Saturday 14 May 2016

ऐ मेरे प्यारे वतन

एक उदास संध्याकाळ. हवेतच हुरहूर पसरलेली असते. खोलीतील सगळे वातावरणच विषण्ण आणि कातर झालेले. मन कुरतडत असलेली संध्याकाळ!! सगळे पठाण आपल्या गतस्मृतीत रममाण झालेले आणि त्यामुळे बोलायचा विषय देखील त्यालाच धरुन. अंगापेराने धडधाकट असलेली व्यक्तिमत्वे पण आपल्या अफगाणिस्तान मधील गावाच्या आठवणीत गुंतलेली आणि म्हणून काहीशी हळवी झालेली. पैसा मिळवायचा, याच उद्देशाने घर सोडून दूर बंगालमधील एका खेडे वजा गावात रहात असतात. 
प्रसिद्ध कवी, ना. वा.टिळक यांनी एका कवितेत मातृभूमीवर फार सुरेख लिहिले आहे. 

"सृष्टी तुला वाहुनी धन्य!! माते,अशी रूपसंपन्न तू निस्तुला 
तू कामधेनु! खरी कल्पवल्ली! सदा लोभला लोक सारा तुला;
या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी 
सामर्थ्य नामी तुझ्या, आर्यभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी"

१९६१ साली आलेल्या "काबुलीवाला" चित्रपटातील "ऐ मेरे प्यारे वतन" हे गाणे, काळाच्या ओघात थोडे विस्मरणात गेलेले. सुप्रसिद्ध लेखक, कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या तितक्याच सुप्रसिद्ध कथेवरील हा चित्रपट. आजच्या काळातील भौतिकवादी व्यवस्थेत हा चित्रपट कदाचित "मागासलेला" वाटू शकतो पण मानवी नात्यांची जपणूक आणि नातेसंबंधातील तलम धाग्यांच्या विणीत, या चित्रपटाला आजही तोड नाही. खरतर या सिनेमाचे निर्माते बिमल रॉय आहेत आणि चित्रपट त्यांच्या पठडीतला असून देखील, त्यांनी, या चित्रपटासाठी हेमेन गुप्ता यांना पाचारण केले आणि हेमेन गुप्तांनी देखील या अजरामर कथेला योग्य न्याय दिला. 
बलराज सहानी यांनी आयुष्यात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत परंतु या चित्रपटातील "काबुलीवाला" केवळ अविस्मरणीय आहे. सगळी कथा, याच माणसाच्या भोवती फिरते आणि बलराज सहानींनी आपल्या underplay शैलीत, या भूमिकेला फारच वरच्या स्तरावर नेउन ठेवले आहे.
आता मी गाण्याकडे वळतो. गाण्याच्या सुरवातीला मेंडोलीन वाद्यावर अरेबिक धाटणीचे स्वर घेतले आहेत आणि चित्रपटात पठाण लोकांचा अंतर्भाव बघता, ते योग्यच आहे. हे गाणे जितके संगीतकार सलिल चौधरी यांचे आहे तितकेच गायक म्हणून मन्नाडे यांचे आहे. इथे थोडे तांत्रिक भागाविषयी दोन शब्द लिहितो. 

ऐ मेरे प्यारे वतन ऐ मेरे बिछडे चमन, तुझपे दिल कुर्बान 
तू ही मेरी आरझू , तू ही मेरी आबरू तू ही मेरी जान. 

गाणे अत्यंत हळव्या मन:स्थितीचे असल्याने, गायनाची बैठक देखील तरल आणि हळव्या सुरांनी मांडलेली आहे. "ऐ मेरे प्यारे वतन" हे शब्द गाताना, "ऐ" अक्षराला "शुद्ध सा" स्वराने तर पुढील "मेरे" या शब्दासाठी मन्नाडे यांनी "कोमल निषाद" स्वर जसा लावला आहे, त्याला तोड नाही. शब्दांतील सगळी आर्तता या स्वरांतून मांडली आहे आणि गाणे एकदम वरच्या स्तरावर जाते. हे गाणे आपण, कधीही सहज जाता-येताना ऐकावे, असे नसून, गाणे ऐकायचे असेल तर स्वस्थचित्त मनाने ऐकायला हवे, तरच या गाण्याची खुमारी कळेल. या एकाच सुराने सगळे गाणे भारून टाकले आहे. 
प्रेम धवन यांचे शब्द आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे साध्या शब्दातून अंतर्मुख करणारा आशय व्यक्त केला आहे. कवितेत, शब्दयोजना करताना, एक प्रकारची अपरिहार्यता येणे फार गरजेचे असते, कविता म्हणून सिद्ध होण्यासाठी. चित्रपटातील नायक, आपले घरदार सोडून परक्या प्रदेशात रहात असताना, होणाऱ्या मनाची व्याकुळता दर्शविणारे गाणे आहे. 
तेरे दामन से जो आये, उन हवाओ को सलाम 
चूम लू मैं उस जुबां को, जिस पे आया तेरा नाम 
सब से प्यारी सुबह तेरी,  सब से रंगी तेरी शाम. 

एखादा गायक जर का सुरांचे यथार्थ ज्ञान घेऊन आलेला असेल तर गाताना, शब्दांची आवश्यक जाणीव ठेऊन, आशय किती खोल वर्तवू शकतो, हे समजून घेण्यासाठी, पहिल्या अंतरा बारकाईने ऐकणे गरजेचे आहे. "तेरे दामन से जो आये, उन हवाओ को सलाम" ही ओळ गाताना, "दामन से जो आये" हे खास ऐकण्यासारखे आहे. मनाची कातर अवस्था दर्शविण्यासाठी, चालीतील "अरेबिक" ढंग कायम ठेऊन,"आये" हा शब्द कंपायमान सुरांत घेतला आहे. वास्तविक श्रुतींचे गणित, याचे विश्लेषण करू शकेल पण त्यात क्लिष्टता अधिक!! गाण्याची "संस्कृती" ध्यानात घेऊन, गायन कसे करावे, याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. 

मां का दिल बन के कभी सीने से लग जाता हैं तू 
और कभी नन्ही सी बेटी बन के याद आता हैं तू 
जितना याद आता हैं तू , उतना तडपाता हैं तू. 

गाण्यात फारसा वाद्यमेळ नाही. केवळ मेंडोलीनचे व्याकूळ करणारे स्वर आणि तालवाद्य, इतकीच वाद्ये आहेत परंतु मेंडोलीनचे स्वर इतके हळवे आणि कातर आहेत की इथे दुसरे कुठलेही वाद्य "उपरे" ठरले असते. चालीत थोडा फेरफार केला आहे म्हणजे लय तशीच ठेवली आहे पण स्वरांचा "ठेहराव" बदलेला आहे तसेच शब्दोच्चार अधिक संदिग्ध केले आहेत. चित्रपटात, पठाण आणि त्या कुटुंबातील छोटी मुलगी यांच्या नात्याचे वेगवेगळे पदर दाखवले आहेत आणि या गाण्याच्या दरम्यान, बलराज सहानीला आपल्या अफगाणिस्तान मधील लहान मुलीची आठवण येते आणि हीच आठवण "और कभी नन्ही सी बेटी" हे शब्द गाताना खोलवर होते. संगीतकार आणि गायक, दोघेही तितकेच तालेवार असतील तर हाताशी असलेल्या रचनेचे कसे सोने करतात, याचा सुंदर वस्तुपाठ आहे, 

छोड कर तेरी जमी को दूर आ पहुचे है हम 
फिर भी है यही  तमन्ना तेरे जारो की कसम 
हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम. 

गाण्याची शब्दकळा बघितली तर प्रत्येक कडव्यात, आशय तसाच ठेऊन, निरनिराळ्या भावनांच्या छटा वाचायला मिळतात. मातृभूमीचा वियोग, पुढे काहीसे प्रतीकात्मक चित्रण पण त्यातही आपल्या मुलीची आठवण आणि शेवटी "हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम" असे लिहून आयुष्याच्या इतिकर्तव्यतेची असोशी!! वास्तवात कितीजणांना असे भाग्य उपभोगायला मिळते? अत्यंत साध्या शब्दातून आपल्याला खोल अभिव्यक्ती समजून घेता येते आणि हेच गाणे अतिशय अर्थपूर्ण होत जाते. 
वास्तविक, सलिल चौधरी यांची ख्याती म्हणजे गाण्यात काहीना काहीतरी वेगळेपण करायचे, प्रसंगी पाश्चात्य सिंफनी संगीताचा आधार घेऊन, रचनेत वैविध्य आणायचे परंतु इथे सगळे गाणे केवळ मेंडोलीन वाद्यावर तोलले आहे. गाण्याची चाल(च) इथे अतिशय गहिरी असल्याने, वाद्यमेळ फारसा वापरलेला नाही आणि याचा परिणाम, गाण्यातील गायन आणि शब्द, या दोन्ही घटकाची अभिव्यक्ती आपल्या मनाला भावते. 
गाण्याची चाल तशी सगळ्या अंतऱ्याना सारखीच आहे पण तरीही प्रत्येक ओळीतील "खास" शब्द ध्यानात घेऊन, त्यावर नेमका जोर देऊन, नेमका आशय व्यक्त केला गेला आहे. पहिला अंतरा ऐकताना आपण, "आये" शब्दावरील कंपायमान हरकत ऐकली तर इथे शेवटचा अंतरा ऐकताना, "छोड कर तेरी जमी को" गाताना "जमी" शब्दावर अशीच अर्थपूर्ण हरकत घेतली आहे आणि रचनेतील उदासवाणा भाव अधिक खोल दर्शवला आहे. 
संगीतकार म्हणून त्यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, काही बाबी विशेषत्वाने ध्यानात घ्याव्याच लागतील. त्यांच्या मनात वैश्विक संगीताची एक धारणा होती आणि त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, त्यांना जे सांगीत निर्णय घ्यावे लागत होते, त्याला बऱ्याच मर्यादा प्राप्त झाल्या होत्या. सुदैवाने सलिल चौधरींची गीतसर्जन शक्ती आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व मिळवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती.त्यांचे संगीत ऐकताना अनेक वेळा हिंदी चित्रपटसंगीतात जे संगीत अस्तित्वात होते, त्यापेक्षा टिकाऊ आणि सार्थ संगीतरचना करण्याची इच्छा होती आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे नव्हते.    
खरेतर गाण्याचे चित्रण यथामुलक आहे, त्यात काही खास "दिग्दर्शकीय" कौशल्य दिसत नाही परंतु कथेच्या अंगाने चित्रीकरण केल्याने, मुळातल्या सखोल आशयाला, अत्यंत साधेपणाचे अप्रतिम अस्तर लाभले आहे. गाणे ऐकताना आणि ऐकून झाल्यावर, आपल्या मनावर खरा  ठसा उमटतो, तो मन्नाडे यांच्या व्याकूळ करणाऱ्या सुरांचा आणि तसेच बलराज सहानींच्या भावगर्भार चेहऱ्याचा.    

Sunday 8 May 2016

आये बहार बन के लुभाकर



संध्याकाळची रम्य प्रणयी वेळ, मोकळ्या मैदानावर एक राजहंसी, राजस जोडपे एकत्र आलेले. अव्यक्त शब्दातून भावना व्यक्त करीत गुंजारव करणारे. काहीसे अधिरे असल्याचे थरथरणाऱ्या अधरांतून जाणवत असताना, मुग्धतेची ग्वाही देणारे.  जशी संध्याकाळ उलटायला लागते, तशी प्रेयसीच्या मनाची घालमेल आणि निघण्याची धडपड.

"जें मत्त फुलांच्या कोषांतून पाझरले,
निळ्या लाघवी दंवांत उलगडले, 
जें मोरपिसांवर सांवरले, 
    ते - त्याहुनही - आज कुठेंसे 
    पुन्हा एकदां 
    तशाच एका लजवंतीच्या 
    डोळ्यांमध्ये - डोळ्यांपाशी --
    झनन-झांजरें मी पाहिलें…….   

सुप्रसिद्ध कवी, पु.शि. रेग्यांच्या या अप्रतिम ओळींतून रेखाटले गेलेले नवथर प्रेयसीची चित्र जणू काही, चित्रपटातील मधुबालाच्या भावनाच व्यक्त करते.  खरतर या कवितेत, "झनन-झांजरें", "ठिबक-ठाकडे" सारखे काहीसे अर्थशुन्य वापरून, अर्थपूर्ण अभिव्यक्ती सादर केली. 
 १९५६ साली आलेल्या "राजहठ" सिनेमातील हे गाणे, काहीसे अप्रसिद्ध पण तरीही अतिशय गोड चालीचे गाणे. मधुबाला, प्रदीप कुमार, सोहराब मोदी, मुराद इत्यादी अभिनेते या चित्रपटात आहेत. कथावस्तू अगदी सरधोपट, साधी आहे. दोन राजघराण्यातील वैर आणि त्यात होरपळले जाणारे प्रेम, याभोवती चित्रपट गुंफला आहे. अर्थात अभिनयाचा भाग हा बराचसा मधुबालाने उचलला आहे. सोहराब मोदी काही प्रसंगात उठून दिसतात पण प्रभाव तात्कालिक ठरतो. त्याकाळात बहुतेक चित्रपट हे त्यातील गाण्यांवर तगलेले आहेत आणि हा चित्रपट अजिबात अपवाद नाही. शंकर/जयकिशन या जोडीने,चित्रपटातील गाणी केली आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत मोलाची भर टाकणारी कामगिरी आहे.
संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांच्याकडे बघायचे झाल्यास, त्यांच्या कारकिर्दीचे काही ठराविक टप्पे आहेत. १] राजकपूर, २] राजेंद्र कुमार, ३] शम्मी कपूर आणि ४] इतर चित्रपट. या जोडीची खासियत अशी, त्यांनी वरील तिन्ही अभिनेत्यांच्या शैलीनुसार गाणी तयार केली परंतु इतरत्र त्यांनी जे चित्रपट केले, ती गाणी या सगळ्यांच्या चित्रपटापेक्षा वेगळ्या शैलीने केली आणि आपल्या सर्जनशीलतेचा असामान्य दाखला दिला. या दृष्टीने विचार करता, हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासात यांचे नाव निश्चितपणे फार वरच्या श्रेणीत बसवावे लागेल. अर्थात जशी कारकीर्द दीर्घ होते तिथे गाण्यांच्या दर्जात कमअस्सल फरक हा नेहमीच पडत राहतो आणि तसा फरक यांच्या बाबतीत स्पष्टपणे बाजूला काढता येतो. 

आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, शायर हसरत जयपुरी यांची शब्दकळा आहे. कविता म्हणून वाचायला गेल्यास, ओळींतील लय लगेच तोंडवळणी होते. चित्रपट गीतांसाठी अशा शब्दांची खरी आवश्यकता असते. हसरत जयपुरी शायर म्हणून फारसे वरच्या श्रेणीत कधी गणले नाहीत पण तरीही शब्दांचा दर्जा, एका विविक्षित दर्जाच्या खाली देखील कधी घसरू दिला नाही. सहज, सुलभ शब्दरचना, हेच बहुतांशी त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य कायम राहिले. गेयताबद्ध शब्दरचना करणे, हेच त्यांचे प्रमाणभूत काम, असे म्हणता येईल.  
गाण्याची सुरवात दीर्घ हुंकाराने होते पण त्या हुंकारातच चालीच्या रचनेची बीजे दडली आहेत. वास्तविक रफीच्या गळ्याची जातकुळी बघत, नैसर्गिक मर्दानी, दीर्घ पल्ल्याचा आवाज. तसे असून देखील हा हुंकार आलापीच्या अंगाने खालच्या पट्टीत घेतलेला आहे. बागेश्री रागाची किंचित छाया आहे पण तरी देखील चालीची सुरवात म्हणून स्वतंत्र आहे. दादरा तालाची योजना आहे पण अगदी खालच्या अंगाने वादन केले आहे. परिणाम असा, रफीचे गायन आणि हसरत जयपुरी यांचे शब्द, दोघांचा आस्वाद सहजशक्य होतो. 
आता तांत्रिक शब्द योजायचे झाल्यास, गाण्याची "स्थायी" म्हणजे ध्रुवपद ऐकताना, "आ" शब्द घेताना "गंधार + मध्यम" घेतले आहेत तर पुढे "ये" शब्द "धैवत" स्वरावर स्थिरावला आहे. बागेश्री रागाची छटा या सुरांतून अधिक स्पष्ट मिळते. 
आता लालित्याच्या अंगाने बघायला गेल्यास,  नुकतीच प्रेयसी भेटून परतत असताना, मनाला जाणवणाऱ्या विषादाची ही रचना आहे. असले प्रसंग हिंदी चित्रपटात असंख्य बघायला मिळतात पण तरीही रसिकांच्या ध्यानात राहतात, याचे प्रमुख कारण, पार्श्वभागी ऐकायला मिळणारी अप्रतिम गाणी. हाच प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन, संगीतकाराने तर्ज बांधली आहे. 

आये बहार बन के लुभाकर चले गये 
क्या राज था जो दिल में छुपाकर चले गये 

या स्थायी नंतरचे वाद्यमेळाचे संगीत, प्रामुख्याने व्हायोलीन वाद्यावर घेतलेले आहे आणि ती सुरावट जरा बारकाईने ऐकली तर काहीशी पाश्चात्य धाटणी आढळते!! संगीतकाराची प्रयोगशीलता अशीच सिद्ध होत असते. वेगळ्या अंगाने बांधलेली धून देखील, परत मूळ चालीशी नेमकेपणी जोडून घेणे, हे फार कौशल्याचे काम आहे. या ओळी गाताना रफीने देखील काही शब्द इतक्या अप्रतिमरीत्या   त्याबद्दल त्या गायनाला देखील वेगळी अशी दाद द्यावीशी वाटते. जिथे शब्दांवर योग्य "वजन" द्यायला हवे, तिथेच रफीने आपल्या गायनाची करामत दाखवली आहे. "छुपाकर" म्हणताना, आवाजात किंचित थरथर आणली आहे आणि त्यामुळे गाण्यात, शब्दांच्या पलीकडले भाव दिसायला लागतात. 

कहने को वो हसीन थी आंखे थी बेवफा 
दामन मेरी नजर से बचाकर चले गये 
आये बहार बन के लुभाकर चले गये 

हा पहिला अंतरा, दोन वेळा घेतला आहे. शब्दकळा गझलेच्या वजनात लिहिली गेली आहे आणि गायन देखील त्याच अंगाने केले गेले आहे. पहिली ओळ, स्थायी रचनेशी नाते सांगत गायली जाते परंतु परत तीच ओळ वरच्या पट्टीत गायली जात, गाताना बागेश्री मधील "ग म म(तीव्र)" (एक गंमत - राग बागेश्री मध्ये "तीव्र मध्यम" स्वराला जागा नाही, पण तरीही इथे बसवला आहे!!) अशा सुरांवरून गायन हिंडते. रफी गायक म्हणून किती श्रेष्ठ आहे, हेच या ओळीच्या गायनातून समजून घेता येते. खास अवलोकण्याचा भाग असा आहे, ही ओळ झाल्यावर, दुसरी ओळ परत मूळ चालीशी संलग्न होते. हा सगळा सांगीतिक प्रवास खरच फार विलोभनीय आहे. रागाच्या सावलीत राहून, चालीचे स्वतंत्र अस्तित्व कसे टिकवायचे, याचा हे गाणे म्हणजे आदीनमुना आहे. 

इतना मुझे बताओ मेरे दिल की धडकनो 
वो कौन थे जो ख्वाब दिखाकर चले गये  
आये बहार बन के लुभाकर चले गये 

हा दुसरा आणि शेवटचा अंतरा तांत्रिक अंगाने तसाच बांधला आहे. सुतराम फरक केलेला नाही. बहुदा असे असावे, आधीची स्वररचना रसिकांच्या मनावर गडद परिणाम घडवून आणण्यासाठी, तोच स्वरबंध स्वीकारला असावा. अन्यथा दुसरे कुठलेच कारण संय्युक्तिक असे दिसत नाही. गायक म्हणून रफीच्या गायनाचा दर्जा इथे सुरेख दिसून येतो. बरेच ठिकाणी, रफी गाताना काही "गिमिक्स" घेण्याच्या नादात वाहवत जातो पण इथे मात्र संपूर्णपणे संयमित आविष्कार आहे. लयबद्ध शब्दकळेचा अतिशय योग्य मान राखून, कुठेही अकारण गळा भिरकावलेला नाही. याचा परिणाम, आपल्याला रचनेचा एकसंधपणा ऐकायला मिळतो वरच्या सुरांत जाताना देखील, मर्यादित स्तरावर गायकी ठेवल्याने, शब्दांतील आशय नेमक्या सुरांतून व्यक्त केला गेला आहे. शब्दांतून भावनेचे जे औचित्य राखले गेले आहे, त्याला रफीने आपल्या संयमित गायनाने अधिक सुंदर केले आहे.   

संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांची रचनादृष्टी इतकी चित्रपट - अंगाची होती, की चित्रित दृश्यास आवश्यक आपल्या ध्वनिमुद्रित रचनांतही योग्य तसे बदल करण्यास, त्यांनी मागे-पुढे बघितले नाही. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वाद्यवृंदावरील नियंत्रण. तसेच त्यांनी केलेल्या कामांतील विविधता अभ्यासण्यासारखी आहे. रागसंगीताबाबत दोन टोके दिसतात. काही रचना, सरळ सरळ रागाच्या पारंपारिक चौकटीमध्ये बांधल्या आहेत तर काही रचना रागाचा निव्वळ आधार घेऊन, त्या स्वरचौकटीत नव्याने स्वररचना केलेली आढळते. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातील दृश्यासाठी रचना करणे जेणेकरून, बांधलेले गाणे हा चित्रपटाचा अंगभूत भाग म्हणून  निर्देश करता येईल. या सगळ्यातून निष्कर्ष असा निघतो, चित्रपटाची हाताळणी, विषयाचे तारतम्य याला आपल्या रचनांसाठी पायाभूत कच्चा माल समजून, त्यानुसार संगीत रचना केल्या आणि तसे करताना, आपल्यातील सर्जनशीलतेची जाणीव अधिक प्रखर केली. त्यासाठी प्रसंगी पाश्चात्य परंपरेपासून त्यांनी केलेल्या उचलीमधून हिंदी चित्रपट संगीताचा आणखी एक विशेष उभारून वर आला आणि हा मुद्दा, त्यांनी तयार केलेल्या नृत्यगीतांच्या अवकाशात तपासून बघता येतो.