Monday 25 August 2014

जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तसे योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.
मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजिबात  झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.
आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समाजात असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यात, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.
"हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुंटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,
जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मै चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी पिलू  राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!
जयदेव यांच्या संगीताची आणखी काही वैशिष्ट्ये बघणे जरुरीचे ठरेल. त्यांच्या रचनाप्रतिभेचे एक रहस्य असे - साधे, मधुर तसे पहाता परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले (इथेच गाण्यातील गायकी अंग दिसून येते) आणि विस्तारशक्यता असलेले, संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत. काही उदाहरणे बघूया, "अल्ला तेरो नाम","अभी ना जाओ छोड के","जब गमे इष्क", किंवा "सीने मे जलन" ही गाणी बघूया. कुणालाही या गाण्यांचे मुखडे सहज गुणगुणता येतात आणि लक्षात येतात. बहुतेक रचनाकार हेच म्हणतात, गाण्याचा मुखडा सुचणे महत्वाचे, नंतर सगळे बांधकामच असते!!
अनेक वेळा इष्ट ते चमकदार, वा भारून टाकणारे सुरावटींचे परिणाम - "दिल जवान आरझू जवान" हे गाणे ऐकावे. परिणाम साधण्यासाठी तंतुवाद्ये आणि Accordion यांची योजना केली आहे.
आणखी महत्वाचा विशेष असा, गीतास रागाधार असावा पण गीत रागात हवे असे नाही. या वृत्तीचे असल्याने, बहुतेकवेळा भावस्थितीशी संलग्न रागांकडे वळताना दिसतात, उदाहरणार्थ "जब गमे इष्क"(भैरवी), "देख ली तेरी खुदाई"( बागेश्री),"जहर देता है"(बिलासखानी तोडी),"किस किस को दीपक प्यार करे (नटभैरव) ही आणि अशी बरीच गाणी ऐकण्यासारखी आहेत. रागाच्या सावलीत चाल तरळत असते पण  अखेर,सावलीपुरताच आधार घ्यायचा, रागदर्शन नव्हे!!
आणखी एक वैशिष्ट्य दिसते, तालाच्या बाबतीत "दादरा" ताल आवडीचा दिसतो. "अभी ना जाओ छोडके","ये वोही गीत है","सीने मे जलन" ही गाणी या दृष्टीने ऐकण्यासारखी आहेत. दादरा ताल, हा ६ मात्रांचा, त्यामुळे लयीची बांधणी घट्ट विणीची करणे आवश्यक. याचाच परिणाम असा झाला, त्यांच्या चाली कधीही शब्दांवर कुरघोडी करत आहेत, असे वाटत नाही. इथे शब्द वावरतो, तो भाषिक तसेच सांगीत ध्वनींचा समूह म्हणून!! अर्थानुसार जरूर पडल्यास, तळाच्या आवर्तनास ओलांडूनही चरण वावरताना दिसतो.
अतिशय चांगल्या अर्थाने, जयदेव अप्रतिम "कारागीर" देखील होते. "अल्ला तेरो नाम" हे समूहगान सुंदर परिणामकारक उदाहरण आहे. गीताला आधार, "गौडसारंग" या रागाचा आहे. गीताचे धृपद फक्त ५ स्वरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून सिद्ध होते तरीही, पुढील कडवे "मध्यम" स्वराला "षडज" मानून गीत पुढे येते. याचा परिणाम असा झाला, आपण सुरावटीची पुनरावृत्ती न ऐकत, एका भारून टाकणाऱ्या स्वरबंधाची प्रतीती येते. असाच प्रकार, "तू चंदा मै चांदनी" या गाण्यात येतो. लोकसंगीताच्या एकूण शैलीचे विश्व निवडून, सफाईदार वा शिष्ट शैलीतील गाणे कसे तयार होते, याचा असामान्य नमुना म्हणता येईल.
आणखी खास वैशिष्ट्य म्हणता येईल, हिंदीतील श्रेष्ठ कवींच्या रचना स्वरबद्ध करण्यातही त्यांनी आपल्या संवेदनाशीलत्वाचा आणि कौशल्याचा प्रत्यय दिला. " हरिवंशराय बच्चन"(मधुशाला),"दिनकर"(उर्वशी),"मैथिलीशरण गुप्त","निराला","महादेवी वर्मा","नरेंद्र शर्मा" यांच्या कविता यात अंतर्भूत होतात. हे कवी, चित्रपटांसाठी गीते रचणारे नव्हते आणि परिणामत: त्यांच्या कृती अगदी वेगळी आव्हाने देणाऱ्या होत्या. याचा अंतिम परिणाम असा झाला,जयदेवच्या अनेक रचना, चित्रपटीय चौकटीशिवाय उभ्या राहू शकल्या.
गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.
रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.

https://www.youtube.com/watch?v=p81LDgumM8s

No comments:

Post a Comment