Friday 25 November 2016

बालमुरली कृष्णन

नुकतेच कर्नाटकी संगीतातील दिग्गज आणि प्रख्यात गायक बालमुरली कृष्णन यांचे निधन झाले. कर्नाटक शैलीतील प्रमुख कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रगण्य होते, याबद्दल कसलेच दुमत नसावे आणि आयुष्यभर त्यांनी सतत कर्नाटकी शास्त्रीय संगीताचीच कास धरली. आपण इथे याच मुद्द्याला धरून त्यांच्या गायकीचा समग्र विचार मांडण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक त्यांना अनेक विषयांची आवड होती परंतु त्यांनी गायन हेच आपले लक्ष ठेवले आणि त्यातच आयुष्यभर रममाण झाले. संगीताच्या क्षेत्रात देखील त्यांनी उत्तर भारतीय संगीतातील कलाकारांच्या समवेत मैफिली केल्या, जसे पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि चौरासिया. तसेच जॅझ फ्युजन सारख्या पाश्चात्य संगीतात देखील भाग घेतला आणि आपल्या आवडींना कसलेही बंधन नाही, हे सप्रमाण सिद्ध केले. परंतु हे सगळे करताना, त्यांनी आपल्या मुल:स्रोताकडे कदापिही दुर्लक्ष केल्याचे आढळले नाही. आता असा विचार मांडता येईल, उत्तर भारतीय संगीत काय किंवा पाश्चात्य जॅझ संगीत काय, या सगळ्याचा मूल:स्रोत एकच - निखळ सूर आणि तिथे या गायकाच्या अस्तित्वाची खरी प्रचिती यायची.
आपल्याकडे एक गंमत बघायला आणि अनुभवायला मिळते. वास्तविक, कर्नाटकी संगीत हे भारतीय(च) संगीत आहे पण अजूनही "उत्तर भारतीय संगीत" आणि "कर्नाटकी संगीत"' यांच्यात अकारण एक भिंत उभी आहे आणि आजही महाराष्ट्रापासून वर जाणारी राज्ये, कर्नाटकी संगीताकडे काहीशा त्रयस्थ नजरेने तरी बघतात किंवा दुर्लक्ष करतात. कर्नाटकी संगीतात ज्याला अभिजातत्व म्हणावे असे सगळे गुण आढळतात पण तरीही आजही दोन्ही शैली, जितक्या प्रमाणात एकत्र यायला हव्यात, ताशा आलेल्या नाहीत, हे निखालस सत्य आहे. शैली भिन्न ठेवाव्यात पण आपपर भाव तरी नाहीसा व्हावा.
शास्त्रीय संगीतातील सगळे अलंकार यथास्थितपणे दोन्ही शैलीत आढळतात, फरक असतो, तो सुरांच्या लगावाबाबत!! जुलै १९३० मध्ये जन्माला आलेल्या या कलाकाराने, आयुष्यभर कर्नाटकी संगीताचीच पूजा केली आणि ही शैली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. मी इथे "प्रयत्न'केला" असाच शब्दप्रयोग वापरेन कारण ज्याप्रकारे आजही आपल्याकडे उत्तर भारतीय संगीताचे रसिक एकूण रसिकांच्या तुलनेत फारच कमी आढळतात, तोच प्रकार कर्नाटकी संगीताबाबत आढळतो, मग गाणारी सुब्बलक्ष्मी असो किंवा बालमुरली कृष्णन असोत.या लेखाच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, गायक म्हणून बालमुरली कृष्णन किती श्रेष्ठ होते आणि एकूणच भारतीय संगीतावर त्यांच्या किती प्रभाव होता? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. तिन्ही सप्तकात सहज विहार करू शकणारा निकोप आवाज त्यांना लाभला होता. त्यांचा तारता पल्ला फार विस्तृत होता - उदाहरणच द्यायचे झाल्यास, त्यांनी गायनात "सशब्द क्रिया" म्हणून नव्याने अलंकार शोधून वापरायला सुरवात केली. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, कर्नाटकी संगीतात सुप्रसिद्ध असलेला "आदिताल"  इथे उदाहरण म्हणून घेऊ. ८ मात्रांचा हा ताल, सर्वसाधारणपणे मध्य लयीतील बंदिशींमध्ये वापरला जातो (कर्नाटकी संगीत बहुतांशी मध्य लय आणि द्रुत लय - या दोन लयीमध्येच सादर होते) आता या ८ मात्रा समान विभागणीमध्ये वापरल्या जातात. बालमुरली कृष्णन या तालाचे जे बोल आहेत, त्यांचा गायनात इतका समर्पक उपयोग करीत असत की ते बोल म्हणजेच त्या बंदिशींचे अभिन्न घटक वाटावेत!! हा खेळ लिहायला फार सोपा आहे आहे पण प्रत्यक्षात मांडायला फार अवघड आहे.
शास्त्रीय संगीताच्या  रसिकांना,या गायकाने, पंडित भीमसेन जोशींबरोबर केलेल्या मैफिली आठवल्या तर माझ्या म्हणण्याची प्रचिती यावी. एका बाजूने पंडित भीमसेन जोशी आपल्या आवाजाने सगळे सप्तक आवाक्यात घेत असत तर दुसऱ्या बाजूने बालमुरली कृष्णन त्याच तानेचे, तालाच्या मात्रेच्या अंगाने सादरीकरण करत असत. "सशब्द क्रिया"'हा त्यांनी नव्याने शोधलेला सगीतालंकार आहे आणि त्यावर प्रभुत्व मिळविणे म्हणजे अहोरात्र रियाज करणे, हेच होय.


इथे मी, मुद्दामून भीमसेन जोशी आणि बालमुरली कृष्णन यांचे युगलगान घेतले आहे (जुगलबंदी हा शब्द मी मुद्दामून टाळला!!) एकतर या दोन्ही शैली कुठे भिन्न आहेत आणि कुठे एकत्र येऊ शकतात, याचा आपल्याला अंदाज घेता येईल. सुरवातीच्या आलापीनंतर लगेच चीज सुरु होते, ती मध्यलयीत आणि पुढे द्रुत लयीत समाप्त होते. यमन राग हा दोन्ही शैलीत ऐकायला मिळतो. अर्थात, कर्नाटकी शैलीत सूर कसा लावला जातो आणि त्यायोगे सांगीतिक अलंकार कसे घेतले जातात याची आपल्याला सुरेख कल्पना येईल. विशेषतः: तानक्रिया घेताना, तानेचा शेवट कसा घेतला जातो, हे ऐकणे अधिक उद्बोधक ठरावे. यात आणखी एक बाब विशेष उजळून येते, कर्नाटकी शैलीत, "सरगम" या अलंकाराचा प्रभाव अधिक आहे पण सरगम घेण्याची पद्धत, उत्तर भारतीय संगीतापेक्षा भिन्न आहे. नेहमीचाच यमन राग तरीही ऐकायला वेगळा वाटतो.
याच व्हिडियोत पुढे, मालकंस रागातील एक छोटीशी रचना सादर केली आहे आणि तिथे, मघाशी मी, "सशब्द क्रिया" या शब्दाचा उपयोग केला, त्याचे नेमके प्रत्यंतर ऐकायला मिळते आणि त्याचबरोबर हा अलंकार गेल्यावर चढवून घेणे किती अवघड आहे, याची कल्पना देखील. तसे जरा बारकाईने ऐकले तर "सशब्द क्रिया"' ही बरीचशी "तराणा" या प्रकाराशी बरेच जवळचे नाते दर्शवते. सरगम घेताना शेवटच्या स्वरावर ठेहराव घेताना, किंचित "टोक" आणून, तो स्वर विसर्जित करायची त्यांच्या गायनाची शैली फारच विलोभनीय होती.
मंद्र सप्तकापासून तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकणारा गळा, घुमारेदार आणि आश्वासक सूर, ही खासियत म्हणावी लागेल. स्वरोच्चार आणि दमसास ही खास वैशिष्ट्ये सांगता येतील. रुंद, भरदार आवाज आणि त्याला साजेसा गरिमा. "गरिमा'' म्हणजे ध्वनीचे लहानमोठेपण. गायनात दुसरे वैशिष्ट्य असे दिसते, जरी सुरवातीच्या आलापीनंतर मध्यलयीत बंदिश सुरु करायची झाली तरी त्यात पायरी पायरीने बढत घ्यायची पद्धत अंगिकारलेली आढळते. अट्टहास, त्यामुळे गायनातील "स्वर" या अंगावर अधिक भर देणे क्रमप्राप्तच ठरते. याचाच दुसरा परिणाम, गाण्यातील शब्दांना गौणत्व मिळणे!! भाषिक स्वरांपेक्षा व्यंजनांना उच्चारण्यात कमी श्वास लागतो. वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, घेतलेल्या श्वासात स्वरांचे काम दीर्घ पद्धतीने करता येते. त्यामुळे आवाज, मांडणी आणि त्यासाठी निवडलेले राग, या सर्वांवर घुमारायुक्त अखंडता, याच तत्वाचा वरचष्मा दिसतो. त्याचा वेगळा परिणाम असा होतो, तानक्रिया जाणवण्याइतकी द्रुत करून, त्यांचा आविष्कार करण्याचे तंत्र, गुंतागुंतीच्या, द्रुत, दीर्घ पल्ल्याच्या ताना सहज घेतल्या जातात आणि त्यामुळे ऐकणारा रसिक भारला जातो.
आता असा हा विलक्षण ताकदीचा कलाकार होता. या कलाकाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने, आपला निश्चित रसिकवर्ग तयार केला होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्नाटकी संगीताकडे या कलाकाराने जाणीवपूर्वक प्रयोग करून, रसिकांना खेचून घेतले. आपल्याकडे एक फार मोठी खुळचट पद्धत आहे. एखादा लोकप्रिय कलाकार निजधामाला की लगेच आपल्या लोकांना, "पोकळी जाणवते. एकतर असे एकाच कलाकारावर कुठलीही कला अवलंबून नसते परंतु इतका सारासार विचार फारसा आढळत नाही आणि भरमसाट विशेषणे लावून, गौरव केला जातो. प्रथितयश कलाकार येतात, जातात, क्वचित एखादाच कलाकार असा निघतो जो कलेच्या क्षेत्रात थोडीफार सर्जनशील भर टाकतो आणि त्या कलेची व्याप्ती रुंदावतो. पण, त्यामुळे कलेच्या अवकाशात कायमचे रितेपण कधीच येत नसते. आता, बालमुरली कृष्णन आपल्यात नाहीत पण त्यांनी निर्मिलेली कलेची वेगवेगळी शिखरे, या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कलाकारांना निश्चित गुंगवून टाकतील. कलाकाराला इतके यश मिळाले तरी आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असे म्हणता येईल.

Wednesday 21 September 2016

रागदारी संगीत आणि समय

चित्र १] सकाळची वेळ. अजूनही आसमंतात किरणांची तशी चाहूल नव्हती. त्यामुळे सगळीकडे थंड काळोख पसरलेला होता. हवेत गारवा होता. हाताच्या अंतरावर म्युझिक सिस्टीम होती. सहज चालू केली आणि त्यातून सतारीचे स्वर बाहेर पडायला लागले. डोळ्यांवर तसा झोपेचा अंमल अधिक गडद होता पण सतारीच्या सुरांनी ग्लानीतुन थोडासा बाहेर आलो. अत्यंत संथ लयीत तोडी रागाचे स्वर कानावर पडायला लागले. "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" या स्वरांच्या साहचर्याने बनलेला हा राग, मनाशी सकाळची रम्य चित्रे रंगवायला लागलो. चित्र २] संध्याकाळी असाच पलंगावर जरासा लवंडलो होतो आणि परत काही "ऐकण्याची" लहर आली आणि यावेळेस, तोडी रागाचेच स्वर आले पण वाद्य मात्र सरोद होते, वाद्याची प्रकृती जराशी गंभीर - सतारीच्या तुलनेत. तरीही रागाचे स्वर "परके" वाटले नाहीत आणि जवळपास तासभर राग ऐकत, तसाच पलंगावर लोळत पडलो होतो. मनात विचार आला, वास्तविक "तोडी" राग सकाळचा असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि तसाच संस्कार आपल्या मनावर देखील झालेला आहे. असे असून देखील हाच राग आज संध्याकाळी ऐकताना, आपल्या कानांना काहीही खटकले नाही. याचा अर्थ, रागाचे सूर आणि त्याचा समय, याचे नेमके नाते काय आणि जे रागांचे समयानुरूप वर्गीकरण करण्यात आले आहे, त्यामागे नेमका काय हेतू असावा? केवळ काही संकल्पना मनाशी धरून, रागांचे समय निश्चित करण्यात आले आहेत? असे मानले जाते, भारतीय संगीत आणि संगीतशास्त्र यांना जगात तोड नाही. अर्थात असे ठाम विधान करताना आपल्याला काही बाबी निश्चित करणे जरुरीचे आहे. जगातील प्रत्येक सचेतन आणि जड वस्तू गणिताच्या कक्षेत येते. याचा पुढील भाग म्हणजे, संगीत हे स्वर-लयप्रधान मानिले, तर या दोन्ही गोष्टी निश्चितपणे गणितागत, गणिताधारित आहेत. अर्थात हा सगळा विषय, संगीतशास्त्राच्या कक्षेत येतो. याचाच वेगळा अर्थ असा, संगीत हे कितीही "कला" म्हणून मान्य केले तरी त्याचे अधिकृत अधिष्ठान हे शास्त्रानेच सिद्ध होते. प्रस्तुत विषयाला हात घालण्यापूर्वी काही बाबी स्पष्ट होणे, आवश्यक वाटते. भारतीय संगीत आणि रागदारी संगीत, यात फरक आहे. रागदारी संगीत ही भारतीय संगीताची एक शाखा आहे. त्यामुळे या विषयावर लिहिताना, याच शाखेचा विस्तारपूर्वक विचार करणे अत्यावश्यक ठरते. रागविवेचन आणि स्वरशास्त्र याचा आपल्याला इथे मागोवा घेणे जरुरीचे आहे. स्वर, स्वरांची मांडणी आणि पुढे राग, असा हा प्रवास आहे आणि या प्रवासातून आपण, राग आणि त्यांचा समय, याचा धांडोळा घेणार आहोत. फार पूर्वीपासून राग आणि रागाचे समय याबाबत काही लिखित संकेत तर काही मौखिक संकेत आपल्या समाजात प्रचलित झाले आणि पुढे रूढ पावले. एक नाकी, संगीत आधी अस्तित्वात होते, पुढे त्याचे शास्त्र निर्माण करून, त्या कलेचा पाया व्यापक केला गेला. आता कुठलीही कला ही कालमापनेच्या दृष्टीने बदलत राहते आणि तसे बदलणे आवश्यक असते अन्यथा ती कला साचून राहते आणि हळूहळू निस्तेज होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या अनुरोधाने बघायला गेल्यास, प्राचीन काळी अस्तित्वात असलेले "यज्ञसंगीत" अथवा "यातुसंगीत" जे सामवेदाच्या काळी प्रसिद्ध होते. पुढे त्यात कालानुरूप बदल होत, आजचे रागसंगीत आपल्याला ऐकायला मिळते. हे बदल होत गेले म्हणूनच रागदारी संगीत चिरंतन राहिले. आपल्याकडे एक विधान अतिशय सैलपणे केले जाते - आपली संगीताची परंपरा तीन,चार हजार वर्षांची आहे आणि अविच्छिन्नपणे, अविकृतपणे चालत आली आहे. इतके भोंगळ वाक्य दुसरे नसेल आणि यात केवळ अहंकार दिसून येतो. जिथे सर्व सृष्टी बदलली, समाजजीवन बदलले तिथे संगीत मात्र जसेच्या तसे अविचल राहिले, हे कसे शक्य आहे? संगीत ही कला तर पाऱ्याप्रमाणे तरल कला आहे. जिथे एकाच गुरु-शिष्यांमध्ये देखील संगीत बदलताना दिसते तिथे शेकडो वर्षांच्या संगीत परंपरेत बदल घडला नाही, यावर विश्वास कसा ठेवायचा? जरा आपण बारकाईने बघितले गेल्या पन्नास वर्षांतील रागसंगीताचा ढाचा आता थोड्याफार प्रमाणात बदलेला आढळतो. भरतकालीन संगीत तानसेनाच्या काळात राहिले आणि तानसेनच्या वेळचे संगीत आज उरले नाही. एक गंमत म्हणून विचार केला तर, समजा आजच्या एखाद्या मैफिलीत स्वतः:तानसेन जर मुकाट्याने येऊन बसला तर तो आजच्या गाण्याने अस्वस्थ तरी होईल किंवा कदाचित खिन्न देखील होईल. आणि हाच विचार पुढे ताणला तर - समजा खुद्द तानसेन गायला बसला तर ऐकणारे श्रोते मनातल्या मनात चुळबुळ नक्की करतील. कुठल्याही गाण्यात, कानांच्या सवयीचा भाग फार महत्वाचा असतो. अर्थात या घालमेलीत एक निष्कर्ष आपण काढू शकतो, "संगीत" एक कला म्हणून अव्याहतपणे चालूच आहे आणि पुढे चालूच राहणार. फारतर त्याच्या बाह्यांगात बदल संभवतील. असे म्हटले जाते, ख्याल संगीत किंवा रागसंगीताची निर्मिती अमीर खुसरोनेच केली, जिचा उद्भव तेराव्या शतकात झाला. यात मजेचा भाग असा आहे, जर का तेराव्या शतकात रागसंगीत अवतरले असेल तर तीतून पुढे अठराव्या शतकापर्यंत म्हणजेच "सदारंगा"च्या काळापर्यंत कुठेच "रागसंगीत" या संकल्पनेचा आढळ सापडत नाही!! हे कसे काय? मधल्या काळातील तानसेन किंवा स्वामी हरिदासस्वामी हे मुळात "ध्रुपदिये" होते आणि हे सर्वमान्य आहे. असे असताना, याचा काळात रागसंगीताचा साधा उल्लेख देखील सापडत नाही!! अकबराच्या काळातील "मियाँ की तोंडी" "मियाँ मल्हार" आजही अव्याहतपणे सादर होताना दिसतात आणि याला साधारणपणे तीनशे तर साडेतीनशे वर्षे झाली. मग "खुसरो"निर्मित "ख्याला"ची परंपरा कुठे लुप्त झाली? तसेच खुसरो निर्मित, सतार या वाद्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही!! इथे बरीच गफलत आहे, असा संशय घ्यायला बराच वाव आहे. फारतर असे म्हणता येईल, खुसरोची निर्मिती तितकी सकस नव्हती आणि काळाच्या ओघात म्हणजे त्यानंतर एक, दोनशे वर्षात नाहीशी झाली. वस्तुस्थिती अशी असते, अभिजात कलेचा एखादा अभिनव प्रकार अशा प्रकारे नाहीसा होत नसतो. रागसंगीताच्या अधिक धृपद-धमार संगीत होते, आजही काही कलाकार ते संगीत सादर करतात (उदाहरणार्थ गुंदेचा बंधू) १२०० च्या काळात उदयास आलेल्या, शारंगदेव निर्मित "संगीत रत्नाकर" या ग्रंथात धृपद संगीताचा स्पष्ट उल्लेख वाचायला मिळतो आणि आजही ही परंपरा बघायला मिळते. खुसरो बाबत इथे शंकेला जागा उरते. आपल्या रागदारी संगीतात, प्रथम स्वर आले, पुढे सप्तकांची निर्मिती झाली आणि त्यातून मग स्वरांचे एकमेकांशी नाते जुळवण्यात आले. असे करत असतानाच, "षड्ज - माध्यम" आणि "षड्ज - पंचम" भावाची संगती लावली गेली, जिचे महत्व कायमस्वरूपी चिरंतन झाले. आता ही जी स्वरसंगती मांडली गेली त्यामागे, त्या ध्वनीचे अवगाहन आणि कर्णगोचरता हे विशेष ध्यानात घेऊनच संगती लावली गेली. अर्थात हे करताना, गणिताचा आधार घेतला गेला पण तो भाग नंतरचा. रागसंगीत आणि त्याचा समय, याबाबत विवेचन करताना, आपल्याला हाच मुद्दा विचारात घ्यावा लागेल. रागाची रचना करताना जेंव्हा हाताशी असलेले स्वर आणि त्याची मांडणी करताना, दाखवलेले रचनाकौशल्य, आपण ध्यानात घेऊया. स्वर हे नैसर्गिक आहेत आणि निसर्गातील असंख्य ध्वनींमधून आपल्या रचनाकारांनी, कानाला जे ध्वनी गोड वाटतात, त्यांची निवड करून, सप्तकांची मांडणी केली. त्यामुळे स्वरांच्या जोडीने त्यात भावनांचा आढळ सापडणे साहजिकच ठरते. रागाचा समय निश्चित करताना, याच तत्वाचा विचार प्रामुख्याने केला गेला. भारतीय रसिक हा बालपणापासून संगीताचा जरी भोक्ता होत नसला तरी संगीतानुकूल कान तयार होत असतो. याचा परिणाम असा होता, स्वराकडे तटस्थ वृत्तीने बघण्याची वृत्ती बऱ्याच प्रमाणात क्षीण होत असते. यामागे परंपरेचे संस्कार आणि त्याचा पगडा जबरदस्त असतो. याबाबत पाश्चात्य संगीत विचारवंत Schubert यांचे विवेचन विचारात घेऊया. "We enjoy negative emotions in music by inhibiting displeasure thanks to the "safe" aesthetic context that nullifies the possible dangerous consequences associated with real everyday negative emotions. Therefore we suggest using valence to indicate positive and negative affective character and including pleasure or enjoyment as an extra dimension." या विवेचनाच्या संदर्भात त्यांनी एक सुंदर शब्द वापरला आहे - Aesthetic Emotions. स्वरांच्या जोडीला भावनांची जोड देताना, मानवी स्वभाव हा मुलत: negative म्हणजे दु:खी भावनेचा आधार अधिक घेतो आणि त्यानुरूप आवड निश्चिती होते. जेंव्हा भारतीय रागदारी संगीत हे प्रामुख्याने भक्ती, समर्पण, विरह या भावनांशी जोडलेले आढळते, तेंव्हा या वरील विवेचनाचा नेमका अर्थ लागतो. भारतीय रागसंगीतात जे स्वर सप्तक असते, त्यातील स्वरांचे एकमेकांशी असलेले नाते या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे कारण त्यातूनच पुढे स्वरांतून निर्माण होणारे भावदर्शन कितपत संयुक्तिक आहे आणि किती भाबडे आहे, याचा अदमास घेता येईल. आपले स्वर सप्तक जेंव्हा बघितले जाते तेंव्हा एक प्रश्न नक्की मनात येतो. दोन स्वरांच्या मध्ये देखील काही ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्या ध्वनीच्या साहचर्याने आपल्याला "मींड" या अलंकाराची संगती लागते. आपण नेहमी म्हणतो, आपले संगीत एका स्वरावर स्थिर होते आणि मग पुढे प्रवासाला सुरवात करते पण यात, पुढे सरकताना, आपल्याला अंतर्गत जे नाद आहेत, त्याची मदत घ्यायलाच लागते आणि त्याला "श्रुती" असे म्हणतात. "श्रुती" हा विषय फार किचकट आहे आणि म्हणूनच त्याबद्दलची चर्चा टाळून पुढे गेलो तर असे दिसून येते, प्रत्येक स्वर हा या श्रुतीच्या साहाय्याने जोडलेला आहे आणि त्यामुळे भारतीय संगीत एका स्वरावर स्थिर होते, हे वाक्य एका मर्यादित अर्थानेच घ्यायला लागते. स्वर आणि श्रुती यांच्या बाबत एक श्लोक, भरत मुनींच्या "नाट्यशास्त्र" ग्रंथात सापडतो आणि आजही त्याबाबत फारसा विवाद नाही. "चतुश्चतुश्चतुशचैव षड्जमध्यमपंचमा: ! द्वै द्वै निषादगांधारौ त्रिस्त्री ऋषभधैवतौ !! अर्थात याबाबत गोंधळ असा आहे, याचे नेमके वाटप कसे करायचे आणि हाच श्लोक कितपत ग्राह्य धरायचा? एक बाब नक्की मानायला हवी, या श्रुतीमुळे संगीतात अनेक रस निर्माण होतात आणि त्या रसांच्या साहचर्यानेच पुढे, रागांचे समय वगैरे बाबी उदयाला आल्या. पंडित शारंगदेवांचा "संगीत रत्नाकर" हा ग्रंथ साधारण १२१० ते १२४७ या काळात लिहिलेला, असे मानले जाते आणि आजही हा ग्रंथ प्रमाणभूत आहे, हे सर्वमान्य आहे. या ग्रंथात, त्यांनी स्वरांच्या रसांबद्दल विवरण केले आहे आणि ते खालील प्रमाणे वाचायला मिळते. रस - षड्ज, ऋषभ - वीर, अद्भुत, रौद्र. गंधार, निषाद - करुण. धैवत - बीभत्स. मध्यम, पंचम - हास्य, शृंगार. तसेच त्यांनी स्वरांच्या देवता देखील सांगितल्या आहेत. स्वरांच्या देवता - अग्नी, ब्रह्मा, सरस्वती, विष्णू, इंद्र, गणेश व सहस्रांशू. वरील वर्गीकरण, आजच्या संगीताच्या संदर्भात बघितले असता, फार ढोबळ वाटते. परंतु स्वरांतून काही प्रकारच्या भावना दृग्गोचर होतात, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणखी एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल, पंडित शारंगदेवांच्या काळात, "ख्याल" संगीताचा उदय झाला नव्हता.रसनिष्पत्ती ही त्यावेळच्या धृपद-धमार संगीताच्या आधारावर केलेली आहे. आपण वर बघितले त्याप्रमाणे कालानुरूप संगीताच्या बाह्यांगात आणि सादरीकरणात फरक पडत गेला आणि त्यावेळचे निकष हे आज काहीसे कालबाह्य ठरत गेले. आता वरील चर्चेच्या अनुरोधाने बघायला गेल्यास, आज "राग भैरव" हा सकाळचा राग मानला जातो. भैरव रागाची स्वरावली बघायला गेल्यास, "रिषभ" आणि "धैवत" स्वर कोमल आहेत तर बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहेत. आता गमतीचा भाग नघायला गेल्यास, "संगीत रत्नाकर" मध्ये जे स्वरांचे रस वर्णिलेले आहेत, त्यानुरूप "वीर,रौद्र तसेच बीभत्स" रंगाचा आढळ या रागाच्या बाबतीत अनुभवायला हवा, अगदी पारंपरिक नजरेतून बघितले तरी हे रस या रागात कितपत आढळतात? प्रश्नच आहे. मग, संस्कृत ग्रंथात जे रस सांगितले आहेत, ते चुकीचे ठरवायचे का? उत्तर सरळ आहे. त्यावेळी, "ख्याल" संगीत अस्तित्वात नव्हते, होते ते "धृपद-धमार". त्या संगीताच्या आविष्काराकडे बघितले तर या रसाचा परिपोष आढळू शकतो पण त्यानंतर काही शतकांनी आजचे "ख्याल" संगीत अवतरले आणि त्यावेळेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते!! आता प्रश्न असा उद्भवतो, ग्रंथांच्या नियमानुसार "भैरव" रागाची वेळ पहाटेची दिली आहे आणि त्यानरूप या रागाच्या "षड्ज" स्वराची स्थापना केली गेली आहे. तेंव्हा हा राग पहाटेच्या समयानुसार सादर केला जावा, हे आजही आपल्या मनावर ठसले गेले आहे. अर्थात, भारतीय संगीत हे नेहमीच "गुरु-शिष्य" परंपरेवर आधारित असल्याने, बरेचवेळा गुरूंची मते, ही आपली होतात!! "बाबा वाक्यम प्रमाणम" या उक्तीचा रोकडा अनुभव आपल्याला "गुरु-शिष्य" परंपरेत आढळून येतो. याला काही वेळा छेद देणारे कलावंत भेटतात पण असे प्रमाण तुरळकच असते. याबाबतीत थोडा तटस्थ विचार करायचा झाल्यास ( भारतीय मन, भारतीय संगीताबाबत कितपत असा दृष्टिकोन स्वीकारू शकेल? मला शंका आहे.) परत एकदा पाश्चात्य विचारवंतांकडे वळावे लागेल. Helmholtz once argued that, " Musical enjoyment is linked with patterns of tension and resolution resulting from the confirmation and violation of perceptual expectations of which we are usually unconscious." हा विषय खरे तर Neuroaesthetics या शाखेत मोडतो पण जर का राग, त्या रागात असणारे स्वर आणि त्या स्वरांचा आपल्यावर घडणारा परिणाम, याचा शोधक विचार करायचा झाल्यास, आपल्याला या शाखेकडे वळावे लागते. थोडा विचार केला तर बघा, आपल्या मनात भावना येतात म्हणजे नक्की काय प्रक्रिया घडते? आपल्याला कानाद्वारे काही ध्वनी ऐकायला मिळतात आणि त्या ध्वनींच्या गोडव्याचा आपल्या मेंदूवर काहीतरी परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याकडून प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया दिली जाते. आता, आपण "तोडी" आणि "भैरव" या सकाळच्या रागांचा उल्लेख केला आहे तेंव्हा त्यादृष्टीने, "संगीत रत्नाकर" या ग्रंथात एक श्लोक दिला आहे. भिन्न कैशिकमध्यम षड्जमध्यमिकोत्पनो भिन्न कैशिकमध्यम: । षड्जग्रहांशो मन्यासो मंद्रसान्तोsथवा भवेत ।। षड्जादिमूर्च्छन: पूर्ण: संचारिणी सकाकली । प्रसन्नादियुतो दानवीरे रौद्रेsदभुते रसे ।। दिनस्य प्रथमे यामे प्रयोज्य: सोमदैवत: । अर्थ: भिन्नकैशिकमध्यम षड्जमध्यमा जातीपासून उत्पन्न झाला आहे, त्याचा ग्रह आणि अंश षड्ज असून, मी हा न्यास किंवा मंद्र षड्ज हा न्यास असतो. षड्जादि मूर्च्छना असलेला, संपूर्ण, संचारी वर्णातील प्रसन्नादि अलंकाराने युक्त व काकलीसहित असलेला राग दानवीर, रौद्र आणि अदभूत अशा रसात योजावा. याची देवता सोम ही असून तो दिवसाच्या पहिल्या प्रहरात प्रयुक्त करावा. रागाच्या समयानुसार जे वर्गीकरण सध्या अस्तित्वात आहे, त्या जोडून हा श्लोक घेतल्यास, एकूणच वर्गीकरणाची व्याप्ती आणि संबंध आपल्याला ताडून बघता येतो. वरील श्लोकाच्या बाबतीत आणखी एक मजेचा भाग सांगता येतो, "कैशिकमध्यम" म्हणजे आजच्या काळातील तीव्र मध्यम!! षड्ज-मध्यम संवाद भावाचे दर्शन आपल्या ग्रंथातून फार पूर्वीपासून समजून घेता येते. आता मजेचा दुसरा भाग म्हणजे या श्लोकाचा आधार घेतला तर समयाचे अस्तित्व दिसते पण तरीही शारंगदेवांनी "प्रयुक्त करावा" असा शब्दप्रयोग केला आहे. याचा वेगळ्या शब्दात असा अर्थ मांडता येतो, हे विधान म्हणजे नियम नव्हे. इथे अर्थात एक मुद्दा अजूनही स्पष्ट झालेला नाही. तोडी रागात, "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" हे दोन स्वर आहेत आणि म्हणून या रागाचा समय पहाटेचा आहे का? याबाबत आणखी एक विधान करता येईल. प्रत्येक रागाचे "षड्ज" स्वराचे स्थान वेगळे असते आणि त्यानुरूप पुढील सप्तक सिद्ध होत असते. हे तर सर्वमान्य विधान झाले. मग प्रश्न येतो, "तोडी" रागाचा जो "षड्ज" आहे, त्यात पहाटेच्या समयाची "बीजे" लपली आहेत का? असे काय त्या स्वरांत आहे, म्हणून हा राग पहाटेचा आहे, हे आजतागायत मान्य झाले आहे. याचा वेगळा अर्थ, आपल्याला परत एकदा, त्या स्वराची "कंपने" आणि "स्पंदने" आपल्याला पहाटेच्या वेळेची जाणीव करून देतात का? पहाटेचे स्वर म्हणून स्वरांची काही वेगळी ओळख करता येऊ शकते का? आधुनिक काळात एक मत प्रसिद्ध झाले आहे, स्वरांना स्वतःची अशी ओळख नसते. आपण त्यांच्यावर ओळख लादतो. स्वर म्हणजे थोडक्यात कर्णगोचर ध्वनी, जे मुळात निसर्गात अस्तित्वात असतात. त्या ध्वनींना आपण नियमावलीत बसवले आणि त्याचे शास्त्र निर्माण केले. वरती आपण एक इंग्रजी भाषेतील उतारा विचारात घेतला होता आणि त्यावरून एक निष्कर्ष आपल्या ध्यानात आला होता. कानातून जे ध्वनी आत शिरतात, त्यांचा आपल्या मेंदूवर काही एक परिणाम घडतो आणि मग त्या स्वराची ओळख आपल्याला होते. मुद्दा असा आहे, जे ध्वनी, स्वररूपात मेंदूवर आघात करतात, त्या ध्वनीच्या कंपनीतून, समयाची जाणीव होते का? असे म्हणता येईल का, ध्वनींच्या कंपनांनी आपल्याला प्रति घड्याळाची अनुभूती होते? इथे याच शास्त्रज्ञाने एके ठिकाणी म्हटले आहे, It is possible to have an aesthetic experience without making an aesthetic decision or judgement about stimulus causing that experience. When we do make an aesthetic judgement (consciously or unconsciously), such as when we decide that an object is beautiful, research in neuroaesthetics suggests that areas in the prefrontal regions of the brain are activated. मी लेखाच्या सुरवातीला श्रुती व्यवस्थेबद्दल थोडेफार विवेचन केला आहे आणि त्याचा रागाच्या प्रकृतीशी फार जवळचा संबंध आहे. भारतीय संगीत हे एका स्वरावर स्थिर होते आणि मग पुढील स्वराकडे वळते परंतु असे वळण घेताना, दोन स्वरांच्या मध्ये अनेक ध्वनी अंतर्भूत असतात आणि त्या ध्वनींना "स्पर्श" करून पुढील स्वराकडे कलाकार वळतो. आज बरेचवेळा श्रुती व्यवस्था टीकेचा विषय बनते परंतु जे नैसर्गिक नियम आहेत, ते कलाकारांकडून नेहमीच अनाहूतपणे का होईना पण पाळले जातात. यामुळे परिणाम असा होतो, अशा "आंतर गोचर" ध्वनींमुळे रागाच्या रचनेला विलोभनीय परीणाम प्राप्त होते आणि त्यातूनच मग, भावनेचा अंतर्भाव होऊन, स्वरांना वेगळी ओळख मिळते. रागाचा समय, ही संकल्पना मांडताना आपल्याकडे श्रुती व्यवस्था डोळ्यासमोर ठेऊन, त्यातून जे भावदर्शन दृग्गोचर होते, त्या अनुषंगाने मांडली आहे. अर्थात, इथे परत एकदा भावदर्शन म्हणताना, त्याचा मेंदूच्या चेतना पेशींशी होणारा संकर ध्यानात घेणे आवश्यक ठरते आणि तिथेच मी वर इंग्रजी भाषेतील दोन परिच्छेद लिहिले आहेत, त्याचा(च) संबंध जोडावा लागतो. आधुनिक काळात रागाच्या समयासंबंधी संकल्पना काहीशा ठिसूळ झालेल्या आढळतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे आपले बदललेले समाज जीवन. एक साधे उदाहरण बघा. गेली काही वर्षे संगीताच्या मैफिलीचा कालावधी हा रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित केला आहे आणि पूर्वीप्रमाणे "पहाट मैफिली" या केवळ समयोचित, इतपतच मर्यादित स्तरावर होतात. जर का, रागाच्या समयांचे बंधन पाळायचे ठरवले तर, मध्यरात्रीचे राग कायमचे "बाद" होतील, जसे "दरबारी" "अडाणा" "मालकंस" इत्यादी अतिशय महत्वाचे राग. हाच विचार पुढे आणायचा झाल्यास, केवळ प्रसंगोत्पात सकाळच्या मैफिली झाल्यामुळे, सकाळचे राग ऐकण्याच्या संधी दुर्मिळ होत जाणार. दुपारच्या मैफिली तर फारशा होतच नाहीत म्हणजे "सारंग" सारखे राग ऐकायचे कधी? याबाबत दुसरा मुद्दा अतिशय ठामपणे मांडला जातो. जेंव्हा कलाकार तासंतास रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये आपल्या सादरीकरणाचे रेकॉर्डिंग करत असतात, तिथे तर सगळाच अंधार असतो किंवा बाहेरच्या जगाशी संबंध तुटलेला असतो. असे असून देखील, काळाचे बंधन न पाळता राग सादर केले जातात, करावेच लागतात. अशा वेळेस, रागसंगीताचा आनंद घेण्याच्या प्रक्रियेत कुठे बाधा येते का? संगीत ऐकणे ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि मनाच्या जडणघडणीचा, संगीत आस्वादाच्या प्रक्रियेवर बराच परिणाम घडत असतो. अशा परिस्थिती, जर का परंपरागत मतांचा आधार घेतला तर रागाचा समय, या बाबीवर आपला विश्वास बसतो आणि मग बरेचसे सुलभीकरण होत जाते लं समजा, रागावर सांगायचे कसलेही बंधन नाही, असा विचार करायला लागलो तर मात्र कुठला राग सादर करावा/ऐकावा, याबद्दल सगळ्या कल्पना ठिसूळ होत जातात. याबाबत आणखी एक विचार मांडता येईल. रागांचे प्रतिरूप म्हणून आपण "ललित" संगीताकडे बघितले तर, भारतीय ललित संगीतातील आविष्कार हे बहुतांशी रागावर आधारित किंवा त्याच्याशी संलग्न असतात आणि त्यात फार विशेष काहीही नाही. असे जर आपण मान्य केले तर, ललित संगीताचा आस्वाद घ्यायला आपण वेळेचा चुकूनही विचार करत नाही आणि ती गाणी आपण अष्टौप्रहर ऐकत असतो. अर्थात ललित संगीतात, इतर घटक देखील महत्वाचे असतात, जसा भाषेचा वापर, जो राग संगीताच्या दृष्टीने "कामचलाऊ" असतो. परंतु सर्वसाधारण रसिक, ललित संगीत ऐकताना, गाण्याच्या स्वररचनेवर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि गाणी आपलीशी करतात. असे करताना आपण, समयाचा कसलाच विचार करत नाही. हाच मुद्दा रागसंगीताला लावला तर, हल्लीच्या काळात रागसमयाचा विचार पिछाडीला का पडला याचे उत्तर मिळू शकेल. एक बाब निश्चितपणे मांडायला हवी, ललित संगीतात रागाच्या नियमांची मोडतोड बरेचवेळा केलेली आढळते आणि त्याबाबत ललित संगीताचे निकष वेगळे असतात परंतु केवळ सूरांचाच विचार केला तर वरील म्हणण्यात थोडेफार तथ्य आढळून येईल. रागांच्या समयाबाबत असा वेगळा विचार करण्याची गरज अधिक तीव्रतेने भासायला लागली कारण, सध्याच्या आयुष्यात घडत असणारे प्रचंड बदल. आधुनिक आयुष्य इतके धकाधकीचे बनत चालले आहे की तिथे पूर्वीचे सगळेच बऱ्याच अंशी ढासळत आहे. रागाचे स्वरूप देखील बदलत आहे, काही अंशी आक्रसत आहे, चटपटीतपणा फार आला आहे. पूर्वी, एखाद्या रागात "वर्ज्य" असलेला स्वर घेणे म्हणजे प्रचंड अपराध मनाला जात असे. थोडक्यात रागसंगीताचे शुद्धत्व अबाधित ठेवण्यासाठी, काटेकोरपणा ठेवण्याचा कल असे. आता, बरेचवेळा, "वर्ज्य" सहजपणे अंतर्भूत करून त्या रागाचे "वेगळे" स्वरूप दाखवण्याचा प्रयोग केला जातो. इथे एक बाब ठामपणे मांडायलाच हवी, असे स्वर सामावण्याचा प्रयत्न असला तरी रागाची "मूळ" आकृती जराही बदलली जात नाही!! इथे समजा असा जर सूर निघत असेल की, रागांच्या समयाचे बंधन आता विरून गेले आहे आणि कालौघात त्याची काहीही जरुरी नाही तर ते निश्चित चूक ठरेल. स्वरांना मानवी भावनांची जोड देताना, पूर्वीच्या पंडितांनी बराच विचार तर नक्कीच केला होता. समयाप्रमाणे वर्गीकरण, हा काही अपघात नव्हता, त्यामागे निश्चित विचारसरणी आहे परंतु त्या वर्गीकरणाला कुठंही शास्त्रीय आधार मिळत नाही, ही बाब देखील विचारात घ्यायला हवी. स्वरांच्या आंदोलनांनी मेंदूवर होणाऱ्या आघातांनी भावनांचा उगम होतो, हे तर रोकडे शास्त्रीय सत्य आहे परंतु संगीताची भाषा ही केवळ शास्त्रावर आणि तर्कावर चालत नसते. मानवी मन आणि त्याचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असतो आणि मानवी मनाचा थांग अजूनपर्यंत तरी कुणाच्याच आवाक्यात आलेला नाही. त्यामुळे संगीताच्या परिभाषेत भावनांना तितकेच महत्व प्राप्त होते आणि इथेच पारंपरिक वर्गीकरणाला महत्व मिळते. मला वाटते, या प्रश्नाचे उत्तर असे एकाच बाजूने विचार करून मिळण्यासारखे नाही. किंबहुना या प्रश्नाचे उत्तर अजिबात सोपे नाही. दोन्ही बाजूंच्या विचाराला तर्काचा आधार तर नक्कीच आहे आणि भावनेची जोड देखील मिळालेली दिसते.

Saturday 17 September 2016

१९९४ ची निवडणूक आणि पुढे!!

साऊथ आफ्रिकेत १९९४ साली, राजकीय मन्वंतर घडवणारी निवडणूक झाली. देशाच्या इतिहासात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रिया कार्यान्वित झाली. अर्थात, या प्रक्रियेची सुरवात १९८८ साली, नेल्सन मंडेला तुरुंगाबाहेर आले आणि सुरु झाली होती. जगभर लोकमताचा रेटा प्रचंड होता आणि त्याचा परिणाम, तिथल्या वर्णद्वेषी सरकारला नमते घ्यायला लागणे. तोपर्यंत या देशाने खूप भोगले, नागरिक म्हणून प्राथमिक हक्कांनाही तिथल्या गौरवर्णीय समाज वगळता, बाकीच्या सगळ्या समाजाला वंचित व्हायला लागले होते. घरे वेगळ्या वस्तीत, दुकाने, हॉटेल्स, अगदी बीचेस देखील वर्णद्वेषी धोरणांचा कित्ता गिरवीत होते. शाळा, कॉलेजेस मधील प्रवेश देखील याच तत्वावर चालत होता. भौतिक सुखाच्या सगळ्या संधी जितक्या गौरवर्णीय समाजाला प्राप्त होत्या, त्याच्या शतांशाने देखील इतर समाजाला मिळत नव्हत्या आणि त्याविरुद्ध नेल्सन मंडेलानी आवाज उठवला, नेतृत्व स्वीकारले, थोडाथोडका नव्हे २७ वर्षे तुरुंगवास भोगला. अर्थात त्यावेळी त्यांच्या सोबतीला केवळ कृष्णवर्णीय नेते नसून भारतीय वंशाच्या लोकांनी देखील सक्रिय भाग घेतला होता आणि आपल्या कुटुंबाची होरपळ स्वीकारली होती. 
या सगळ्या पार्श्वभूमीवर १९९४ साली होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. आता विचार केला तर, ती निवडणूक ANC पक्ष जिंकणारच होता तेंव्हा जरी जगाचे लक्ष असले काय किंवा नसले काय, निकालावर काहीही परिणाम घडणारच नव्हता. यासाठी आपण जरा तिथल्या समाजाची घडी बघणे आवश्यक ठरेल. एकूण लोकसंख्येपैकी ६०% ते ६५% लोकसंख्या ही कृष्णवर्णियांची आहे, २०% समाज गौर वर्णियांचा आहे तर भारतीय वंशाचे लोक १५% ते २०% आहेत. वर्णद्वेषी आणि जुलमी राज्यव्यवस्थेचा परिपाक म्हणून गौर वर्णीय समाज अल्पसंख्येत राहणार, हे सांगायला कुणा राजकीय पंडितांची गरज नव्हती आणि निवडणुकीत तसेच घडले. ANC पक्ष प्रचंड बहुमताने निवडून सत्तेवर आला. निवडणूक झाली आणि कृष्णवर्णियांनी सत्ता काबीज केली. साऱ्या जगाने नेल्सन मंडेलांचे अभिनंदन केले. खरेतर ही प्रक्रिया १९९२ पासून सुरु झाली होती. याचा पहिला परिणाम, साऊथ आफ्रिकेला बाहेरील जगाने सामावून घेणे. १९९२ साली, साऊथ आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणे, ही घटना तिथली वर्णद्वेषी व्यवस्था मोडकळीस आल्याचे द्योतक होती. 
मंडेलांनी सत्ता हस्तगत केल्यावर, सर्वात प्रथम एक फार अतिशय महत्वाची गोष्ट केली. सरकार बनवताना, त्यातील काही महत्वाच्या पदांवर पूर्वीच्या गौर वर्णीय सरकारातील काही सदस्यांना प्रतिनिधित्व दिले. त्यामागे उद्देश हाच होता, या लोकांना प्रशासकीय कामांचा प्रचंड अनुभव होता आणि त्या अनुभवाचा, या नव्या राजवटीस फायदा व्हावा. आधीचे सरकार F.W.D.Klerk याचे होते आणि नव्या राजवटीत, त्यांना उपाध्यक्ष पद देऊन, त्यांचा देखील यथोचित सन्मान राखला. आर्थिक घडी नव्याने बसविणे, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता आणि त्यानुरूप अनेक आर्थिक महामंडळांवर गौर वर्णीय सदस्यांना सामावून घेतले, जेणेकरून नवीन सरकार हे सर्वसमावेशक तर असेलच परंतु कारभार देखील अधिक सुरळीत व्हावा. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे, अत्यंत खडतर संघर्ष करून सत्ता मिळाली तेंव्हा बरेचवेळा पूर्वीच्या जुलमी राजवटीतील नेत्यांच्या विरुद्ध भूमिका घेऊन, त्यांचे निर्दालन करायचे!! आजूबाजूच्या अनेक आफ्रिकन देशांचा इतिहास बघता, अशी घटना घडणे, सर्वमान्य होते आणि इथेच नेल्सन मंडेला यांनी निर्णायक भूमिका बजावली आणि सगळ्या देशात शांतीचे वातावरण पसरवले. त्यावेळी, देशातच नव्हे तर जगात नेल्सन मंडेला यांचा दबदबा पसरला होता. (याचाच अनुचित परिणाम म्हणजे मंडेला यांना "संत" घोषित करणे!!) याचा फायदा उठवताना, मंडेला यांनी देशात कुठेही यादवी माजू दिली नाही आणि हे यश खरोखरच अत्यंत स्पृहणीय असे मानायलाच हवे. वास्तविक जर का मंडेलांनी थोडी तरी "सवलत" दिली असती तर गौर वर्णीय समाजावर, आधीच्या अत्याचाराचा बदला म्हणून अनन्वित अत्याचार घडू शकले असते परंतु अत्यंत हुशारीने, मंडेला यांनी ठाम पावले उचलली आणि धुमसू शकणारा विद्वेष तिथेच थंड केला. हे यश खरोखरच स्पृहणीय आहे. 
निवडणुका झाल्या आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आणि ते साहजिकच होते. आता, आपल्याच देशात आपण कुठेही वावरू शकत होतो, काहीही करू शकतो, ही भावना सुखद होती. अर्थात, एक बाब मात्र हवेत नक्कीच होती. अजूनही वर्णद्वेषी राजवटीचे पडसाद कुठे ना कुठे तरी उमटत असायचे. एक सुंदर स्वानुभवाचे उदाहरण आठवले. १९९५ साली मी "पीटरमेरिट्झबर्ग" या शहरात नोकरी करीत होतो (याच शहरातील स्टेशनवर गांधीजींना गाडीबाहेर ढकलले होते!!) आणि एके संध्याकाळली, मी आणि माझे दोन सहकारी एकेकाळच्या गौरवर्णीय हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. प्रवेश मिळायला काहीच अडचण आली नाही परंतु जवळपास अर्धा तास झाला तरी आमच्या टेबलावर, आमची "ऑर्डर" घ्यायला कुणी आले नाही!! शेवटी अखेरीस एक गौरकन्या आली आणि अत्यंत तुसड्या चेहऱ्याने आमची ऑर्डर घेतली. वास्तविक आम्ही काही मुंबईतील इराण्याच्या हॉटेल संस्कृतीप्रमाणे चहा पाव खायला गेलो नव्हतो. आम्हा तिघांची तशी मोठी ऑर्डर होती पण ऑर्डर दिल्यावर देखील अर्धा तासाने आमचे ड्रिंक्स आले!! त्यानंतरची "रिपीट" ऑर्डर घ्यायला देखील आणखी अर्धा तास लावला गेला. खरेतर एव्हाना आम्हालाच राग यायला लागला होता. बरे असे नव्हते, हॉटेल तुडुंब भरलेले होते आणि त्यामुळे वेट्रेसेस मुलींची तारांबळ उडत  होती. हॉटेलमध्ये आम्ही तिघे वगळता, बाकीचे सगळे गौरवर्णीय ग्राहक होते आणि तिथे अगदी घरगुती पद्धतीने आगत-स्वागत होत होते. आज या घटनेला जवळपास २० वर्षे झाली पण तरीही ही तुसडी वागणूक आजही माझ्या ध्यानात आहे. तसा थोडा मोकळ्या मानाने विचार केला तर, या देशात गौर समाजाने जवळपास दीड शतक राज्य केले, पिढ्यान पिढ्या, फक्त जुलूम केला असल्याने, त्यांची मानसिक घडण देखील तशीच घडत गेली. आता परिस्थिती जरी बदलली तरी, मानसिक बदल तितक्या सहजतेने होत नसतो आणि त्याचेच अनुभव ठिकठिकाणी दिसायचे. एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या वस्त्यांत घर घेणे, ही पुढे कितीतरी वर्षे एक चर्चित "घटना" होत होती. 
हळूहळू कृष्णवर्णीय राजकारणात सक्रिय व्हायला लागले. एक बाब ठामपणे सिद्ध झाली होती, यापुढे साऊथ आफ्रिकेत वर्णद्वेष राहणार नाही आणि लोकशाही तग धरून राहणार. जसे बहुजन समाजाचे राज्य आले तशी अनेक धोरणे तद्नुषंगाने बदलत गेली. इतकी वर्षे शिक्षणाच्या नावाने वानवा होती, ते शिक्षण आता मिळण्यास कसलाच प्रतिबंध नव्हता. नोकऱ्या देखील सगळ्या पदावर मिळू शकत होत्या. त्या दृष्टीने अनेक कायदे बदलण्यात आले आणि जेणेकरून मागासलेला समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा, याची कायद्यान्वये तजवीज करण्यात आली. नवीन राजवटीच्या सुखस्वप्नात सगळे रंगून गेले होते. साऊथ आफ्रिकेची आर्थिक घडी ही मुलत: तिथल्या सोन्यांच्या खाणी आणि पर्यटन व्यवसाय, यांच्या वर आधारलेली होती आणि आजही यात फारसा फरक नाही. जगातील यच्चयावत बडे उद्योगधंदे आपले बस्तान बांधून इथे स्थिरस्थावर होते. बँकिंग व्यवसाय चांगल्याप्रकारे पसरत होता तसेच इंश्युरन्स व्यवसाय देखील. सगळ्या उद्योगात सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळायला लागले. अर्थात यात एक फरक ठळक होता, उच्चपदस्थ नोकऱ्या मात्र गौरवर्णियांनी आपल्याकडे ठेवल्या होत्या आणि ते देखील काहीसे संय्युक्तिक कारण होते. बहुजन समाजात असलेली शिक्षणाबाबतची उदासीनता!! दुर्दैवाने आजही या परिस्थितीत फारसा बदल घडलेला नाही!! 
अर्थात कृष्णवर्णीय राजकारणात सक्रिय व्हायला लागले आणि त्यांच्या महत्वाकांक्षा वाढायला लागल्या पण ही वाढ तशी साहजिक अशीच म्हणायला हवी. मानवी स्वभावच असा आहे, त्याला काय करणार. याचा परिणाम असा झाला, निवडणूक होऊन फक्त २,३ वर्षे झाली आणि लोकमत बदलाची चिन्हे मला बघायला मिळाली. १९९५ साली, मी पीटरमेरिट्झबर्ग शहरात राहात असताना, एका भारतीय वंशाच्या कुटुंबातील लग्नाला हजार राहण्याचा योग्य आला. लग्न आपल्याप्रमाणेच विधिवत झाले. दुसऱ्या दिवशी घरातल्या लोकांसाठी पार्टी होती आणि त्या पार्टीला देखील मला आमंत्रण मिळाले. तिथे मग ड्रिंक्स घेताना, काही वयस्कर मंडळींनी सध्याचे राजकारण, हा विषय काढला. अनेक मतांतरे झाली पण एका बाबतीत एकमत झाले. कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे आणि ही देणगी "नवीन" साऊथ आफ्रिकेची!! हे ऐकल्यावर मी देखील थोडा चमकलो. स्वातंत्र्य मिळून नुकतीच २ वर्षे होत असताना, भारतीय वंशाच्या लोकांना "जुनी" राजवट प्रिय वाटावी!! खरेतर कायदा व्यवस्था बिघडली इतकी काही परिस्थिती नव्हती पण हळूहळू भ्रष्टाचार कारभारात शिरत चालला होता आणि तो प्रामुख्याने कृष्णवर्णीय लोकांच्या सहभागाने शिरत असल्याचे जाणवत होते. वास्तविक, मी मनात तुलना करीत होतो ती, भारतातील भ्रष्टाचार आणि इथला भ्रष्टाचार याची आणि मला तर सगळेच सुव्यवस्थित वाटत होते!! अर्थात तोपर्यंत मला इथल्या समाजातील अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली नव्हती. 
नेल्सन मंडेलांनी अनेक चांगल्या धोरणांच्या घोषणा केल्या आणि नवीन योजना आखताना, त्यांनी समाजाचा समग्र विचार केला होता. अर्थात, कृष्णवर्णीय लोकांसाठी उजवे माप मिळणे क्रमप्राप्तच होते. पुढे काही वर्षांनी काही बाबी ठळक झाल्या. १९९४ च्या निवडणुकांनी देशात स्वातंत्र्याचे वारे सुरु झाले आणि समाज मोकळा व्हायला लागला. परंतु यात एक मेख अशी दडली होती, हळूहळू कृष्णवर्णीय समाजाला अधिक उजवे माप मिळायला लागले आणि यात भारतीय वंशाच्या लोकांची पीछेहाट व्हायला लागली. वरील परिच्छेदात मी इथल्या काही वयस्कर लोकांचे मत सांगितले, याचा रोकडा अनुभव मला नंतर यायला लागला. वर्णद्वेषी काळात, गौरवर्णीय समाज सगळेच ओरबाडून घेत होता आणि इतर समाजाला उष्टे खरकटं ठेवत होते. आता, कृष्णवर्णीयांना संधी प्राप्त झाली आणि गौरवर्णीयांना मागे सरकावे लागले. यात भारतीय वंशाच्या लोकांना काय फायदा मिळाला? स्वातंत्र्य मिळाले पण तरीही इतर समाजाला जे फायदे मिळायला लागले, त्यात वाटेकरी होता येत नव्हते, किंबहुना स्वातंत्र्य वगळता बाकी सोयी, सवलती बाबत वंचिता भोगायला लागत होती. 
धोरणात्मक बाबत लिहायचे झाल्यास, कृष्णवर्णियांना शैक्षणिक सवलती, प्रत्यक्ष फीमध्ये सवलत (साऊथ आफ्रिकेत शिक्षण प्रचंड महाग आहे), घरांसाठी स्वस्त कर्जे - प्रसंगी कर्जमाफी देखील, इत्यादी सवलती कायदे पास करून अधोरेखित केल्या. याचा दूरगामी फायदा नक्कीच झाला. जिथे शाळेची पायरीदेखील चढायची मारामार असायची तिथे "मॅट्रिक" परीक्षेपर्यंत मजल गेली, काही तर पुढे युनिव्हर्सिटीत जाऊन, प्रत्यक्ष डिग्री घेऊन आले. एक मुद्दा, इथे डिग्रीला भरपूर मान आहे. आपल्याकडे ज्या हिशेबात सरसकट "बी.कॉम.","बी. एस्सी" जसे होतात, तसा प्रकार अजूनपर्यंत तरी नाही. त्याचा परिणाम, युनिव्हर्सिटी डिग्री ज्यांनी मिळवली, त्यांना मानाच्या नोकऱ्या मिळाल्या. हा फरक तर लक्षणीय होता. एकेकाळी गौरवर्णीय लोकांनी आपल्या "स्वतंत्र" वस्त्या वसवल्या होत्या (अर्थात आलिशान, दिमाखदार वस्त्या होत्या - पुढे मी देखील अशा वस्तीत घर घेऊन राहिलो होतो) त्या ठिकाणी आता, भारतीय वंशाचे तसेच कृष्णवर्णीय लोक सहजतेने घर घेऊन, प्रसंगी बांधून राहायला लागले, भौतिक सुखाच्या दृष्टीने तर हा फरक फार मोठा होता. 
मंडेलांनी नवीन सासमाजिक कायदे बनवून घेतले आणि वर्णवर्चस्वाचा कायदा कायमचा रद्दबातल करून टाकला. हा मुद्दा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. काही राज्ये, शहरे यांची नावे बदलली ( अर्थात, अजूनही जुन्या नावानेच उल्लेख होतो, हा भाग वेगळा) उदाहरण द्यायचे झाल्यास, "प्रिटोरिया" शहराचे नाव "Tshwane" असे केले पण आजही हे शहर, प्रिटोरिया या नावानेच ओळखले जाते. आर्थिक कायदे मात्र फारसे बदलले नाहीत. १४% VAT हा गोऱ्या लोकांनी ठरवलेला होता आणि आजही त्यानुसारच कर आकारणी होत असते. आपल्याकडे GST या धर्तीवर आणायचा प्रयत्न चालेल आहे. तसेच Income Tax, Wealth Tax अशा काही मूलभूत कायद्यात कर आकारणीचे प्रमाण अजूनही फारसे बदललेले नाही. परिणाम उत्पन्नाचा फार मोठा भाग कर रूपाने कापला जातो, परंतु आजही, हा पैसा Social Welfare च्या नावानेच खर्च केला जातो. बहुतेक प्रगत देशांत Social Welfare हा फार मोठा खर्चाचा भाग असतो आणि तो नेहमीच Personal Tax, Corporate Tax मधूनच वसूल केला जात असतो. 
गोऱ्या लोकांनी या देशातील Infrastructure मात्र, माझ्यासारख्याला असूया वाटावी इतक्या अप्रतिम पद्धतीने उभारलेले होते आणि त्यात अणुमात्र बदल, मंडेला सरकारने केला नव्हता आणि त्याची तशी गरजच नव्हती. मुळात या देशाची हवा वर्षभर, (२,३ महिने वगळल्यास) थंड असते (म्हणूनच युरोपमधील गोरे इथे कायमचे राहायला आले)  त्यातून इथले रस्ते हा भारतीयांच्या दृष्टीने कायमचा संशोधनाचा विषय ठरावा!! याचा परिणाम असा झाला, वातावरणात धुळीचा संसर्ग नाही. अर्थात ही नैसर्गिक देणगी, गोऱ्या लोकांच्या सरकारने अधिक वृद्धिंन्गत केली (१९९४ च्या निवडणुकीत गोऱ्या लोकांचा हाच ठळक मुद्दा होता).  थोडक्यात सांगायचे झाल्यास, सुरवातीचा काळ खरोखरच स्वप्नवत असाच होता आणि याचे संपूर्ण श्रेय, हे नेल्सन मंडेला यांनाच जाते. 
१९९९ साली मंडेला सत्तेवरून पायउतार झाले. वास्तविक त्यांनीच अमेरिकन कायद्याच्या धर्तीवर, अध्यक्ष पदाची मुदत जास्तीत जास्त २ टर्म्स, म्हणजे १० वर्षे, असा कायदा करून घेतला होता (खरे सांगायचे झाल्यास, वर्णद्वेषी काळात देखील हीच पद्धत होती) आणि १९९९ साली, त्यांची केवळ ५ वर्षे झाली होती आणि देशात त्यांच्या शब्दाला प्रचंड मान होता. त्यांनी मनात आणले असते तर दुसरी टर्म सहज उपभोगली असती. परंतु त्यांनी आपला साथीदार Thabo Mbeki याला खुर्ची खाली करून दिली आणि जगासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण करून ठेवला. 
आज जेंव्हा सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे, तेंव्हा एक बाब ठळकपणे जाणवते, १९९४ च्या निवडणुकीनंतर कृष्णवर्णियांच्या "मूलभूत" वृत्तीनुसार गोऱ्या लोकांवर अत्याचार होणे क्रमप्राप्तच होते परंतु मंडेलांनी परिस्थिती नेमकी जाणून घेऊन, परिस्थितीला अत्यंत संयमितपणे हाताळले  आणि गोऱ्या लोकांच्या मनात देखील विश्वास निर्माण केला. याचा दुसरा परिणाम असा झाला, देशात इन्व्हेस्टमेंट भरपूर व्हायला लागली. इतकी वर्षे "पालन पोषण" हे ठराविक वर्गाचे होत असल्याने, फारशी आर्थिक चणचण जाणवत नव्हती पण आता परिस्थिती बदलली आणि संपूर्ण समाज आता प्रत्येक धोरणात बसविणे अगत्याचे होऊन बसले आणि तिथेच Capital Investment अत्यावश्यक होऊन बसली. मंडेलांनी प्रसंगी वैय्यक्तिक संबंध वापरून, विशेषतः अमेरिकेडून भरपूर सवलतीच्या दरात इन्व्हेस्टमेंट देशात आणली. पुढे अर्थात ब्रिटन, जर्मनी यांनी देखील हातभार लावला. याचा परिणाम, सामाजिक समृद्धता वाढीस लागली. कृष्णवर्णीय हळूहळू राज्यकारभारात पारंगत व्हायला लागले. हे सगळे पहिल्या ५ वर्षांत घडत गेले. मंडेला जोपर्यंत सत्तेवर होते, तोपर्यंत तरी "सुरक्षा" हा शब्द भीतीदायक नव्हता. या निमित्ताने एक सुंदर उदाहरण देतो. १९९४ मध्येच, मी पीटरमेरिट्झबर्ग शहरात असताना, आम्ही ३,४ भारतीय (आम्ही हे सगळे भारतातून नोकरीसाठी इथे आलो होतो) एका शनिवारी, इथल्याच एका प्रसिद्ध नाईट क्लब मध्ये गेलो होतो आणि मध्यरात्र उलटल्यानंतर, आम्ही जवळपास १ किलोमीटर चालत घरी गेलो!! १९९४ साली सुरक्षतेचा प्रश्न इतका भयावह नव्हता तरी त्या रात्री आम्ही चालत घरी गेलो, ही बातमी ऑफिसमध्ये सोमवारी समजली (कुणीतरी ओळखीच्याने आम्हाला बघितले असणार) आणि लगेच आम्हाला असले काही कृत्य करू नये, असा काळजीच्या स्वरात सल्ला मिळाला होता. खरेतर आम्ही सगळेच भारतातून नुकतेच या देशात आलो होतो आणि भारतात, मुंबईत रात्री चालत येणे, हा प्रकार काही धक्कादायक नव्हता. 
Thabo Mbeki सत्तेवर आले आणि खऱ्याअर्थी "नवीन" साऊथ आफ्रिकेची चुणूक दिसायला लागली. नेल्सन मंडेला यांनी तर सार्वजनिक व्यवहारातून देखील अंग काढून घेतले होते. वास्तविक मंडेला यांचे जे कुणी सहकारी, वर्षानुवर्षे तुरुंगात सडत राहिले, त्यात Thabo Mbeki यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल आणि त्यांनी सोसलेल्या हालाबद्दल समाजात नक्कीच अनुकंपा होती. फरक पडला तो राज्यव्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा. मंडेलांनी प्रसंगी, त्यांच्या बायकोला - विनी मंडेलाला आपल्या आयुष्यातून तिलांजली द्यायला जरा देखील मागे पुढे बघितले नाही ( वास्तविक या बाबतीत मंडेला हे काही धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ नव्हते परंतु राज्य महत्वाचे मानताना आणि तिथे बायकोची आडकाठी येत आहे, असे दिसत असताना, त्यांनी तिची जराही गय केली नाही) Mbeki मनाने काहीसे मवाळ निघाले आणि हळूहळू त्यांचा ताबा ढिला व्हायला लागला. ही सामाजिक घसरण कमालीच्या वेगाने होत राहिली आणि केवळ २ वर्षांत, जोहान्सबर्ग सारख्या महाकाय महानगरातील सेंट्रल सिटीमधील २ पंचतारांकित हॉटेल्स, केवळ असुरक्षितता, या कारणास्तव बंद झाली. जोहान्सबर्ग शहर तर प्रचंड असुरक्षित झाले, इतके की संध्याकाळी सेंट्रल सिटी मध्ये पायी फिरणे केवळ अशक्य, अशी परिस्थिती झाली आणि याचा परिणाम, सर्वात आधी तिथल्या या अत्यंत महागड्या पण अतिशय प्रतिष्ठित अशा हॉटेल्सच्या धंद्यावर झाला!! एकतर, साऊथ आफ्रिकेत, जोहान्सबर्ग शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी जशी आपल्याकडे मुंबई आहे. त्यामुळे बहुतांशी सगळे बडे उद्योगधंदे याच शहरात. याचा परिणाम असा झाला, जोहान्सबर्ग शहरात भरपूर पैसा मिळवण्याच्या संधी प्राप्त होत गेल्या, यात आजही फरक नाही. त्यामुळे या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण, प्रमाणाच्या बाहेर वाढत गेले. मी २००६ साली प्रिटोरिया शहरात नोकरीसाठी आलो आणि मला हा फरक प्रचंड प्रमाणात जाणवला - जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, ही दोन "जुळी" शहरे आहेत. अर्थात जोहान्सबर्ग आकारमानाने अवाढव्य आहे - त्यात कमीतकमी ३ मुंबई शहरे बसतील म्हणजे आवाका ध्यानात यावा. वास्तविक २००० च्या सुमारासच Mbeki यांनी, Black Empowerment नावाचा कायदा आणला, आपल्याकडील दलित आरक्षणाची आठवण यावी, याच धर्तीवर आणि त्या योगे कृष्णवर्णियांना नोकरीच्या अधिक संधी प्राप्त व्हाव्यात, असाच हेतू होता. 
या कायद्यान्वये कृष्णवर्णियांना नोकरीच्या संधी प्राप्त होत होत्या पण गुन्हेगारी कमी होण्याचे चिन्ह कुठेच दिसत नव्हते. Rape, Mugging. Robbery हे गुन्हे नित्याचे व्हायला लागले. एकेकाळी न्यूयॉर्क शहरातील गुन्हेगारीच्या कथा वाचायला/चित्रपटात बघायला मिळत होत्या, त्याचेच प्रत्यंतर, विशेषतः: या दोन शहरांतून दिसायला लागले. जोहान्सबर्ग शहरात Sandton नावाचे उपनगर आहे, भौतिक सुखाची परमावधी म्हणजे हे उपनगर!! या उपनगराच्याच बाजूला, (दोनही उपनगराच्या सीमा एकमेकांना चिकटून आहेत) Alexandra नावाचे उपनगर आहे. जगातील यच्चयावत गुन्हेगारीचे नंदनवन!! बहुतांशी भाग हा कृष्णवर्णियांनी व्यापलेला आहे आणि त्याच जोडीला इथे "कलर्ड" नावाची तितकीच विधिनिषेधशून्य अशी जमात आहे. एक उदाहरण देतो, २००५ साली, पोलिसांनी या भागावर धाड टाकायचे ठरवले पण त्यांनी सोबत मिलिटरी सहाय्य्य मागितले आणि ते देखील वरून Air Shelter घेऊन!! अर्थात इतके होऊन देखील, इथली गुन्हेगारी शतांशाने देखील कमी झाली नाही!! शेवटी, हा भाग गुन्हेगारी भाग म्हणून सरकारनेच घोषित करून टाकले आणि हात टेकल्याची भावना व्यक्त केली!! 
या देशात मी उणीपुरी १७ वर्षे काढली आणि त्याचा परिणाम असा झाला, इथल्या बहुतेक सगळ्या समाजाचे अंतरंग मला फार जवळून अनुभवता आले. रक्ताचाच गुण आहे की काय हे कळत नाही पण, कृष्णवर्णीय लोकांना अंगमेहनतीची कामे आवडतात पण बौद्धिक कामे म्हटले की पाय मागे!! हे मी अगदी खालच्या स्तरावरील लोकांचा अनुभव घेऊन सांगत आहे. आज, अनेक कृष्णवर्णीय, फार वरच्या पदावर सक्षमपणे कामे करीत आहेत आणि त्यांच्या बुद्धीबद्दल संशय घेण्याचे काहीच कारण नाही.. १९९२/९३ मध्ये मी लागोस-नायजेरिया मध्ये दोन वर्षे नोकरी केली. हा देश तर संपूर्णपणे कृष्णवर्णियांचा परंतु ऑफिसकामासाठी सक्षम माणूस मिळणे दुरापास्त!! भर ऑफिसवेळेत देखील, डेस्कवर डोके ठेऊन झोपण्याची अलौकिक कला सध्या झालेली असते!! बरे काही बोलायची कसलीच सोय नाही कारण हा त्यांचा देश!! दिलेले काम नाकारणे किंवा अति संथपणे करणे, यात आपण काही चूक करत आहोत, याची साधी जाणीव देखील आढळत नाही आणि साधारणपणे २००० नंतर या वृत्ती भरमसाट प्रमाणात वाढायला लागल्या. एका बाजूने आपल्या मिळालेल्या हक्कांची नको तितकी कडवी जाण ठेवायची परंतु त्याबदल्यात, आपण ज्या ऑफिसचा पगार घेत आहोत, त्या बद्दल तुसडेपणा दाखवायचा!! आता तर याबाबतीत भारतीय वंशाचे लोक देखील, आपण याच स्पर्धेत आहोत, याची जाणीव करून देतात!!  
कायद्याने आरक्षण दिले पण उद्दामपणा जराही कमी झाला नाही. मला पुस्तकी शिक्षणाची जरादेखील जरुरी नाही, हाच यांचा खाक्या असतो. अशा परिस्थितीत गुन्हेगारी वाढणे क्रमप्राप्तच होते. भारतीय वंशाचे लोक मात्र आता युनिव्हर्सिटी शिक्षणाला प्राधान्य द्यायला लागले आहेत. त्यांना देखील शैक्षणिक खर्चात बऱ्याच सवलती प्राप्त होत आहेत. कामाच्या बाबतीत, कृष्णवर्णियांपेक्षा भारतीय वंशाचे लोक बरे, अशी परिस्थिती आहे. आडमुठेपणा करतात पण जरा शांतपणे समजावून सांगितले तर समजून घेतात. आता याबाबत एक मुद्दा ठामपणे मला ऐकायला मिळाला. इतकी वर्षे इथल्या लोकांनी फार सहन केले तेंव्हा याचा परिपाक आता दिसत आहे. एकवेळ हा मुद्दा एका मर्यादेपर्यंत ग्राह्य धरला तरी ज्याप्रमाणात इथे घसरण होत आहे ( मी १९९४ साली इथे आलो तेंव्हा US $ 1 = SA Rand 3.3 हा चलनाचा दर होता, जो आज SA Rand 14/15 हा झालेला आहे!!) भ्रष्टाचार तर दिवसेंगणिक फैलावत चाललेला आहे. इतकी वर्षे भ्रष्टाचार वरच्या पातळीवर चालत होता, पण आता भारताप्रमाणे चिरीमिरीसाठी देखील पैसे खाण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे आणि याची झळ सामान्य माणसांना निश्चित बसते.मला १९९९ साली या देशाचे नागरिकत्व प्राप्त झाले आणि त्यासाठी मला तिथल्या Home Affairs (हेच डिपार्टमेन्ट, व्हिसा, नागरिकत्व इत्यादी बाबी सांभाळते) एका कृष्णवर्णीय ऑफिसरने मदत केली होती. त्यानिमित्ताने, एके दुपारी मी त्याला भेटलो आणि त्याला एक स्कॉच बाटली दिली. प्रथम त्याने ही भेट स्वीकारायला नकार दिला पण मीच त्याच्या गळ्यात मारली. आज तोच अधिकारी इतका भ्रष्टाचारी झाला आहे, की २००९ मध्ये एकाचे साधे वर्क परमीट रिन्यू करायचे तर त्याने चक्क US $ ५०० मागितले आणि माझ्या त्या मित्राला द्यायला लागले!! अर्थात त्या मित्राला, त्याच्या कंपनीकडून पूर्ण भरपाई मिळाली पण तो भाग वेगळा!! 
आता त्यांच्या हातात संपूर्ण सत्ता आहे आणि ती सत्ता कशी वापराची, याचे नेमके भान आलेले आहे. 
Black empowerment policy ने तर आता भयानक वळण घेतलेले आहे. एकतर ही पॉलिसी केवळ सरकारी नोकऱ्यांपुरती मर्यादित नसून खासगी उद्योगधंद्याला देखील लागू आहे. यात एक नियम असा आहे, जर का कंपनीचा टर्नओव्हर Rand ५० मिलियनच्या वर असेल (खासगी उदयॊगाबाबत हा नियम आहे) तरच तिथे Black Empowerment कायदा लागू होतो. याचा परिणाम असा झाला, ज्या कंपन्यांचा धंदा मध्यम प्रतीचा आहे, त्या सगळ्या कंपन्या हातचलाखी करू लागल्या आहेत तसेच शक्यतो नोकऱ्या कनिष्ठ दर्जाच्या असतील, त्याच कृष्णवर्णीयांसाठी राखून ठेवायला लागल्या!! अर्थात बड्या उद्योगधंद्यात देखील थोड्याफार प्रमाणात असलाच प्रकार चालतो. त्यामुळे प्रश्न असा उभा राहिला आहे, केवळ कायदा पास करून ही विषमता घालवता येईल का? इथे भांडवलशाही योग्य की समाजवादी पद्धत योग्य, हा प्रश्नच उद्भवत नाही. आरक्षणामागील उद्देश चुकीचा नव्हता पण त्याची राबवणूक फार चुकीच्या प्रकारे होत गेली आणि विषमतेमधील दरी अधिकाधिक रुंदावत गेली आणि पर्यायाने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत गेले!! याचे मुख्य कारण म्हणजे, भाकरी का करपली किंवा घोडा का बसला? या उक्तीत सापडते!! जेंव्हा कायदा केला त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फरक पडत गेला आणि बदलत्या परिस्थितीनुरूप कायद्याचे स्वरूप बदलले नाही आणि तो कायदा वठल्याचे स्वरूप धारण करून राहिला. 
दुसरे असे झाले, या देशात स्वातंत्र्य आले पण त्याबरोबर "माणूस" सुधारण्याचे जरादेखील प्रयत्न झाले नाहीत. त्यावेळी जी सामाजिक घडी होती, जे सांस्कृतिक वातावरण होते, त्यात कसलाच बदल केला गेला नाही. नेल्सन मंडेलांच्या कार्याचे मूल्यमापन करताना, हा मुद्दा विशेष करून ध्यानात ठेवायला हवा. त्यावेळचा कृष्णवर्णीय समाज जसा होता, तसाच स्वीकारला गेला आणि त्यांना सहजगत्या सुविधा मिळत गेल्या!! त्याची किंमत, त्या समाजाला फारशी कळलीच नाही. सुविधा सहजगत्या मिळत आहेत म्हटल्यावर कशाला मेहनत घ्यायची? हा विचार अधिक प्रबळ झाला!! हे दुर्दैव आहे पण जळजळीत वास्तव आहे. आरक्षण देण्याची ही किंमत, आता हा देश भयानक पद्धतीने चुकवीत आहे. याचा परिणाम इतर समाजावर व्हायला लागला आहे. 
१९९४ साली प्रचंड बहुमत प्राप्त करणारा, ANC पक्ष, आज झपाट्याने आपली लोकप्रियता गमावत आहे. त्यामुळे दुसरा भयानक प्रश्न उद्भवत आहे, जर का याच गतीने या पक्षाची घसरण सुरु राहिली तर त्या पक्षाची जागा घेणारा जो कुठला पक्ष यईल, (हे थोडे अवास्तव आहे, निदान आज तरी) त्याच्या हातात कुठल्या स्थितीतील देश येणार आहे? आरक्षण देऊन आता जवळपास, २० वर्षे होऊन गेली आणि जर का आढावा घेतला तर परिणाम भयावह आहे. साधे उदाहरण, Price Waterhouse, Earnst & Young सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांना प्रशिक्षित Chartered Accountant ची चणचण भासत आहे, म्हणजे जोहान्सबर्ग, प्रिटोरिया इथे नव्हे पण, Rustenburg, Pietermaritzburg सारख्या मध्यम आकाराच्या शहरात हे नक्की जाणवत आहे. याचा एक अर्थ असा घेता येतो, इथे हळूहळू कुशल कामगारांची चणचण वाढत जाणार पण त्याबरोबर Black Empowerment मुळे त्या वाढीला मर्यादांचे बंधन पडणार. गोऱ्या लोकांनी जी मेहनत घेऊन, इथे अप्रतिम infrastructure चे जाळे निर्माण केले, त्याला हळूहळू ग्रहण लागायला लागले आहे. याचा अर्थ असा नव्हे, देशाच्या ऱ्हासाला सुरवात झाली आहे पण त्या दृष्टीने वाटचाल मात्र सुरु झाली आहे. वाईट याच गोष्टीचे वाटते, आफ्रिका खंडातील सर्वात प्रगत देशाची घसरण सुरु झाली. इच्छा इतकीच, इतर आफ्रिकन देशांप्रमाणे इथे "टोळी युद्ध" आणि "यादवी" माजू नये!!

Wednesday 31 August 2016

इशारो इशारो मे दिल लेनेवाले

"जवळ…. जवळ ये, पण सीमेचे भान असू दे 
रात्र असो, पण पहाटही वेगळी दिसू दे 
स्वरजुळणीतुनि एक गीत - तरी हवेच अंतर सात सुरांतून 
इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन"
मंगेश पाडगांवकरांच्या या ओळी आपल्या आजच्या गाण्याच्या मतितार्थाशी जवळीक साधतात. अर्थात, गाण्यातील कविता आणि या ओळी, इतपतच संदर्भ आहे. चित्रपटातील गाण्याबाबत एक बाब नक्कीच मांडावीशी वाटते,  गाण्याची चाल, पहिल्या मुखड्यातच मनात ठसली पाहिजे म्हणजे मग ते गाणे लक्षात राहण्यास मदत होते. अर्थात, चित्रपटातील संदर्भ, अभिनय, चित्रीकरण इत्यादी घटक मदतीला नेहमीच असतात तरीही गाणे म्हणून ऐकायला गेल्यास, मुखडा श्रवणीय असणे अत्यंत गरजेचे असते. "इशारो इशारो मे" या गाण्याबाबत हा अनुभव लगेच मिळतो. 
सुरवातीचा आलाप (च) आपल्याला गाण्याच्या स्वररचनेची पार्श्वभूमी तयार करून देतो आणि तिथेच गाणे पहाडी रागावर आहे, हे कळून चुकते. 
वास्तविक, कवितेत सुरवातीला "हाये" हा शब्द नाही परंतु आशा भोसले यांनी हा शब्द गाऊन, गाण्याची सुरवातच सुंदरपणे केली आहे. "हाये" या शब्दातून ऐकायला मिळणाऱ्या, आर्जव आणि मुग्ध भावना खरोखरच रमणीय आहेत. चित्रपट गाण्याच्या बाबतीत हा विशेष मांडण्यासारखा आहे. मुळात ३ ते ४ मिनिटांचा सगळा आविष्कार आणि त्यात(च) गायकी बसवायची आणि ती देखील शब्दांचा आशय जरादेखील न बिघडवता!! हे अजिबात सहज जमण्यासारखे नसते. गळा हुकमी तयार हवा पण त्यात सवयीचा रुक्षपणा बाजूला सारून उस्फूर्तता दर्शवायची!! 

"इशारो इशारो में दिल लेनेवाले
बता ये हुनर तुने सिखा कहां से 
निगाहो निगाहो में जादू चलाना 
मेरी जान सिखा है तुमने जहां से 

इथे "इशारो इशारो" या शब्दातून जाणवणारा आशय आणि त्याची अभिव्यक्ती, आशा भोसले ज्याप्रकारे दाखवून देतात, ते खास ऐकण्यासारखेच आहे. मघाशी मी, "मुग्ध" हा शब्द वापरला आणि तीच भावना, हे शब्द गाताना आपण ऐकू शकतो. पुढील ओळीत "हुनर" शब्द देखील याच धर्तीवर ऐकावा लागेल. इथे "हुनर" हाच शब्द योग्य आहे आणि तोच शब्द कविता आणि गाण्याची खुमारी वाढवतो. गाताना किंचित आवाजात कंप घ्यायचा पण इतका नव्हे, जेणेकरून शब्दातील मार्दव नाहीसे होईल. खरतर सगळे गाणेच अतिशय मार्दवतेने गुंफलेले आहे. सुरवातीच्या आलापीत गाण्याची लय स्पष्ट होते आणि तीच लय, शेवटपर्यंत कायम राखली आहे आणि त्यायोगे मार्दव देखील!!  
गाण्यात दीपचंदी ताल वापरला आहे, जो फारसा सुगम संगीतात वापरला जात नाही. एकतर १४ मात्रांचा ताल आहे आणि शक्यतो हा ताल ठुमरी किंवा गझल सारख्या उपशास्त्रीय संगीतासाठी वापरला जातो, जिथे लय अधिक दीर्घ असू शकते. परंतु या गाण्यात त्याचा वापर अतिशय खुबीदारपणे केलेला आहे. संगीतकार म्हणून ओ.पी.नैय्यर यांना निश्चित क्रेडिट द्यायलाच लागेल. 

मेरे दिल को तुम भा गये, मेरी क्या थी इसमें खता 
मुझे जिसने तडपा दिया, यही थी वो जालीम अदा 
ये रांझा की बातें, ये मजनू के किस्से 
अलग तो नहीं हैं मेरी दास्तां से 

प्रत्येक संगीतकाराची स्वतः:ची अशी खास शैली असते आणि त्यानुरूप त्याच्या बहुतेक रचना आपल्याला त्या शैलीचाच पडताळा देत असतात. काही संगीतकार आपल्याच शैलीचे गुलाम झाले आहेत की काय? असा प्रश्न पडण्याइतपत शैलीच्या आहारी गेलेले दिसतात. जितकी तुमची कारकीर्द लांबते, दीर्घ होते त्या हिशेबात तुमची शैली बनत जाते, क्वचित विकसित देखील होते. ओ.पी. नैय्यर यांची गाणी ऐकताना आपल्याला हा अनुभव वारंवार येतो. पहिला अंतरा ऐकताना याची जाणीव प्रकर्षाने होते. ओळ सुरु होण्याआधी किंचित हुंकार घ्यायचा किंवा तासच आलाप घ्यायचा आणि लगेच काही ठराविक शब्दांवर जोर देऊन, आपली शैली प्रस्थापित करायचा आग्रह दिसतो. कधी कधीतरी हरकती देखील समान वाटाव्यात, इतके साम्य ऐकायला मिळते. "मेरे दिल को तुम भा गये" ही ओळ, या दृष्टीने ऐकावी. पुढे, "मुझे जिसने तडपा दिया" ही ओळ गाताना, संगीतकाराच्या शैलीचे प्रच्छन्न दर्शन होते. 
इथे कुठलीही कमतरता दाखवण्याचा उद्देश नसून, स्वररचनेत आपली शैली कशी अनाहूतपणे असेल किंवा उद्मेखूनपणे असेल (या बाबत ठाम विधान करणे अशक्य) पण स्पष्टपणे दिसते, हेच दाखवून द्यायचे आहे. तसे बघितले तर या संगीतकाराने रूढार्थाने संगीत शिक्षण घेतले नव्हते पण याचा परिणाम असा झाला, रागाचा वापर करताना, रागालाच बाजूला सारणे त्यांना कधीही अवघड गेले नाही. या गाण्यात याचा पडताळा आपल्याला घेता येतो. पहाडी राग आहे पण रागाचे मूलभूत चलन आहे आणि पुढे चाल स्वतंत्रपणे विस्तारत जाते. चित्रपट संगीतासाठी रागदारी संगीताचा अभ्यास जरुरीचा आहे, हा निकष फार चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आणि स्वीकृत केला गेला.  असे असले तरी मधुर सुरावटी किंवा चलने याबाबतीत हा संगीतकार नि:संशय सर्जनशील होता. याबाबत आणखी एक विधान करता येईल, कोणताही रचनाकार रचनाप्रक्रियेत कधीही एकांगी असूच शकत नाही. या विचाराच्या पार्श्वभूमीवर पुढील रचना ऐकणे मनोरंजक ठरेल. 

मोहब्बत जो करते हैं वो मोहब्बत जताते नहीं 
धडकने अपने दिल की कभी, किसी को सुनाते नहीं 
मजा क्या रहा जब के खुद कर दिया हो 
मोहब्बत का इजहार अपनी जुबां से 

आशा भोसले यांच्या गायकीबद्दल लिहायचे झाल्यास, कुणालाही हेवा वाटावा इतका चैतन्यपूर्ण, कंपविहीन असूनही भावपूर्ण, न घसरतात द्रुत लयीत फिरणारा, खालच्या आणि वरच्या तारतांवर सहज आविष्कारपूर्णतेने विहार करणारा आणि भरीव असूनही जनानी सौंदर्याने व लालित्याने युक्त असा आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आवाजाचा पल्ला विस्तृत, तारता मर्यादा सहजपणे, वेगाने आणि अगदी गाण्याच्या आरंभी देखील घेणे, याबाबत तिच्याशी बरोबरी करणारा आवाज सापडणे जवळपास अशक्य आहे. 
या गाण्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, "मोहब्बत जो करते हैं" ही ओळ घ्यायच्या अधिक किंचित "हुंकार" आहे आणि हा स्वर, त्या आधी पार्श्वभागी सतारीच्या स्वरांचा शेवट जिथे होतो, त्या स्वराशी जुळवून घेतलेला आहे. आणि हाच "हुंकार" पुढे गायल्या गेलेल्या ओळीला वेगळे परिमाण देतो. मघाशी मी जे लिहिले, गीताच्या आरंभी देखील, स्वरांत आवश्यक तितके "वजन" आणायचे कौशल्य, त्याची प्रचिती इथे घेता येते. 
"मजा क्या रहा जब के खुद कर दिया हो" ही ओळ जेंव्हा ऐकायला मिळते तेंव्हा. मी वरती शैलीचा जो उल्लेख केला आहे, त्याचे नेमके प्रत्यंतर ऐकायला मिळते.    

माना के जान-ए-जहां लाखो में तुम एक हो 
हमारी निगाहो की भी कुछ तो मगर दाद दो 
बहारो को भी नाज जिस फुल पर था 
वही फुल हमने चुना गुलसिता से"  

रफी यांच्या गायनाबाबत देखील आपल्याला अशीच काही विधाने करता येतील. आवाजाचा पल्ला, भरीवपणा, मर्दानी जोमदारपणा, सुरेलपणा आणि लहान स्वरांशाचे सफाईदार गायन, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. "हमारी निगाहो की भी कुछ" ही ओळ गाताना आवाजातील जोमदारपणा आपल्या सहज लक्षात येईल आणि असे गाताना देखील, स्वरात कुठेही "कणखर"पणा येत नसून अत्यंत सुरेल गायन ऐकायला मिळते. ओळीच्या सुरवातीला घेतलेला सुरेलपणा, त्याच ताकदीने शेवटपर्यंत त्याच ताकदीने पेश करण्याचे कौशल्य खरोखरच वाखणणावे असेच आहे. बरेच गायक इथे घसरतात, हे इथे ध्यानात ठेवावे. 
एकंदरीत बघता, चैतन्याने भारलेले तरीही कुठेही विसविशीत न होणारे असे गाणे ऐकल्याचे समाधान आपल्याला इथे मिळते. अर्थात हा अनुभव संगीतकार म्हणून ओ.पी. नैय्यर तसेच गायक म्हणून रफी आणि आशा भोसले यांच्या एकत्रित कारागिरीकडे जात, हे नि:संशय. 
Attachments are

Thursday 25 August 2016

आरतीप्रभू

आरतीप्रभू उर्फ खानोलकर, यांच्या कवितेविषयी लिहायला सुरवात करण्यापूर्वी, मला त्यांच्या एकूणच साहित्यप्रकृतीवर प्रकाश टाकून पुढे, त्यांची ही प्रवृत्ती त्यांच्या साहित्यात कशी ठळकपणे दिसायला लागली, याचा अदमास घेता येईल. खरेतर कलाकाराच्या वैय्यक्तिक आयुष्याचा त्याच्या कलाकृतीशी संबंध असतोच असे नाही पण काहीप्रमाणात तरी वैय्यक्तिक आयुष्य त्यांच्या कलाकृतीत डोकावत राहते, हे मान्यच करायला हवे. माझा प्रयत्न, त्यांच्या वैय्यक्तिक आयुष्याचा ताळेबंद मांडण्याची नसून, सुरवातीपासून त्यांची जी विचारसरणी होती, त्या विचारसरणीचा प्रभाव आणि विस्तार कशाप्रकारे त्यांच्या कवितेत होत गेला, याचा मागोवा घेण्याकडे आहे. 
प्रतिभा आणि त्याच्या आविष्कार हा त्याच्या कलाकृतीतूनच बघावा. प्रतिभेचा प्रवास पडताळून बघणे जिथे प्रत्यक्ष कलाकाराला देखील अशक्य असते तेथे आपल्या सारख्या त्रयस्थाला तर अजिबात जमणारा नाही. कलाकृती प्रत्यक्ष समोर आल्यावर, त्या कलाकृतीच्या सत्यतेची, दर्जाची पारख करणे शक्य असते परंतु टी कलाकृती, कलाकाराच्या मनात कशी "जन्माला" आली, हे मजानुन घेणे जवळपास सर्वथैव अशक्य कोटीतील बाब ठरते. त्यादृष्टीने प्रतिभेचा शोध हा नेहमीच चकवा देणारा असतो आणि इथेच आपण "नियती" शरण व्हायला लागतो. अशावेळेस वाटते, "आत्मस्वातंत्र्य" म्हणजे काय? खरंच आपल्याला "आत्मस्वातंत्र्य" म्हणून काही मिळते का? जर तसे काही मिळत असेल तर मग "नियती" शरण या शब्दाला किती अर्थ आणि महत्व आहे? खानोलकरांच्या साहित्यात आणि पर्यायाने कवितेत मला वाटते हाच भाव सर्वत्र पसरलेला आढळतो. "आत्मस्वातंत्र्य" आणि "नियती",यांचा खानोलकरांच्या कवितेत किती प्रभाव आहे, हेआपण त्यांच्या कवितेतून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु याचाच परिणाम असा दिसतो, इथे सतत शोधाचा प्रयास चालू आहे पण त्या शोधातून आपल्याला काय मिळणार आहे, याबाबत अनभिज्ञता आणि जरी अदमास घेता आला तरी पुढील वाटचाल ही अंधारात ठेचकाळत वाट शोधण्याइतपत मर्यादित आणि ती देखील, धुक्यातून प्रवास केल्यासारखी.
वास्तविक खानोलकरांनी, "कादंबरी","नाटक", "कथा" इत्यादी साहित्य माध्यमांत लिखाण केले तरी या सगळ्यातून, त्यांच्यातील कवी सतत आपल्यापुढे येत असतो. कथेत देखील एखादी प्रतिमा खेळवत ठेऊन, कथेला अनेक अंगानी व्यामिश्र परीणाम घेऊन, वाचकाला खिळवून ठेवायचे, हाच उद्देश स्पष्ट दिसतो. त्यामुळे, आपण खानोलकरांना "कवी" याच अधिक ओळखतो. 
आरतीप्रभूंच्या कवितेतील अनुभव काहीवेळा विस्कळीत वाटतो याचे कारण, कवी बरेचवेळा एखाद्या सूत्राला धरून काहीतर, असे वाटत नाही. सुरवातीला एक सूत्र असते पण पुढे त्यात अनेक वेगवेगळ्या प्रतिमा अवतरतात आणि बरेचवेळा  वाचक काहीसा चक्रावून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुष्कळदा जागृत मनाच्या राजरस्त्याने पुढे न सरकत संज्ञाप्रवाहाच्या भूमिगत प्रवाहाबरोबर ते पुढे सरकतात आणि मध्येच कवितेतील मूळ संकल्पना नजरेस आणून, वाचकांना बिचकवतात. पण हे सगळे करताना, अनुभवांच्या रचनेच्या मूळ तत्वांना ते डावलत नाहीत. कवितेतील सगळेच अनुभव बांधेसूद असतात. ते डावलतात ते अनुभवांच्या रचनेविषयीच्या संकेतांना. त्यामुळे, त्यांच्या अनुभवांची रचना जराशी अस्वाभाविक वाटली तरी तरी ती, त्या प्रत्यक्ष अनुभवांपुरती अधिक स्वाभाविक असते, असे आपल्याला म्हणता येईल. 

"चिरा लाल नि सिमेंट ढवळे 
त्यांतुन फुटते डहाळ हिरवी; 
कळसाआधी भिंत अनावर 
दचकून होते इथें ओणवी. 

घुमवयाचे गगन खोलवर 
तिथें चिमुटभर घुमते गाणें;
तुटते चिंधी जखमेवरची 
आणिक उरते संथ चिघळणे. 

चिरा लाल नि सिमेंट ढवळे
त्यांतून कैसे निघतील बगळे?
म्हणून माझ्या पायधुळीची 
गिरकी जाते कळसापरती..."
(गिरकी जाते कळसापरती - जोगवा) 

नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. मागे मी म्हटले होते त्याप्रमाणे  ही शब्दांमधून. आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे तर सगळे खरंच असते पण ते गृहीत धरावे लागते कारण त्यांचीही जाणीव होते, ती अखेर शब्दांमधूनच!! एकदा आशय गृहीत धरल्यावर, कवीने पुढे काय, हे पडताळणे सर्वार्थाने महत्वाचे असते आणि इथे परीक्षा असते, ती भाषेशी, तिच्या घटकांशी आणि घडणीशी. 
आरतीप्रभू इथे, सुरवातीला गद्यमय शब्द वाटतील इतक्या रोकड्या प्रतिमांतून कवितेला आरंभ करतात. सिमेंट, चिरा सारख्या शब्दांतून सुरवात करून, "कळसाआधी भिंत अनावर, दचकून होते इथें ओणवी. "  इथे एकदम काहीसे धक्कातंत्र वापरून कवितेची "जमीन" तयार होते. 
पुढील ओळी खऱ्याअर्थाने कवितेचा आशय व्यक्त करतात आणि कवी म्हणून आपण किती खोलवर विचार करून शकतो ,याची अप्रतिम प्रचिती देतात. एक व्यथा, एक खंत मनाशी बाळगून आयुष्य पुढे चाललेले आहे आणि तो अनुभव देताना, "तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे." अशी असामान्य प्रतिमा वापरतात. वास्तविक, जखम होणे, रक्त गळणे हे आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक वेळा घडत असते परंतु खानोलकरांनी "नजर" अशा वेळी प्रगट होते आणि तीच कृती, आधीच्या ओळीच्या अनुभवाशी जोडून घेताना, सगळीच कविता फार वरच्या पातळीवर नेऊन ठेवली जाते.
खानोलकर आपल्या कवितांमधून असाच "अनपेक्षित" पणाचा धक्का वारंवार देतात आणि आपल्या सृजनशक्तीचा प्रत्यय घडवतात. त्यामुळे मला नेहमी असेच म्हणावेसे वाटते, आरतीप्रभूंची कविता, हे त्यांचीच असते, त्याच्यावर त्यांची खास "नाममुद्रा" असते, तिचा "तोंडवळा" वेगळा असतो. ती तथाकथित सामाजिक जाणीव, विद्रोह यांच्या पासून दूर आहे तसेच मानवी प्रगती आणि तिच्या समस्या वगैरेंशी दुरान्वये देखील संबंध ठेवत नाही. 

मुळात आरतीप्रभूंचे लेखन हे वाचकाला आरपार झपाटून टाकते, प्रसंगी हेलपाटून देखील टाकते. अनुभवाची खोली जितकी शक्य आहे, तितकी दाखवण्याचा असामान्य प्रयत्न सतत चाललेला असतो. हीच त्यांच्या अभिव्यक्तीची खासियत म्हणता येईल. इथे आपण, उत्तरोत्तर त्यांची प्रतिभा कशी विकसित होत गेली आणि तशी होताना, वाचकाला आपल्याबरोबर खेचून घेण्याची अद्भुत ताकद, या दोन प्रमुख मुद्द्यांचा विचार करावा लागेल. कवितेसारखे अत्यंत अल्पाक्षरी माध्यम हाताशी घेऊन, प्रतिमांच्या साहाय्याने आशयाची व्याप्ती जी दाखवली जाते आणि त्यामुळे एकूण कविताच कशी समृद्ध होत जाते, हे बघणे अधिक श्रेयस्कर ठरते. 

"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
कुठे उतरावे? कशासाठी तंबू ठोकून? 
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून? 
या सगळ्याचा हिशेब ठेवायचा कुणी?
मनांतल्या मनात कुजून जगतात कुणी 
गुलाब राहतील तरीही ताजे. 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

इथले सगळे दिवे विझून जातात,
अंधारांत वृक्ष गोठून झडत राहतात,
कुणी करतात प्रीत, कुणी करतात पूजा,
कुणी खोकत खोकत जीवनाशी पैजा 
मारून म्हणतात : आम्ही राजे!
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. 
कुणी देतो एक हळी, त्याचाच पडतो बळी,
हारासारखे हौतात्म्य त्याच्या येते गळी,
त्याचे त्याला माहित पंजे. 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?"
(कुणाच्या खांद्यावर - नक्षत्रांचे देणे) 
कवितेचा आशय अगदी स्पष्ट आहे, आयुष्यातील अत्यंत निराशावस्थेतील अभिव्यक्ती आहे, अगदी टोकाची वाटावी अशीच आहे आणि त्यासाठी, "दिवे विझून जाणे" किंवा "वृक्ष झडत जाणे" अशा अगदी वेगळ्या आपल्याला सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा वापरल्या आहेत. अशा कवितांमधून कवीची खरी अभिव्यक्ती समजून घेता येते. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणिवेची प्रतीती देते आणि ती देताना वाचक काहीसा झपाटला जातो. या कवितेतून काही मूलभूत प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे. नियती आणि आत्मस्वातंत्र्य ह्यांचे खरे स्वरूप काय? त्यांचे नाते काय? नियती म्हटले की तिच्यामागे काहीतरी "नियंत्रण" करणारी शक्ती परंतु स्वतः: मात्र त्यापासून मुक्त, स्वयंभू अशी शक्ती मानावी लागते पण तशी कुठली शक्ती जाणवते का? तर तसे काहीच नसते. आपण फक्त, आपले जीवन घडविता येण्याच्या अनेक शक्यतांचा शोध घेत असतो पण याचाच वेगळा अर्थ, अंशत: तरी आपण आत्मस्वातंत्र्य उपभोगत असतो!! तसे बघितले तर आत्मस्वातंत्र्य तरी आपल्याला कुठे संपूर्णपणे उपभोगता येते.  
"कुणी देतो एक हळी, त्याचाच पडतो बळी,
हारासारखे हौतात्म्य त्याच्या येते गळी,"
निदान या ओळी तरी आपल्याला याच बाबीचा निर्देश करतात. म्हणजे माणसाला स्वातंत्र्य कसले? तर आपला तुरुंग कुठला आहे, हे निवडण्याचा!! त्याशिवाय सुटका नाही. फार तर आपण त्या तुरुंगाच्या भिंती किती? त्याला खिडक्या किती? इतपतच प्रश्न विचारू शकतो. त्यापलीकडे आपण सगळेच हतबल असतो.  
इथे याच कवितेच्या संदर्भात आणखी काही ओळी आठवल्या, आरतीप्रभूंच्याच एका कवितेतील ओळी आहेत. 
"कशासाठी, कुणासाठी, कुठवर कुठवर;
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर". 
मी मघाशी तुरुंगाचा उल्लेख केला, तीच बाब या ओळीत अधिक खोलवर व्यक्त झाली आहे. जर का प्रत्येक आयुष्य हा अभेद्य तुरुंग असेल असे मानले तर मग, तिथे आत्मस्वातंत्र्याला कुठे जागा आहे? आरतीप्रभूंच्या "नक्षत्रांचे देणे" या संग्रहातील बहुतेक कविता, हीच जाणीव आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमांच्या साहाय्याने दाखवत आहेत आणि त्या जाणीवा सहज समजून घेताना, आपण केवळ विस्मित होण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. "जोगवा" नंतर "नक्षत्रांचे देणे" हा संग्रह परंतु आरतीप्रभूंच्या अभिव्यक्तीमध्ये कमालीचा बदल घडत गेला. कविता अधिक आत्मलक्षी, अंतर्मुख आणि वेदनेच्या अत्यंत नवीन जाणिवांनी भारून गेली. 
क्रमश: 
मघाशी मी एक विधान केले, आरतीप्रभूंच्या कवितेत वेदनेचे अनेक स्तर आढळतात!! या विधानामुळे एक गैरसमज होऊ शकतो, आरतीप्रभू यांनी फक्त वेदनेचीच कविता लिहिली. वास्तविक, "नक्षत्रांचे देणे" या संग्रहात, वाचताना भावनांचे अनेक कंगोरे आढळतात आणि तिथे मात्र आपण, दि:डमूढ होतो. अशीच एक, संपूर्ण वेगळ्या धर्तीवरील कविता वाचायला मिळते. 

"सबंध घरांत गाणें सुरु आहे,
दिवे लागायला अजून थोडा वेळ आहे,
खिडक्यांच्या गजांतून आलेली उन्हें 
सरकताहेत गाण्यापाशी मंद मंद फिकी,
एक स्कर्टवाली मुलगी गिरकी घेत गेली 
कुठल्यातरी खोलीत : 
गाण्यानेच फेकली फुलांची ओंजळ. 
नागमोडी जिन्यांची बुडताहेत वळणे भरगच्च 
मंद्रात, दिवे लागण्याची सम येतेय जवळ,
जिन्यावरून जातोय कुणी वर वर धीरवान पुरुष,
टक टक टक टक संपत गेली बुटांची टपटप,
माडीवरच्या एका खिडकीत उजळला मंद दिवा,
त्याने धीमी शीळ घुमवली, पोशाख उतरला,
सिग्रेट शिलगावली. 
संबंध घरात गाणे सुरु आहे :
एकेका खोलीचे भान हरपतेय,
एकेका दाराचा अडसर गळतोय,
भिंती सगळ्याच होताहेत पारदर्शक,
तो उभा आहे थोड्या उंचीवर,
ती उभी आहे जागच्या जागी लपल्यासारखी,
त्याला ती दिसली भिंतीतून, 
तिला तो दिसला नाही,
तिला फक्त जाणवला माडीवरील दिव्याचा 
पायांवर सांडलेले गिटारीच्या स्वरासारखा 
थरारता कवडसा,
आणि त्याचा रुंद खांदा तिच्यासमोर आला,
तिने डोकी टेकली त्याच्या नग्न छातीवर :
ती गाणे ऐकतेय,
तो गाणे ऐकतोय :
एक संबंध गाणेच गाणे म्हणतेय
आणि एक संबंध गाणेच गाणें ऐकतेय." 

कविता थोडी दीर्घ स्वरूपाची आहे आणि मुक्तछंदात बांधली आहे. कवितेचा विषय अगदी उघड, उघड वेश्यावस्तीचा आहे.  जरी वेश्यावस्ती असली तरी तिथल्या गणिकेची कोठी आणि तिथला एक अनुभव, हाच खरा विषय आहे. आता गणिका आणि तिची कोठी म्हणजे तिथले गाणे, हे ओघानेच येते. वास्तविक, आता ही संस्कृती पार रसातळाला गेली आहे पण २५, ३० वर्षांपूर्वी, माडीवरील गाणे समाजमान्य असेच होते. आरतीप्रभू कवितेत अनुभव मांडताना थेट मांडतात, कुठेही अनावश्यक पाल्हाळ नसतो की अनावश्यक प्रतिमा नसते. त्यामुळे आशयाला एकप्रकारचे टोक येते. ज्यांना कोठीवरील गायन संस्कृती माहीत असेल त्यांना, "गाणे सुरु झाले" म्हणजे नक्की कसा परिसर असणार, काय वेळ असणार तसेच तिथे कसल्या प्रकारचे व्यवहार असणार या सगळ्यांची इत्थंभूत माहिती नक्कीच असणार आणि त्यामुळे इथे तशा तपशिलात आरतीप्रभू जराही जात नाहीत. "गाणे सुरु झाले" म्हणजे परिसर "मदिर" झालाच असणार आणि तिथले नेहमीचे "व्यवहार" सुरु झालेच असणार, हे गृहीत धरायलाच हवे.  
"गाण्यानेच फेकली फुलांची ओंजळ" या ओळीशी थोडे थबकायला होते. कोठीवरील गाणे खरे पण तरीही गाण्यातून व्यक्त झालेले आर्जव आणि "ओंजळीतून" जाणवणारी भावना, सगळेच आपल्यासमोर एक अमूर्त चित्र उभे करतात. ऐकायला येणाऱ्या स्वरांची सांगीतिक प्रत समजून घेता येते. शब्दांना स्वरांचे कोंदण लाभते. 
हळूहळू तिथल्या व्यवहाराला "जाग" यायला लागते आणि कविता आणखी तपशिलात जाते. कोडगेपणा, हा इथला स्थायीभाव तर असतोच पण त्या जोडीला थंड भावनाशून्यता देखील जाणवते - 
"ती उभी आहे जागच्या जागी लपल्यासारखी,
त्याला ती दिसली भिंतीतून, 
तिला तो दिसला नाही" 
प्रत्यक्ष व्यक्ती समोर असून देखील मनात त्याच्याबद्दल कशाप्रकारचे भाव ठेवायचे, जणू सावलीशी संवाद चाललेला आहे!! इथले सगळे व्यवहार किती कोडगेपणाने चालतात, याचा अत्यंत मोजक्या शब्दांतून मांडलेला आलेख!! 
आरतीप्रभूंनी हीच कल्पना, आणखी दुसऱ्या एका कवितेत इतकीच सुंदररीत्या मांडलेली आहे - 
"इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास, कसे कसे हासायाचे, आहे मला" या ओळीतून आपल्याला आणखी वेगळे काय जाणवते? 
आणि, नायिकेचे अस्तित्व देखील , "गिटारीच्या थरथरत्या स्वरांच्या" स्पंदनातून जाणवते. एका बाजूने सुंदर पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजुने फार अस्वस्थ करणारे रूपक आहे. कविता गाण्याच्या सुरांच्या संगतीने सुरु होते पण बघता, बघता सगळी कविता, अतिशय दाट, गडद असा परिणाम घडवत राहते आणि हे शब्दांचे गारुड फार अद्भुत आहे. काव्य लिहायचे म्हणजे ते अनुभवांवर आधारावेच लागते. बाह्य सृष्टीचा आश्रय प्रतिभेला घ्यावाच लागतो. आरतीप्रभुंची अनुभूती घेण्याची शक्ती इतकी तीव्र आहे की, काहीं वेळा असे वाटते, खऱ्या अनुभवातून काव्यनिर्मिती करण्याऐवजी त्यांनी आपल्या प्रकृतीला अनुसरून आणि अनुरूप असेल निभाव कल्पनेने निर्माण केले आहेत. कवींच्या सृजनशक्तीने आपल्या एका अंगास दुसऱ्या अंगाचा विषय बनवून आपला स्वयंभूपणा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा प्रयत्न या वरील कवितेत स्पष्टपणे केलेला आढळतो. 
अशीच एक अप्रतिम कविता, "नक्षत्रांचे देणे" या संग्रहात आढळते. कवितेची सुरवात आणि शेवट, दोन्ही सत्कृतदर्शनी भिन्न वाटतात पण जरा बारकाईने वाचन केले तर त्यातील लय आपल्या मनाला कधी वेधून टाकते, याचा पत्ताच लागत नाही . फार विलक्षण चकवा देते. 

"शब्दाआधीची शांतता : त्यांत तूं,
शब्दानंतरची शांतता : त्यांतही तूं. 
पाखरं आली होती, उडालीसुद्धा,
पाखरं उडालेली पुन्हा आलींसुद्धा. 
एकेक मंत्र तुझा, मुग्ध पुन्हा तूं; 
एकेक पाशांत प्रशांत मी अन तूं. 
हें पात्रसुद्धा प्रतिबिंब लिंबकांत 
नाही दाखवीत, नुस्तेंच प्रवाहित. 
काय कुठे चाललोय, कुणाची कुणाला 
लाभलीय संगत? जरूर कुणाची कुणाला?
अशांत कोण? झालोत कां अनिकेत?
जीवनसूत्राची खेच : पाय कुठे पडावेत? 
भेटलीच आहेस नको त्या वळणावर;
भूतसुद्धा होईन म्हणतेस मरणानंतर सरणावर. 
सुंदर नसतो - असला तरी नको मृत्यू तुला; 
शब्दानंतरच्या शांततेत हवीस तूं मला. 
गाणाऱ्याने नुस्तें नये जाऊ गाऊन, 
जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन. 
याहून काय सांगूं? हवा तर हात पुढे कर :
वाचीन शब्दहीन रेषा, डोळे मात्र बंद कर. " 

आरतीप्रभूंची कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, तेणे आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो.  साध्या निसर्गचित्रातून कवितेचा आरंभ होतो. परंतु वाचताना एकदम, "एकेक मंत्र तुझा, मुग्ध पुन्हा तूं; एकेक पाशांत प्रशांत मी अन तूं." ही ओळ वाचायला मिळते!! कविता वेगळ्याच वळणावर उभी राहते. दोन प्रेमीजीवांचा संवाद पण खरे तर हा स्वतः:शीच चाललेला मूक संवाद आहे पण हे नंतर जाणवते!! मनात चाललेल्या खळबळीतुन निर्माण झालेले प्रश्न आणि त्या त्या विचारलेल्या प्रश्नांतून मिळत असलेली उत्तरे, असे काहीसे स्वरूप या कवितेचे आहे. 
चांगल्या भावकवितेतील भावनाशयासंबंधी काहीं लिहिणे मुळातच फार कठीण असते कारण तिच्यातून जाणवणारा एखाद्या भाववृत्तीचा अनुभव हा संमिश्र असूनही संश्लेषणात्मक, तरल आणि विशिष्ट स्वरूपाचा असतो. आणि त्यामुळे गद्यात तो अनुभव नेमक्या शब्दांत मांडणे फारच अवघड होऊन बसते. एका बाजूने प्रेयसीशी संवादात्मक बोलणे पण दुसरीकडे पटकन मरणाची आठवण करून देणाऱ्या ओळी!! आरतीप्रभुंची प्रतिभा ही अशीच सतत एखाद्या लंबकाप्रमाणे हेलकावे घेत असते आणि आपल्याला फार चकवा देत असते. एकूणच या कवीला मृत्यूबद्दल विलक्षण आकर्षण असल्याचे बहुतेक कलाकृतींमधून आपल्याला अनुभवायला मिळते. 
कवितेचा शेवट किती अर्थपूर्ण केला आहे. सहवास तर संपण्यासाठीच असतो पण त्यावेळी जाणवणारा एकाकीपणा विषण्ण करणारा असतो आणि म्हणूनच "जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन" अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नंतर येणारा रितेपण तरी निखळ असावे, हेच जणू यामधून सुचवायचे आहे. भावनाशयाचा स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे प्रवास कसा होतो आणि कविता एकूणच किती सघन होत जाते - 
"गाणाऱ्याने नुस्तें नये जाऊ गाऊन, 
जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन. 
याहून काय सांगूं? हवा तर हात पुढे कर :
वाचीन शब्दहीन रेषा, डोळे मात्र बंद कर. "
समृद्ध भावनाशयाचे अप्रतिम उदाहरण!! कविता इथेच संपायला हवी, अशीच अपरिहार्यता या ओळी वाचून झाल्यावर आपल्या मनात येते. येथे भावानुभवाचे बाहेरून वर्णन करण्याचा प्रयत्न नसून, त्या अनुभवाचे संवेदनाशरीर साकार करून त्याच्या द्वारे तोच अनुभव पुन्हा निर्मिण्याचा सुंदर प्रयत्न आहे. या विशिष्ट भाववृत्ती एकत्रितपणे जाणवून देऊन, अस्तित्वात असलेल्या सर्व घटकांच्या सूक्ष्मतर छटा अति निकटतेने जाणवून देत आहेत. भावकविता अशीच असायला हवी, हे दर्शवून देणारी ही असामान्य कविता. 
नियतीच्या खेळाची जन्म आणि मृत्यू ही दोन टोके. या खेळाचे स्वरूप जाणून घेणे,हेच या कवीच्या सगळ्या कलाकृतीचे मूलभूत सूत्र आहे. त्यांच्या केवळ कवितेतून(च) नव्हे तर इतर गद्य लेखनातून याचाच आपल्याला पडताळा येतो. याच दोन संकल्पनेतून आपल्या सगळ्या साहित्याचा डोलारा मांडायचा आणि तो देखील अतिशय तरल, सूक्ष्मपणे मांडलेला दिसतो. मराठीत अशा प्रकारचे लेखन फारच तुरळक झाल्याचे आढळते. 

Friday 12 August 2016

इंदिरा संत

वाचता, वाचता एखादी कविता आपल्या वाचनात येते. सुरवातीला काही शब्द परिचित वाटतात आणि ते शब्द आपले लक्ष वेधून घेतात. काहीसे परिचित शब्द पण संपूर्ण ओळ वाचताना वेगळेच अर्थ ध्यानात येतात आणि डोळे टवकारून आपण कवितेकडे एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो. कवितेचे हेच तर खरे बलस्थान. नेहमीच्या वापरातील शब्दांचे वेगळे अर्थ वाचकांना जाणवून द्यायचे. 
खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. 
शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन  करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. 
अनुभवाशी एकरूप होऊन, पुढे स्मृतीत "जिवंत" ठेवलेल्या त्या क्षणाला अनुभूतीतील स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना खऱ्या रूपात जाणवायला लागतात आणि असे होत असताना, जेंव्हा वर्तमानात जो अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला असतो, तो अनुभव बाजूला सारून, हा दुसराच क्षण, भूतकाळातील क्षण त्याची जागा घेतो आणि मग भूतकाळ हाच आपला वर्तमानकाळ होतो आणि तिथेच तो अनुभव नव्या जाणिवांनी आपल्या कक्षेत यायला लागतो.
काळाची जाणीव हलकेच पुसून टाकणारी ही नवीन जाणीव आपल्याला निराळ्याच परिणामाची अनुभूती देते. खरे तर आपल्याला जो क्षण अनुभवता आलेला असतो, त्या क्षणाच्याच साऱ्या संवेदन विश्वाला जिवंत करणे, सक्षम लेखनाची पहिली पायरी म्हणायला हवी आणि ही पायरी गाठली की रसिक वाचक देखील त्या संवेदनविश्वाची खरी अनुभूती घेऊ शकतो. वेगळ्या शब्दात, भूतकाळाचा तो क्षण पुन्हा वर्तमानात आणताना, त्यावेळच्या संवेदनेसह लेखनातून प्रकट होणे. त्या क्षणाच्या जाणिवेतील मनाच्या जागृत, अर्धजागृत आणि सुप्त पातळ्यांवरील संज्ञाप्रवाह, त्याच पातळीवरील अनुभवांचेच शब्दरूप प्रकट करणे, हेच तर कवितेच्या अननुभूत आणि अर्धुकलेल्या वाटेचे खरे संचित मानावे. 
अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप. 
आणि या वाटेवर चाचपडत असताना, मला इंदिरा संतांची कविता वाचायला मिळाली. 

या दृष्टीने मला इंदिरा बाईंची "कुब्जा" ही कविता फार विलक्षण वाटते. वास्तविक, "कुब्जा" हे व्यक्तिमत्व पुराणकाळातील, काहीसे दुर्लक्षित झालेले, किंबहुना दोन, चार प्रसंग वगळता फारसे महत्व नसलेली व्यक्तिरेखा. असे असून देखील तिचा प्रभाव महाभारताच्या संपूर्ण कथेत जाणवतो. अर्थात ही किमया महाभारतकारांची!! 

"अजून नाही जागी राधा,
           अजून नाहीं जागें गोकुळ; 
  अशा यावेळी पैलतीरावर 
            आज घुमे का पावा मंजुळ;
  मावळतीवर चंद्र केशरी;
             पहाटवारा भवती भणभण;
  अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती 
              तिथेच टाकुन आपुलें तनमन. 
  विश्वच अवघे ओठा लावून 
               कुब्जा प्याली तों मुरलीरव;
  डोळ्यांमधून थेंब सुखाचे  :
                हें माझ्यास्तव... हें माझ्यास्तव..."

ही कविता वाचताना, आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांमधून साधली गेलेली कविता. इंदिराबाईंच्या कवितेतील विचार आपल्याला स्वतंत्रपणे करायला लावणारी ही कविता. तसे बघितले विस्ताराच्या दृष्टीने या कवितेत प्रतिमाविश्व अतिशय मर्यादित आहे. त्या प्रतिमा, त्यांच्या स्थायीभावाच्या जाणिवेने मर्यादित केले आहे. सरत्या रात्रीची वेळ आणि त्यावेळी भणाणणारा वारा!! या वातावरणाच्या भोवती दिसणारा केशरी चंद्र, कवितेतील वातावरण निर्मिती, हा वेगळा शाब्दिक खेळ असतो. प्रतिमा मोजक्या शब्दात मांडावी आणि मांडताना त्यातील आशय अधिक विस्तारित व्हावा!! हेच इथे नेमकेपणा आपल्याला वाचायला मिळते. 
संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. त्या दृष्टीने, सपक, सामान्य पातळीवरील संवेदनाविश्व इंदिरा बाईंच्या कवितेत फारसे कधी आढळत नाही. या कवितेत, अर्थातच निसर्गरूपे आहेत पण ती सहजपणे डोळ्यासमोर दिसणारी नाहीत. आपल्या भाववृत्तीच्या स्पंदनांचे प्रतिबिंबच असे निर्माण केले जाते. अतिशय अरुप अशा भाववृत्तीने जाणवणाऱ्या निसर्गाचे रूप या कवितेत आढळते. 
कवितेत प्रतिमा आढळणे आणि त्यातून मूळ आशय वृद्धिंगत होत जाणे, हे भावकवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानावेच लागेल. बरेचवेळा प्रश्न पडतो, वापरलेली प्रतिमा, मूळ भावनेचा आशय अधिक अंतर्मुख होऊन व्यक्त होते की मूळ भावनेला गुदमरवून टाकते? नाकापेक्षा मोती जड, हे तत्व इथे देखील लागू पडते. प्रतिमासंयोजन म्हणजे तरी काय? जीवनात अनेक अनुभव आपणांस येतात. त्यातील काही संवेदनाद्वारे स्वतः:ला आलेले, काही कल्पनेने जाणवलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. काहीवेळा मिश्र अनुभव देखील येऊ शकतात. यातीलच कुठल्याही एकाच्या किंवा एकत्रित अनुभवांचा अर्कभूत परिणाम म्हणजे भाववृत्ती!! तिच्याशीच खऱ्याअर्थाने भावकवितेला नाते जोडता येते आणि ते नाते, प्रतिमांच्या द्वारे सखोल होत जाते. 
"कुब्जा" कवितेत, हेच नात्यांचे ताणेबाणे बघायला मिळतात. या कवितेत, इंदिरा बाईंच्या प्रतिमांना ताकद मिळते, ती संवेदनाविश्वाच्या भरीव आणि निकट अशा जाणिवेमुळे. कवितेच्या पहिल्या कडव्यात राधेचा उल्लेख आणि त्याबरोबर "गोकुळ" आणि "मंजुळ पावा" या प्रतिमा आपल्या मनात एक "जमीन" तयार करतात. पुराणकथेचा आधार घेतला तर कुब्जेने विषाचा प्याला घेऊन जीवन संपविले होते. या कृतीचे वर्णन करताना, 
"  विश्वच अवघे ओठा लावून 
               कुब्जा प्याली तों मुरलीरव;"
किती समर्पक शब्दयोजना आहे. कृष्णाचे नाव देखील कुठे घेतलेले नाही पण "मुरलीरव" या प्रतिमेतून कृष्ण तर उभा राहिलाच पण त्याच बरोबर, "विश्वच अवघे ओठा लावून" या कृतीने आपले अव्यक्त प्रेम व्यक्त केले आहे. बरे, तिची कृती "प्याला पिण्या" इतपत नसून, विष पिताना देखील डोळ्यातून सुख सांडत आहे आणि नुसते सांडत नसून ती भावना केवळ माझीच आहे, हे अधिक महत्वाचे आहे.इथे सगळी कविता कुब्जेची होते आणि सुरवातीची राधा पूर्णपणे लुप्त होते. शेवटच्या कडव्यात जो ताण आहे, तिचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची जाणीव. 
     
इंदिराबाईंच्या कवितेत निसर्ग आहे आणि त्याच्या प्रतिमा देखील आहेत पण त्या प्रतिमा येताना, शब्दाच्या पलीकडील अर्थ दाखवण्याची किमया करतात. परिणाम असा होतो, आशयाचा मनावर होणारा दृढ परिणाम आणि कवितेच्या बांधणीत येणारी सघनता. प्रतिमा वाचताना, आपले संवेदनाविश्व जागे होते आणि त्याबरोबर भाववृत्ती. बाईंच्या कवितेत याच एकात्मतेचे सूत्र आढळते. जो अनुभवाचा क्षण असतो, त्यातील भाववृत्तीच्या अंतर्गत ताणाच्या जाणिवेतूनच तिचा प्रत्यय द्यायचा आग्रह दिसतो. शब्द, शब्दांची विशिष्ट तऱ्हेने घडवलेली गुंफण यांच्यातील अनेक लय त्यांच्या कवितेत साकार होतात. एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे आणि ज्या क्षणी तो अनुभव स्थिर होत आहे, तेंव्हाच त्याला किंचित धक्का द्यायचा. असे करताना, प्रतिमांची उलटापालट करायची, एका प्रतिमेचा परिणाम दुसऱ्या प्रतिमेने पुसून टाकायचा किंवा दोन्हींच्या मिश्रणाने तिसरीच प्रतिमा प्रत्यक्षात आणायची आणि या सगळ्या खेळातून भाववृत्तीचा क्षण साकार करायचा!!  कधी कधी एखाद्या प्रतिमेतच टाकलेल्या विरोधी प्रतिमेत भाववृत्ती तोलून घ्यायची आणि अशा संपन्नतेणे घडवलेल्या सौंदयात्मक घडणीतून संवेदनाविश्व आणि भाववृत्ती एकत्र जोडून घ्याची. मी मागे म्हटल्याप्रमाणे, आपल्या मर्यादित भावविश्वाचीच पण अतिशय सखोल आणि गहिरी जाणीव अशाप्रकारे करून द्यायची जेणेकरून इतर घटकांची जरुरी नाही. 
"कधी जीवन वाटे वाळवंट वैराण 
वा दावाग्नीने घेरीयलेले रान :
होऊन सहन ना हृदयातील काहूर 
मी निघू पाहते कुठे...कुठे तरी दूर." 
(कधी जीवन वाटे - शेला) 
इथे सुरवातीलाच आयुष्यातील विदग्ध अनुभवाची सांगड घातली गेली आहे आणि ती अनुभूती "वैराण वाळवंट","दावाग्नी" अशा प्रतिमांतून मांडली आहे. कवितेच्या सुरवातीला असा रखरखाट दाखवून कवितेची "जमीन" स्पष्ट केली. याच कवितेतील पुढील ओळी बघता, 
"थरथरती शेतें, रानपाखरें चिमणी
अन क्षणांत होतें स्तब्धचि वातावरणी.
संपूच नये ही रम्य गोजिरी वाट; 
संपूच नये हॅ गंधित हिरवे शेत." 
मघाशी मी ज्या "धक्कातंत्राचा" उल्लेख केला तो इथे बघायला मिळतो. सुरवातीची काळोखी अनुभूती, इथे किंचित हळवी, निसर्गप्रतिमा हाताशी  घेऊन,तो ताण हलका केला आहे. परंतु संपूर्ण कविता वाचली असता, याच प्रतिमेतून सुरवातीचा भाव किंवा भाववृत्तीचे सखोल दर्शन आपल्याला मिळते. भाववृत्तीतील अनुभवाचे घटक जेंव्हा एकमेकांशी संबद्ध होतात, तेंव्हा त्यांना अंत:केंद्रित करणारे जे सूत्र असते, ते त्या भाववृत्तीचे स्पंदन. या स्पंदनाचा लय म्हणजेच त्या भाववृत्तीचा लय. हा लयच कवितेला भावकविता बनवतो. अर्थात, कवितेतील नादलय ही वेगळी संकल्पना आहे. कविता वाचताना कानांवर आदळणारे शब्दांचे आघात, तो नादलय निर्माण करतात. चांगल्या काव्यात हे दोन्ही घटक एकत्रित झालेले दिसतात तरी मुळात ते दोन भिन्न घटक आहेत. 

इंदिराबाईचे काव्य स्वभावत:च सहज, आर्जवी आणि सोपे आहे. मुळात, भावकाव्य हे वैय्यक्तिक अनुभवांची अनुभूती शोधणारे काव्य असते. आधुनिक काव्यात एकूणच "गूढता" या भावच्छटेला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे परंतु या छटेची छाया देखील या कवितेत आढळत नाही. नेहमीचे, वापरातले शब्द वाचायला मिळतात पण मजा इथेच असते, त्या शब्दांची रचना अशा प्रकारे केली जाते की, तोपर्यंत आपल्या मनात जी छटा दृश्यमान असते, तिचे स्वरूपच, ही कविता पालटून टाकते. 
एखादा वैय्यक्तिक अनुभव जेंव्हा काव्यरूप घेतो, त्यावेळी तो कवीच्या जाणिवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वतःचे रूप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वैय्यक्तिक अनुभवाशी असलेली "नाळ" तोडणे आवश्यक ठरते.एक इथे ध्यानात ठेवावे लागेल, कुठलेही काव्य, हे एका पातळीवरील संवाद असतो आणि या संवादाचे वाहन भाषेतूनच निर्माण होते आणि हा सामाजिक संकेत आहे. हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, बाईंच्या कवितेतील भावनाशय हा सर्वस्वी त्यांचाच आहे. 
"विचारांची घोडदौड 
      येई उडवीत धूळ,
तुडवीत टापांखाली 
      मन माझे भयाकूल. 

कधी भवसागरात 
      उठे भीषण भोवरा;
असहाय माझे मन 
      फिरे त्यात गरगरा. 

कधी होई अवचित 
      निराशेची वारामोड,
उन्मळल्या केळीपरी   
      मन घेई पुरा मोड. 

म्हणुनीच येतां रात्र 
      मन जाई घाबरून,
भयभीत सशापरी 
      बसे दडून लपून."
(संग्रह - मेंदी)

वरील कविता वाचताना, संत्रस्त मानसिक अवस्था आणि त्या अवस्थेचे चित्रण, आपल्याला सहज कळून घेता येते. भावकवितेत आशयाची बंदिश किती तऱ्हांनी करता यावी याला भावकविता या रुपाचेच बंधन असते!! काल अमी अवकाश यांच्या अगदी संकुचित अशा क्षेत्रात, अगदी थोड्या घटकांच्या व्दारे अभिव्यक्ती घडवावी लागते. म्हणूनच हे एक क्षितिज गाठल्यावर, त्यानंतरची प्रगती ही अधिकाधिक संमिश्र आणि तरल अशा जाणिवा, जाणवून देणे, हेच असू शकते. ज्या भावच्छटा शब्दांच्या किंचित स्पर्शाने देखील कोमेजतील, त्यांना त्याच शब्दांनी उमलविणे हीच कसोटी इथे असते. 
वरील कवितेत अनेक प्रतिमा वाचायला मिळतात पण त्या प्रतिमांची रचना बघण्यासारखी आहे. आशय एकच आहे, मनाची भयभीत अवस्था आणि त्यासाठी योजलेली प्रतीके, "टापाखाली भयभीत"," गरगरणारा भोवरा", "उन्मळलेली केळ" इत्यादी आहेत. या प्रतिकांमधून कवितेत, त्या क्षणाच्या मनाच्या अवस्थेचेच चित्रण केले आहे. संत्रस्त अवस्था खरेच पण त्यातही कमी-जास्त गडद रंग आढळतात आणि त्यातून सगळं परिणाम अधिक गडद होण्यात होतो. 
एकूणच इंदिराबाईंच्या कवितेत, करड्या-काळ्या रंगाचा प्रभाव जाणवण्याइतपत प्रभावी आहे. अनुभूतीच्या क्षणाच्याच स्पंदनातून भाववृत्तीचा प्रत्यय ह्या प्रवासाला इथे पूर्तता येते. पहिल्या काही ओळीत, एका खास क्षणाचे स्वतंत्र अस्तित्व दाखवले जाते. एकदा तो क्षण दाखवून झाल्यावर मग, त्या क्षणातून पुढे मनात येणाऱ्या भावनांचे पडसाद बघायला मिळतात. हे करताना, कुठेही आधी जो ताण निर्माण केला आहे, त्याची पकड कुठेही विसविशीत होत नसून, पुढील प्रतीकांच्या साहाय्याने त्या चित्राचे रंग अधिक गडद केले जातात आणि वाचकाचे लक्ष तिथेच संपूर्णपणे केंद्रित केले जाते. "उन्मळल्या केळीपरी" सारख्या निसर्गचित्रातून आधीचीच जाणीव अधिक भीषण, खोलवर केली जाते आणि इथे कविता "स्व" शी संवाद करायला लागते. 
तसे बघितले तर या कवितेतली जाणीव, इतर अनेक कवितांमधून आपल्याला मिळालेली असणार मग असे इथे काय वेगळे आहे ? पण, "फॉर्म" आणि "बॅकग्राउंड" यांच्या उलटंपालटीने, संथ चाललेल्या जीवनातील अनपेक्षित आघात नेमका शब्दांकित केला आहे. ही भावस्थिती अनुभवाच्या क्षणातील अंतर्गत ताणांच्या जाणिवेतून साकार झाला आहे.  

इंदिराबाईंच्या बाबतीत एक बाब स्पष्टपणे जाणवते आणि ती म्हणजे प्रत्येक काव्यसंग्रहाद्वारे त्यांची अभिव्यक्ती अधिक अंतर्मुख आणि खोल होत गेली आहे. 
"सहवास" पासून ते "गर्भरेशीम" पर्यंतचा प्रवास न्याहाळताना, आपले प्रतिमाविश्व तसेच काय ठेऊन आणि मर्यादित ठेऊन देखील, त्यांनी अभिव्यक्तीचा 
फार मोठा पट मांडला आहे आणि तो कुणालाही स्तिमित करण्यासारखाच आहे. त्यांच्या कवितेत कधीही आक्रस्ताळेपणा किंवा सामाजिक 
बांधिलकी वगैरे कुठल्याच विचारसरणीचा "ढोल" वाजवलेला नाही. बघायला मिळते, ती अत्यंत संयमित तसेच व्यक्तिगत अनुभवाची संपन्न 
अनुभूती. 
प्रत्येक कलावंताच्या कलाकृतीतून जाणवणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाशी काही ना काहीतरी संबंध असतो. 
कारण या दोहोंतूनच त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व आकाराला येत असते. अर्थात, कलेच्या आस्वादाच्या प्रक्रियेत मात्र, वैय्यक्तिक स्तर मागे ठेऊन,
आपल्याला कलेचा आस्वाद घेणे गरजेचे असते. एकतर, या दोन्ही पातळ्यांचा स्वभावत: शोध घेणे असफल ठरते. कारण तिथे कलाव्यवहार 
मागे पडतो आणि मानसशास्त्र आणावे लागते. तेंव्हा कलाव्यवहार मानसशास्त्राच्या आधाराने बघायला घेणे, ही अत्यंत निसरडी पायरी ठरू 
शकते. 
बाईंची कविता वाचताना काही ठराविक मुद्दे आकाराला येतात. बाईंचे व्यक्तिमत्व मूलतः आत्मनिष्ठ, आत्मकेंद्रित आहे आणि याचा परिणाम,
त्यांच्या कवितेतील याचा विचारांना सुसंगत असतात. बाईंचा कलाप्रवास न्याहाळताना, प्रत्येक नवीन काव्यसंग्रहातून, विकसित होत गेलेली 
त्यांची आत्मनिष्ठता अवलोकणे, खरोखरच अभ्यासपूर्ण आहे. वर आपण त्यांच्या सुरवातीच्या काळातील काही कविता इथे चर्चेला घेतल्या 
होत्या. त्या कविता आणि नंतरच्या काळात आलेला "गर्भरेशीम" या काव्यसंग्रहात जाणिवा, याचा मागोवा विलक्षण आहे आणि या 
संग्रहातील प्रतिमादर्शन आणखी विस्मयचकित करून टाकते. 

"जागृत देवस्थान, पर्वणीचा दिवस. 
प्रवेश द्वारांतून न चालतांच आंत गेले. 
पादत्राण सुरक्षाकडे चपला ठेवून मुक्त झालें. 
पूजा सांभाळीत पुढें चाललें. 

'मामी, घड्याळ सांभाळा. 
काकू, पर्स सांभाळा. चेन सांभाळा.' 
फिरणाऱ्या पोलिसांचे फिरते घोष ऐकले 
सगळें छातीशी घट्ट धरले; पुरती बद्ध होऊन 
भयाच्या गळाभर पाण्यांतून पुढें 
सरकत चाललें. 

गाभाऱ्यासमोर लांबलचक कट्टा. त्यावर 
चौके खोललेले बँकेतल्यासारखे. पोस्टासारखे. 
ईथे फुलें-दुर्वा. इथें तांदूळ-प्रसाद. इथें पैसे. 
इथें कापूर-उदबत्ती. इथें... इथें... 

चौक्याचौक्यांतून हजेरी नोंदवताना मधेंच 
डोळे दिपले. 
विदयुद्दीपांची रोषणाई. चांदीसोन्याचा झगमगाट. 
हिऱ्यामाणकांचा लखलखाट.... 
दिपलेले डोळे किलकिले झाले तेंव्हा मी 
बाहेर आले होतें.... 

दर्शन घडले होतें की नव्हतें?
हात जोडले होते की नव्हतें?
मनात कांहीच नव्हतें 
मुकेंमुकेच चालूं लागावें वाटत होतें."

मुद्दामून सगळी कविता इथे लिहिली आहे. कवितेतील आशय स्पष्ट आहे. सध्याचा देवळांचा जो बडिवार 
चाललेला आहे, त्याची अत्यंत निराश अनुभूती. कवितेची सुरवात किती संथ लयीत चालली आहे. कुठलातरी 
सणासुदीचा दिवस असताना,देवाचे दर्शन घेण्याचा मनसुबा. साधी प्रवृत्ती आणि त्यातून देवळाच्या आवारात 
चाललेल्या हालचाली. सगळीकडे गोंगाट आहे, हे दर्शविण्यासाठी,
'मामी, घड्याळ सांभाळा. 
काकू, पर्स सांभाळा. चेन सांभाळा.' 
फिरणाऱ्या पोलिसांचे फिरते घोष ऐकले. 
या ओळींतूनच सगळा परिसर उभा राहिला आणि मनाची द्विधावस्था मांडली गेली. पुढील ओळींतून 
देवळातील भयानक गर्दीचे वर्णन, बरेचसे रोखठोक, तसे बघितले सगळी कविता एका रेषेत जात आहे. 
एक विविक्षित अनुभव असेच म्हणता येईल पण खरी गंमत येते, कवितेच्या शेवटाला. 
 "मनात कांहीच नव्हतें 
मुकेंमुकेच चालूं लागावें वाटत होतें" 
दर्शनासाठी आलो पण अखेर सगळे मन रितेच राहिले आणि त्या निराशेपोटी स्वतः:शीच संवाद साधत 
अस्वस्थ मनाने चालत राहावे. याचसाठी सगळं अट्टाहास केलं आहोत का? असा प्रश्न आपल्या देखील 
मनात उभा राहतो. 
"गर्भरेशीम" संग्रहातील कविता बरीचशी वेगळी आहे, अर्थात आधीच्या कविता संग्रहाच्या संदर्भात. बहुतेक 
कवितांमध्ये, इतर संग्रहात जशा प्रतिमा आढळतात, तसा सढळ वापर दिसत नसून, कविता अनुभवाला थेट 
भिडत आहे. किंबहुना, बहुतेक कविता स्वानुभवाचीअनुभूती देणाऱ्या आहेत पण तरीही रचनेच्या दृष्टीने 
फार वेगळ्या आहेत. ईथे काहीजण कारण नसताना, "सामाजिक" जाणिवेची कविता वगैरे लेबले लावतील, 
पण त्याला फारसा अर्थ नाही कारण हा अनुभव फार वैय्यक्तिक स्तरावरील आहे. 

इंदिराबाईंच्या कवितेचा आतापर्यंत थोडक्यात धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रतिमाविश्वाचा 
मार्ग काढण्याचे धाडस केले. मी "धाडस"  मुद्दामून वापरला आहे कारण कुठल्याही कलाकाराच्या 
विचारांचा (त्यात प्रतिमाविश्व अंतर्भूत होते) गाभा शोधणे, मुळातच फार कठीण असते. आपण 
फारतर अदमास घेऊ शकतो, तर्क लढवू शकतो. त्यापलीकडील शोध हा नेहमीच अर्धुकल्या 
अवस्थेत, ठेचकाळत न्याहाळावा लागतो. 
असे म्हणतात, आयुष्यातील सगळी दु:खे, आनंद पचवावी लागतात, मग त्यात दुसऱ्याची 
दु:खे देखील सखोलतेने पचवावी लागतात. तेंव्हाच कुठे, कधीतरी मनात लिखाणाचे "बीज" 
रुजायला लागते. इथेच प्रत्येकाचे संवेदनाविश्व वेगळे होत जाते आणि तदनुषंगाने निर्मिती 
देखील. काव्यनिर्मितीच्या बाबतीत हीच जाणीव अधिक अंतर्मुख व्हावी लागते. त्यामुळे बाईंची 
कविता वाचताना, एक अनुभव येतो की इंदिराबाई प्रतीक म्हणून पाहायला लागल्या म्हणजे 
मग त्या प्रतिमा आपल्याला रायाला लागतात आणि एखाद्या प्रतिमेच्या अनेकवार होणाऱ्या 
संपन्न अशा जाणिवेतून आपल्या स्मृतीत ती प्रतिमा राहते, एक प्रतीक म्हणून. 
त्यादृष्टीने बघायला गेल्यास, संवेदनांचा प्रवास हा भावनेकडे आणि भावनेशयाचा प्रवास 
स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे सुरु असतो. प्रतिमा ही इथे कवितेत अवतरते. बाईंनी शब्दांकित 
केलेल्या प्रतिमेच्या जाणिवेतून स्फुरणारा जो अनुभव, तोच अनुभव हीच त्यांची खरी 
त्यांची भाववृत्ती. असे आपल्याला म्हणता येईल. इथे संवेदना हाच अनुभव आहे आणि ते 
भाववृत्तीचे शरीर आहे. या विशिष्ट भाववृत्तीतील एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या सर्व 
घटकांच्या सूक्ष्मतर छटा जाणून घेणे, म्हणजेच बाईंच्या कवितेचा आस्वाद घेणे होय. 
अखेर कवितेतील जाणीव म्हणजे तरी  काय?ज्या संवेदना आपल्याला होतात, त्याचे
भाववृत्तीत परावर्तन होतानाचा प्रवास!!
आपण कितीही म्हटले तरी हा सगळं प्रवास घडतो, तो अखेर शब्दांच्याच आधारे. त्यांच्या 
कवितेत नेहमी भाववृत्तीच्या क्षणातील अंतर्गत ताणाच्या जाणिवेतूनच प्रत्यय देण्याचा प्रयत्न 
सतत चाललेला दिसतो. शब्द, शब्दांची विशिष्ट पद्धतीने घडवलेली गुंफण, यांच्यातून अनेक 
लय साकार होतात. एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे 
आमी ज्यावेळी तो स्वतः:च्या अस्तित्वाने स्थिर झाला असे वाटत असते, त्याचवेळी 
धक्का देऊन. तो किंचित हलवायचा आणि ही स्थिरता, अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रगट 
करायची - जसे आपण वरील कवितेत (देवस्थान - गर्भरेशीम), कवितेच्या शेवटी अनुभवले.

एखादी मंद लयीतली प्रतिमा निर्माण करायची, तिच्यावर जाणीव हेलकावे घेऊ लागली की 
लगेच तिच्या जोडीला अत्यंत अनपेक्षित द्रुतलय टाकायचा आणि त्या बदलाच्या धक्क्यातून 
परिणाम साधायचा!! कधी कधी, प्रतिमांची जागाच बदलून टाकायची आणि त्याच्या 
मिश्रणातून तिसरीच प्रतिमा उभी करायची आणि या सगळ्या घालमेलीतून भाववृत्तीचा क्षण 
साकार करायचा. 
यात एक विफलता बेहमी जाणवते. जे पकडायचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला, त्याची इतिश्री 
ही कधीच प्राप्त होणार नव्हती. स्वानुभवातून जाणवलेल्या संवेदनाविश्वाचा अवकाश इतका 
प्रचंड आहे की तो अशा प्रतिमेच्या चिमटीत कधीच सापडू शकणार नसतो. प्रश्न असतो, आपण 
त्यादृष्टीने किती अर्थपूर्ण प्रयत्न करतो? या धडपडीला इतकाच अर्थ प्राप्त होत असतो आणि 
मला वाटते, इथे ही धडपड बऱ्याच अंशी अर्थपूर्ण झाली.