Tuesday 18 April 2023

चटका लावणारा शेवट

क्रिकेटसारख्या क्षणभंगुर खेळात, कधीही, कसेही घडू शकते. एका चेंडूवर चौकार मारला तरी पुढील चेंडूवर तोच फलंदाज बाद होऊ शकतो, तसे कित्येकवेळा घडले देखील आहे. परंतु हीच तर या खेळाची खरी लज्जत आहे. It's one ball game. त्यामुळे एखाद्या खेळीत, खेळाडू "स्थिरावला" आहे, याला फार मर्यादित अर्थ आहे. याच अर्थ असा नव्हे, स्थिरावलेला खेळाडू, खेळावर वर्चस्व गाजवू शकत नाही. परंतु असे ठामपणे सांगणे अवघड आहे. अशा कित्येक खेळी मला पाहायला मिळाल्या आहेत, जिथे पूर्णपणे फलंदाजाचे खेळावर वर्चस्व आहे आणि गोलंदाज हताश झाले आहेत. अर्थात हा खेळाचा एकांगी भाग झाला. जिथे गोलंदाज आणि फलंदाज, दोघांनाही आपले कौशल्य दाखवायची संधी मिळत असते, तिथे घडणारे द्वंद्व हे या खेळाचे खरे सौंदर्य होय. अर्थात जिथे खेळपट्टी गोलंदाज धार्जिणी असते तिथे फलंदाजांची खरी कसोटी असते. कारण तिथे कुठल्याही क्षणी तुम्ही बाद होण्याची शक्यता असते आणि अशा खेळपट्टीवर अगदी "पन्नाशी" गाठणे देखील फार जिकिरीचे असते आणि तिथे फलंदाजांचा खरा कस लागgood length तो. हे सगळे फक्त कसोटी सामन्यात बघायला मिळते. तिथे फलंदाज आणि गोलंदाज, दोघांचीही खरी कसोटी लागत असते. दोघांना समसमान संधी उपलब्ध असते. म्हणूनच कसोटी क्रिकेट हाच खेळाडूंचा अंतिम मानदंड असतो. इथे खऱ्याअर्थी "घाम" गाळावा लागतो तसेच तुमच्या कौशल्याची इतिश्री घडत असते. अशीच एक खेळी १९८७ साली मला बंगळुरू इथल्या कसोटी सामन्यात बघायला मिळाली. आजही ती खेळी कसोटी सामन्यांच्या इतिहासात अजरामर म्हणून गणली गेली आहे आणि याचे मुख्य कारण खेळपट्टी पूर्णपणे मंदगती गोलंदाजीला पोषक होती. खेळावा लागणारा चेंडू हा किंग कोब्राच्या आवेशात येत होता आणि कधीही मरणोन्मुख डंख करू शकेल, असे वाटत होते. भारताला दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी २२१ धावा करण्याचे आव्हान होते. पाकिस्तानचा इम्रान खान, मालिका जिंकण्याच्या इर्षेने भारतात आला होता आणि पहिल्या चारी कसूरी सामने अनिर्णित अवस्थेत संपले होते. ही कसोटी १००% निर्णायक होणार आणि इथे पाकिस्तानला विजयाची संधी प्राप्त झाली होती. अडसर होता तो फक्त सुनील गावस्करचा!! या खेळपट्टीवर प्रत्येक धाव शब्दाश: लाखमोलाची होती. इथे प्रत्येक धाव "कमवावी" लागत होती. कुठला चेंडू उसळेल, लिटी वळेल, याचा अंदाज खुद्द गोलंदाजांना अचूकपणे येत नव्हता. खेळपट्टीवर चेंडू पडला की धुळीचा लोट उठायचा आणि त्यात चेंडू अचानक गिरकी घ्यायचा. अक्षरश: शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला, चेंडूकडे "टक" लावून बघायला लागायचे. अगदी, good length वर पडलेला चेंडू छातीपर्यंत उसळत होता. इथे निव्वळ तंत्र उपयोगी नव्हते तर तुमच्या मन:शांतीची प्रखर कसोटी होती. फक्त एकाग्रता असून उपयोगी नसून, त्याच्या जोडीला "आयत्या" वेळी तंत्रात बदल करायला लागण्याचे अजोड कौशल्य आवश्यक होते. सुनील इथेच असामान्य ठरला. "इक्बाल कासीम"अशक्य गोलंदाजी करत होता. बहरात २२१ धावांचा पाठलाग करताना, १४७ धावसंख्येवर अर्धा संघ परतला होता. सुनील एका बाजूने खिंड लढवत होता. सुनीलने, या खेळीत, आपण काय दर्जाचे फलंदाज आहोत, याची जगाला जाणीव करून दिली. जर का चेंडू short pitch पडला तर मागे सारून चेंडूचा सामना करायचा, हे सर्वमान्य तंत्र पण इथे चेंडूचा टप्पा थोडा पुढे पडतो आणि चेंडू छातीपर्यंत उसळतो!! बरे, नुसताच उसळत नाही तर चेंडू अवास्तवरीत्या गिरकी घेतो!! सुनील ज्या प्रकारेक्रश चेंडूचा सामना करायचा, हे नुसते बघण्यासारखे नव्हते तर शिकण्यासारखे होते. असेच काही चेंडू त्याने सरळ सोडून दिले!! विकेटकीपर चकित व्हायचा. मिडल स्टंपवरील चेंडू, केवळ अंदाजाने सुनील सोडून देतो!! याचे कारण तो चेंडू स्टम्पवरून जाणार, याची खात्री सुनीलला होती. इतकी खात्री कुठून येते? इथेच अंदाज आणि कौशल्य याचा खरा मिलाफ दिसतो. चेंडू छातीपर्यंत अचानक उसळला आणि सुनीलने मागील पायावर जाऊन, हातातील बॅटीची पकड हलकी करून, तो चेंडू, आपल्या पायाशीच थांबवला!! कितीजणांना हे जमू शकेल? असा चेंडू खेळताना, बॅटीची कड घेतली जाते आणि झेल उडू शकतो. हे क्रिकेटमधील सर्वमान्य दृश्य. जिथे चेंडू खेळणे, हीच कसोटी असताना, सुनीलने एक चेंडू फारसा फिरला नाही आणि आयत्या वेळेस half volley असल्याचे समजल्यावर. त्याच इक्बाल कासिमच्या बाजूने स्ट्रेट ड्राइव्ह मारून, चौकार वसूल केला. निव्वळ अशक्यप्राय घटना होती. पाकिस्तानी समालोचक देखील अवाक झाले होते आणि इथे मैदानावर इम्रान चिंताक्रांत. इम्रानला पूर्ण माहीत होते, जोपर्यंत सुनील मैदानावर आहे, तोपर्यंत विजय अशक्य. सुनील सत्तरीत आला आणि इम्रानने defensive fielding लावली. इम्रानला असे क्षेत्ररक्षण लावावे लागले, हीच सुनीलच्या त्या खेळीला मानवंदना होती. अशा खेळपट्टीवर फलंदाजांचा अंदाज फसणे, हा अजिबात दोष नव्हता कारण तो अंदाज येणे अशक्य होते. काहीवेळा सुनीलचा देखील अंदाज चुकला आणि इथे नशिबाची साथ मिळते. परंतु त्यामुळे नाउमेद न होता, पुन्हा मन एकाग्र करणे, हीच फलंदाजाच्या कौशल्याची पावती असते. मध्येच एक चेंडू short pitch आला पण सरळ आला!! सुनीलने आयत्यावेळी मागे सरकून मिडविकेटला ड्राइव्ह मारून चौकार मिळवला. आयत्यावेळी तंत्रात बदल करून, कशा धावा मिळवता येतात, याचे हे असामान्य उदाहरण. आलेला चेंडू वळणार नाही याची खात्री केली आणि मिडविकेटला ड्राइव्ह केला. वर्षानुवर्षे जो अनुभव गोळा केला, त्या अनुभवाची प्रचिती होती. सुनीलची अतुल्य एकाग्रता, कायम सोबत असायची पण इथे निव्वळ एकाग्रता असून भागणार नव्हते तर एकाग्रतेसोबत धावा "गोळा" करणे जरुरीचे होये अन्यथा २२१ धावांचे शिखर गाठणे अशक्य. ९६ धावांच्या खेळीत फक्त ८ चौकार होते, म्हणजे ६४ धावा त्याने पळून काढल्या!! ही खेळी म्हणजे सुनीलच्या असामान्यत्वाची शिखर खूण होय. सुनील ९६ धावांवर पोहचला आणि इक्बाल कासीमचा चेंडू अचानक भयानक उसळला आणि सुनीलचा अंदाज लवणमात्र चुकला! चेंडू बॅटीच्या पट्टीतून निसटला आणि खरंतर ग्लोव्ह्ज देखील निसटले पण मनगटाला निसटता स्पर्श झाला. एका अजरामर खेळीचा अंत झाला. इम्रान तिथेच समजून गेला, सामना आपल्या खिशात आला आणि तसेच झाले. गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर कसे खेळावे, याचा अप्रतिम मानदंड या खेळीतून सुनीलने घालून दिला. आजही सुनीलची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील अजोड खेळी मानली जाते. अगदी इम्रान सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याने खिलाडू वृत्तीने या खेळीचे कौतुक केले आहे. जिथे संपूर्ण सामन्यात, पहिल्या इनिंग मध्ये दिलीप वेंगसरकरची ५० हीच खेळी, सर्वात मोठी खेळी झालेली असताना, (पाकिस्तानच्या कुठल्याच खेळाडूने पन्नाशी गाठली नाही. अर्थात ३०, ४० अशा धावा करून त्यांनी भारताला २२१ धावांचे आव्हान दिले) त्याच खेळपट्टीवर ९६ धावांची खेळी करणे, यातच सुनीलचे अलौकिकत्व दिसून येते. अर्थात सुनील बाद झाला तेंव्हा कुणालाच सुतराम कल्पना नव्हती, हीच सुनीलची शेवटची खेळी असेल परंतु पुढे त्याने निवृत्ती जाहीर केली आणि सन्मानाने निवृत्ती कशी घ्यावी, याचा असामान्य मानदंड प्रस्थापित केला आणि म्हणूनच या खेळीचा चटका मनाला लागला.

No comments:

Post a Comment