. असाच प्रकार त्याच काळात काम्बोडियात पॉल पॉट या नरराक्षसाने आरंभला होता. साम्यवाद आणण्याच्या इर्षेने माओ आणि पॉल पॉट ईर्ष्येने पेटले होते आणि त्यापायी स्वतः:च्याच हजारो नागरिकांची कत्तल केली होती. अनेकांना देशत्याग करण्यास भाग पाडले होते आणि देश उध्वस्त केला. 
असाच प्रकार अमेरिकेने व्हिएतनाममध्ये लष्करी हस्तक्षेप करून, नव्याने हिंसाचाराचा अध्याय लिहिला. साम्यवाद रोखण्याची केवळ आपलीच जबाबदारी आहे, असल्या मूर्ख समजुतीपायी आणि आपणच जगाचे रक्षणकर्ते आहोत, या भोंगळ विचारापायी, व्हिएतनाममध्ये अमेरिकेने हत्याकांड घडवले. मॅकनामारा हे त्यावेळी संरक्षण मंत्री होते. त्यांनी आणि हेन्री किसिंजर यांनी एकत्रितपणे अमेरिकन लोकांवर धूळफेक करून, सत्य दडपून ठेवले होते. "माय लाय" इथल्या हत्याकांडाने तर नाझी हत्याकांडाचीच बरोबरी केली!! निक्सन आणि किसिंजर, यांच्या राजवटीत दुटप्पीपणा आणि खोटेपणाचा कळस झाला आणि त्यातूनच निक्सन यांना पायउतार व्हावे लागले!! लोकशाही आणि हुकूमशाही, यात हा महत्वाचा फरक आहे. स्टालिन, हितकर, माओ किंवा पॉल पॉट तसेच आफ्रिका खंडातील इतर हुकूमशहा, यांच्यावर लोकमताचे दडपण कधीही आले नाही. 
पुढे ईडी अमीन आणि इराणचा शहा, यांनी आपल्याच लोकांचा छळ मांडला होता आणि दहशत निर्माण केली होती. नारळ फोडल्याप्रमाणे ईडी अमीन लोकांची डोकी फोडत होता. इराणचा शहा तर विरोधकांना विजेचे धक्के देऊन मारण्याप्रमाणेच इतर अनेक उपायांनी नेस्तनाबूत करीत होता. इंडोनेशियात सुकार्नो यांनी भ्रष्टाचार माजवून, देश रसातळाला नेला, तेंव्हा लष्कराने उठाव केला आणि कम्युनिस्ट म्हणून ३ लाख लोकांना ठार मारून, बहुतेकांना समुद्रातच फेकून दिले!! 
आफ्रिका खंडात, परिवर्तनाचे वारे म्हणून गोऱ्या लोकांचे राज्य जाऊन, स्थानिक लोकांचे राज्य निर्माण झाले. तथापि सामान्य लोकांना अधिक संवेदनशील राज्यकर्ते लाभले का? या प्रश्नाचे उत्तर तपासता, फक्त नकारार्थी उत्तर हाती लागते. झिम्बाब्वेमध्ये गोरे गेले आणि मुगाबेची सत्ता आली. पण मुगाबे यांनी फक्त झोटिंगशाहीच आरंभली आणि देश खंक करून सोडला!! अनेक आफ्रिकी देशांत पाश्चात्यांनी  सत्ता सोडल्यानंतर आफ्रिकी लोकांचा मुळातला "टोळीवाद" जागा झाला!! मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आणि आजही होत आहे. दक्षिण आफ्रिकेत १९९४ साली प्रथमच लोकशाही प्रथेप्रमाणे निवडणूक झाली आणि सामान्यांचे राज्य आले. नेल्सन मंडेला अध्यक्ष झाले आणि हळूहळू काळ्या लोकांचा मूळ स्वभाव जागा झाला, पुढे १९९९ मध्ये मंडेला यांनी सत्ता सोडली आणि देशाची सुव्यवस्था धोक्यात आली. जोहान्सबर्ग सारख्या महाकाय शहरात दिवसाढवळ्या सामान्य माणसाचे मुडदे पडायला लागले आणि अर्थव्यवस्थेवर नकारार्थी परिणाम व्हायला लागला. 
अरब देशांची काही वेगळी परिस्थिती नाही. तिथे तर "राजेशाही"च आहे किंवा लष्करशहा!! त्यातच इस्लामी पुनरुज्जीवनवादामुळे हात तोंडाने, दगडाने ठेचणे असल्या रानटी, मध्ययुगीन शिक्षा देण्यात येऊ लागल्या!! यात सामान्य माणसाचे कुणीही विचार केला नाही. इराणमध्ये खामेनींनी क्रांती केली आणि शहा जसे अत्याचार करीत होता, तसेच धर्माच्या नावावर आत्याचे सुरु केले. धर्मपिसाटांना हाती धरून झुंडशाही आणण्यात आली आणि अनेकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले !! यात कुठला न्याय आणि कुठला कायदा?? 
दक्षिण अमेरिकेत तर अनेक देशांत सर्वाधिकारशाही आहे. अर्जेन्टिनामध्ये पेरॉन पती-पत्नी यांनी अत्यंत खुनशीपणे राज्य केले. पुढे त्यांचे नाव घेऊन, डावे आणि उजवे आले. त्यांच्यात यादवी निर्माण झाली आणि कुणाचेही राज्य आले तरी दडपशाही चालूच राहिली
राजसत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनीच दहशतवाद, घातपात, दडपशाही यांच्याद्वारे राज्य करण्याची काही उदाहरणे. काही विशिष्ट कल्पनेपायी, शांततेच्या सगळ्या कल्पना पायदळी तुडवून, लोकांवर निरंकुश सत्तेचा वरवंटा फिरवायचा, हेच धोरण अंमलात आणले.
युद्धोत्तर जगाचे स्वरूप बदलले आणि अनेक बंधने नष्ट झाली. कुटुंबसंस्था अनेक जगात मोडकळीस आली पण याचे फलस्वरूप मोडून पडलेल्या कुटुंबामुळे झालेली अपत्ये अनिर्बंध होऊन पुढारलेल्या देशांतच हिंसाचार, गुन्हेगारी करायला लागली. अमेरिकेत तर झाडावरचे फळ तोडावे त्याप्रमाणे म्हाताऱ्या माणसांना गोळ्या घालतात. याचाच वेगळा अर्थ, केवळ दारिद्र्य हेच गुन्हेगारीच्या मुळाशी आहे, हे नसून अतिरेकी आकर्षण देखील आहे  आणि या विळख्यातून जगातील कुठलाच देश सुटलेला नाही. आज भारत, काश्मीरबाबत हेच वर्षानुवर्षे अनुभवत आहे. प्रत्येकवेळेस फक्त "राजकारण" चालते आणि बळी पडतो, तो केवळ आणि केवळ सामान्य माणसाचा!!
हिरोशिमावर बॉम्ब पडला आणि जगाला तेंव्हा धक्का बसला!! पण त्यामुळे जग अधिक सहिष्णू, संवेदनशील आणि मानवतावादी झाले का? तर ती  आशा पार धुळीला मिळाली आहे. हे जग अधिक क्रूर आणि अधिक हिंसाचारी बनले आहे. जरा बारकाईने विचार केला तर दुसऱ्या महायुद्धाने जितके बळी घेतले त्यापेक्षा अधिक मृत्यू युद्धोत्तर जगात झाले आहेतानी यात नजीकच्या काळात कुठे खंड पडेल, असे वाटत नाही सत्तासंपादनार्थ क्रांतीच्या मार्गाने प्रयत्न करणारे हे अखेर हिंसेचाच आश्रय घेतात आणि आता तर या हिंसाचाराला अत्याधुनिक शस्त्रांचा अविरत पुरवठा चालू असतो. विज्ञानाने जे सध्या केले, त्याचा उपयोग या प्रकारे हिंसाचाराच्या वाढीत झालेला दिसून येतो. त्यामुळेच मनात प्रश्न उभा राहतो, आपण विज्ञानाचा विधायक उपयोग करून घेण्यात कमी पडलो की काय? विज्ञानविरोध हा त्यावरील उपाय नक्कीच नव्हे परंतु मानवी बुद्धीचा विधायक विकास, हाच एकमेव उपाय वाटतो. तो झटपट यश मिळवून देणारा नसेल पण भूतकाळाचे उदात्तीकरण करून कालचक्र उलटे फिरवण्याचा आग्रह धरणे मात्र अतिशय घातक ठरेल.    

No comments:

Post a Comment