Monday 7 May 2018

अरुण दाते

अरुण दाते यांचे नुकतेच निधन झाले असल्याकारणाने त्यांच्याबद्दल तटस्थपणे लिहिणे थोडेसे अवघड होणार आहे पण तरीही त्रयस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न राहील. या लेखात गायक म्हणून अरुण दात्यांचे वैशिष्ट्य आणि मर्यादा देखील , याचे विवेचन करणार आहे. एक तर बाब स्पष्ट आहे, कुठलाही कलाकार/ गायक घेतला तरी तो एका विशिष्ट परिप्रेक्षातच लक्षणीय असतो. त्याच्या कलेला मर्यादांचा परीघ नेहमीच असतो. बरेचवेळा याच गोष्टीचे भान विसरले जाते आणि कौतुक करण्याच्या प्रयत्नात वाहवले जातात. अरुण दात्यांचा आवाज कसा होता, हे आपण मूल्यमापनाच्या संदर्भात लक्षात घेतले म्हणजे मग त्यांनी गायलेल्या गाण्याचे यथायोग्य विश्लेषण करता येऊ शकेल. आवाज काहीसा रुंद पण ढाला म्हणता येणार नाही. त्यात एक सूक्ष्म ध्वनिकंप आहे. त्यामुळे सादरीकरणात खास भावपूर्णतेचा स्पर्श निर्माण करणे चांगले जमले. आवाजातील कंपामुळे काही वेळा स्वर लागावं थरथरता वाटलं तरी गायन सुरेल नक्कीच म्हणता येईल. स्वरकेंद्रापासून ढळणे हे काही वेळा फायद्याचे ठरले. छोट्या स्वरसमूहांची द्रुत फेक त्यांचा आवाज सक्षमतेने करतो. बरेचवेळा आवाजाच्या गतीचे वर्णन भारदस्तपणे संथ असे करता येईल. काही गीतांच्या संदर्भात ज्याला "अप्पर रजिस्टर" म्हणता तो लागावं वापरून गती साधली आहे परंतु ते रजिस्टर नीट विकसित झाले आहे, असे म्हणवत नाही. गायकास स्वरेलपणाची योद्धा आहे आणि पुष्कळ रचना सादर करताना, त्या सादरीकरणात भरीव फेक जमली असे सार्थपणे म्हणता येते.
आणखी एक वैशिष्ट्य निश्चितपणे मांडता येईल. आवाज कोमलमधुर, अंत:स्पर्शी, अंतर्मुख, काहीसे उदास आणि अनाक्रमक असे गायन आहे. बालपण इंदोर सारख्या सरंजामी वातावरणात गेल्याने तसेच बालपणी कुमार गंधर्वांसारख्या अनोख्या गायकाखाली मार्गदर्शन मिळाल्याने, गायनात भारदस्तपणा येणे, हा योगायोग निश्चित म्हणता येणार नाही. एक बाब निश्चितपणे मांडता येईल. अरुण दात्यांनी आपला गळा ओळखला होता आणि त्या जातकुळीला ओळखूनच त्यांनी आयुष्यभर गायन केले. आवाजाला निश्चित मर्यादा होत्या. मघाशी मी म्हटल्याप्रमाणे मूल्यमापन करताना आपल्याला दोन परिप्रेक्षा ध्यानात घ्यायला हव्या. १) सामाजिक-सांस्कृतिक, आणि २) सौंदर्यशास्त्रीय. आता सांस्कृतिक नजरेतून बघायचे झाल्यास, वर निर्देशित केल्याप्रमाणे आवाजाला मर्यादा होत्या त्यामुळे गाण्यांमध्ये विस्तृत अशी विविधता नव्हती. तशी विविधता दाखवणे हा त्यांच्या गळ्याचा धर्मच नव्हता. त्यामुळे जनसंगीतात अवतरणाऱ्या धर्मसंगीत किंवा लोकसंगीत, या कोटींतील गायन जवळपास अशक्य असे होते.
ललित संगीतात असा तर-तम भाव ठेवणे आणि राखणे, ही एक मर्यादा असते. अरुण दात्यांनी ही मर्यादा कायम पाळली. अर्थात आणखी वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपण कशा प्रकारची गीते गाऊ शकतो , याचा नेमका अंदाज अरुण दात्यांना होता आणि त्याच्याशी त्यांनी अपवादस्वरूप रचना वगळता फारशी प्रतारणा केल्याचे आढळत नाही.
आता सौंदर्यशास्त्राच्या नजरेतून बघितल्यास, आवाजातील तारता पल्ला फार विस्तृत असा नव्हता, संपूर्ण सप्तक आवाक्यात घेता येईल अशी जातकुळी नव्हती. त्यामुळे गळ्याला सर्व दिशांनी चपलगती चलन अशक्य!! याचाच परिणाम असा झाला, गायन करताना, छोट्या हरकती, काही खटके इतपतच सांगीतिक अलंकार गायनात विशेषत्वाने आढळतात. आणखी एक मर्यादा अशी सांगता येईल, शास्त्रोक्त रागांवरील रचना गाताना, काहीसे अडखळणे क्रमप्राप्तच होते. परंतु गायन करताना, काव्यातील आशय नेमका ओळखून तो आशय अधिक अंतर्मुख करण्याची हातोटी समृद्ध होती. वर निर्देशित केल्याप्रमाणे आवाजातील सूक्ष्म कंप, भावगर्भ कवितेतील आशयवृध्दीसाठी नेहमीच उपकारक ठरला.
आता या पार्श्वभूमीवर ५०, ६० वर्षांपूर्वी गायलेले आणि आजही लोकप्रिय असलेले "शुक्रतारा मंदवारा" हे गाणे विचारात घेता येईल. यमन रागाशी नाते जोडणारी स्वररचना, त्यामुळे चालीत सहजपणे अंतर्भूत असलेला गोडवा!! मुळात खळेकाकांच्या चाली या नेहमीच "गायकी" अंगाकडे वळणाऱ्या असतात त्यामुळे सत्कृतदर्शनी सहज, सोपी वाटणारी चाल, प्रत्यक्षात फार अवघड असते. गायकाला त्याबाबतीत फार दक्ष राहावेच लागते. केवळ प्रत्येक ओळ नव्हे तर प्रत्येक शब्द, अक्षर हे फार गुंतागुंतीच्या स्वरचनेने भारलेले असते. अशी स्वररचना गाताना, गायकाची परीक्षाच असते. मंगेश पाडगांवकरांची गेयताबद्ध समृद्ध शब्दकळा!! "लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा" सारखी अति तरल ओळ गाताना, ठाय लय तर सांभाळावीच लागते पण त्यापलीकडे जाऊन, "लाजऱ्या" शब्दातील "लाजरेपण" ठळकपणे दर्शवावे लागते. प्रणयाची काहीशी धीट पण त्याकाळानुसार असलेली संयत भावना हेच या गाण्याचे संपूर्ण असे वैशिष्ट्य आहे आणि तेच वैशिष्ट्य गाताना अरुण दात्यांनी औचित्यपूर्णपणे सांभाळले आहे.
कवितेतील नेमका भाव हेरून, त्याची स्वरिक आशयवृद्धी करणे, हेच अरुण दात्यांच्या गायकीचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. "डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी" या मारवा राग सदृश स्वररचनेत गायन करताना, अरुण दात्यांनी हेच भान दाखवले आहे. कवितेतील व्याकुळ भावना व्यक्त करताना, अनाक्रोशी संयत गायकीचा मानदंड निर्माण केला. एकेकाळी अरुण दात्यांवर "मराठीतील तलत मेहमूद" असा काहीसा हेटाळणीचा आरोप केला गेला होता. अर्थात सुरवातीला त्यांची शैली याच गायकाची आठवण करून देणारी होती, यात संशय नाही "सखी शेजारिणी" सारख्या गाण्यांत हा प्रभाव स्पष्ट दिसतो. परंतु लवकरच त्या प्रभावातून स्वतः:ला मुक्त करण्याची किमया दाखवली आणि मराठी भावगीतांत आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली. दुसरा विशेष सांगता येतो आणि तो म्हणजे गायनातील प्रसन्न असा "प्रसाद गुण". केवळ व्याकुळ करणारीच गाणी नव्हेत तर "पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची" सारख्या लयीला अवघड असणाऱ्या स्वररचनेत ही बाब विशेषत्वाने ध्यानात येते. प्रणयी थाटाचे गाणे तर कुठेही उथळ, उठवळपणा नाही. अर्थात हे खळे काकांच्या संगीतरचनेचे देखील खास लक्षण मानता येईल आणि हेच लक्षण अरुण दात्यांच्या जातकुळीला शोभले. ज्या आवाजात प्रसादगुण असतो त्यामुळे त्यातून किंवा त्याद्वारे सादर होणारे संगीत श्रोत्यांना थेट, लगेच (कालविलंब न होता) आणि मूळ संगीतातील सर्व वा प्रमुख गुणांचा अजिबात अपभ्रंश न होता - किंवा तो कमी प्रमाणात होऊन - पोहोचते. ही कामगिरी निश्चितच सहज जमणारी नव्हे.
ललित संगीतातील गायक असे म्हणताना, ज्या मर्यादा त्यांच्या गळ्याला होत्या, त्याचा उल्लेख वर केला आहेच पण तरी आणखी एक विधान नक्कीच करता येईल. जरी संख्येने त्यांची गीते कमी भरली तरी बहुतेक सर्व गाणी उच्च दर्जाची आहेत!! हे प्रमाण इतर गायकांच्या बाबतीत लक्षात घेता विलक्षण आहे. इंदोरी सरंजामी व्यवस्थेचा परिणाम असेल किंवा घरातील उच्च अभिरुचीचा परिणाम असेल पण, आपण जी गीते गायची त्यांच्या संहितेबाबत अरुण दाते फार चोखंदळ होते. दुसऱ्या शब्दात, आपण जी गीत म्हणून गाणार आहोत, त्याचा कविता म्हून काही विशेष दर्जा असायलाच हवा, असा जवळपास आग्रह होता की काय? असा संशय घेता येतो. अर्थात याचा परिणाम असा झाला, गायलेल्या गीतांतील कवितेचा दर्जा समृद्ध असायचा. स्वररचना वगळून, कागदावर शब्द मांडले तर त्या कवितेचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल, अशीच शब्दकळा असावी, हाच उच्च अभिरुचीचा प्रभाव म्हणता येईल. इथेच अरुण दात्यांचे व्यक्तित्व फार वेगळे ठरते.
गेली काही वर्षे त्यांनी गायन जवळपास सोडलेच होते. त्यांच्या बहराच्या काळानंतर ज्या प्रकारचे संगीत अवतरले, त्या शैलीत सुरावट, संथ गती आणि नाजूक प्रक्षेपण यांना जागा नव्हती. असेही म्हणता येईल, काहीसे पाश्चात्य, उडत्या स्वभावाचे संगीत आणि लयबंध अरुण दात्यांना मानवले नसावेत. अर्थात काळाच्या या बदलाची अचूक जाण ठेऊन त्यांनी गाणी गायचे थांबवले, हे देखील त्यांच्या सुसंस्कृत, संयत स्वभावाला साजेसेच होते. उच्च अभिरुची सगळ्यांनाच मानवते किंवा परवडते असे नाही त्यामुळे तशी कला निर्मिती ही नेहमीच दुर्मिळ असते. आपण काय आणि कसे गाणार आहोत, याची अचूक जाण असलेल्या काही मोजक्याच गायकांपैकी एक असे अरुण दाते होते आणि हेच त्यांच्या गायकीचे खरे वैशिष्ट्य मानायला हवे.

No comments:

Post a Comment