Friday 1 February 2019

केळीचे सुकले बाग

मराठी भावगीतात स्वररचना करण्यासाठी, अनेक संगीतकारांनी, बरेचवेळा, ज्यांना रूढार्थाने "गीतकार" म्हणता येणार नाही अशा कवींच्या कवितांना स्वरबद्ध करून, भावगीत हा अविष्कार खऱ्याअर्थाने श्रीमंत केला. ही परंपरा फार जुनी आहे पण त्यामुळे रसिकांना अनेक उत्कृष्ट कवितांचा आस्वाद घेणे सहजशक्य झाले, हे मात्र निर्विवाद. निव्वळ कवितेचा आस्वाद घेणे, हे बऱ्याच रसिकांना जमत नाही, अवघड जाते किंवा त्या बाजूला वळतच नाहीत. खरंतर कविता वाचन हा अतिशय तलम, मुलायम आणि अनिर्वचनीय असा वाचनानुभव असतो पण त्यासाठी मनाची एक ठराविक पातळी तयार करणे आवश्यक असते आणि तिथेच बहुतेकजण मागे फिरतात. अशावेळी, अशीच एखादी समृद्ध कविता, स्वरबद्ध होऊन आपल्यासमोर आली तर लगेच त्या कवितेबद्दल मनात आवड निर्माण होण्याची शक्यता असते. इथे आणखी एक मुद्दा मांडता येईल. जे सजग वाचक असतात, त्यांच्या दृष्टीने, संगीतकाराने लावलेला अन्वयार्थ नव्याने आकळून घेण्याची नवीन संधी असू शकते, असते देखील. अखेरीस, संगीतकार हा देखील एक सजग वाचक असतोच. 
कवी अनिल हे मराठीतील एक प्रतिथयश नाव. मराठीत मुक्त छंद रूढ करण्यामागे कवी अनिल यांचे फार मोठे योगदान आहे. एकूणच कवितेबाबत काही लिहायचे झाल्यास, कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, त्याने आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो. चांगल्या भावकवितेतील भावनाशयासंबंधी काहीं लिहिणे मुळातच फार कठीण असते कारण तिच्यातून जाणवणारा एखाद्या भाववृत्तीचा अनुभव हा संमिश्र असूनही संश्लेषणात्मक, तरल आणि विशिष्ट स्वरूपाचा असतो. आणि त्यामुळे गद्यात तो अनुभव नेमक्या शब्दांत मांडणे फारच अवघड होऊन बसते. 
कविता म्हणून पहिल्याच ओळीतील "केळीचे बाग" हे प्रतीक घेऊन आणि त्यालाच केंद्रस्थानी ठेऊन, एका अंतस्थ आणि विमनस्क मनोवस्थेचे चित्रण आढळते. भावकवितेबाबत तर ही बाब फारच महत्वाची ठरते. अशा कवितेला स्वरबद्ध करायला घेण्याची उर्मी मनात येणे, इथेच संगीतकार यशवंत देवांनी आपल्या निवडकौशल्याचा मासलेवाईक नमुना पेश केला आहे. यशवंत देव हे जरी हाडाचे संगीतकार असले तरी त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत आणि त्यामुळे कविता निवडीबाबत त्यांची स्वतः:ची अशी खास नजर तयार झाली आहे. यशवंत देवांची कुठलीही रचना ऐकायला घेतली काही बाबी ठळकपणे दिसून येतात. शब्दरचनेतील प्रासादिकता, गेयता तसेच कवितेतील आशय (इथे फक्त देवांचाच विचार!!) ध्यानात घेऊन निर्मिलेली स्वररचना. स्वररचना करताना शब्दांना शक्यतो कुठंही ओरबाडायचे नसून, त्यातील ऋजू भाव नेमकेपणाने स्वरांतून मांडायचे, हा प्रधान विचार दिसतो.  

केळीचे सुकले बाग असुनिया पाणी 
कोमेजली कवळी पानं असुनी निगराणी 

गाण्याची सुरवात ही लगेच होते म्हणजे मुखड्याआधीचे पार्श्वसंगीत वाजते, असा प्रकार नसून सरळ गायिकेचाच सूर आपल्या कानावर पडतो. गायिका म्हणून हे एका अर्थाने अवघडच असते पण तरीही गाण्याच्या पहिल्या क्षणापासून रसिकांना कवितेची ठाम ओळख पटवून द्यायची, हा देखील विचार समजून घेता येतो. मुखडा बांधताना, संगीतकाराने "केळीचे सुकले बाग" हेच शब्द वारंवार घेतले आहेत - अर्थ एकच, केळीच्या बागांचे जे प्रतीक कवीने मध्यवर्ती ठेवले आहे , त्याचीच सुरांतून रास्त जाणीव करून देणे होय. पार्श्वभागी वाजत असलेल्या सतारीच्या सुरांतून ही जाणीव अधिक गडद करून दिली आहे. नीट ऐकल्यावर कळू  शकेल,हेच शब्द परत घेताना, त्याला वेगवेगळ्या हरकतींची जोड दिली आहे. "शब्दप्रधान गायकी" ही अशी असते. "असुनी निगराणी" हे शब्द सुद्धा दोन वेळा घेतले आहेत. कवितेचा आशय ध्यानात घेतला तर या पुनरावृत्तीचा नेमका अर्थ लक्षात घेता येतो. 

अशी कुठे लागली आग जळती जसे वारे 
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे 

पहिला अंतरा सुरु होण्याआधी सतार आणि बासरी (अर्थात साथीला तबला आहेच) या दोनच वाद्यांनी निर्मिलेला स्वरावकाश ऐकण्यासारखा हे, ज्यातून एकतर पुढील चालीचे सूचन तर मिळतेच पण शब्दातील भावाशयाचे दर्शन घडू शकते. पहिल्या अंतऱ्याच्या ओळीतून, ध्रुवपदाच्या ओळींतील भावना अधिक तीव्र, विखारी होते तेंव्हा अशा शब्दांना त्याच प्रत्ययी सुरांची जोड देताना, तशाच भाववृत्तीची सांगड घातली गेली आहे. यशवंत देव कवितेकडे कशा नजरेने बघतात, याचा हा एक नमुना!! 

किती दूरची लागे झळ आंतल्या जीवा 
गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा 

हा दुसरा अंतरा मात्र अगदी वेगळ्या "उठावणीने" घेतलेला आहे. त्यातही "दूरची" गाताना किंचित लांबवलेला सूर, माझ्या वरील विवेचनाला सिद्ध करतो. पुढील शब्द "झळ" याची हताशता अचूक सुरांतून मांडली आहे. ऐकण्यासारखे आहे - आधीचे शब्द "किती दूरची लागे" + "झळ"!! एकाच भावनेचे प्रकटीकरण परंतु सुरांतून दाखवताना, तीच भावना अधिक तीव्र कशी  होईल,याकडे वेधलेले आपले लक्ष. या अंतऱ्यातील दुसरी ओळ घेताना, "सुकत ओलावा" मधील "शुष्कपणा" तितकाच सुंदर!! 

किती जरी घातले पाणी, सावली केली 
केळीचे सुकले प्राण बघुनी भवताली 

गायिका म्हणून उषा मंगेशकरांनी वेगळी ओळख देण्याचे काहीच कारण नाही. गायिका म्हणून मूल्यमापन करायचे झाल्यास, गळ्याचा पल्ला फार मोठा नाही तसेच दीर्घ, अवघड हरकती घेताना काहीसे चाचपडलेपण जाणवते तरीही शब्दांची अचूक जाण, चालीतील मध्यवर्ती असलेला गोडवा टिपण्याची शक्ती, आणि शक्यतो मध्य सप्तकात अतिशय सुरेलपणे गायन करणे!! ही चाल तर उघडपणे "गायकी" अंगाने वावरणारी आहे तरीही चालीचे "वजन" अचूकपणे गळ्यावर पेलल्याचे समजून घेता येते. अर्थात घरातील दोन बहिणींच्या सावलीतच त्यांनी वावरणे पसंत केले. त्यापेक्षा अधिक काही करता येणे या गायिकेला अशक्यच होते. 



2 comments: