Wednesday 18 June 2014

या चिमण्यांनो परत फिरा रे………………




इथे मी काही गाण्यांचा उल्लेख उदाहरण म्हणून घेणार आहे. त्यानिमित्ताने सुगम संगीतात गायकाचे स्थान किती महत्वाचे, हे स्पष्ट व्हावे. लिहिताना, भाषा शक्यतो साधी, सरळ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जरुरीच असेल तिथे स्वरलेखन किंवा स्वरांची मांडणी मांडावी लागेल. सुरवातीला आपण, श्रीनिवास खळे साहेबांचे असामान्य गाणे “या चिमण्यांनो परत फिरा” हे गाणे घेऊया. इथे मी, फक्त चाल, आणि गायन, या दोनच घटकांचा विचार करणार आहे.
आता, या गाण्याची पहिली ओळ “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या” आणि दुसरी ओळ आहे, “जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या”. पहिली ओळ, पुरिया धनाश्री रागावर आहे तर दुसरी ओळ मारवा रागावर आधारित आहे. ही झाली तांत्रिक माहिती. आता, पुरिया धनाश्रीचे सूर बघितले तर “धैवत” आणि “रिषभ” हे कोमल स्वर तर बाकीचे शद्ध स्वर आहेत. पहिली ओळ ऐकताना या स्वरांचा पडताळा घेत येतो. गंमतीचा भाग असा आहे, या पहिल्या ओळीत, “फिरा” आणि “रे” या दोन शब्दात किंचितसा “विराम” आहे. म्हणजे, “फिरा” शब्दानंतर क्षणभर शांतता आणि मग “रे” शब्द ऐकायला येतो, आता हा “रे” शब्द कसा येतो? तर, कोमल रिषभाचा स्पर्श घेऊन येतो. आता, स्वररचना करताना, खळ्यांनी अशीच स्वररचना लताबाईंच्या समोर ठेवली परंतु त्या स्वरांचे नेमके उच्चारण आणि त्यातून जाणवणारा भाव, हे रसिकांपर्यंत या बाईंनीच पोहचवले, म्हणजे कागदावरील स्वर, “जिवंत” करण्याचे “काम” या गायिकेने केले आणि त्यातूनच आपल्याला स्वरांची अनुभूती मिळाली.
आता असे बघू, शास्त्रीय गायक तरी यापेक्षा वेगळे काय करतात? रागदारी ही कागदावर मांडलेली असते, गुरुकडून शिकताना, त्याचे व्याकरण समजून घेत येते पण अखेर हा जो जीवघेणा कोमल रिषभ आहे, तो त्यालाच त्याच्या गळ्यातून काढावा लागतो, अन्यथा त्या स्वरांचे सौंदर्य आपल्याला कसे कळणार? फरक इथे आहे, रागदारी गाणारा संपूर्ण स्वतंत्र असतो तर सुगम संगीत गाणारा, संगीतकाराने दिलेला सूर प्रगत करीत असतो, इतकेच!! पण, जर का, बाहेर पडणारा सूर, बेसूर झाला तर सगळा आविष्कार फसला, असेच म्हणावे लागेल.
मी, पहिल्यापासून जे म्हणत आहे, सुगम संगीतातील गायक/गायिकेकडे आविष्काराचा नकाशा हातात असतो परंतु तो केवळ नकाशाच असतो. ज्याला संगीताच्या व्याकरणाची माहिती असते, त्यालाच त्यातील सौंदर्य समजू शकते परंतु सगळेच काही त्याबाबतीत “जाणकार” नसतात आणि त्याना, त्या रचनेची अनुभूती घ्यायची झाल्यास, गायक/गयिकेवरच अवलंबून राहणे जरुरीचे असते.
आता, वरील गाण्याच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, “रे” शब्दावरील कोमल रिषभ इतका जीवघेणा आहे की, तो, त्या प्रतीचा स्वर, केवळ लताबाईंच्याच गळ्यातून निघू शकला!! पुढे, आणखी गंमत आहे, पहिली ओळ संपल्यावर दुसरी ओळ मारवा रागात आहे. मारवा तर केवळ ५ स्वरांचा राग. इथे देखील, कोमल रिषभ आहेच. प्रश्न असा आहे, पहिल्या ओळीतील कोमल रिषभ – जो पुरिया धनश्री रागातील आहे आणि दुसऱ्या ओळीतील कोमल रिषभ – जो मारवा रागातील आहे, या दोन्ही स्वरांचे “टेक्श्चर” वेगळे आहे. खळ्यांनी चाल निर्माण करताना, या दोन्ही रागांचा नेमका अभ्यास करूनच “तर्ज” बनवली आणि संगीतकार म्हणून, रचना तयार करताना, पहिल्या ओळीतील राग योजना, दुसऱ्या ओळीत, दुसऱ्या रागात प्रवेश करतेवेळी, हा जो रागबदल आहे,हा लय तशीच ठेऊन, केलेला आहे आणि तिथे संगीतकाराचे कौशल्य दिसून येते.
मग, लताबाई यात कुठे बसतात आणि त्यांचे यात काय Contribution आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना, आधी जे स्वर मी दाखवले आहेत, ते स्वर आणि त्यांची अनुभूती, त्या किती प्रत्ययकारी पद्धतीने देतात, हे बघण्यासारखे आहे आणि सुगम संगीतातील सर्जनशीलता, जी काही थोडी फार असते, ती इथे दिसते. आता, हेच गाणे इतर गायिका गातात, अगदी प्रचंड मेहनत घेऊन गातात तरीही लताबाईंच्या गळ्यातून जी आर्तता येते, तिथपर्यंत पोहोचत नाहीत. तो कोमल रिषभ, त्या ताकदीने इतर गायिकांच्या गळ्यातून उमटत नाही. का उमटत नाही? स्वर तर तुमच्या समोर आहेत, चालीचे वळण देखील कागदावर मांडलेले आहे आणि “ओरिजिनल” गाणे आत्तापर्यंत शेकडोवेळा ऐकलेले आहे तरीही ओरिजिनल गाण्यातील स्वरांची “उठावण” इतर गायिकांना जमत नाही. सुगम संगीतात, प्रत्येक क्षणाला अतिशय महत्व असते आणि इथला कुठलाही क्षण “फुकट” घालविणे, उत्तम गाण्याला परवडत नाही!! लताबाई, गळ्यातून सूर काढताना, आधी तो सर्वांगाने न्याहाळतात, त्याच्याशी मैत्री करतात. प्रत्येक सुराचे स्वत:चे असे “वजन” असते आणि त्या वजनानेच तो सूर बाहेर येणे, क्रमप्राप्त असते अन्यथा सगळा आविष्कार फुसका ठरतो. इथे केवळ “कोमल रिषभ” फक्त येत नाही तर त्याच्या जोडीने इतर श्रुतींचे “कण” त्या स्वराला लगडलेले असतात आणि हे संगीतकाराने रचनेच्या आराखड्यात मांडलेले नसते, मग ते “कण” इतके अलगद, हळवे असतात की, तेंव्हा आपल्याला कळते, इथे शब्द अपुरे आहेत!! आणि या कणांच्या सहाय्याने तो स्वर अधिक लखलखून बाहेर पडतो आणि आपल्या कानावर येतो.
त्यातून, शब्दोच्चार देखील गायकावरच अवलंबून असतात. अखेर गाणे हे, त्याच्या मुखातून आपल्याकडे येते, तेंव्हा ही जबाबदारी फार मोठी असते. याच गाण्याची लय सरळ, साधी नाही प्रत्येक सुरांमागे आणखी सूर (श्रुती) लताबाईंनी जोडल्याने, तो सूर अधिक अंतर्मुख होतो आणि गाण्याचा मूळ आशय अधिक खोल होतो. म्हणूनच भारतीय संगीत कधीही संपूर्णपणे कागदावर मांडता येत नाही कारण इथे प्रत्येक कलाकाराला स्वत:चा विचार करायची संधी उपलब्ध असते.
पुढच्या भागात आणखी एक गाणे उदाहरण म्हणून घेतो.

4 comments:

  1. स्पष्ट रसग्रहण. आवडलं.

    ReplyDelete
  2. सुंदर!
    आत्ताच एका प्रख्यात शास्त्रीय गायकाने हे गाणे गाण्याचा केलेला प्रांजळ प्रयत्न एकला व तुम्ही वर मांडलेल्या विश्लेषणाची प्रचिती आली.
    धन्यवाद

    ReplyDelete
  3. अतिशय कठीण गाणं, भावगीताला कसा न्याय द्यावा लागतो कि ज्यामुळे त्यातला भावार्थ समजून ते परिणामकारक होऊ शकते, हे उत्तम प्रकारे समजावून सांगितलेत, धन्यवाद

    ReplyDelete
  4. सुंदर

    ReplyDelete