Thursday 28 August 2014

सलिल चौधरी - प्रयोगशील संगीतकार!!

चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात ३ घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ ३ ते ४ मिनिटांचे सादरीकरण. त्यामुळे, प्रयोग करायचे झाले तरी, शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथे तिन्ही स्वतंत्र व्यक्ती!! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील. चित्रपटातील कविता अति गूढ असून चालत नाही अन्यथा शब्दकळेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक. जरी, गायक/गायिका स्वतंत्र व्यक्ती असली तरी गायनाचा पल्ला हा संगीतकाराने आधीच आखून दिलेल्या मार्गावरून गाठायचा.  तसे, इथे " मी गाण्यात वेगळे प्रयोग केले" असा "दावा" करणारे भरपूर भेटतात परंतु यामुळेच बहुदा "प्रयोग" हा शब्द थोडा हास्यास्पद झाला आहे. अशा परिस्थितीत, ज्या संगीतकारांना खऱ्याअर्थी "प्रयोगशील" संगीतकार म्हणावे, अशा फार थोड्या संगीतकारांमध्ये सलिल चौधरी यांचा समावेश सहज होतो. आपल्याला इथे, त्यांनी नेमके काय प्रयोग केले, आणि त्याचे किती दूरगामी परिणाम झाले, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 
बालपण, आसाम आणि बंगाल इथे गेल्याने, या दोन्ही प्रदेशातील आदिम आणि लोकसंगीताचा गडद परिणाम झाला, असे त्यांच्या पुढे निर्माण केलेल्या रचनांवरून सहज अनुमान काढता येते. त्यातून, लहानपणी "कम्युनिस्ट" विचारसरणीशी संबंध आल्याने, ज्या कलांचा लोकांशी थेट संबंध असतो, ज्या कलांना लोकांच्या  कला म्हणता येते, त्याच कला महत्वाच्या असतात. अर्थातच, आदिम, लोन आणि धर्म या भारतीय संगीताच्या कोटी आपोआपच खास महत्वाच्या ठरतात. सलिलदांच्या एकंदर सांगीत निवडीत, ही भूमिका बरीच ठामपणे दिसून येते. 
या संदर्भात, पुढे विचार करण्यासाठी, आपल्याला निदान ४ टप्पे ध्यानात घेतले पाहिजेत. युथ क्वायर (युवासमूह गायन) क्षेत्रांतील त्यांचे काम, हा पहिला विशेष आणि त्यांच्यातील ज्वलंत कम्युनिस्ट विचारसरणी लक्षात  घेता, हा टप्पा त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत महत्वाचा टप्पा ठरतो. त्या दृष्टीने, त्यांनी, मुंबई आणि कोलकत्ता इथे असे गायकसमूह स्थापले. 
दुसरे कार्यक्षेत्र - त्यांनी दिलेले हिंदी चित्रपट संगीत आणि ते मात्र संपूर्णपणे मुंबईत फळाला आले. 
तिसरा टप्पा, "बंगाली गीत" आणि या क्षेत्रात त्यांनी खूपच वेधक कामगिरी केली आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे "बालगीते". 
या सगळ्या टप्प्यांचे विवेचन अशा साठी करायचे, त्यांनी जी चित्रपट गाणी तयार केली, त्या सगळ्या निर्मितीवर, कुठे ना कुठेतरी या टप्प्यांचा प्रभाव ठामपणे जाणवतो. डाव्या विचारसरणीशी असलेल्या बांधिलकीमुळे, विविध भारतीय प्रदेशांतील लोकसंगीत, समूहगायनाची सहेतुक योजना आणि वाद्यवृंदाचा वापर त्यांच्या संगीतात सर्वत्र आढळतो. शिवाय, भारतीय संगीतात ज्याची कमतरता अनेकांना जाणवते , त्या स्वनरंगाची विविधता या ३ विशेषांमुळे त्यांना सुलभ झाले. भारतीय संगीतात, कुठलेही चावीफलक वाद्य (हार्मोनियम, पियानो, ऑर्गन इत्यादी वाद्ये) म्हटले की नवा स्वन्रंग, एक प्रकारचे प्रमाणीकरण आणि सर्वांना उपलब्ध सांगीत उपयुक्तता, या गोष्टी अपरिहार्यतेने जाणवतात. संगीतातून, अखिल भारतीय आवाहकता कशी साधायची, या मुलभुत प्रश्नाला इथे स्पर्श झाला. सलिलदांनी समूहगायनाचा आपल्या पार्श्वसंगीतासाठी वाद्यांसारखा वापर केला आहे. 
बंगाली गीताचा आधुनिक अवतार सिद्ध करण्यातली त्यांची आस्था, तसेच रवींद्र संगीत आणी त्याचे वातावरण, याविषयी विरोधविकासवादी भूमिका, यामुळे, त्यांना आपल्या खास ठशाचे बंगाली गीत रचणे भाग पडले, हे सहज ध्यानात येण्यासारखे आहे. यातूनच, त्यांनी पुढे आपली अनेक बंगाली गीते, हिंदीत आणली. 
याचाच परिणाम असेल, पण सलीलदा पाश्चात्य कलासंगीताचे अभ्य्सक झाले. बीथोवन, मोझार्ट इत्यादी "क्लासिकल" रचनाकार त्यांच्या खास पसंतीचे होते, हे सहज समजून घेता येते. याच संगीताच्या प्रभावामुळे, त्यांना वाद्यवृंद रचनेत प्रयोग करण्याची स्फूर्ती मिळाली असणार, हे उघड आहे. भारतीय वैदिक संगीत, आदिवासी संगीत, इतकेच नव्हे तर तंबोरा या वाद्यातही, स्वरसंवाद (हार्मनी) हे तत्व आहे, असे त्यांचे ठाम मत होते. 
"दो  बिघा जमीन" या चित्रपटातून, त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. "धरती कहे पुकार के" ही गाणे, लोकसंगीताशी फार जवळचे नाते सांगणारे आहे. या गाण्याच्या सुरवातीला, "भाई रे" अशी पुकार आहे आणि ती पुकार, या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.  
पुढे, त्यांच्या "परख" चित्रपटातील गाणे विशेष गाजली. "मिला है किसीका झुमका" हे गाणे ऐकण्यासारखे आहे. एकाच बासरीचा वाक्यांश ऐकायला येतो. ढाल्या तारतेचा ताल आणि साधी चाल तरीही लोकसंगीताचा बाज आणि त्याच्याच चलनाचा थेट वापर, यामुळे हे गाणे वेधक होते. सुरवातीला म्हटल्या प्रमाणे , बंगाली लोकसंगीताचा त्यांच्या गडद परिणाम जाणवतो - "क्या हवा चली" किंवा "ऋत बदली" या गाण्यांवर बंगाली "बाउल" संगीताची छाप आहे. याचा वळणाने, वेगळे गाणे बघायचे झाल्यास, "बन्सी क्यो बजाये" हे गाणे ऐकावे. एक वेगळे नृत्यगीत आहे 
मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी अनेक बंगाली रचना, (स्वत:च्या) हिंदीत आणल्या - "जारे, जारे उड जारे पंछी","ओ  सजना,बरखा बहार आई" किंवा " ना जिया लागे ना" ही गाणी, त्यांच्याच मुळातल्या बंगाली गाण्यांची हिंदी नक्कल आहे. असे असले तरी ती मुळातली गाणी ऐकताना, त्यांच्या प्रतिभेची साक्ष मिळते, हे नक्की. 
त्यांनी, पाश्चात्य रचनाकारांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी ज्याप्रकारे गाण्याचे वाद्यमेळ रचले, त्यातून आपण सहज समजू शकतो. याचाच परिणाम असा झाला, त्यांच्या गाण्यात, दोन्ही सांगीतिक संस्कृतीचा अप्रतिम मिलाफ आढळतो. तसेच पारंपारिक वाड्यातून देक्गील नवनवीन सुरावटी काढून, गाण्यालाच वेगळे परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षणीय ठरतो. तसेबघितले तर, "इतना ना मुझसे तू प्यार बढा" हे गाणे सरळ, सरळ मोझार्टच्या सिम्फनीवर बेतलेले आहे (सलिलदांनी ते कधीही लपविले नाही) तरीही गाण्यातील वाद्यमेळ बारकाईने ऐकला तर, त्यात सलिलदांच्या अभ्यासाची चुणूक दिसून येते. असाच प्रकार, त्यांनी इतर रचनांच्या बाबतीत केलेला दिसतो. म्हणजे चालीचा मुलस्त्रोत जरी उचलेल असला तरी त्यात स्वत:चे वैशिष्ट्य म्हणून काहीतरी सांगीतिक करामत करून दाखवायची आणि ही जाणीव, त्यांनी शेवटपर्यंत ठेवली होती, अगदी "रजनीगंधा", "छोटी छोटी सी बात" या चित्रपटातील गाणी ऐकावीत. चाली तशा सरळ, साध्य आहेत परंतु प्रत्येक अंतरा आणि तिथला वाद्यमेळ, यात काही ना काहीतरी वेगळेपण दिसून येते. त्या दृष्टीने, त्यांच्या आधी सी. रामचंद्रांनी जी पाश्चात्य संगीताची जाणीव ठेवली होती, त्याचे सुसंस्कारित रूप, सलिलदांनी आपल्या रचनांमधून आपल्या समोर आणले. 
आज, ए.आर, रेहमान जे प्रयोग करीत आहे, म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संगीताचे एकत्रीकरण, याचा पाया, सलिलदा आणि नंतर राहुल देव बर्मन, यांनी घातला आहे, हे आपल्याला सहज समजून घेता येईल. 
संपूर्ण गीतत्वास पोचलेली अशी एक रचना - "ओ सजना बरखा बहार" बघूया. वास्तविक चाल, ही त्यांच्या मूळ बंगाली गाण्याची आहे तरीही स्वरपट्ट्यामध्ये मुक्त फिरणारी, संगीत कल्पनांनी भरलेली, उत्साही, द्रुत अशी मधुर चाल आहे. कोमल निषाद स्वरावर येउन थांबणारा मुखडा,  हा या रचनेचा मनोज्ञ विशेष. नायिकेच्या मनोवस्थेचे नेमके चित्रण स्वरांच्या सहायाने अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने घडते.
पाश्चात्य संगीताचा अभ्यास असल्याने, "जिंदगी ख्वाब है" या गाण्यात, Violin, Accordion, Trumpet इत्यादी वाद्यांचा वापर खास ऐकण्यासारखा आहे. 
सलिलदांच्या सांगीतिक कारकिर्दीचे  शिखर म्हणजे "मधुमती". या चित्रपटात, सलिलदांच्या सांगीत सर्जनक्षमतेचा विस्तीर्ण पट जवळपास उलगडलेला दिसतो. "आजा रे" सारखे पछाडून टाकणारे गीत, "दैय्या रे दैय्या" सारखे लोकसंगीतावर आधारित गाणे, "जंगल मे मोर नाचा" सारखे हलके फुलके गीत तर "टुटे हुवे ख्वाबो ने" सारखे अप्रतिम विरह गीत, चित्रपट संगीताच्या गाण्यांच्या जीतल्या काही महत्वपूर्ण "कोटी" आहेत, त्या सगळ्यांचा या चित्रपटात समावेश होतो आणि त्यामुळे, त्यातील प्रत्येक गाण्याला सलिलदांनी स्वत"चे खास वैशिष्ट्य प्रदान केले आहे. 
सलिलदांची गीतसर्जनशक्ती वारंवार आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती. काम जर अधिक केंद्रीभूत झाले असते तर संगमसंगीताच्या गतिमान कोटींत चपखल बसणारे संगीत ते आपल्याला देऊ शकले असते. त्यांची गाणी ऐकताना, अनेकवेळा हिंदी चित्रपट संगीतात जे संगीत होते त्यापेक्षा अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीतसंगम साधण्याची त्यांना इच्छा होती, असे फार जाणवते आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे काम नव्हते!! 

Monday 25 August 2014

जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तसे योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.
मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजिबात  झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.
आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समाजात असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यात, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.
"हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुंटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,
जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मै चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी पिलू  राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!
जयदेव यांच्या संगीताची आणखी काही वैशिष्ट्ये बघणे जरुरीचे ठरेल. त्यांच्या रचनाप्रतिभेचे एक रहस्य असे - साधे, मधुर तसे पहाता परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले (इथेच गाण्यातील गायकी अंग दिसून येते) आणि विस्तारशक्यता असलेले, संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत. काही उदाहरणे बघूया, "अल्ला तेरो नाम","अभी ना जाओ छोड के","जब गमे इष्क", किंवा "सीने मे जलन" ही गाणी बघूया. कुणालाही या गाण्यांचे मुखडे सहज गुणगुणता येतात आणि लक्षात येतात. बहुतेक रचनाकार हेच म्हणतात, गाण्याचा मुखडा सुचणे महत्वाचे, नंतर सगळे बांधकामच असते!!
अनेक वेळा इष्ट ते चमकदार, वा भारून टाकणारे सुरावटींचे परिणाम - "दिल जवान आरझू जवान" हे गाणे ऐकावे. परिणाम साधण्यासाठी तंतुवाद्ये आणि Accordion यांची योजना केली आहे.
आणखी महत्वाचा विशेष असा, गीतास रागाधार असावा पण गीत रागात हवे असे नाही. या वृत्तीचे असल्याने, बहुतेकवेळा भावस्थितीशी संलग्न रागांकडे वळताना दिसतात, उदाहरणार्थ "जब गमे इष्क"(भैरवी), "देख ली तेरी खुदाई"( बागेश्री),"जहर देता है"(बिलासखानी तोडी),"किस किस को दीपक प्यार करे (नटभैरव) ही आणि अशी बरीच गाणी ऐकण्यासारखी आहेत. रागाच्या सावलीत चाल तरळत असते पण  अखेर,सावलीपुरताच आधार घ्यायचा, रागदर्शन नव्हे!!
आणखी एक वैशिष्ट्य दिसते, तालाच्या बाबतीत "दादरा" ताल आवडीचा दिसतो. "अभी ना जाओ छोडके","ये वोही गीत है","सीने मे जलन" ही गाणी या दृष्टीने ऐकण्यासारखी आहेत. दादरा ताल, हा ६ मात्रांचा, त्यामुळे लयीची बांधणी घट्ट विणीची करणे आवश्यक. याचाच परिणाम असा झाला, त्यांच्या चाली कधीही शब्दांवर कुरघोडी करत आहेत, असे वाटत नाही. इथे शब्द वावरतो, तो भाषिक तसेच सांगीत ध्वनींचा समूह म्हणून!! अर्थानुसार जरूर पडल्यास, तळाच्या आवर्तनास ओलांडूनही चरण वावरताना दिसतो.
अतिशय चांगल्या अर्थाने, जयदेव अप्रतिम "कारागीर" देखील होते. "अल्ला तेरो नाम" हे समूहगान सुंदर परिणामकारक उदाहरण आहे. गीताला आधार, "गौडसारंग" या रागाचा आहे. गीताचे धृपद फक्त ५ स्वरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून सिद्ध होते तरीही, पुढील कडवे "मध्यम" स्वराला "षडज" मानून गीत पुढे येते. याचा परिणाम असा झाला, आपण सुरावटीची पुनरावृत्ती न ऐकत, एका भारून टाकणाऱ्या स्वरबंधाची प्रतीती येते. असाच प्रकार, "तू चंदा मै चांदनी" या गाण्यात येतो. लोकसंगीताच्या एकूण शैलीचे विश्व निवडून, सफाईदार वा शिष्ट शैलीतील गाणे कसे तयार होते, याचा असामान्य नमुना म्हणता येईल.
आणखी खास वैशिष्ट्य म्हणता येईल, हिंदीतील श्रेष्ठ कवींच्या रचना स्वरबद्ध करण्यातही त्यांनी आपल्या संवेदनाशीलत्वाचा आणि कौशल्याचा प्रत्यय दिला. " हरिवंशराय बच्चन"(मधुशाला),"दिनकर"(उर्वशी),"मैथिलीशरण गुप्त","निराला","महादेवी वर्मा","नरेंद्र शर्मा" यांच्या कविता यात अंतर्भूत होतात. हे कवी, चित्रपटांसाठी गीते रचणारे नव्हते आणि परिणामत: त्यांच्या कृती अगदी वेगळी आव्हाने देणाऱ्या होत्या. याचा अंतिम परिणाम असा झाला,जयदेवच्या अनेक रचना, चित्रपटीय चौकटीशिवाय उभ्या राहू शकल्या.
गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.
रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.

https://www.youtube.com/watch?v=p81LDgumM8s

Saturday 23 August 2014

Beethovan-​Class of Symphony!!

साधारणपणे पाश्चात्य संगीताचा विचार आणि आवड दर्शविली जाते ती, अधिककरून, POP, ROCK अशाच संगीतात. फार तर, JAZZ पर्यंत मजल जाते पण सिम्फनी संगीत, ज्याला पाश्चात्य शास्त्रीय संगीत म्हटले जाते, तिथे फारशी जात नाही. अर्थात, भारतात तरी काय वेगळी परिस्थिती आहे म्हणा!! अजूनही बहुतेक समाज हा सुगम संगीत किंवा चित्रपट संगीत इथेच आकर्षिला गेलेला आहे. असे, नेहमीच, पूर्वीपासून चालत आलेले आहे. अर्थात, माझ्या अनुभवाने बोलायचे झाल्यास, पाश्चात्य समाजातसुद्धा एकूणच, सिम्फनी संगीताचे रसिक हे ठराविक गटाचेच असतात आणि तिथेदेखील सिंफनी संगीताबद्दल फारसे उत्साहाने बोलणारे भेटत नाहीत. मी, साउथ आफ्रिका या देशात उणीपुरी १७ वर्षे काढली, त्यानिमित्ताने, तिथल्या समाजात चांगल्यापैकी मिसळलो होतो. वास्तविक, साउथ आफ्रिका हा देश म्हणजे आफ्रिका खंडाचे युरोप किंवा अमेरिका असे सहजपणे म्हणता येईल, इतका पुढारलेला देश आहे. ठायीठायी, तिथे युरोपियन वंशाचे लोक भेटत असतात. त्यामुळे, ती संस्कृती, तिथे मुरली आहे, असे म्हणायला प्रत्यवाय नाही. तिथेच, मी प्रिटोरिया शहरात आणि डर्बन शहरात असे दोन सिम्फनी संगीताचे कार्यक्रम पहिले होते. मला तेंव्हा थोडासा धक्का बसला होता. धक्का अशासाठी की, कार्यक्रमात बहुतेक रसिक हे मध्यम वयीन किंवा उतार वयाचे असतील अशी अपेक्षा ठेवली होती पण वास्तवात अर्धे सभागृह तरुण रसिकांनी भरले होते. अर्थात, पुढे जेंव्हा मी, माझ्या ओळखीच्या मित्रांशी सिंफनी संगीताचा विषय काढीत असे, तेंव्हा अपवाद वगळता, नेहमीच निराशा पदरी पडली.
असो, खरे सांगायचे झाल्यास, जसे आपले रागदारी संगीत. जोपर्यंत स्वरांची ओढ लागत तोपर्यंत तरी, परकेच वाटते!! तोच अनुभव सिंफनी संगीताबद्दल येतो. पियानो, व्हायोलीन सारखी अत्यंत थोडी वाद्येच या संगीतात वापरली जातात. आपल्या रागदारी संगीतात जसे, आधी ठाय लय, नंतर रागाची बढत असा स्वरविस्तार असतो, तसाच प्रकार सिम्फनी संगीतात असतो. स्वर तेच असतात फक्त स्वर लावण्याची पद्धत वेगळी असते आणि मुळात तिथे सिम्फनी संगीत हे वाद्यसंगीत असल्याने, मानवी गळा अप्राप्य असतो आणि आपल्याला थोडे बिचकायला होते. पण, एकदा का त्या स्वरांची ओळख, विस्तार ध्यानात यायला लागला की मात्र आपली “सुटका” नाही!! पियानोवरील नृत्यमग्न बोटे, आपल्या मनाचा कब्जा कधी घेतात, हे कळतच नाही!! अर्थात, दोन्ही संगीतात एक फरक फार महत्वाचा आहे.सिंफनी संगीत एकदा तयार झाली की त्यात सुधारणा शक्यच नसते. एखादे चिरेबंदी स्थापत्य असावे त्याप्रमाणे, सिंफनीची घट्ट विणीची बांधणी असते. त्यात तुम्ही कधीही बदल घडवू शकत नाही, निदानपक्षी अजूनपर्यंततरी कुणी असा प्रयोग केलेला नाही. त्यामुळे, तुम्ही त्या संगीताचे संपूर्ण “नोटेशन” काढू शकता. रागदारी संगीतात, व्यक्तिगणिक बदल नेहमीच घडत असल्याने, आपले संगीत संपूर्णपणे “नोटेशन” पद्धतीत बसविणे अवघड होते. प्राथमिक स्वररचना मांडता येते पण तीच स्वररचना, त्या रागाची एकमेव ओळख असे म्हणता येत नाही. असे असले तरी सिम्फनी संगीताची बांधणी मात्र केवळ अपूर्व, अशीच म्हणावी लागते. स्वरांचे इतके विविध प्रकार ऐकायला मिळतात, की ऐकताना आपण “थक्क” होणे, इतकेच आपल्या हाती राहते.
तसा, सिंफनी संगीताचा इतिहास हा काही शतकांपूर्वीचाच आहे. त्या आधी, पाश्चिमात्य संगीत हे प्रामुख्याने “ग्रीक” संगीत पद्धत अवलंबत होती जी बऱ्याच प्रमाणात अजूनही चालू आहे. पण, नंतरच्या काळात, इटालियन पद्धत अस्तित्वात आली आणि संगीत लेखन पद्धत बदलली. त्या दृष्टीने, व्हिएन्नाचा संगीतकार, मोझार्ट हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. याने निर्माण केलेला सिम्फनी संगीत वारसा, पुढे बीथोवनने अधिक विस्तारला असे, ढोबळपणे म्हणता येईल.
बीथोवनच्या रचना या अतिशय गुंतागुंतीच्या असतात. बहुश: पियानो हेच वाद्य डोळ्यासमोर ठेऊन निर्माण केल्या आहेत, असे वाटते. आपल्याकडे जसे, वादी-संवादी स्वर हे त्या रागाची मुलभूत ओळख दर्शवितात, तसाच प्रकार, सिंफनी संगीतात, C मेजर, E मायनर अशी स्वरांची ओळख असते. परंतु, बीथोवनच्या रचना, त्याहीपलीकडे जातात म्हणजे, त्याच्या रचनेची सुरवात हे बरेच वेळा E मेजर किंवा, F मायनर अशा सप्तकातील नंतरच्या सुरांवरून होते आणि तिथे, ज्या काही स्वरांच्या जाती दर्शविल्या जाता, ते सगळे केवळ अपूर्व असते. जसे आपण, रागदारी संगीत, आपले मन संपूर्ण एकाग्र करतो, तसेच करून ऐकले तर सिंफनी संगीतातील अपूर्वता जाणता येईल. फक्त, आपल्या संगीतात गमकांच्या सहायाने मिंड काढली जाते, तसे सिंफनी संगीतात जमत नाही आणि याचे मुख्य कारण, त्यांच्याकडे असलेली वाद्ये, हेच आहे. ऑर्गन किंवा पियानो, या वाद्यात स्वर लांबविण्याची अजिबात सोय नसल्याने, स्वरांच्या तुटकपणात स्वरांची संगती साधायची असते, जशी आपण सतार वादनात साधतो. तरीही वाद्यांमधील फरक जाणवतोच. तरीही, जर का इटलीमधील सेंट पीटर्सबर्ग येथील चर्चमधील ऑर्गन वादन ऐकली, या वाद्याची घनगंभीरता लगेच लक्षात येईल. केवळ इटलीमधीलच नव्हे तर इतर प्रसिध्द चर्चमधील ऑर्गन असाच अनुभव देतात. एकाच वाद्यावर पाच सप्तकांपेक्षा अधिक स्वरांचा अनुभव देण्याची ताकद या वाद्यात आहे. चर्चचे अवाढव्य सभागृह ऑर्गनमधील स्वरांनी तुडूंब भरून जाते आणि हा अनुभव केवळ अनिवर्चनीय असतो. मी, साउथ आफ्रिकेत हा अनुभव खूप वेळा घेतलेला आहे.
बीथोवनच्या रचना अतिशय संथ लयीत सुरु होतात, एक विविक्षित क्षणी संथ लय कधी द्रुत लयीत परावर्तीत होते, हे सुरवातीला तरी समजतच नाही. सिम्फनी संगीत म्हणजे, एका स्वरावरून अनेक स्वरांचा “गुच्छ” असे स्वरूप असते आणि इथे बीथोवन केवळ असामान्य आहे. त्याच्या रचनेतील पियानोच नव्हे तर व्हायोलीनदेखील इतके स्वरबंध दाखवीत असतात की आपल्यालाच प्रश्न पडतो की एकाच वेळी किती स्वर सौंदर्य ऐकायचे आणि अवलोकायचे!! खरतर, बीथोवनच्या प्रत्येक रचनेचे हे नेमके लक्षण मानावे लागेल. रचना कधीही सरळसोटपणे आपल्या समोर येत नाही, सुरवातीचा स्वर पियानोवर वाजला की लगेच पुढील स्वर हे लाटालाटानी जणू अंगावर कोसळायला लागतात. हे स्वर इतके एकमेकात गुंतलेले असतात की, प्रत्येक स्वर सुटेपणी ऐकायला, आपले मन फार एकाग्र करावे लागते, नव्हे बीथोवनच्या रचनेची ही पहिली मागणी असते!! इथे, तुम्हाला बीथोवन जरादेखील उसंत देत नाही!! एकामागून एक स्वर तुमच्या कानावर येत असतात आणि त्यातून लय तयार होत जाते आणि त्या लयीचा मागोवा घेणे, कधीकधी अशक्य होऊन जाते. त्याची, Symphony No.9, The Fifth Symphony, Fur Elise या रचना मुद्दामून ऐकण्यासारख्या आहेत. Piano Concert No.5 in E Flat major, ही रचना तर केवळ असामान्य अशीच आहे. थोडक्यात, या रचनेची सुरावट E खर्ज तरीही प्रमुख(वादी) स्वर कल्पून केलेली रचना. आपल्या भाषेत लिहायचे झाल्यास, खर्जातील “गंधार” हा आधार स्वर मानून, केलेली स्वररचना!! रचना ही “गंधार” हाच “षड्ज” मानून स्वरविस्तार केलेला!! किती अवघड काम!! गंमत म्हणजे, नंतर, हीच रचना, Piano Concert No.5 “Emperor” या रचनेत पूर्ण वेगळे स्वरूप घेऊन येते. इथे, आपल्याला हातात केवळ अवाक होणे, इतकेच राहते. पियानोवरील, याच्या रचना तर केवळ असामान्य याच शब्दात मांडता येतील. अर्थात सगळ्याच रचना काही E, F या स्वरांनी सुरु होत नाहीत. उदाहरणार्थ, Piano Concert No.3 Opera 37 ही रचना C Minor या स्वराने सुरु होते, म्हणजे आपला “सा” परंतु त्याचे स्वरूप अपवादानेच या रचनेत येते!! जणू काही आपला राग मारवा!! अशा कितीतरी रचना या संदर्भात सांगता येतील. मला तर नेहमीच असे वाटते की, कलावंताचे मोठेपण, कधीही त्याच्या संख्येवर ठरवू नये. म्हणजे, सातत्य आवश्यक आहे पण एकमेव निकष मानू नये. लताचे कौतुक, तिने काही हजारो गाणी गायली म्हणून न करता, “रूठ के तुम तो चल दिये” सारखी अफलातून रचना गायली, या मुद्द्यावर करावे. त्यातून कुणीही कलाकार कधीही सातत्याने एकच दर्जा कधीही राखू शकत नाही. हा निसर्गनियम आहे. फक्त, त्याने आपल्या कारकिर्दीत किती वेळा परमोच्च शिखर गाठले किंवा तसा प्रयत्न केला, यावर दर्जा ठरवावा!! आणि त्या शिखरस्थळाचे विश्लेषण करावे. बाकीचा सगळा कचरा दुर्लक्षित करावा.
बीथोवन हा असा अलौकिक कलाकार होता की, हळूहळू तो चक्क “बहिरा” होत गेला!! तरीही, त्याने आपली संगीत रचना करण्याचे अजिबात थांबविले नाही. अर्थात, या शारीरिक व्यंगाने त्याच्या रचनेतील स्वरस्थानांच्या मांडणीत थोडा बदल होत गेला आणि तो तसा घडणे, क्रमप्राप्तच होते. खरे कौशल्य हे की, जसजसे त्याचे बहिरेपण वाढत गेले, तशी हा माणूस, जमिनीला कान लावून, त्यातून जाणविणाऱ्या कंपनांमधून पुढील स्वररचना करीत असे!! संगीतकलेवर किती प्रेम करावे, याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे!! अर्थात, बहिरेपण वाढत गेले तशी त्याच्या रचना थोड्या खर्जात होऊ लागल्या पण हा अवगुण कसा म्हणता येईल? तसा प्रयत्न काही समीक्षकांनी केल्याचे वाचनात येते. कदाचित असे देखील असू शकेल की, शारीरिक व्यंग वाढीस लागल्याने, त्याची जिद्द वाढीस लागली, असे असेल तर, आपण केवळ त्याला “कुर्निसात” करणे, हेच योग्य ठरते.
इथे मी बीथोवनची Moon Light ही एक रचना विचारात घेत आहे. सिम्फनीचे जसे नाव आहे, तशीच अनुभूती ही रचना ऐकायला मिळते. मध्यरात्रीची निरव शांतता, आसमंतात केवळ निळा प्रकाश पसरलेला आणि हाताशी निवांत वेळ!! ही रचना मी, प्रथम २००६ साली ऐकली आणि तिच्या प्रेमातच पडलो. माझ्याकडे ही रचना पियानोवरील आहे पण, “सेलो”, “फ्रेंच हॉर्न”, “सेक्सोफोन” इत्यादी अनेक वाद्यांवर वाजवलेली ऐकायला मिळते. मुळात सुरावट इतकी अप्रतिम आहे की, कुठल्याही वाद्यावर ऐकताना, एक ठराविक दर्जाचा अनुभव सहज घेता येतो. शेक्सपियरने एके ठिकाणी लिहिले आहे, “Moonlight sleeps on Banks” (ज्याचे ग्रेसने भाषांतर केले आहे – चांदणे निजले नदीकिनारी!!) ह्या ओळीत जे वातावरण प्रतीत होते, तोच अनुभव ही सिम्फनी ऐकताना येतो.
“C” Minor, G, E या प्रमुख सुरांतून सारे विश्व उभे केले आहे. मला स्वत:ला पियानोवरील वादन अधिक भावले. पहिल्या सुरापासून, आपली मान आणि मन डोलायला लागते . जशी रचना मध्यावर येते, तिथे पियानोचे “विभ्रम” ऐकण्यासारखे आहेत. पियानो हे वाद्यच इतके समृद्ध वाद्य आहे, की त्यातून, नृत्याचा पदन्यास. मनाची आनंदविभोर अवस्था तसेच चर्चचे घनगंभीर वातावरण एकाचवेळी निर्माण करू शकते. मला वाटते, तुम्ही प्रत्यक्ष ऐकून, याचा अनुभव घेणे चांगले.

https://www.youtube.com/watch?v=nT7_IZPHHb0

Monday 4 August 2014

श्रवणक्रिया - अथक प्रक्रिया!!

वास्तविक संगीत हे भारतीय समाजाचे एक अविभाज्य अंग असे मानले जाते आणि त्यात बरेच तथ्य आहे. काहीजण विरंगुळा म्हणून गाणी ऐकतात, काही गाण्याचे नादिष्ट असतात तर कुणी अधिक छांदिष्ट असतात. अर्थात, व्यक्तिपरत्वे आस्वादाच्या शक्यता बदलत असतात. त्यानुसार आवडीनिवडी निर्माण होतात. प्रत्येक प्रकारच्या आस्वादात, "गाणे ऐकणे" ही क्रिया नेमकेपणी अंतर्भूत असते.
आपल्याकडे अजूनही, सुगम संगीताला तितकीशी मान्यता मिळालेली नाही!! का? याचे समर्पक उत्तर मिळत नाही. रागदारी संगीताचे "अभिजातत्व" नाकारण्यात काहीच हशील नाही पण तसा थोडा बारकाईने विचार केला तर रागदारी संगीताचे रसिक हे तसे एकूण समाजात कमीच असतात.एकतर रागदारी संगीत समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी, तुमच्याकडे "धीर" धरण्याची वृत्ती हवी, त्यात रंगून जाण्याची आवड हवी आणि मुख्य म्हणजे "लयीच्या" अंगाने ऐकण्याची प्रवृत्ती हवी. बहुतेकजण, इथेच गळफाटतात!! अर्थात, या वृत्तीचे दुसरा परिपाक म्हणजे सुगम संगीताची आवड निर्माण होणे. एकतर, सगळा कारभार काही मिनिटांपुरता असतो आणि सहज, जाता-येता, तुम्ही गाण्याचा आस्वाद घेऊ शकता. 
याचा परिणाम असा झाला, सुगम संगीत म्हणजे एक खुशालखेळी असा "अपसमज" पसरला!! वास्तविक पहाता, सुगम संगीताने जे गारुड, समाजावर पसरलेले आहे, त्यावरून, सुगम संगीत म्हणजे हलके फुलके संगीत असा समज का पसरला, हे थोडे कोडेच आहे. वास्तविक पहाता, सुगम संगीताच्या आवडीने, रागदारी संगीताची ओळख सहज होऊ शकते, असा अनुभव आहे. माझ्यासारखे कितीतरी रसिक तर सुगम संगीतातून रागदारी संगीताकडे वळले आणि ही वस्तुस्थिती असताना, सुगम संगीताकडे थोडे उपेक्षित नजरेने बघणे कितपत योग्य आहे? याच विचाराचा दुसरा भाग म्हणजे, मी जे वर म्हटले आहे, त्याप्रमाणे, सहज जाता-येता ऐकत येण्यासारखे संगीत म्हणजे सुगम संगीत!! 
आता, याकडे थोडे बारकाईने बघूया. सुगम संगीत म्हणजे, संगीताचा अत्यंत अटकर बांध्याचा लोभस आविष्कार, असे म्हणता येईल. आपल्याकडे तीन मिनिटांच्या गाण्याकडे बघण्याचे दोन प्रमुख प्रवाह दिसतात. १] गाणे ऐकताना, त्यातील शास्त्रीय संगीताचा भाग शोधणारे, २] गाणे वरवर ऐकणारे. अर्थात माझ्या मते, दोन्ही वृत्ती चुकीच्या आहेत. सुगम संगीतासाठी आणि ते ऐकण्यासाठी शास्त्रीय संगीताची बैठक पक्की हवी, याची अजिबात गरज नाही. एखादे गाणे, एखाद्या रागावर आहे किंवा त्यातील हरकती कुठल्या स्वरांवर आधारित आहेत, असे मत व्यक्त करणे आणि त्यानुसार गाण्याची प्रतवारी ठरविणे, हा प्रगाढ व्यासंगतेचा परिपाक आहे. रागदारी संगीत हे संपूर्ण वेगळ्या प्रतीचे संगीत आहे आणि त्याची सुगम संगीताशी वाजवीपेक्षा अधिक जोड लावणे म्हणजे स्वत:च्या ज्ञानाचे (????) प्रदर्शन मांडणे होय. 
तसेच सुगम संगीत देखील सर्जकतेची विशिष्ट पातळी गाठू शकतात आणि त्याकडे वरवर बघून नजरेआड करणे, हे देखील तितकेच चुकीचे. सुगम संगीतात किती प्रयोग करता येऊ शकतात, हा जरी व्यामिश्रतेचा भाग झाला जरी सर्जनशीलता निश्चित दाखवता येते आणि त्यासाठी या सांगीतिक आविष्काराकडे थोड्या गंभीरपणे बघणे अत्यावश्यक ठरते. 
सुगम संगीताचा आता, थोड्या टप्प्याटप्प्याने विचार करूया. यासाठी, गाण्याची बांधणी कशी असते, तिचा विस्तार कसा होतो इत्यादी भाग विचारात घ्यावे लागतील. बहुतांश गाण्याच्या सुरवातीला वाद्यमेळ सुरु होतो आणि त्यातून, मुखड्याची कल्पना पुढे ठेवली जाते. गाणे कसे असेल किंवा गाण्याची चाल कशी असेल, याचे हा सुरवातीचा वाद्यमेळ कल्पना देतो आणि आपल्यासारखे बरेचजण इथे दुर्लक्ष करतात. सुगम संगीतात सर्जकतेच्या ज्या महत्वाच्या "जागा" असतात, त्यातील ही जागा फार महत्वाची आणि तिथेच फारसे लक्ष दिले जात नाही. 
पुढे, गाण्यात शब्द अवतरतात आणि गाण्याची खरी ओळख सुरु होते. मुळात, सुगम संगीताचा आविष्कार काही मिनिटांपुरता असतो आणि त्यामुळे इथे गाण्यातील प्रत्येक सेकंदाला महत्व असते. जेंव्हा आपण, "अप्रतिम" गाणे असे म्हणतो, तेंव्हा त्या गाण्याची रचना तशी बंदिस्त असते। म्हणजेच, गाण्यातील प्रत्येक क्षण हा अर्थपूर्ण असावाच लागतो. मग तो स्वररचनेचा असेल किंवा वाद्यमेळाचा असेल, शब्दांचा असेल किंवा गायनाचा असेल. सुगम संगीत ऐकताना, आपल्याला संपूर्ण एकाग्रचित्त होऊन गाणे ऐकणे, ही गाणे ओळखण्याची पहिली कसोटी असते आणि तिथेच बहुतेक सगळे रसिक कमी पडतात. 
आपण, आपल्या आवडीनुसार गाणे ऐकतो. कुणी, वाद्यमेळासाठी ऐकतो तर कुणी गायकीसाठी ऐकतो तर कुणी शब्दरचनेसाठी. पण, हे सगळे गाण्याचे "पोटविभाग" आहेत, संपूर्ण गाणे नव्हे. मी वर म्हटले तसे, गाण्यात प्रत्येक क्षणाला महत्व असल्याने, कुशाग्र संगीतकार हा नेहमीच त्या प्रत्येक क्षणाचा अत्यंत हुशारीने वापर करून, गाणे सजवीत असतो. वाद्यमेळावरून एक टीकेचा मुद्दा आठवला. मराठी गाण्यात वाद्यमेळाचा अभाव असतो आणि त्यामुळे हिंदी चित्रपट गाण्यांच्या समोर विविधता कमी पडते अशी टीका बरेचवेळा केली जाते. विविधतेचा मुद्दा ग्राह्य धरला तरी माझ्या माहितीनुसार, हिंदीत आर्थिक पाठबळ भरपूर असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर वादक तसेच अत्याधुनिक ध्वनिमुद्रण व्यवस्था परवडू शकते. माझ्या माहितीत मराठीतील अनेक संगीतकारांना, केवळ आर्थिक पाठबळ नसल्याने, रचनेला मुरड घालावी लागली आहे. साधी सारंगीतून Contra Melody तयार करायची झाल्यास, हाताशी कमीतकमी ४ वादक असणे गरजेचे असते आणि तितके वादक आणण्याची कुवत नसल्याने,  रचनेवर मर्यादा येणे क्रमप्राप्त ठरते आणि त्यामुळे मराठीवर टीका करताना, हा मुद्दा ध्यानात घेणे आवश्यक आहे. 
गाण्याच्या सुरवातीची सुरावट तसेच पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा, इथे संगीतकाराला वाद्यमेळ आणि त्याची रचना, याला वाव असतो आणि बरेचवेळा आपण इथे लक्षच देत नाही. गायकाच्या आवाजाचे गारुड असामान्य खरेच पण, सुरेल वाद्ये हा गाण्याच्या बांधणीतील तितकाच महत्वाचा घटक आहे. कधीकधी गाण्याची लय बदलली जाते आणि त्याचे अर्थपूर्ण सूचन वाद्यमेळातून अतिशय सूक्ष्मपणे समोर येते. बाब तशी लहान आहे पण फार महत्वाची आहे. 
वेगवेगळी वाद्ये तसेच त्याचा पारंपारिक घाट नाकारून, वेगळ्या धर्तीने वाद्यमेळ सजवणे, ही गोष्ट संगीतकाराच्या प्रतिभेची साक्ष देणारी असते. अर्थात, हे सगळे करताना, हाताशी जी शब्दकळा आहे, तिला साजणारी रचना, हे भान कायम राखणे गरजेचे असते. 
सुगम संगीतात, गायन कला निश्चित अंतर्भूत असते आणि त्यानुसार विचार करायचा झाल्यास, आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. गायन म्हटले की लगेच आपला विचार रागदारी संगीताकडे वळतो आणि त्या अनुषंगाने गायनाचे विश्लेषण केले जाते. सुगम संगीतात, शास्त्रीय संगीताचे पायाभूत प्रशिक्षण असण्याची अजिबात गरज नसते, शास्त्रीय गायनाने गळा "जड" होतो आणि सुगम संगीतात, जिथे "संपूर्ण सप्तक" किंवा "मुर्घ्नी स्वर" अशा अलंकाराची काहीही जरुरी नसते. शब्दांच्या आशयानुसार जितका सांगीतिक आविष्कार आवश्यक असेल तितकीच गायकी दाखविणे, गरजेचे असते पण समजा गाण्यात, भरपूर तानांचा "पाऊस" असला की लगेच गाणे प्रभावित होते!! हा अर्थात चुकीचा विचार आहे. 
गाणे ऐकताना, आपण इतक्या सगळ्या गोष्टींचे भान राखतो का? माझा तर अनुभव असा आहे, एखादे गाणे ऐकायला घेतले की मनात त्या अनुषंगाने अनेक विचार (गाणे सोडून) येतात आणि त्या विचारांच्या भोवऱ्यात, गाण्यातील कित्येक अलंकार ऐकायचे राहून जातात!!  अशावेळी, मी गाणे ऐकतो, हा "दावा" किती पोकळ ठरतो. वास्तविक, सुगम संगीताचा आवाका बघता, संपूर्ण गाणे समजून घेण्यास फारसा त्रास होऊ नये परंतु तसे आपल्याकडून घडत नाही. त्यातून, गाण्यात, जे महत्वाचे घटक असतात - स्वररचना, शब्दकळा आणि गायन, या तिन्ही घटकांवर एकाचवेळी मन एकाग्र करणे, ही बाब वाटते तितकी सहजशक्य नसते. शब्दावर लक्ष द्यावे तर गायनातील करामती नजरेआड होतात किंवा स्वररचना ऐकावी तर वाद्यमेळाकडे दुर्लक्ष होते!! 
या सगळ्या गोष्टी "एकसमयावेच्छेदे"  ध्यानात ठेवल्या तरी गाणे आवाक्यात आले असे घडत नाही. यात आणखी एक गंमत आहे. अर्थात, हे माझे अनुमान आहे. कुठलेही गाणे कितीही अप्रतिम आहे, असे वाटले तरी "सुगम संगीत" ही अभिजात कला नाही!! याचे मुख्य कारण, या संगीत आविष्कारात दोन माध्यमे अंतर्भूत आहेत आणि दोन्ही माध्यमे, एकमेकांच्या विरोधात आहेत. १] स्वर, २ ] शब्द. स्वरांच्या राज्यात, कितीही जवळीक साधायचा प्रयत्न केला तरी शब्द माध्यम परकेच असते. आणि याचा प्रभाव अखेरीस गाण्यांवर नेहमी पडतो. गाणे जर का बारकाईने ऐकले तर सहज समजेल, गाण्यात, लयीच्या सोयीसाठी शब्द किंवा अक्षरे, यांची मोडतोड होत असते किंवा करावी लागते. गाणे हे संगीताभिमुख असल्याने, स्वराला प्राधान्य मिळणे आवश्यक परंतु गाण्याच्या आराखाड्यात शब्दांचा अंतर्भाव आवश्यक असल्याने, शब्द आणि आशय,याचा विचार क्रमप्राप्तच ठरतो. सुगम संगीत तोकडे पडते ते इथे. इथे स्वराविष्कारावर मर्यादा कारण शब्दांची मर्यादा आणि एकूणच बांधणीचा अटकर आवाका. स्वररचना ही अत्यंत थोड्या काळासाठी तरीही हाताशी असलेल्या शब्दांशी नाते राखून असणारी, त्यामुळे कुठेतरी, कुठल्यातरी एका घटकाला "गौणत्व" तर नेहमीच मिळत राहणार. याचाच परिपाक असा झाला, मला अजूनही, संपूर्ण "निर्दोष" गाणे ऐकायला मिळालेले नाही!! म्हणूनच मला मनापासून वाटते, गाणे ऐकणे, ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे.