Monday 10 July 2023

स्थलांतरित नागरिकत्व

दुसऱ्या देशात स्थलांतर करणे आता जवळपास सगळ्या देशात मान्य झाले आहे. स्थलांतरीत व्यक्ती या साधारणपणे, आर्थिक,भौतिक सुख डोळ्यासमोर ठेऊन इतर(मुख्यतः प्रगत देशात) देशात जात असतात. आता प्रगत देशाचे काही प्रश्न असतात. प्रगत देशात शक्यतो मजुरी करणारे फार महाग असतात कारण तिथले कडक कायदे. स्थलांतरित व्यक्ती या, आपल्या देशातील एकूणच परिस्थिती बघून, राहणीमान, वेतन इत्यादी बाबींत, त्यामानाने "स्वस्त"उपलब्ध होतात. स्थलांतरितांना नवीन देशात, स्थायिक व्हायचे असते आणि त्यासाठी त्यांची मेहनत करायची तयारी असते. याचाच फायदा स्थानिक लोकं घेतात आणि त्यांना स्वस्तात पडून घेतात. काही उदाहरणे देतो. मी बरीच वर्षे साऊथ आफ्रिकेत काढली असल्याने, तिथल्या स्थलांतरित लोकांचे प्रश्न किती गहाण आहेत, याची कल्पना आली. इतिहासात फार मागे जायचे झाल्यास, १८५० साली, भारतातून साऊथ आफ्रिकेत, तिथल्या उसाच्या शेतात काम करण्यासाठी, प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि आताचे तामिळनाडू, इथून असंख्य मजूर कामाला नेले आणि त्यांच्याकडून वेठबिगारी कामे करवून घेतली.त्यावेळी भारताची स्थिती ब्रिटिशांनी हलाखीची केली होती, विशेषतः वर निर्देशित राज्यांची परिस्थिती तेंव्हाही हलाखीची असल्याने, तिथले मजूर, ब्रिटिशांना खूपच स्वस्तात मिळाले. डर्बन, पीटरमेरित्झबर्ग सारख्या शहरातील भारतीय लोकवस्तीचे मूळ हे इथे आढळते. अर्थात त्यावेळी आणि आजही, भारतापेक्षा तिथे परिस्थिती केंव्हाही चांगलीच आहे. असाच प्रकार ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे देखील केला. यात एक मेख आहे. मुख्यतः आर्थिक बाब आहे. भारतीय माणसे, स्थानिक लोकांपेक्षा स्वस्तात काम करायला तयार असतात कारण आपण भारतीय, कुठेही गेलो तरी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याइतके लवचिक असतो. अगदी पांढरपेशे भारतीय घेतले तरी, आपली वागणूक तशीच राहते. वास्तविक ऑफिसमध्ये काम करणारे भारतीय उच्च शिक्षित तसेच प्रचंड मेहनत करणारे असतात , प्रसंगी ऑफिसवेळ संपली तरी ऑफिसमध्ये काम करायला तयार असतात पण साऊथ आफ्रिकेतील गोरे, त्याबाबत अतिशय ताठर असतात. घड्याळात संध्याकाळचे ४.३० किंवा ५.०० वाजले की लगेच ऑफिस सोडणार. आपण भारतीय प्रसंगी रात्री उशिरापर्यंत काम करीत बसणार!! त्यातून एकुणात वेतनाचा मुद्दा बघितला तर गोऱ्या माणसापेक्षा आपण भारतीय स्वस्तात नोकरी करायला तयार असतो. पुढे एकदा का "नागरिकत्व" मिळाले की मग हळूहळू आपण, आपली नखे बाहेर काढतो. परंतु तोपर्यंत कंपनीचा मालक देईल ते काम स्वीकारत असतो. प्रगत देशात कामगार कायदे अतिशय कडक असतात आणि सहसा कायद्याची पायमल्ली करायला फारसे कुणी धजावत नाही. याचा परिणाम असा झाला, साऊथ आफ्रिकेत, इतर गरीब आफ्रिकन देशातून प्रचंड प्रमाणात स्थलांतरित आले, विशेषतः नायजेरियन तर लाखोंच्या हिशेबात आले. नायजेरिया कायदा पालनाबाबतीत भयानक आहे. कायदा मोडणे, हे आपले "ब्रीद"असल्याप्रमाणे सगळे वागत असतात. अशा प्रवृत्तीची माणसे साऊथ आफ्रिकेत आली, बहुतांशी बेकायदेशीर स्थलांतरित आहे. बनावट कागदपत्रे सादर करून तर कधी काही आफ्रिकन देशातील माणसे "निर्वासित" म्हणून देशात प्रवेश करतात आणि इथल्या समाजात मिसळून जातात. याच नायजेरिन माणसांनी साऊथ आफ्रिका देश आतून पोखरला आहे, इतका की आता तर रस्त्यावर देखील "ड्रग्ज" मिळतात!! प्रसंगी हिंस्र होतात, मुडदेफराशी तर वारंवार घडणाऱ्या घटना आहेत. आता तर त्या देशाने "असुक्षितता" कायमची स्वीकारली आहे, इतकी पराकोटीची परिस्थिती झाली आहे. असेच चित्र आता बऱ्याच युरोपियन देशात दिसत आहे. स्थलांतर करताना, एक प्रश्न वारंवार भेडसावतो आणि तो म्हणजे तिथली संस्कृती किती प्रमाणात आणि कशी स्वीकारायची? अर्थात हा प्रश्न प्रामुख्याने पांढरपेशा समाजाला भेडसावतो. जे स्वीकारतात ते पुढे सुखाने राहतात पण अन्यथा फार त्रांगड अवस्था होते. हे जे इतर आफ्रिकन देशातून आले, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही कारण त्यांना लपूनछपून राहण्याची सवय असते आणि बेकायदेशीर राहात असल्याने, घर नावाची वस्तू कधीच स्थिर नसते, कुटुंबकबिला नसतो. भणंग अवस्थेत राहण्याची तयारी असते. त्यातुन मग, कधीतरी एखादी स्थानिक मुलगी गटवायची आणि तिच्या सोबत "Contract Marriage" करून, नागरिकत्व पदरी पाडून घ्यायचे. एकदा का तुम्ही "Legal Citizen" झालात की मग उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळे!! बहुतेक देशात असेच चालू असते आणि असे घडत असल्याने अशा लोकांचा धीर चेपला जातो आणि गुन्हेगारी करायला मोकाट सुटतात. आज फ्रांस सारख्या अत्यंत प्रगत देशात हेच झाले आहे. फ्रांस देश हा तास मवाळ, सहानुभूती दर्शवणारा म्हणून ख्यातकीर्त आहे. शक्यतो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावयाचे नाही की त्याच्या फंदात पडायचे नाही, अशी वृत्ती. अर्थात अशी वृत्ती बहुदा सर्वत्र आढळते आणि याचा फायदा बेकायदेशीर स्थलांतरित असतात, ते उठवतात. आज फ्रान्समध्ये प्रचंड जाळपोळ चालू आहे, कारणे असंख्य देता येतील, अगदी हिंसा करणारे आणि ती हिंसा भोगणारे. परंतु केवळ फ्रांस कशाला, बेल्जीयम मध्ये फार वेगळे चालू नाही. जर्मनीत मध्यंतरी सीरियामधील निर्वासितांनी असाच गोंधळ घातला होता. मागील वर्षी साऊथ आफ्रिकेत, डर्बन इथल्या प्रचंड मॉल मध्ये असाच धुडगूस घातला, कित्येकांचे प्राण गेले, भयानक नासधूस झाली.अगदी आगीचे लोळ उठले होते. पुढे चौकशी केली असता, बेकायदेशीर निर्वासितांचा हात होता, हे बाहेर आले. आता त्यांना शोधणे पण अतिशय जिकिरीचे असते. इतका अवाढव्य देश, किती आणि कुठले कानेकोपरे शोधायचे? त्यातून स्थानिक लोकांची देखील त्यांना साथ असते, अर्थात त्याशिवाय असा हिंसाचार अवघड म्हणा. आता हा प्रश्न जागतिक झाला आहे. त्यातून त्या देशाची घटना अशी असते, सरसकट अटकसत्र राबवता येत नाही कारण सुक्याबरोबर ओले जळण्याची भीती. ओले जळले की लगेच मीडिया कान टवकारून टीका करायला मोकळे! दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय जटील होत चाललेला आहे. आज शेजारचा देश जळत आहे म्हणून दुर्लक्ष करणे, परवडणारे नाही. उद्या आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू शकते. मुळात, "Easy Money" चा हव्यास प्रत्येक पावलावर नडतो आणि त्यातून गुन्हेगारी बोकाळत जाते. प्रत्येक देशाची घटना स्वतंत्र असते आणि घटना बदल करायला, कुठलेच सरकार शक्यतो धजावत नाही कारण राजकारणात त्यांना देखील स्थिर व्हायचे असते. स्थलांतरितांच्या प्रश्नांचे असंख्य कंगोरे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडथळे आहेत., हेच खरे.

No comments:

Post a Comment